Showing posts with label गुण गाईन आवडी... Show all posts
Showing posts with label गुण गाईन आवडी... Show all posts

June 02, 2008

गोपाला मेरी करूना...

१९९३/९४ सालचा सुमार असेल, तेव्हाची गोष्ट.

"ग्रँटरोडचा नॉव्हेल्टी सिनेमा माहीत आहे ना? त्याच्याजवळच रेल्वे हॉटेल म्हणून आहे आणि त्याच्याजवळ एस पी सेन्टर म्हणून साड्यांचं दुकान आहे. तीच बिल्डिंग! ये हां नक्की, मी घरीच आहे!"

दस्तुरसाहेब मला फोनवरून पत्ता सांगत होते!

पं फिरोज दस्तूर आणि त्यांच सुंदर गाणं!

या माणसाच्या मी गेली अनेक वर्ष प्रेमात होतो. त्यांना एकदा भेटावं असं मला खूप वाटत होतं. आणि एके दिवशी तो योग आला. त्यांनी सांगितलेल्या पत्त्यानुसार मी ग्रँटरोडला त्यांच्या घरी पोहोचलो. लाकडी गोलाकार जिने असलेल्या त्या बिल्डिंगमधलं त्यांचं ते टिपिकल पारशी पद्धतीचं घर. भिंतीवरचं घड्याळ, खुर्च्या, सोफे, कपाटं, अगदी सगळं सगळं पारशी पद्धतीचं, ऍन्टिकच म्हणा ना! मला एकदम विजयाबाईंच्या पेस्तनजी सिनेमाचीच आठवण झाली.

गुलाबीगोर्‍या वर्णाचे दस्तुरबुवा समोर बसले होते. मी प्रथमच त्यांना इतक्या जवळून पाहात होतो. सवाईगंधर्वांचे लाडके शिष्य, किराणा गायकीचे ज्येष्ठ गवई, माझे मानसगुरू भीमण्णा यांचे ज्येष्ठ गुरुबंधू! मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं!

"ये, बस!"

दस्तुरांनी माझ्या पाठीवरून हात फिरवत म्हटलं. त्यांचं गाणं जितकं गोड होतं तेवढेच तेही अगदी सुरेख होते, गोडच दिसत होते!

"काय, कुठून आला? गाणं शिकतोस का कुणाकडे?"

दस्तुरबुवा अगदी मोकळेपणानी माझी विचारपूस करू लागले, माझ्याशी बोलू लागले. अगदी साधं-सुस्वभावी बोलणं होतं त्यांचं. जराही कुठे अहंकार नाही, की शिष्ठपणा नाही! गुजराथी-पारशी पद्धतीचं मराठी बोलणं! मला ते ऐकायला खूप गंम्मत वाटत होती. आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. थोड्या वेळाने दस्तुरबुवांनी त्यांच्या स्वयपाक्याला माझ्याकरता चहा करायला सांगितला. घरात ते दोघेच होते. ते आणि त्यांचा स्वयंपाकी. ह्या पारश्याने लग्न केलं नव्हतं! नातेवाईंकांचा गोतावळा खूपच कमी. त्यांचा एक पुतण्या तेवढा होता, तो तिकडे अमेरिकेत होता. दस्तुरबुवा अधनंमधनं त्याच्याकडे रहायला जायचे.

पहिल्या भेटीतच मला दस्तुरांनी त्यांच्याकडची त्यांचं एक यमनचं लाईव्ह रेकॉर्डिंग असलेली कॅसेट ऐकायला दिली. "अरे माझ्याकडे एवढी एकच कॉपी आहे. तू वाटल्यास टेप करून घे आणि ही मला परत आणून दे हां!" खूप भाबडेपणाने दस्तुरसाहेब म्हणाले. त्यांच्या आवाजात जात्याच कमालीचा मृदुपणा होता. त्यांना मुद्दामून मृदु बोलण्याची गरजच नव्हती!

घाटकोपरच्या एका मैफलीतलं यमन रागाचं फार सुंदर रेकॉर्डिंग होतं ते! किराणा पद्धतीची, सवाईगंधर्वांच्या तालमीखाली तावूनसुलाखून निघालेली फार अप्रतीम गायकी होती त्यांची! किराणा पद्धतीनुसार एकेका स्वराची बढत करून विकसित केलेला राग, अतिशय सुरेल अन् जवारीदार स्वर, स्वरांचं अगदी छान रेशमी नक्षिकाम करावं अशी आलापी! खरंच, दस्तुरबुवांचं गाणं म्हणजे सुरेल, आलापप्रधान गायकीची ती एक मेजवानीच असे! असो! दस्तुरबुवांच्या गायकीवर लिहायला मी अजून खूप लहान आहे. आणि त्यांच्या गाण्यावर कितीही जरी भरभरून लिहिलं तरी त्यांच गाणं शब्दातीत होतं हेच खरं!



