Showing posts with label रसग्रहण. Show all posts
Showing posts with label रसग्रहण. Show all posts

June 01, 2008

आज़ जाने की जि़द ना करो...

राम राम मंडळी,

आज़ जा़ने की जि़द ना करो.. हे गाणं आपल्याला
इथे ऐकता येईल आणि इथेही ऐकता येईल!फ़रिदा खा़नुमने गायलेलं एक अतिशय सुरेख गाणं! बर्‍याच दिवसापासून या गाण्यावर दोन शब्द लिहायचा बेत होता, आज जरा सवड मिळाली.




आज़ जा़ने की जि़द ना करो,
यू ही पेहेलू मै बैठे रहो..

आज़ जा़ने की जि़द ना करो.. !


क्या बात है, एक अतिशय शांत स्वभावाचं, परंतु तेवढंच उत्कट गाणं! भावनेचा, स्वरांचा ओलावाही तेवढाच उत्कट! यमन रागाचं हे एक वेगळंच रूप!

मंडळी, आजपर्यंत हा यमन किती वेगवेगळ्या रुपाने आपल्या समोर यावा? मला तर अनेकदा प्रश्न पडतो की या रागाचं नक्की पोटेन्शियल तरी किती आहे?! 'जिया ले गयो जी मोरा सावरीया', 'जा रे बदरा बैरी जा' मधला अवखळ यमन, 'समाधी साधन' मधला सात्विक यमन, 'जेथे सागरा धरणी मिळते' मधला जीव ओवाळून टाकायला लावणारा यमन, 'दैवजात दु:खे भरता' मधला ईश्वरी अस्तित्वाची साक्ष पटवणारा यमन, अभिजात संगीतातल्या निरनिराळ्या बंदिशींमधून प्रशांत महासागराप्रमाणे पसरलेला अफाट आणि अमर्याद यमन, आणि 'रंजिश ही सही' किंवा 'आज़ जा़ने की जि़द ना करो' सारख्या गाण्यांतून अत्यंत उत्कट प्रेमभावना व्यक्त करणारा यमन! किती, रुपं तरी किती आहेत या यमनची?! गाणं कुठल्याही अर्थाने असो, यमन प्रत्येक गाण्याच्या शब्दांना त्याच्या अलौकिक सुरावटीचे चार चांद लावल्यावाचून रहात नाही!

आज़ जा़ने की जि़द ना करो,
यू ही पेहेलू मै बैठे रहो..


'यू ही पेहेलू मे बैठे रहो..' मध्ये काय सुंदर शुद्ध मध्यम ठेवलाय! क्या बात है..! 'पेहेलू' या शब्दात ही खास शुद्ध मध्यमाची जागा आहे बरं का मंडळी! 'कानडाउ विठ्ठलू..' आठवून पाहा, आपल्याला हाच शुद्ध मध्यम दिसेल! अहो शेवटी समुद्र हा सगळा एकच असतो हो, फक्त त्याची नांव वेगवेगळी असतात!

'बैठे रहो' हे शब्द किती सुंदररित्या ऑफबिट टाकले आहेत!

हाये मर जाएंगे, हम तो लुट जाएंगे
ऐसी बाते किया ना करो!
आज़ जा़ने की जि़द ना करो,

हाये मर जाएंगे, हम तो लुट जाएंगे..!!


ओहोहो! खल्लास...

'हाये' मधला पंचम पाहा मंडळी! साला, त्या यमनापुढे आणि फ़रिदा खा़नुमपुढे जा़न कुर्बान कराविशी वाटते! हा 'हाये' हा शब्द कसला सुरेख म्हटला आहे या बाईने! छ्या, ऐकूनच बेचैन व्हायला होतं! माझ्या मते इथे या गाण्याची इंटेन्सिटी आणि डेप्थ समजते!

'हम तो लुट जाएंगे..' मधल्या 'हम' वरची जागा पहा!

