March 28, 2007

एक रंगलेला मधुकंस..

राम राम मंडळी,

आमच्या ठाण्याचे डॉ विद्याधर ओक, आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ओक यांचं घर मला परकं नाही. डॉ विद्याधर ओक यांच्यावर सवडीने एखादा विस्तृत लेख लिहिणारच आहे, आत्ता त्याबद्दल फार लिहीत नाही.


गेल्या वर्षीची गोष्ट. गोकुळअष्टमीचा दिवस होता. संध्याकाळच्या सुमारास मला आदित्य ओकचा फोन आला, "तात्या, जिवंत आहेस का? साडेआठ नऊच्या सुमारास माझ्या घरी पोच. गाण्याची मैफल आहे."


झालं! आपली काय चैनच झाली. मी ठरल्यावेळेला गाण्याची मैफल ऐकायला गेलो. अगदी घरगुती स्वरूपाची मैफल होती. गिने-चुने श्रोते, त्यातच मी एक. मैफल अगदी मस्तच रंगली होती. मंडळी, मोठ्या मैफलींची मजा वेगळी, पण खाजगी, घरगुती स्वरूपाच्या मैफली नेहमीच अधिक रंगतात हा माझा आजपर्यंतचा अनुभव. 'रंगमंच' हा प्रकार नाही, गवई आणि श्रोते एकाच सतरंजीवर. एखाद्या चपखल समेला अगदी गवयाचा हात हातात घेऊन दाद देता यावी असा हा संवाद असतो. ही मैफलही तशीच अगदी छान जमली होती.


"दरस मोहे राम" ही झपतालातली बंदिश. मधुकंस फार सुरेखच जमला होता. अगदी छान लयदार, आणि सुरेल काम सुरू होतं! कोण बरं गात होतं?


मंडळी, ती मैफल होती एका तरुणाची. विलक्षण प्रतिभावंत, अवलिया कलाकार पं वसंतराव देशपांडे यांच्या नातवाची. त्याचं नांव राहुल देशपांडे.


राहुल हा आजच्या तरुण पिढीतला एक उमेदीचा कलाकार. गाणं तर रक्तातच. पण राहुलला आजोबांकडून तालीम घ्यायचा कधी योग आला नाही. कारण राहुल अवघा तीन-चार वर्षांचा असतानाच वसंतराव गेले. पण जाताना तो प्रेमळ आजा आपल्या नातवाच्या डोक्यावर हात ठेवूनच गेला. वसंतरावांचा गाण्यातला वैभवशाली वारसा राहुलला मिळाला आहे हे खरंच. पण मंडळी, गाण्यात नुसता पिढीजात वारसा असून चालत नाही. गाणं हे जरी रक्तातच असलं तरी ते शिकावं लागतं, त्याला श्रवण, चिंतन, मनन याचीही पुरेपूर जोड लागते. शिक्षण, श्रवण, आणि सततचे चिंतन व मनन असेल तरच मुळात असलेला गानझरा अधिक प्रसन्नतेने वाहू लागतो, प्रवाही होतो. राहुलच्या बाबतीत असंच झालं.


राहुलमध्येही गाणं होतंच, पण त्यानेही किराण्याचे पं गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे गाण्याची रीतसर तालीम घ्यायला सुरवात केली. गंगाधरबुवांनंतर, पं मधुसूदन पटवर्धन यांच्याकडे राहुलने तालीम घेतली. कुमारजींच्या शिष्या उषाताई चिपलकट्टी यांच्याकडेही राहुल जवळ जवळ सात वर्ष गाणं शिकला. अजूनही त्याचं संगीतशिक्षण सुरूच आहे. आजही तो कुमारजींचेच शिष्य पं पंढरीनाथ कोल्हापुरे, कुमारजींचे चिरंजीव पं मुकुल शिवपुत्र यांच्याकडे गाण्याची तालीम घेत आहे. परंपरेचं गाणं न गाणाऱ्या वसंतरावांच्या नातवाचा ओढा कुमारजींनी सुरू केलेल्या दुसऱ्या अपारंपरिक गानप्रवाहाकडे असणं हे साहजिकच आहे!