मंडळी, दस्तुरबुवांच्या घरी जाण्याचा, त्यांना भेटण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा अनेकदा योग आला हे माझं भाग्य! मी जरी समोरसमोर बसून त्यांची तालीम घेतली नसली तरी एका अर्थी ते माझे गुरूच होते. किराणा गायकीबद्दल, आलापीबद्दल, गाणं कसं मांडावं, राग कसा मांडावा, घराण्याची गायकी कुठे अन् कशी दिसली पाहिजे इत्यदी अनेक विषयांवर ते माझ्याशी अगदी भरभरून बोलत! त्यांची जुनी ध्वनिमुद्रणं मला ऐकवत! आपण कुणीतरी मोठे गवई आहोत असा भाव त्यांच्या बोलण्यात कधीही म्हणजे कधीही नसे!

एकंदरीत खूपच साधा आणि सज्जन माणूस होता. अतिशय सोज्वळ आणि निर्विष व्यक्तिमत्व! बोलणं मात्र काही वेळेला मिश्किल असायचं!

एकदा असाच केव्हातरी त्यांच्या घरी गेलो होते. नोकराने दार उघडलं.

"दस्तुरसाब है?"

तेवढ्यात, "अरे ये रे. किचनमध्येच ये डायरेक्ट! चहा पिऊ!" असा आतूनच दस्तुरसाहेबांचा आवाज आला. त्यांच्या स्वयंपाक्याने आमच्या पुढ्यात चहा ठेवला. टेबलावर लोणी, ब्रेड ठेवलेलं होतं! दस्तुरबुवांनी स्वत:च्या हाताने लोणी लावून दोन स्लाईस माझ्या पुढ्यात ठेवले! आम्ही लोणीपाव खाऊ लागलो. तेवढ्यात स्वयंपाकघराच्या एका कोपर्‍यातून दोन मोठे उंदीर इकडून तिकडून पळत गेले! च्यामारी, घरात दोन दोन मोठाले उंदीर! त्यांना पाहताच मी दचकलोच जरा! मला दचकलेला पाहून दस्तुरसाहेबांनी एकदम मिश्किलपणे म्हटलं,

"अरे ते मामा लोक आहेत! खेळतात बिचारे. त्यांना तरी माझ्याशिवाय दुसरं कोण आहे?!"

आमच्या दस्तुरसाहेबांना विडी ओढायची सवय होती बरं का मंडळी! फार नाही, पण अधनंमधनं म्हातारा अगदी चवीने ती खाकी विडी ओढायचा! "दस्तुरसाहेब, विडी चांगली नाही बरं प्रकृतीला! जास्त ओढायची नाही!" असा मी त्यांना जरा माझ्या लहानपणाचा फायदा घेऊन एकदा प्रेमळ दम दिला होता!

"बरं बरं! यापुढे एकदम कमी ओढीन. मग तर झालं?!" मी घेतलेला लहान तोंडी मोठा घास त्यांनी तेवढ्याच मोठेपणाने आणि खिलाडीवृत्तीने मला परतवला होता! त्यानंतर काहीच दिवसांनी नेमका मी फोर्टमधल्या कुठल्यातरी दुकानात गेलो होतो, तिथे मला हमदोनो पिक्चरमध्ये असतो तसा एक म्युझिकल सिग्रेट लायटर मिळाला. त्या लायटरचे स्वर खूप छान होते. तो लायटर पाहिल्यावर मला एकदम दस्तुरसाहेबांचीच आठवण आली. मी तो त्यांना मुद्दाम प्रेझेंट म्हणून देण्याकरता त्यांच्या घरी गेलो. त्यांनाही तो लायटर खूप आवडला!

"अरे खूप महाग असेल रे! कशाला एवढे पैसे खर्च केलेस? असं कुणी काही प्रेझेंट दिलं की मला खूपच अवघडल्यासारखं वाटतं! आणि काय रे, एकिकडे मला विडी कमी ओढा म्हणून दम देतोस आणि दुसरीकडे हा लायटर पण देतोस? आता तू हा इतका सुंदर लायटर दिल्यावर माझी विडी कशी कमी होणार सांग बरं!"

हे म्हणतांना त्यांच्या चेहेर्‍यावर जे निरागस मिश्किल भाव होते ते मी आजही विसरू शकत नाही! खरंच, देवाघरचा माणूस!

त्यांचे गुरू सवाईगंधर्व, यांच्याबद्दल तर ते नेहमीच भरभरून बोलत. त्यात केवळ अन् केवळ भक्तिच असे. सवाईगंधर्वांच्या काही आठवणी त्यांनी मला सांगितल्या होत्या. एक आठवण सांगतांना त्यांच्या डोळ्यात नेहमी पाणी यायचं!

