July 24, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३८) - साद कोकिळ घालतो..


साद कोकिळ घालतो.. (येथे ऐका)

नंद रागातला एक सुरेख मुखडा..

राग नंद! राग नंद म्हणजे प्रसन्नता, राग नंद म्हणजे शृंगार, राग नंद म्हणजे प्रियकर-प्रेयसीतला एक अवखळ संवाद, राग नंद म्हणजे सुगीच्या दिवसातलं शरदाचं चांदणं!

गाण्याच्या सुरवातीलाच नंदचा अगदी प्रसन्न आलाप..

साद कोकिळ घालतो
कधी वसंत येईल
पानगळल्या तरुला
नवी पालवी देईल..


सुंदर शब्द, सुंदर गायकी..तब्बलजीचा अगदी दमदार ठेका..'साद' या शब्दावरच्या तानवजा हरकती छानच! गाणं तसं अगदी छोटेखानीच.. परंतु प्रसन्नतेचा छान शिडकावा करणारं..

प्रतिभावंत संगीतकार आनंद मोडक आणि गायिका जयश्री शिवराम - दोघांचेही आभार.. मराठी चित्रसंगीताला अशीच सुंदर गाणी यापुढेही मिळू देत इतकीच इच्छा..
 
-- तात्या अभ्यंकर.

July 09, 2010

जीवन डोर तुम्ही संग बांधी..! (अवांतर - रौशनी, पुढची पिढी!)

पूर्वसंदर्भ -    रौशनी..१
                    रौशनी..२
                    रौशनी..३
                    रौशनी..४
                    रौशनी..५  (अपूर्ण..)


पूर्वसंदर्भ -    ए मालिक तेरे बंदे हम! (रौशनी - अवांतर..!)


खूप वर्ष झाली फोरास रोड सोडल्याला! तेथील मी नौकरी करत असलेला झमझम देशी दारू बार, रोजच्या मारामार्‍या, गुंड, पोलिस, दारुवाले, मटकेवाले, आसपासच्या रांडा अन् त्यांचे भडवे, ती रौशनीची चाळ, ती रौशनी, रौशनीच्याच परिचयातली अजून एक कुणीशी मावशी (आम्ही तिला परवीनदिदी म्हणत असू,) आणि परकर पोलक्यात पाहिलेली आमच्या रौशनीची मुलगी नीलम!


एकदा केव्हातरी फॉकलंड रोडवरील दिल्ली दरबार हॉटेलच्या बाहेर मन्सूर भेटला होता. रांडांकरता बिर्याणी पॅक करून घेऊन चालला होता! मला तिथे पाहताच,


"अरे तात्यासाब आप? कैसे है?"असं ओरडत आनंदाने गळ्यात पडला होता.


"साला भोसडिके मन्सूर तू! कितने सालो बाद मिल रहा है?! चल, बिर्यानी खायेंगे..!" असं म्हणून मी मन्सूरला बिर्याणी खिलवली. रौशनीच्या आठवणी निघाल्या.


"तात्यासाब, नीलम अब परवीनदिदीके कोठेपे नाचती है. अपने बनारसी चालमैइच लगता है परवीनका कोठा!"


"अल्ला की मेहेरबानीसे नीलम अब बडी हो गई है, अच्छी खानेखिलाने लायक हो गई है! गातीभी अच्छा है!" असं म्हणून भडवा छद्मीपणे हसला होता!


"और ठुमकेभी भोत सही लगाती है! साला, यू पैसा उडता है..!" मन्सूर.


अच्छी खानेखिलाने लायक हो गई है! ??


पण दोष मन्सूरचा नव्हता! तो अजून त्याच वस्तीत रांडांच्या पाठीला साबण चोळण्याचं काम करत होता. मी तेथून बाहेर पडलो होतो! पुन्हा माझ्या पांढरपेशा, सुसंस्कृत, सभ्य समाजात!


नीलम!


आमच्या रौशनीची पोर. एका जमान्यात मी त्या पोरीचे खूप लाड केले होते! लहानपणीची "तात्यासाब..." म्हणून गळ्यात पडणारी नीलम मला आठवली. तेव्हा मन्सूरपासून ते रौशनीपर्यंत सर्वजण मला "तात्यासाब" याच नावाने ओळखत असत. त्यामुळे भाबडी लहानगी नीलमही मला 'तात्यासाब'च म्हणे! :)


आज काही कामानिमित्त मुंबई सेन्ट्रलला गेलो होतो आणि अचानक जुन्या आठवणी जाग्या झाल्या! डेअरी मिल्कचं एक चॉकलेट खरेदी केलं आणि सरळ एक टॅक्सी पकडली आणि म्हटलं,


"चलो बनारसी चाल. फोरास रोड!"