'मर जाएंगे', 'लुट जाएंगे' मधील 'जाएंगे' या शब्दाचा गंधारावर काय सुरेख न्यास आहे पहा! गंधारावर किती खानदानी अदबशीरपणे 'मर जाएंगे', 'लुट जाएंगे' हे शब्द येतात! मंडळी, हा खास यमनातला गंधार बरं का! अगदी सुरेल तंबोर्‍यातून ऐकू येणारा, गळ्यातला गंधार म्हणतात ना, तो गंधार! आता काय सांगू तुम्हाला? अहो या एका गंधारात सगळा यमन दिसतो हो! यमनाचं यमनपण आणि गाण्याचं गाणंपण सिद्ध करणारा गंधार!

'हाये मर जाएंगे, हम तो लुट जाएंगे' ची सुरावट काळीज घायळ करते! क्या केहेने.. साला आपली तर या सुरावटीवर जान निछावर!

'ऐसी बाते किया ना करो..'!

वा वा! 'किया' या शब्दावरची जागा पाहा. 'करो' हा शब्द कसा ठेवलाय पाहा फंरिदाबाईने! सुंदर..!

खरंच कमाल आहे या फ़रिदा खानुमची. या बाईच्या गाण्यात किती जिवंतपणा आहे, किती आर्जव आहे! खूपच सुरेल आवाज आहे या बयेचा. स्वच्छ परंतु तेवढाच जवारीदार आवाज! आमच्या हिंदुस्थानी रागसंगीतात आवाज नुसताच छान आणि सुरेख असून चालत नाही तर तो तेवढाच जवारीदारही असावा लागतो. फंरिदाबाईचा आवाज असाच अगदी जवारीदार आहे. तंबोरादेखील असाच जवारीदार असला पाहिजे तरच तो सुरेल बोलतो आणि हीच तर आपल्या रागसंगीताची खासियत आहे मंडळी! सुरेलतेबरोबरच, बाईच उर्दूचे उच्चार देखील किती स्वच्छ आहेत! क्या बात है...!

असो, तर मंडळी असं हे दिल खलास करणारं गाणं! बरेच दिवस यावर लिहीन लिहीन म्हणत होतो, अखेर आज टाईम गावला! एखादं गाणं जमून जातं म्हणतात ना, तसं हे गाणं जमलं आहे. अनेक वाद्यांचा ताफा नाही, की कुठलं मोठं ऑर्केस्ट्रेशन नाही! उतम शब्द, साधी पेटी-तबल्याची साथसंगत, यमनसारखा राग आणि फ़रिदाबाईची गायकी, एवढ्यावरच हे गाणं उभं आहे! मी जेव्हा 'फ़रिदाबाईची गायकी' हे शब्द वापरतो तेव्हा मला नेमकं काय म्हणायचं आहे हे कदाचित हिंदुस्थानी रागसंगीतात जाणणारी मंडळी अधिक चांगल्या रितीने समजू शकतील! बाईने दिपचंदी सारख्या ऑड तालाचं वजन काय छान सांभाळलंय! हार्मिनियमचं कॉर्डिंगही खासच आहे. तबलजीनेही अगदी समजून अत्यंत समर्पक आणि सुरेल ठेका धरला आहे! जियो...!

साला, या गाण्याचा माहोलच एकंदरीत फार सुरेख आहे!

आसुसलेली संध्याकाळ आहे, ग्लासात सोनेरी, मावळतीच्या रंगाच्या सोनेरी छटांच्या रंगाशी नातं सांगणारी आमच्या सिंगल माल्ट फ्यॅमिलीतली ग्लेनफिडिच आहे, छानपैकी गाद्या-गिर्द्या-लोड-तक्क्यांची बिछायत पसरली आहे, मजमुहा अत्तराचा मादक सुवास अंगावर येतो आहे, सगळा माहोल रंगेल करतो आहे, तंबोरा जुळतो आहे, सारंगी त्याच्याशी मिळतंजुळतं घ्यायच्या प्रयत्नात आहे, तबल्याच्या सुरांची आस तंबोर्‍याच्या स्वराशी एकरूप होऊ पाहते आहे आणि काळजावर अक्षरश: कट्यार चालवणारी अशी एखादी ललना मादक आणि बेभान स्वरात,

'आज़ जाने की जि़द ना करो..' असं म्हणते आहे!

क्या बात है...!