दस्तुरबुवा १४-१५ वर्षांचे असतानाची गोष्ट. सवाईंचा नाटककंपनीसोबत जेव्हा मुंबईत मुक्काम असे तेव्हा सवाई त्यांना त्यांच्या घरी येऊन गाणं शिकवायचे. एकदा असेच पावसाळ्याचे दिवस होते. रस्त्यावर खूपच चिखल आणि पाणी साचलं होतं. त्या पावसातही सवाईगंधर्व त्यांच्या घरी शिकवणीकरता आले. गुरूने शिष्याला चांगली तास, दोन तास तालीम दिली अन् सवाईगंधर्व जायला निघाले! दारापाशी आले व स्वत:च्या चपालांकडे पाहून त्यांनी क्षणभर दस्तुरांच्या आईकडे अत्यंत कृतज्ञतेच्या भावनेनं बघितलं, हात जोडले, थोडे हसले आणि घराबाहेर पडले! झालं होतं असं की बाहेरच्या पावसा-चिखलामुळे सवाईंच्या चपला खूपच बरबटलेल्या होत्या. मुलाची शिकवणी होईस्तोवर त्या माऊलीने सवाईंच्या चपला स्वच्छ धुऊन, तव्यावर वाळवून कोरड्या करून ठेवल्या होत्या!!

इंडियन आयडॉल, अजिंक्यतारा, महागायक, महागुरू, एस एम एस चा जमाना नव्हता तो!!

सवाईगंधर्व महोत्सवात शेवटच्या दिवशी पहाटे गंगूबाई हनगल, दस्तुरबुवा आणि शेवटी अण्णा हा गाण्याचा क्रम गेली अनेक वर्ष होता. 'गोपाला मेरी करूना' ही अब्दुलकरिमखासाहेबांची ठुमरी आणि दस्तुरबुवांचं काय अजब नातं होतं देवच जाणे! सवाईगंधर्व महोत्सवात त्यांना दरवर्षी न चुकता 'गोपाला...' गाण्याची फर्माईश व्हायची आणि दस्तुरबुवही अगदी आवडीने ते गात! फारच अप्रतीम गायचे! साक्षात अब्दुलकरीमखासाहेबच डोळ्यासमोर उभे करायचे!

अण्णा आणि दस्तुर! दोघेही सवाईगंधर्वांचे शिष्य. त्या अर्थाने दोघेही एकमेकांचे गुरुबंधू होते. आणि तसंच त्यांचं अगदी सख्ख्या भावासारखंच एकमेकांवर प्रेमही होतं! सवाई महोत्सवात एके वर्षी दस्तुर गुरुजींनी कोमल रिषभ आसावरी तोडी इतका अफाट जमवला की तो ऐकून अण्णा दस्तुरांना म्हणाले, "फ्रेडी, आज मला गाणं मुश्किल आहे. आज तुमचेच सूर कानी साठवून मी घरी जाणार!"

अण्णा नेहमी प्रेमाने दस्तुरांना 'फ्रेडी' या नावाने हाक मारायचे!

असो..!

अजून काय लिहू? आता फक्त दस्तुरबुवांच्या आठवणीच सोबतीला उरल्या आहेत! त्या आठवणींतून बाहेर पडवत नाही. खूप भडभडून येतं. अलिकडेच दस्तुरसाहेब वारले. एका महत्वाच्या कामाकरता, एक महत्वाची कौटुंबिक जबाबदारी निभावण्याकरता त्या दिवशी मी पुण्यात होतो. मला तातडीने मुंबईला परतणं शक्य नव्हतं. दस्तुरांचं अंत्यदर्शन मला मिळालं नाही हे माझं दुर्भाग्य म्हणायचं! दुसरं काय? काल संध्याकाळी थोडा वेळ होता म्हणून मुद्दाम ग्रँटरोडला गेलो होतो. त्या इमारतीपाशी गेलो. पण दस्तुरांच्या घरी जाण्याची हिंमत होईना! खूप भरून आलं. पुन्हा काही आठवणी ताज्या झाल्या. मी दिलेला लायटर असेल का हो अजून त्या घरात? मी येऊन गेल्याचं कळलं असेल का हो आमच्या त्या पारशीबाबाला?

रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती. लोकं आपापल्या उद्योगात होते. मी मात्र एकटा, एकाकी उगाच त्यांच्या घराबाहेर घुटमळत होतो. मनात 'गोपाला मेरी करूना'चे सूर रुंजी घालत होते!

--तात्या अभ्यंकर.

हाच लेख इथेही वाचता येईल!

December 10, 2007

अण्णा गायले!