मी राहुलची परवाची मैफल ऐकली आणि त्याच्या गाण्यातला सच्चेपणा मला जाणवला. राहुलने मैफलीची सुरवात छायानट या रागाने केली. मंडळी, छायानट हा खास करून ग्वाल्हेर परंपरेत गायला जाणारा राग. या रागाचा मला अपेक्षित असणारा विस्तार राहुलने केला नाही, पण ती वेळेची घडी झाली असे आपण म्हणू. कुमारांच्याच भाषेत सांगायचं तर एखाद्या रागातून प्रत्येक वेळेला हवं तसं मनोगत व्यक्त करता येतच असं नाही. छायानट नंतर राहुलने मधुकंस सुरू केला आणि तिथे मात्र राहुल छान रमला. मधुकंस म्हणजे काय विचारता मंडळी! शृंगाररसातील मधुरता ज्याच्यात पुरेपूर भरली आहे असा मधुकंस! जमला तर भारीच जमतो बुवा. राहुलने मधुकंस मस्तच जमवलान. सुरवातीचा विलंबित झपताल आणि 'आजा रे पथिकवा' ही द्रुत बंदिश छानच रंगली होती.


'बनराई बोराय लागे'! ओहोहो, राहुलने मधुकंस नंतर 'सोहनी-बसंत' सुरू केला. त्यातलीच 'बनराई..' ही बंदिश. 'सोहोनी-बसंत' ही खास कुमारांची रचना. तसं पहायला गेलं तर सोहोनी आणि बसंत हे दोन्हीही दिग्गज राग. त्यांच्यात योग्य तो समतोल साधत हा जोड राग गाणं हे कठीणच. राहुलने मात्र ह्या रागांचं बेअरींग छानच सांभाळलंन असं म्हणावं लागेल. राहुलचा सोहोनी-बसंत ऐकताना मजा आली.


'सोहोनी-बसंत' नंतर राहुलने राजकल्याण रागातील 'ऐसी लाडलीकी..' ही द्रुत बंदिश सुरू केली. क्या बात है, राहुलचं 'ऐसी लाडलीकी' छानच जमलं होतं. मंडळी, राजकल्याण ही खास वसंतरावांची खासियत. राजकल्याण म्हणजे पंचम विरहित यमन. तरीही राजकल्याणचं वेगळं असं चलन आहे आणि ते सांभाळूनच तो राग गावा लागतो. पंचम न लावता नुसताच यमन गायचा असा याचा अर्थ नव्हे! एकंदरीत राहुलचं 'ऐसी लाडलीकी' छानच चाललं होतं. जमून गेलं.


त्यानंतर राहुलने जनसंमोहिनी रागातली एक बंदिश म्हटली. हा राग मला व्यक्तिशः फारसा भावला नाही. कलावती रागात शुद्ध रिषभ, यापलीकडे मला तरी या रागात फारसं काही सापडलं नाही, जाणवलं नाही. सरतेशेवटी 'सुनता है गुरूग्यानी' या कुमारांच्या निर्गुणी भजनाने राहुलने मैफलीची सांगता केली. हे निर्गुणी भजनदेखील राहुलने अगदी तल्लीनतेने सादर करून श्रोत्यांना अंतर्मुख केलं. श्री समय चोळकर यांनी तबल्यावर आणि आदित्य ओक यानी संवादिनीवर अगदी रंगतदार साथ करून मैफलीत मजा आणली.


असो. मंडळी, एकंदरीत राहुल देशपांडे या माझ्या मित्राकडून मला बऱ्याच अपेक्षा आहेत. अगदी सुरेल गातो, ताला-लयीची अतिशय चांगली समज आहे. जे गातो ते स्वतःचं गातो, स्वतःच्या बुद्धीने गातो. त्याच्या गाण्यात मला विचारांचा, बुद्धीचा भाग बराच दिसला. सरगम गायकीवरही त्याची चांगली पकड आहे. आलापी सुरेल असून ताना निश्चितच खूप कल्पक आहेत. त्याचं गाणं अत्यंत प्रवाही आहे, सतत पुढे जाणारं आहे. बुद्धीवादी आहे. अर्थात ही त्याच्या आजोबांचीच खासियत. पण कधीतरी, कुठेतरी राहुलने आलापीतही जरा जास्त वेळ रमावं, त्यामुळे त्याचं गाणं अधिक समृद्ध होईल असं मला वाटतं. तानेतले, किंवा सरगमातले लहान लहान झरे, प्रवाह नक्कीच छान वाटतात, पण कधीतरी आलापीचा एखाद मोठा जलाशयही बघायला खूप सुरेख वाटतो. राहुलशी बोलताना ही बाब मी त्याला सांगितली होती, आणि त्यालाही ती पटली असावी असा माझा अंदाज आहे!
असो. आज राहूलसारखी तरूण मंडळी कुणाकडेही sms ची भि़क्षा न मागता रियाज करत आहेत, संगीताची साधना करत आहेत, ही गोष्ट मला खूप मोठी वाटते!