बनारसी चाळ जवळच होती. माझं सुसंस्कृत, पांढरपेशा मन पुन्हा एकदा चरकलं! आज कित्येक वर्षांनी पुन्हा त्या कोठ्याच्या पायर्‍या चढत होतो! बनारसी चाळ हा कोठा आहे, जिथे मुजरा होतो, गाणंबजावणं होतं. तिथे शरीरविक्रय तेव्हाही होत नसे, आजही होत नाही!


पहिल्या मजल्यावरील परवीनदिदीच्या कोठ्यावर गेलो. परवीनही आता हयात नसल्याचं समजलं.


खोलीत शिरलो. दोनचार तरण्याताठ्या नर्तिकांनी माझं स्वागत केलं, या बसा म्हटलं! त्यांना वाटलं कुणी पाहुणा आला आहे मुजरा बघायला!


"नीलम कहा है? यहीपे रेहती है ना?"


असं विचारलं तितक्यात आतल्या खोलीतून नीलमच बाहेर आली! रौशनीची मुलगी! खूप वर्षांनी तिला पाहात होतो. रंगरुपाने रौशनीसारखीच गोरी दिसत होती, सुरेख दिसत होती!






"पेहेचाना??"


क्षणभर विचार करून "तात्यासाब.." असं म्हणत तेव्हा जशी पडायची तशी आताही गळ्यात पडली! मीच क्षणभर हबकलो. तेव्हाची नीलम खूप लहान होती, परकर-पोलक्यातली होती!


खूप आनंद झाला होता पोरीला. मी खिशातनं डेअरी मिल्कचं चॉकलेट काढलं आणि तिला दिलं! पाणी आलं पोरीच्या डोळ्यात!


चहा झाला.


"तात्यासाब क्या सुनोगे?"


"मन्सूर बोल रहा था की तुम बहोत अच्छा गाती हो!"


मी तिला थोडं गायचा आग्रह केला. मलाही तिथे फार वेळ बसायचं नव्हतंच! तसं म्हटलं तर आता तिथे काय संबंध माझा??


"बस मुझे अब जाना है दो-पाच मिनिटमे. कुछभी सुनाओ, लेकीन पुराना..!"


"पुराने गाने तो मै बहोत कम जानती हू. फिरभी आपके लिये एखाददुसरा गा दुंगी! अभी मुजरा शुरू होनेमे वक्त है. बाजिंदे-साजिंदे नही है!"


अस म्हणून 'जीवन डोर तुम्ही संग बांधी..' या लतादिदीच्या एका सुरेख गाण्याची दोन कडवी तिने गुणगुणली! आपल्या उत्सुकतेकरता लतादिदीचं मूळ गाणं इथे ऐकता येईल. छान गायली पोरगी. आईने तिला थोडंफार गाणं शिकवलं होतं!


"बस अब चलुंगा!"


"तात्यासाब दुबारा कब आओगे? आओगे ना? जरूर आना..!"


तिच्या त्या 'आओगे ना?' या प्रश्नाच्या टोनमध्ये मला तिची ममत्वाची भूक जाणवली! अगदी विलक्षण जाणवली! कारण तिच्या ठुमक्यांकडे हावरेपणाने बघणारा मी कुणी तिचा गिर्‍हाईक नव्हतो! मी तिथे गेलो होतो तो तिच्या आईच्या ओळखीचा कुणीतरी होतो म्हणून..! 




असो..


काय साला जमना असतो पाहा! काही वर्षांपूर्वी मी त्याच खोलीत रौशनीकडून 'ए मालिक तेरे बंदे हम..' ऐकलं होतं आणि आज तिच्या पोरीकडून त्याच खोलीत 'जीवन डोर तुम्ही संग बांधी..' ऐकलं!


पुन्हा तिथे जाईन की नाही हे मला माहीत नाही!


-- तात्या अभ्यंकर.

July 01, 2010

प्राचार्य गेले - सरस्वतीपुत्र हरवला

माझे मित्र अर्धवटराव यांच्या लेखणीतून उतरलेला हा सुंदर लेख त्यांच्या परवानगीने मी येथे प्रकाशित करतो आहे व माझ्या ब्लॉगची शोभा वाढवतो आहे..


मूळ लेख येथेही वाचता येईल..