राम राम मंडळी,

काही वैयक्तिक कारणांमुळे या वर्षी पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात हजेरी लावू शकलो नाही, परंतु आजच त्या महोत्सवाला हजेरी लावलेले आमचे पुण्यातील मित्र चित्तोबा यांच्याशी फोनवर बोलणं झालं आणि त्यात आम्हाला एक अतिशय म्हणजे अतिशय आनंदाची बातमी समजली!

प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेली ३ वर्ष गाऊ न शकलेले भारतीय अभिजात संगीताचे अध्वर्यु, पद्मविभूषण, स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांनी या वर्षी या महोत्सवात आपली गानहजेरी लावून आपले गुरू रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाईगंधर्व यांना स्वरांजली वाहिली!

मंडळी, संगीतक्षेत्रातल्या मंडळींकरता यापरीस दुसरी आनंदाची बातमी ती काय असू शकते?

आज वयाच्या ८५ व्या वर्षी अण्णांनी मुलतानी हा राग सादर केला आणि नारायणराव बालगंधर्वांचा 'अवधाची संसार' हा अभंग सादर केला. मुलतानी हा तर किराणा घराण्याचा खास राग आणि त्यावर अण्णांची असामान्य हुकूमत! तर 'अवघाची संसार' मधून त्यांच्या गुरूस्थानी असलेल्या नारायणरावांचं त्यांच्या जागा घेत घेत, त्यांची आठवण करून देणारं गाणं!

आत्ताच ईटीव्हीवरील बातम्यांवर ही बातमी दाखवली, अण्णांना गातांना बघितलं आणि धन्य धन्य झालो.

आजच्या फाष्ट, इन्स्टंट आणि एस एम एस ची भीक मागण्याच्या काळात अण्णांचा सच्चा सूर ऐकला आणि समाधान वाटलं! तोच सच्चा सूर, तीच श्रद्धा, तोच प्रामाणिकपणा, तीच सगळी तपस्या!! तीन वर्षच काय, परंतु तीनशे वर्ष जरी खंड पडला तरी अस्स्ल सोनं कधी बदलत नाही, त्याचा कस, त्याचा बावनकशीपणा कधी कमी होत नाही!!

मी संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे या स्वरभास्कराला वंदन करतो आणि परमेश्वर त्यांना उत्तम प्रकृतीस्वास्थ आणि उदंड आयुष्य देवो अशीच मनापासून प्रार्थना करतो! तमाम संगीतसाधकांवर, विद्यार्थ्यांवर, आणि आम्हा संगीत रसिकांवर त्यांची छत्रछाया आणि त्यांच्या आशीर्वादाचा वयोवृद्ध थरथरता हात असाच राहो हीच मनोकामना!

आपला,
(भीमसेनभक्त) तात्या.

March 28, 2007

एक रंगलेला मधुकंस..

राम राम मंडळी,

आमच्या ठाण्याचे डॉ विद्याधर ओक, आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ओक यांचं घर मला परकं नाही. डॉ विद्याधर ओक यांच्यावर सवडीने एखादा विस्तृत लेख लिहिणारच आहे, आत्ता त्याबद्दल फार लिहीत नाही.


गेल्या वर्षीची गोष्ट. गोकुळअष्टमीचा दिवस होता. संध्याकाळच्या सुमारास मला आदित्य ओकचा फोन आला, "तात्या, जिवंत आहेस का? साडेआठ नऊच्या सुमारास माझ्या घरी पोच. गाण्याची मैफल आहे."


झालं! आपली काय चैनच झाली. मी ठरल्यावेळेला गाण्याची मैफल ऐकायला गेलो. अगदी घरगुती स्वरूपाची मैफल होती. गिने-चुने श्रोते, त्यातच मी एक. मैफल अगदी मस्तच रंगली होती. मंडळी, मोठ्या मैफलींची मजा वेगळी, पण खाजगी, घरगुती स्वरूपाच्या मैफली नेहमीच अधिक रंगतात हा माझा आजपर्यंतचा अनुभव. 'रंगमंच' हा प्रकार नाही, गवई आणि श्रोते एकाच सतरंजीवर. एखाद्या चपखल समेला अगदी गवयाचा हात हातात घेऊन दाद देता यावी असा हा संवाद असतो. ही मैफलही तशीच अगदी छान जमली होती.


"दरस मोहे राम" ही झपतालातली बंदिश. मधुकंस फार सुरेखच जमला होता. अगदी छान लयदार, आणि सुरेल काम सुरू होतं! कोण बरं गात होतं?


मंडळी, ती मैफल होती एका तरुणाची. विलक्षण प्रतिभावंत, अवलिया कलाकार पं वसंतराव देशपांडे यांच्या नातवाची. त्याचं नांव राहुल देशपांडे.