मंडळी, राहुलचं गाणं ऐकून मला जे जाणवलं ते मी इथे मोकळेपणानी लिहिलं आहे. त्याच्यातली मला जाणवलेली सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 'मी वसंतरावांचा नातू आहे म्हणून मला मोठं म्हणा' असा भाव त्याच्याकडे मुळीच नाही. वास्तविक एवढ्या मोठ्या गायकाचा नातू म्हणजे लोकांच्याही अपेक्षा बऱ्याच असतात. त्याचं दडपण राहुलला येत नसेल, असंही नाही. पण त्याच्या गाण्यातून ते मला जाणवलं नाही. तो जे काय गातो ते अगदी सहज आणि त्याचं स्वतःचं गातो. आणि मंडळी, मलातरी हीच गोष्ट मोठी वाटते. अर्थात, त्याच्या गाण्यात वसंतरावांचा ढंग निश्चितच आहे. आणि ते साहजिकही आहे. पण जे काय आहे ते अस्सल आहे. कुठेही नक्कल नाही.

असो, राहुलला त्याच्या भविष्यातील गानकारकीर्दीकरता मी अनेक अनेक शुभेच्छा देतो, सुयश चिंतितो. आज राहुलचं वय अवघं २७-२८ वर्ष आहे. अजून त्याला गाण्यात खूप काही करायचं आहे, शिकायचं आहे आणि अधिकाधिक उत्तम गायचं आहे. या सगळ्याकरता त्याला अगदी मनापासून शुभेच्छा! आज मी राहुल देशपांडेची मैफल ऐकली, अजून ३० वर्षांनंतर मला पं राहुल देशपांडे यांची एखादी जबरदस्त रंगलेली मैफल ऐकायला मिळावी हीच सदिच्छा! ;)

मला घाई नाही, मी थांबायला तयार आहे. कारण मला बऱ्याच आशा आहेत!
--तात्या अभ्यंकर.

March 20, 2007

आणि दीपस्तंभ ढासळला...

राम राम मंडळी,

ही गोष्ट असेल १९९०-९१ सालची. मी तेव्हा प्रभादेवी येथे असलेल्या जी एम ब्रेवरीज या सरकारमान्य देशी दारूच्या कंपनीत लेखा विभागात नोकरी करत होतो. नोकरी, गाणं, खाणं, मित्रमंडळी असं अगदी झकास आयुष्य सुरू होतं. (तसं ते आजही सुरू आहे म्हणा!;)

आमची म्हातारी अगदी सुगरण हो. त्यामुळे खाण्यापिण्याच्या शौकाला अगदी घरातूनच खतपाणी मिळालं. घरी आईच्या हातचं अगदी उत्तम, सुग्रास खायला मिळायचंच, शिवाय बाहेरही कुठे काय चांगलं मिळतं अशी ठिकाणं शोधणे, त्या ठिकाणांना नियमितपणे भेटी देणे, हाही माझा एक छंदच. बरं, शिवाय गाणं ऐकण्याचाही शौक. त्या निमित्ताने बहुतेक शनिवार-रविवार अगदी यथास्थित गाणंही ऐकणं व्हायचं. चांगलं गाणं ऐकलं की खाणंही अधिक चवदार लागतं, आणि चांगलंचुंगलं खाऊन गाण्याची मैफल ऐकली की ते गाणंही अधिक सुरेल, लयदार वाटतं! असं हे गाण्या-खाण्याचं सुष्टचक्र! ;)