--तात्या अभ्यंकर.

हाच लेख इथेही वाचता येईल..

December 20, 2007

मेरे मन ये बता दे तू...

राम राम मंडळी,

'मेरे मन ये बता दे तू..मितवा' या गाण्यातली मला दिसलेली सांगितिक सौंदर्यस्थळे सांगण्याचा हा एक प्रयत्न!




'मेरे मन ये बता दे तू
किस ओर चला है तू..'


'मेरे' तल्या शुद्ध गंधाराने श्रीगणेशा. 'मन', 'ये' चा पंचमावरील सुरेख ठेहेराव. 'ये बता' मधली 'पसां' संगती गाण्यातला स्वाभाविक 'षड्ज-पंचम' भाव दाखवते. 'बता' या अक्षरांनी तार षड्जापाशी केलेले मंजूळ knocking! या ठिकाणी लयीचा फार नाजूक टच जाणवतो आणि अक्षरशः सुखावून जातो. क्या बात है..

'दे' वरील पंचम व 'तू' वरील शुद्ध धैवत यांची कानाला अत्यंत गोड लागणारी 'पध' ही संगती. याच संगतीमुळे 'मेरे मन ये बता दे तू' मधला 'दे तू' कमालीचा गोड आणि लोभसवाणा वाटतो! शिवाय 'पध' ही आरोही संगती 'मेरे मन ये बता दे तू' या वाक्याचा उत्तरार्ध कायम ठेवते आणि श्रोत्यांना, आता पुढे काय ? अशी उत्सुकता लावते! ;)

'किस ओर चला है तू' हे त्याचं उत्तर लगेचंच मिळतं! फक्त इथे 'है तू' तली 'पप' ही संगती आणि तिच्यातील इनबिल्ट पंचमावरील न्यास ह्या गोष्टी पूर्वीच्या 'दे तू' तल्या 'पध' संगतीसारखी श्रोत्यांची उत्सुकता अधिक ताणून न धरता श्रोत्यांचे समाधान करतात! विशेषत: 'चला' या शब्दावरील जागा फारच सुरेख आणि तरल आहे. क्या बात है.. ;)

'मेरे मन ये बता दे तू
किस ओर चला है तू.. '

वा! किती गोडवा आणि हळवेपणा आहे या ओळींत! साला ऐकूनच दिल खुष होतो. आता पुढच्या ओळी पाहू..

'क्या पाया नही तूने,क्या ढुंड रहा है तू'

वा, किती साधे पण सुंदर शब्द आहेत! सरगम बरीचशी वरच्यासारखीच. तोच 'पध' आणि 'पप' चा संवाद. एक महत्वाचा फरक असा की 'क्या पाया नही तूने' मधली 'नही' ही तार सप्तकातल्या शुद्ध रिषभावरून तार षड्जावर स्थिरावलेली 'रेंसा' ही संगती आहे. 'नही' तल्या 'ही' या अक्षरावरचा बेहलावा ऐका काय सुरेख आहे! मस्त वाटतं ऐकायला..

'क्या ढुंड रहा है तू' मधला 'है' ही असाच सुखावह आहे! आणि त्यानंतर किंचितसा ऑफबीट टाकलेला 'तू'! वा..

मंडळी, खूप मजा येते हे गाणं ऐकतांना. हा लेख ज्यांना थोडीफार स्वरांची, लयीची ओळख आहे त्यांना अधिक चांगल्या रितीने समजू शकेल असे वाटते! अर्थात, ज्यांना स्वर समजत नाहीत त्यांचंही काहीच अडत नाही. कारण गाणं हे भावल्याशी कारण व हृदयाला भिडल्याशी कारण! ;)

पुढे जाऊया!

'जो है अनकही, जो है अनसुनी,वो बात क्या है बता...'

यातल्या 'वो बात क्या है बता' मध्ये पहा कसा एक एक स्वर ठेवला आहे! 'वो', 'क्या' आणि 'बता' तल्या 'ता' वर धीम्या केरव्यातल्या समेची कशी छान टाळी येते पहा. मस्त...!

आगे बढेंगे!

'मितवा....कहे धडकने तुझसे क्या!'