राहुल हा आजच्या तरुण पिढीतला एक उमेदीचा कलाकार. गाणं तर रक्तातच. पण राहुलला आजोबांकडून तालीम घ्यायचा कधी योग आला नाही. कारण राहुल अवघा तीन-चार वर्षांचा असतानाच वसंतराव गेले. पण जाताना तो प्रेमळ आजा आपल्या नातवाच्या डोक्यावर हात ठेवूनच गेला. वसंतरावांचा गाण्यातला वैभवशाली वारसा राहुलला मिळाला आहे हे खरंच. पण मंडळी, गाण्यात नुसता पिढीजात वारसा असून चालत नाही. गाणं हे जरी रक्तातच असलं तरी ते शिकावं लागतं, त्याला श्रवण, चिंतन, मनन याचीही पुरेपूर जोड लागते. शिक्षण, श्रवण, आणि सततचे चिंतन व मनन असेल तरच मुळात असलेला गानझरा अधिक प्रसन्नतेने वाहू लागतो, प्रवाही होतो. राहुलच्या बाबतीत असंच झालं.


राहुलमध्येही गाणं होतंच, पण त्यानेही किराण्याचे पं गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे गाण्याची रीतसर तालीम घ्यायला सुरवात केली. गंगाधरबुवांनंतर, पं मधुसूदन पटवर्धन यांच्याकडे राहुलने तालीम घेतली. कुमारजींच्या शिष्या उषाताई चिपलकट्टी यांच्याकडेही राहुल जवळ जवळ सात वर्ष गाणं शिकला. अजूनही त्याचं संगीतशिक्षण सुरूच आहे. आजही तो कुमारजींचेच शिष्य पं पंढरीनाथ कोल्हापुरे, कुमारजींचे चिरंजीव पं मुकुल शिवपुत्र यांच्याकडे गाण्याची तालीम घेत आहे. परंपरेचं गाणं न गाणाऱ्या वसंतरावांच्या नातवाचा ओढा कुमारजींनी सुरू केलेल्या दुसऱ्या अपारंपरिक गानप्रवाहाकडे असणं हे साहजिकच आहे!


मी राहुलची परवाची मैफल ऐकली आणि त्याच्या गाण्यातला सच्चेपणा मला जाणवला. राहुलने मैफलीची सुरवात छायानट या रागाने केली. मंडळी, छायानट हा खास करून ग्वाल्हेर परंपरेत गायला जाणारा राग. या रागाचा मला अपेक्षित असणारा विस्तार राहुलने केला नाही, पण ती वेळेची घडी झाली असे आपण म्हणू. कुमारांच्याच भाषेत सांगायचं तर एखाद्या रागातून प्रत्येक वेळेला हवं तसं मनोगत व्यक्त करता येतच असं नाही. छायानट नंतर राहुलने मधुकंस सुरू केला आणि तिथे मात्र राहुल छान रमला. मधुकंस म्हणजे काय विचारता मंडळी! शृंगाररसातील मधुरता ज्याच्यात पुरेपूर भरली आहे असा मधुकंस! जमला तर भारीच जमतो बुवा. राहुलने मधुकंस मस्तच जमवलान. सुरवातीचा विलंबित झपताल आणि 'आजा रे पथिकवा' ही द्रुत बंदिश छानच रंगली होती.


'बनराई बोराय लागे'! ओहोहो, राहुलने मधुकंस नंतर 'सोहनी-बसंत' सुरू केला. त्यातलीच 'बनराई..' ही बंदिश. 'सोहोनी-बसंत' ही खास कुमारांची रचना. तसं पहायला गेलं तर सोहोनी आणि बसंत हे दोन्हीही दिग्गज राग. त्यांच्यात योग्य तो समतोल साधत हा जोड राग गाणं हे कठीणच. राहुलने मात्र ह्या रागांचं बेअरींग छानच सांभाळलंन असं म्हणावं लागेल. राहुलचा सोहोनी-बसंत ऐकताना मजा आली.


'सोहोनी-बसंत' नंतर राहुलने राजकल्याण रागातील 'ऐसी लाडलीकी..' ही द्रुत बंदिश सुरू केली. क्या बात है, राहुलचं 'ऐसी लाडलीकी' छानच जमलं होतं. मंडळी, राजकल्याण ही खास वसंतरावांची खासियत. राजकल्याण म्हणजे पंचम विरहित यमन. तरीही राजकल्याणचं वेगळं असं चलन आहे आणि ते सांभाळूनच तो राग गावा लागतो. पंचम न लावता नुसताच यमन गायचा असा याचा अर्थ नव्हे! एकंदरीत राहुलचं 'ऐसी लाडलीकी' छानच चाललं होतं. जमून गेलं.