इथे काय अण्णांची मैफल आहे, चला! तिथे काय मालिनीबाईंचं गाणं आहे, चला! आज काय किशोरीताई, उद्या काय वीणाताई, परवा काय आमच्या उल्हासकाकांचंच गाणं आहे, चला! बरं गाण्याची मैफल संपल्यावर मित्रमंडळींबरोबर पुन्हा मग एकदा यथास्थित कुठेतरी खाणंही व्हायचं. आहाहा, काय तो अण्णांचा शुद्धकल्याण, किंवा काय किशोरीताईंनी आज सुरेख अहीरभैरव मांडलाय, क्या बात है असं म्हणत म्हणत गाण्यानंतर खादाडीही अगदी यथास्थित व्हायची. गाणं आवडल्याच्या आनंदात दोन घास जास्तच जायचे! ;)


तर मंडळी, असा अगदी सुखाचा काळ चालला होता. पण काही लोकांना मी संपादन केलेली शारीरिक माया बघवेना;) मग लागले मला सल्ले द्यायला. 'तात्या, अरे किती जाड्या झाला आहेस. जरा डाएट कर की. नाहीतर तरुण वयातच नाना व्याधी होऊन मरशील ना लेका फुक्कट!' असं घाबरवायचे. कॅलरीजची, आणि त्या प्रमाणातल्या श्रमांची, वजना-उंचीची आणि कसली कसली आकडेमोड करून दाखवायचे.
मग मंडळी, मी पण ठरवलं एक दिवस, की बास्स.. उद्यापासून माझं डाएट सुरू. अगदी मोजकंच खायचं, सात्त्विक खायचं. तिखट, तेलकट, मटण, मासे, पान, तंबाखू, सगळं बंद! गाणंही बंद. म्हणजे मग अनायसे खाणंही जास्त होणार नाही. हे सगळे मोह टाळायचे. बास्स ठरलं, आता दाखवतोच जगाला, तात्या काय करू शकतो ते!


दुसरा दिवस उजाडला. सकाळी लवकर उठून दुकानातून गायीचं दूध घेऊन आलो. म्हशीच्या दुधात फॅटस् जास्त असतात म्हणे. नकोच ते. सकाळचा चहाही प्यायलो नाही. फक्त अर्धा कप गायीचं दूध. तेही साखर न घालता. आईला काही कळेचना. तिने आदल्या रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांचे तूप-गूळ घालून लाडू केले होते हो. मी ओरडलोच तिच्या अंगावर. "तुला कळत कसं नाही? मुलगा हवाय की नको? आजपासून माझं डाएट आहे. सकाळचा नाष्टाफिष्टा सगळं बंद. तू पटकन मला दोन फुलके आणि सोबत थोडी गाजराची कोशिंबीर, असाच डबा भरून दे. रात्रीही माझ्याकरता फक्त दोन फुलके आणि मुगाची कोशिंबीर एवढंच जेवण कर."

"अरे मग तुला हे तूप-गूळ-पोळीचे लाडू केले आहेत ते नकोत? असं काय रे करतोस. खा की रे एखादा!"
काय सांगू मंडळी, पाणी तरारलं हो त्या माउलीच्या डोळ्यात! देव काही कुठे फार लांब नसतो हो, आपल्या घरातच असतो! असो...


कार्यालयात पोहोचलो. आमचा दत्तोबा शिपाई माझा अगदी लाडका. तो चहा घेऊन आला. झालं! मी जवळ जवळ खेकसलोच त्याच्या अंगावर. "परत घेऊन जा हा चहा. नकोय तो मला. तू चहात साखर जरा जास्तच घालतोस. आणि हो, आजपासून मी चहा सोडला आहे. पुन्हा माझ्याकरता चहा घेऊन येऊ नकोस."
वाईट वाटलं हो बिचाऱ्याला. काही बोलला नाही, चुपचाप परत गेला. नेहमी प्रसन्न असणारा तात्या आज असं का वागला, हे कळेचना त्याला.

जरा वेळाने पुन्हा टेबलापाशी आला. एक झकासपैकी मोतीचुराचा लाडू माझ्यापुढे करत म्हणाला, "घ्या तात्या. लाडू घ्या. कालच माझ्या बहिणीचा साखरपुडा झाला."