-----------------------------------------------------------------------------------------------------------


एका महाविद्यालयाचं आवार. प्राचार्य गाडीतुन उतरतात, पांढरा शर्ट, लेंगा आणि काळं जाकीट, सुरकुतलेला पण उत्साही प्रसन्न चेहेरा, आणि त्यांचे पेटंट मिश्कील हास्य, इमारतीच्या पायर्‍या चढुन येताना, त्यांच्याच व्याख्यानाचा बोर्ड समोर लावला आहे, त्याकडे क्षणभर कटाक्ष टाकुन पुन्हा त्यांच्या नेहेमीच्या पद्धतीने तरातरा चालत, हॉल मधे येतात. हॉल काठोकाठ भरलेला. समोरच्या तांब्याभंड्यातुन थोडे पाणी पीउन प्राचार्य सुरुवात करतात.

"आत्ताच येताना खाली मी व्याख्यानाचा बोर्ड बघितला. त्यावर विषय लिहीलेला नाही. तो लिहायचा राहायलाय असं नव्हे. पण हल्ली कुणी व्यक्त्याला विषय देत नाही, दिला तर आम्ही तो घेत नाही, अणि घेतलाच तर विषयाला धरुन कुणी बोलत नाही. तेव्हा कुठल्याही एका विषयावर न बोलता तुमच्या आणि माझ्या तारा जुळेपर्यंत मी बोलणार आहे...."

आणि त्यानंतर सतत १ तास अखंड, शांत आणि कल्लोळी, शीतल आणि दाहक असा विचारप्रवाह, सतत संवाद साधणारा, काहीतरी हितगुज करणारा, अंतर्बाह्य निर्मळ असा ओघवता प्रवाह. आपलं कर्तव्य, आपलं समाजातलं एक जबाबदार अस्तित्व. अभियंता या शब्दाबरोबर येणारी एक थोरलेपणाची जाणीव हे सगळं सगळं...

काही वेळापुर्वी मित्राचा फोन आला 'प्राचार्य गेले'.. एवढं एक वाक्य बोलुन फोन ठेवावा लागला. आणि त्यानंतर पहिल्यांदा मनात दाटला तो वर उल्लेखलेला प्रसंग. आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातलं त्यांचं हे व्याख्यान. मी पहिल्या वर्षाला असताना ऐकलेलं. अगदी जसंच्या तसं माझ्या समोर अगदी काल घडल्यासारखं दिसतंय ऐकु येतंय..
नंतर अशी अनेक व्याख्यानं आठवत गेली. प्राचार्यांना मी अगदी माझ्या शाळेपासुनच ऐकतोय.. सहा आठ महिन्यातुन एकतरी व्याख्यान शाळेत व्हायचंच. शाळेत अगदी सोप्या सोप्या विषयांवर बोलायचे, खुलवुन सांगायचे. नंतर त्यांना ऐकतच गेलो, समृद्ध होतच गेलो सतत. नुसती विषयांची जंत्री द्यायची झाली तरी त्यांच्या व्यासंगाचा आवाका लक्षात येतो. विवेकानंद, शिवछत्रपती, संतसाहित्य, समर्थ रामदासांचे विचार, मुक्तचिंतने, समाजाभिमुख विषय आणि बरेच काही.
अर्थात आमच्या वाट्याला प्राचार्य नेहेमीच जास्त आले. एकतर फलटणपासुन जवळ आणि सातार्‍यालाच त्यांचे शिक्षण झाल्यामुळे त्यांना वाटणारी आपुलकी. मनात अनेक भाषणं दाटुन आली आहेत आत्ता. शाळेतली, कॉलेजातली, समर्थ सदन मधली, गांधी मैदानावरच विराट जनसमुदयापुढे केलेलं भाषण, आमच्या नगरवाचनालयाच्या छोटेखानी हॉलमधे होणारी छोटी भाषणं.

एक मोठा अविस्मरणीय प्रसंग आठवतो तो म्हणजे.. बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या हस्ते शाहुकलामंदीर मधे झालेला त्यांचा सत्कार. आणि त्यावेळेला अत्यंत आदराने बाबासाहेबांनी काढलेले.. " हा साक्षात सरस्वतीपुत्र आहे" हे उद्गार




खुप समृद्ध केलं ह्या माणसानं, संतसाहित्याची गोडी लावली, महाराजांचा, विवेकानंदांचा वारसा शिकवला. खुप लहान वयात आयुष्याचा अर्थ समजावण्याचा प्रयत्न केला, विचार शिकवला.. जबाबदारीची जाणिव करुन दिली... जागल्या बनुन राहिला मनाच्या कोपर्‍यात.. सतत, ह्या अंधार्‍या जगात..

खुप खोल खोल दाटुन आलय मनात, खुप लिहायचं होतं.. लिहीताही येत नाहिये.. थांबतो..

जाउद्या.. ही सगळी देवाघरची माणसं.. आमची इवलीशी आयुष्य सम्रुद्ध करायला पाठवली होती देवानं.. न मागता दिली होती....न सांगता घेउन गेला..