त्यानंतर राहुलने जनसंमोहिनी रागातली एक बंदिश म्हटली. हा राग मला व्यक्तिशः फारसा भावला नाही. कलावती रागात शुद्ध रिषभ, यापलीकडे मला तरी या रागात फारसं काही सापडलं नाही, जाणवलं नाही. सरतेशेवटी 'सुनता है गुरूग्यानी' या कुमारांच्या निर्गुणी भजनाने राहुलने मैफलीची सांगता केली. हे निर्गुणी भजनदेखील राहुलने अगदी तल्लीनतेने सादर करून श्रोत्यांना अंतर्मुख केलं. श्री समय चोळकर यांनी तबल्यावर आणि आदित्य ओक यानी संवादिनीवर अगदी रंगतदार साथ करून मैफलीत मजा आणली.


असो. मंडळी, एकंदरीत राहुल देशपांडे या माझ्या मित्राकडून मला बऱ्याच अपेक्षा आहेत. अगदी सुरेल गातो, ताला-लयीची अतिशय चांगली समज आहे. जे गातो ते स्वतःचं गातो, स्वतःच्या बुद्धीने गातो. त्याच्या गाण्यात मला विचारांचा, बुद्धीचा भाग बराच दिसला. सरगम गायकीवरही त्याची चांगली पकड आहे. आलापी सुरेल असून ताना निश्चितच खूप कल्पक आहेत. त्याचं गाणं अत्यंत प्रवाही आहे, सतत पुढे जाणारं आहे. बुद्धीवादी आहे. अर्थात ही त्याच्या आजोबांचीच खासियत. पण कधीतरी, कुठेतरी राहुलने आलापीतही जरा जास्त वेळ रमावं, त्यामुळे त्याचं गाणं अधिक समृद्ध होईल असं मला वाटतं. तानेतले, किंवा सरगमातले लहान लहान झरे, प्रवाह नक्कीच छान वाटतात, पण कधीतरी आलापीचा एखाद मोठा जलाशयही बघायला खूप सुरेख वाटतो. राहुलशी बोलताना ही बाब मी त्याला सांगितली होती, आणि त्यालाही ती पटली असावी असा माझा अंदाज आहे!
असो. आज राहूलसारखी तरूण मंडळी कुणाकडेही sms ची भि़क्षा न मागता रियाज करत आहेत, संगीताची साधना करत आहेत, ही गोष्ट मला खूप मोठी वाटते!




मंडळी, राहुलचं गाणं ऐकून मला जे जाणवलं ते मी इथे मोकळेपणानी लिहिलं आहे. त्याच्यातली मला जाणवलेली सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 'मी वसंतरावांचा नातू आहे म्हणून मला मोठं म्हणा' असा भाव त्याच्याकडे मुळीच नाही. वास्तविक एवढ्या मोठ्या गायकाचा नातू म्हणजे लोकांच्याही अपेक्षा बऱ्याच असतात. त्याचं दडपण राहुलला येत नसेल, असंही नाही. पण त्याच्या गाण्यातून ते मला जाणवलं नाही. तो जे काय गातो ते अगदी सहज आणि त्याचं स्वतःचं गातो. आणि मंडळी, मलातरी हीच गोष्ट मोठी वाटते. अर्थात, त्याच्या गाण्यात वसंतरावांचा ढंग निश्चितच आहे. आणि ते साहजिकही आहे. पण जे काय आहे ते अस्सल आहे. कुठेही नक्कल नाही.

असो, राहुलला त्याच्या भविष्यातील गानकारकीर्दीकरता मी अनेक अनेक शुभेच्छा देतो, सुयश चिंतितो. आज राहुलचं वय अवघं २७-२८ वर्ष आहे. अजून त्याला गाण्यात खूप काही करायचं आहे, शिकायचं आहे आणि अधिकाधिक उत्तम गायचं आहे. या सगळ्याकरता त्याला अगदी मनापासून शुभेच्छा! आज मी राहुल देशपांडेची मैफल ऐकली, अजून ३० वर्षांनंतर मला पं राहुल देशपांडे यांची एखादी जबरदस्त रंगलेली मैफल ऐकायला मिळावी हीच सदिच्छा! ;)

मला घाई नाही, मी थांबायला तयार आहे. कारण मला बऱ्याच आशा आहेत!
--तात्या अभ्यंकर.

February 13, 2007

मन रामरंगी रंगले..