लाडू पाहून माझ्या डाएटचं गळू पुन्हा एकदा ठणकायला लागलं होतं. पण ते गीतेत कुठेसं म्हटलं आहे ना, 'क्रोधात भवति संमोह.. का कायसं, म्हणून यावेळी मी क्रोध आवरला. तो बापडा आपल्या बहिणीचा साखरपुडा झाल्याबद्दल कार्यालयातील प्रत्येकालाच मोठ्या प्रेमाने लाडू वाटत होता हो. मी शक्य तितक्या सौम्य शब्दात त्याला म्हटलं. "अरे आजपासून मी डाएटवर आहे. मला फक्त त्यातला एक कण दे आणि तुझ्या बहिणीला माझ्या शुभेच्छा सांग".

तेवढ्यात माझा आणि दत्तोबाचा संवाद कुणीतरी ऐकला आणि "अरे तात्या डाएटवर आहे रेऽऽऽ..." असं आख्ख्या कार्यालयभर तो मनुष्य ओरडत सुटला. कसला कुत्सित हर्षोन्माद त्याला झाला होता कुणास ठाऊक! ;) सगळं कार्यालयच खी खी करत माझ्याकडे पाहून हसायला लागलं.

मी मात्र अगदी शांत होतो. एखाद्या दीपस्तंभासारखा!! मनातल्या मनात म्हणत होतो, 'देवा त्यांना क्षमा कर. ते कुणाला हसताहेत हे त्यांना कळत नाही.'

दुपार झाली. सगळ्यांनी आपापले डबे उघडले. शिवा माहिमकर हा माझा खास दोस्त. कार्यालयात माझ्या शेजारीच बसायचा. त्यानेही आपला डबा उघडला. माझं लक्ष नकळत त्याच्या डब्याकडे गेलं. शिवाच्या डब्यात सुंदरशी बैदाकरी दिसत होती.

"काय तात्या, बैदाकरी खाणार काय? मस्त आहे एकदम."

एक नाही, नी दोन नाही. मी शिवाला काहीच उत्तर दिलं नाही. चुपचाप माझा डबा उघडला. बघतो तर काय? दोन फुलके आणि गाजराची कोशिंबीर तर होतीच, पण शिवाय बेसनाच्या दोन वड्याही होत्या. कालच आईने केल्या होत्या. 'मुलगा फक्त अर्धा कप दूध पिऊन कामावर निघालेला, शिवाय डब्यात फक्त दोन फुलके आणि गाजराची कोशिंबीर. कसं व्हायचं त्याचं?' राहवलं नसेल हो त्या माउलीला! म्हणून तिने माझ्या नकळत त्या वड्या डब्यात दिल्या असतील!

एकीकडे पोटातली खवळती भूक, आणि दुसरीकडे मारे 'तात्या, काय आहे हे जगाला दाखवूनच देतो' काय, नी 'दीपस्तंभासारखा उभा होतो' काय अशी सगळी पोकळ वाक्य! मारे डाएट करायला निघालो होतो, मोह टाळायला निघालो होतो.

'ख्रिस्ताला जमलं, बुद्धाला जमलं, आम्हीही हुरळून गेलो. पण ते दीपस्तंभ होते. आम्ही मात्र केरसुणीने समुद्राच्या लाटा परतवायला निघालो होतो!' हे गुरुवर्य भाईकाकांच्या 'तुझं आहे तुजपाशी' नाटकातलं एक वाक्य उगाचच आठवून गेलं!

मंडळी खरं सांगतो, आईने डब्यात दिलेल्या, छानशी चारोळीची तीट लावलेल्या त्या बेसनाच्या वड्या पाहिल्या आणि अगदी भरून आलं हो. भूकसुद्धा अगदी फारच लागली होती. बास्स! पुरे झाली ही डाएटची थेरं असं मनाशी म्हटलं आणि, आणि....

दीपस्तंभ ढासळला.........!! ;)


"दत्तोबाऽऽऽ.." अशी मोठ्याने हाक मारली. "कुठायत ते मगासचे लाडू? घेऊन ये मला."

"शिवा, तुझा डबा आण इकडे, त्यातली बैदाकरी मला या फुलक्यांबरोबर खायची आहे."