मंडळी, 'वो बात क्या है बता...' या ओळीनंतर हे गाणं 'पनीसां' ही संगती घेऊन डायरेक्ट तार षड्जाला अनपेक्षितपणे भिडतं! एकदम वळण घेतं. इतका वेळ सुरातल्या सुरात डुंबणारं हे गाणं ताल तोच असला तरी लयीच्या दुगुनचौगुन मध्ये शिरतं! तालाच्या एका छानश्या लयबद्ध पकडीत जातं! क्या बात है मंडळी, खरंच क्या बात है! शंकर महादेवनसारखा विलक्षण प्रतिभावान कलावंत आपल्याला लाभला ही मी अत्यंत भाग्याची गोष्ट समजतो!

दिल्ली स्थानकाला भले १० फलाट असतील. १० नंबरच्या फलाटाहून मुंबईकडे येणारी पंजाबमेल सुटते. दिल्ली स्थानकाबाहेर पडते. दिल्ली स्थानका बाहेरही रुळांची गर्दी असते. त्यातून एक एक रूळ बदलत, ओलांडत अखेर ती मुंबईकडे जाणार्‍या ठाराविक रुळावर येते आणि मग एका लयबद्ध रितीने धावू लागते. या गाण्यातल्या मितवावरही थोडंफार असंच होतं बरं का मंडळी! ;)

'मेरे मन ये बता दे तू, किस ओर चला है तू.. '
'क्या पाया नही तूने,क्या ढुंड रहा है तू'
'जो है अनकही, जो है अनसुनी,वो बात क्या है बता...'

या छानपैकी गुणगुणाव्याश्या वाटणार्‍या ओळी ओलांडून गाठलेला,

'मितवा....कहे धडकने तुझसे क्या!' हा टप्पा खासच! ;)

आणि मग पुन्हा वरील सर्व ओळी आणि मितवा हे सगळं एकाच लयीत धावू लागतं.

'मितवा....कहे धडकने तुझसे क्या,मितवा....ये खुदसे ना तू छुपा'

बाकी 'मितवा' हा शब्द सुरेखच आहे! का माहीत नाही, पण हा शब्द कानी पडला की एकदम आपलेपणा वाटतो. 'मितवा'वरच्या चार आवर्तनांच्या तार षड्जावरच्या ठेहेरावानंतर 'कहे धडकन' मधल्या 'कहे' तल्या 'हे' वर इतकावेळ पिक्चर मध्ये नसलेला कोमल निषाद अचानक प्रवेश करतो आणि या गाण्याला एक वेगळंच फिलिंग येतंम् एक वेगळाच टच येतो. खरंच मंडळी, स्वरांची जादू काही औरच! क्या बात है..

'मितवा' तल्या 'वा' वर घेतलेल्या आकारच्या जागाही सुरेख आहेत. सरगमही छान केली आहे. गाणं लिहिलंही उत्तम आहे. त्याचा अर्थ मनाला भिडतो. गाण्यातल्या दोन कडव्यांमधले टाकलेले सांगितिक तुकडे आणि त्याचं ऍरेंजिंगही मस्त आहे. मंडळी, गाण्याचं ऍरेंजिंग हेदेखील संगीत दिग्दर्शनाइतकंच महत्वाचं असतं तरच चालीचा परिणाम उत्तमरीत्या साधला जाऊ शकतो. एकंदरीतच या गाण्याची भट्टी मस्तच जमली आहे हे निर्विवाद!

शाहरुख आणि राणीवर चित्रित झालेलं हे गीत. आमची राणी बाकी काय छान दिसते हो, क्या बात है! आपंण तर साला तिच्या प्रेमातच आहोत!

श्शश्श शाहरुख हा प्राणीदेखील आपल्याला आवडतो. तसा टॅलेंटेड आहे! :)

शंकर महादेवन जेव्हा सरगम गातो तेव्हा बाकी राणी मस्तच नाचली आहे हो! वा..! शंकरने सरगम छानच गायली आहे!

जीवन डगर मे, प्रेम नगर मे
आया नजर मे जबसे कोई है,
तू सोचता है, तू पुछता है
जिसकी कमी थी, क्या ये वही है?