राम राम मंडळी,

खालापूर! कर्जत-खोपोली जवळचं एक लहानसं गाव. अण्णा सोमठणकर हे खालापूरचेच राहणारे. अण्णा वृत्तीने भाविक माणूस. गेली अनेक वर्ष खालापूरला अण्णांच्या घरी दत्तयंतीचा उत्सव साजरा केला जातो, आणि त्या दिवशी रात्री त्यांच्या घरी गाण्याचा कार्यक्रम असतो. मंडळी, आज गेली ५३ वर्ष अण्णा सोमठणकरांच्या घरी हा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे ही गोष्ट मला खूप मोठी वाटते. अनेक कलाकारांनी तिथे आजपर्यंत हजेरी लावली आहे.

गेल्या वर्षी अण्णांच्या घरी दत्तजयंती उत्सवानिमित्त आयोजलेल्या मैफलीला उपस्थित राहण्याचा मला योग आला. त्या मैफलीचा हा थोडासा धावता वृत्तांत आज मी येथे देणार आहे. पण ती मैफल कशी रंगतदार होती हे एक श्रोता म्हणून (समिक्षक किंवा तज्ज्ञ म्हणून नव्हे!;) सांगण्यापूर्वी एक खवैय्या म्हणून अण्णा सोमठणकरांच्या घरी जे प्रसादाचं जेवण होतं त्याबद्दल मला आधी बोललं पाहिजे. आहाहा काय विचारता मंडळी!, अगदी मोजकाच, पण अतीव सुंदर आणि चविष्ट बेत होता हो. रस्साभाजी, मउसूत पोळ्या, जीव ओवाळून टाकावा अशी गुळ-गोडामसाला घातलेली आमटी आणि गरमागरम भात. नास्तिकतेला आस्तिकतेकडे नेणारा स्वयंपाक! अहो देव म्हणजे तरी अजून वेगळं काय असतं हो? हे नास्तिक लोक उगाचंच आमच्या विठोबाला घाबरतात! ;)

असो, खाण्याचा पोटोबा तर झाला. आता गाण्याच्या विठोबाकडे वळुया!

ठाण्याची राहणारी सौ वरदा गोडबोलेची मैफल होती ती. वयाच्या ६ व्या/७ व्या वर्षापासूनच वरदा गाणं शिकत आहे. किराणा घराण्याचे पं फिरोज दस्तूर यांचे ज्येष्ठ शिष्य पं अच्युतराव अभ्यंकर यांच्याकडे वरदाने १२ वर्ष गाण्याची रीतसर तालीम घेतली. अभ्यंकरबुवांनी वरदावर किराणा गायकीचे खूप चांगले संस्कार केले. त्यानंतरचा काही काळ तिने डॉ सुशिलाताई पोहनकर व पं अजय पोहनकर यांच्याकडेही तालीम घेतली. सुशिलाताईंकडे आणि पं अजय पोहनकरांकडे वरदाला विशेष करून ठुमरी-दादऱ्याच्या खासियती शिकायला मिळाल्या. सध्या वरदा पं यशवंतबुवा महाले यांच्याकडे अण्णासाहेब भातखंडे, आचार्य रातंजनकर, यांच्या अत्यंत समृद्ध परंपरेतील आग्रा घराण्याच्या गायकीचे, विशेष करून बंदिशींचे शिक्षण घेत आहे.

आजपर्यंत अनेक ठिकाणी वरदाची गाणी झाली आहेत. ख्यालगायनाच्या स्पर्धांतून अनेक बक्षिसं, आणि शिष्यवृत्त्या तिने मिळवल्या आहेत. खास करून केन्द्र सरकारची दिली जाणारी शिष्यवृत्ती, स्वरभास्कर पं भीमसेन जोशी शिष्यवृत्ती, राष्ट्रीय पातळीवर दिले जाणारे 'डागर पारितोषक', अण्णासाहेब रातंजनकर प्रतिष्ठानचे पारितोषक, पं रामभाऊ मराठे नाट्यसंगीत शिष्यवृत्ती, ह्या काही विशेष उल्लेखनीय गोष्टी तिच्या खात्यात जमा आहेत. रुईया महाविद्यालयातून संस्कृत विषय घेऊन बी ए च्या परीक्षेत मुंबई विद्यापिठात सर्वप्रथम येण्याचा मानदेखील तिने मिळवला आहे.

वरदाने मैफलीची सुरवात पुरियाकल्याण रागाने केली. "आज सो बन" ही पारंपारिक विलंबित एकतालातली अस्थाई तिने भरायला सुरवात केली. पुरियाकल्याण हा खास किराणा घराण्याचा राग असं म्हटलं जातं ते फारसं वावगं नाही. पुरियाकल्याण! आलापप्रधान गायकी गाता येण्याजोगा एक खानदानी राग. पुरियाकल्याण म्हणजे पुरिया आणि कल्याण या दोन रागांचं अद्वैत. पुरियाचा स्वभाव तसा गंभीर. मला तर पुरिया म्हणजे एखाद्या जबाबदार, बुजुर्ग अशा अनुभवसंपन्न व्यक्तिचं मनोगतच वाटतं. पण पुरियाची सगळी सत्ता फक्त पूर्वांगातच बरं का मंडळी. आपला अवखळ, लोभसवाणा 'कल्याण' त्याला उत्तरांगात नेमकेपणाने गाठतो आणि त्याचा छानसा पुरियाकल्याण होतो!