"दत्तोबा, हे एवढेसे दोन फुलके मला पुरणार नाहीत. समोरच्या हॉटेलमधून गरमागरम पुरीभाजी माझ्याकरता बांधून घेऊन ये. त्याला म्हणावं, "पुऱ्या जरा छान लालसर तळ."

आणि काय सांगू मंडळी, ते मगासचं सुतकी वातावरण क्षणात बदललं. जिवाचा जीवलग शिवा मला म्हणाला, "अरे तात्या, सगळी बैदाकरी संपवलीस तरी चालेल रे!"

फुलक्यांबरोबर बैदाकरी हाणली. सोबतीला गाजराची कोशिंबीर छान लागत होती! ;) दत्तोबाने पुरीभाजी बांधून आणली. ती उडवली. मोतीचुराचा लाडू खाल्ला, आईने दिलेल्या बेसनाच्या वड्या खाल्ल्या! घरी फोन लावला, "आई, रात्री मी व्यवस्थित जेवणार आहे. तू सगळं जेवण कर. सोबतीला थोडी शेवयांची खीरही कर!"

लंचटाइम संपला. दत्तोबाने आणलेल्या बनारसी १२० जाफरानी पत्तीच्या पानाचा तोबरा भरला, आणि "पियू पलन लागी मोरी अखिया" ही गौडसारंग मधली बापुराव पलुसकरांची बंदिश गुणगुणत पुन्हा कामाला लागलो. सकाळी आकडेमोड करण्याकरता कॅल्क्युलेटर लागत होता, आता मात्र पटापट तोंडीच हिशेब जमत होते!

दीपस्तंभ ढासळला होता, पण आत्माराम शांत झाला होता.....

-तात्या अभ्यंकर.

March 19, 2007

आणि वेलणकर सुधारला!

"प्रशसकीय अनुमतीच्या" विरोधात मनोगतावर आम्ही बंड केलं, आणि तिकडचं आमचं लेखन, आमचे प्रतिसाद, आणि आमचे 'विसोबा खेचर' हे खाते प्रशासकाला बंद करायला सांगून आम्ही स्वत:च आमचा बळी दिला.

"प्रशासकीय अनुमतीच्या" विरोधात आम्ही शक्य त्या सर्व ठिकाणी बोंबबोंब आणि शिविगाळ केली. आणि शेवटी वेलणकर सुधारला!! नाक घासत वठणीवर आला..;)

आमच्या काही मनोगती मित्रांकडून "प्रशासकीय अनुमती" चा हलकटपणा बंद झाल्याचं कळलं आणि एक माजी मनोगती म्हणून आम्हाला आनंद झाला!

लेखन आणि त्याला उत्स्फुर्तपणे दिले गेलेले प्रतिसाद आता लगेच प्रसिद्ध होतील आणि नीरस, निर्जीव झालेलं मनोगत पुन्हा जीवंत होईल अशी आम्हाला आशा आहे!

सध्या आम्ही मायबोलीवर सुखाने नांदत असून, मनोगतावर आम्ही यापुढे कधीही नसू. पण भविष्यातही मनोगताच्या अस्तित्वाकरता वेलणकराने मालकी मुजोरी सोडून असंच ताळ्यावर रहावंन हीच इच्छा!

वेलणकरा, सुधारलास आणि वठणीवर आलास याचं बरं वाटलं रे भाड्या...;)

फोकलीच्या वेलणकरा, एक तात्या गेला म्हणून तुला काहीच फरक पडत नाही आणि मलाही काहीच फरक पडत नाही. पण भविष्यात मनोगतावरील असेच काही वेडझवे कोकणी तात्या जाऊ देऊ नकोस रे! त्यांच्या आरत्या नक्कीच करू नकोस, पण त्यांना जप!

कधीकाळी तुझ्या मनोगतावर भरभरून प्रेम केलं होतं, मिसळीची ठिकाणे, लाडवांच्या, नाष्ट्यांच्या मनोगतीय स्पर्धा यासारखी मनसोक्त धमाल केली होती म्हणून या दोन ओळी...

चल, काळजी घे आणि खूप खूप मोठा हो!

तुझा,
तात्या.