आपल्या घरात अशीच एखादी अनुभवसंपन्न, पण थोडी गंभीर अशी बुजूर्ग व्यक्ती असते. कुणी फारसं तिच्याजवळ गप्पाबिप्पा मारायला जात नाही. पण तिच्या नातवाला मात्र नेमकं कळतं की आजोबांना काय आवडतं आणि काय नाही ते! ;) नातू अवखळपणाने धावत त्यांना बिलगतो आणि या गंभीर आजोबांच्या चेहऱ्यावर पटकन स्मित हास्य उमटतं! ;) पुरिया काही क्षणाकरता स्वत:चा स्वभाव विसरतो आणि त्याचा पुरियाकल्याण बनतो! ;) मंडळी, किती समृद्ध आहे आपलं संगीत! क्या केहेने..

वरदाने किराणा गायकीच्या पद्धतीनुसार एकेका स्वराची बढत करत विलंबितात पुरियाकल्याण छानच रंगवला. त्यानंतर "पार करो नाव मोरी" ही पुरियाकल्याणातली पं फिरोज दस्तुरांनी बांधलेली द्रुत बंदिशीही तिने फार सुरेख म्हटली. अर्धापाऊण तास अगदी झकास माहोल जमला होता पुरियाकल्याणचा!
त्यानंतर मैफलीमध्ये केदार महाराजांचा रथ मोठ्या दिमाखात डेरेदाखल झाला. केदार राग म्हणजे काय विचारता महाराजा? स्वरांचा उत्सवच तो! 'सोच समझ मनमीत पिहरवा' ही गुरूमहात्म्य सांगणारी केदारातली मध्यलयीतली एक बंदिश. वरदाने ही बंदिश अगदी जमून गायली. मंडळी, 'मध्यलयीत गाणं सर्वात कठीण' असं बुजुर्ग सांगतात. वरदाने मात्र मध्यलयीचं तंत्र चांगल्या तऱ्हेने हाताळत ही बंदिश उत्तम तऱ्हेने सादर केली. केदाराने मैफलीच्या शोभेला चार चांद लावले!


त्यानंतर वरदाने 'मधुकर वन वन', 'सोहम हर डमरू बाजे', यांसारखी काही नाट्यपदं, 'हरी मेरो जीवनप्राण आधार', 'मन हो रामरंगी रंगले' हे अभंग सादर केले. उत्तरोत्तर मैफल चढत्या भाजणीने रंगतच गेली! श्री समय चोळकर यांनी तबल्यावर अत्यंत रंगतदार साथ केली व श्री निरंजन लेले यांनी संवादिनीवर समर्पक संवाद साधला.

मंडळी, एकूण कालची मैफल ऐकून माझ्यासारख्या श्रोत्यांना वरदासारख्या तरूण मंडळींकडून खूपच आशा आहेत. वरदाही ठाण्याचीच असल्यामुळे गेली अनेक वर्ष तिची मेहनत आणि लगन मी फार जवळून पाहतो आहे. सुरेख आणि सुरेल आवाज, स्वच्छ दाणेदार तान, लयतालावर चांगली पकड, सरगम आलापी, उत्तम तालीम मिळाल्यामुळे रागावरची पकड, ह्या गोष्टी तर वरदाच्या गाण्यात आहेतच. पण घराण्यांच्या परंपरा राखून गाण्यात स्वत:चे विचार मांडण्याची, आणि त्यादृष्टीने अत्त्यावश्यक ते चिंतन-मनन-अभ्यास व रियाज करत राहण्याची तिची वृत्ती नक्कीच कौतुकास्पद आहे.

sms मागवून मांडला जातो तो संगीताचा बाजार! ते संगीत नव्हे! 'माझं गाणं आपल्याला आवडलं असेल तर please please please मला मत द्या' असा सांगितिक जोगवा मागणाऱ्या कलाकारांची मला अक्षरश: कीव येते. कुठल्याही कलाकाराची कला ही कुठल्याही sms ची मिंधी नसते, नसावी असं मला वाटतं! वीणाधारी, श्वेतवस्त्र परिधान केलेल्या प्रसन्न व तेज:पुंज मुद्रेच्या सरस्वतीला असं फाटक्या वस्त्रानिशी sms द्वारा मतांची भीक मागताना पाहिलं की खरंच खूप वाईट वाटतं! पण मंडळी, खरं त