राणीकडे पाहता पाहता मितवाचा हा स्वतःच्या मनाशीच चाललेला संवाद सुंदर आहे. जिसकी कमी थी, क्या है वही है? या प्रश्नाचं उत्तर मितवा लगेचंच देतो..

हा ये वही है, हा ये वही है
तू इक प्यासा, और ये नदी है

मग? :)

काहे नही इसको तू खुलके बता?..

अरे भाई, अगर छोकरी अच्छी लगती है तो बोल दे ना बॉस!

काहे नही, इसको तू, खुलके बता या सर्वांमधला ऑफबिट छानच टाकला आहे!

अरे बाबा माझ्या मितवा, मनोगता,

ये जो है अनकही, हो है अनसुनी
वो बात क्या है बता, मितवा....

मेरे मन ये बता दे तू,
किस और चला है तू
क्या पाया नही तुने,
क्या ढुंड रहा है तू..

बा माझिया मना, सांगून टाक एकदा तू नक्की कुठे चालला आहेस? तुला काय हवं आहे अन् तू काय शोधतो आहेस :)

मस्त गाणं आहे! गाण्याचं चित्रिकरण आणि लोकेशनस् ही छान आहेत. हिंदी चित्रपटांत अशी छान छान गाणी यापुढेही यावीत हीच इच्छा!

असो! मंडळी सध्या इथेच थांबतो. माझं हे खूप आवडतं गाणं आहे म्हणून यातल्या काही गोष्टी आपल्याशी शेअर कराव्याश्या वाटल्या.

हा लेख मी माझा मित्र राजीव देसाई याला समर्पित करत आहे. छ्या! कधी कधी ही NRI लोकं खूप त्रास देतात. राजीव आता लंडनला असतो. अलिकडेच नोकरीधंद्यानिमित्त बदली होऊन तिकडे गेला. मुंबईत होता तेव्हा नेहमी मला आग्रहाने घरी बोलवायचा. 'ये रे तात्या, काय भाव खातो? मस्तपैकी गप्पा मारू ' असं त्याने अक्षरशः अनेकदा बोलावलं असेल! पण कामाच्या व्यापात मलाच त्याच्याकडे कधी जायला जमलं नाही. किंबहुना मी गेलो नाही असं म्हणूया!
का माहीत नाही, पण आज अचानक राजीवची खूप आठवण झाली. त्याला खरंच आज मी खूप मिस करतोय! आज संध्याकाळी राजीवकडे जांण्यासाठी खरं तर वेळही होता. भरपूर गप्पा मारल्या असत्या त्याच्याशी आणि उर्मिलाशी! पण आता राजीवच मुंबईत नाही! त्याने १० वेळा प्रेमाने बोलावलंन तेव्हा गेलो नाही, आता वाटून काय उपयोग? ;)

शेवटी माणसं जपली पाहिजेत हेच खरं. गाणं तरी माणसाला अजून वेगळं काय शिकवतं?!

पुन्हा एकदा,

'मेरे मन ये बता दे तू
किस ओर चला है तू.. '

या दोन ओळी गुणगुणतो आणि हा लेख संपवतो! ;)

आपलाच,
तात्या मितवा! :)

August 28, 2006

कधी रे येशील तू..

नमस्कार मंडळी,

'सुवासिनी' चित्रपटातील '
जीवलगा कधी रे येशील तू' http://www.musicindiaonline.com/p/x/3UXv-6v4zd.As1NMvHdW/?done_detect हे बाबुजींनी बांधलेलं आणि आशाताईंनी गायलेलं गाणं आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या चांगलंच परिचयाचं आहे. मंडळी, हे माझं अत्यंत आवडतं गाणं आहे. याची कारणं म्हणजे अर्थातच या गाण्याची चाल, गदिमांचे शब्द, आणि आशाताईंसारखी समर्थ गायिका. एखादं गाणं कुणाला कसं भावेल हे काही सांगता येत नाही. मला हे गाणं आवडण्याचं प्रमूख कारण म्हणजे या गाण्याची पूर्णतः रागदारी संगीतावर आधारीत असलेली चाल! हे गाणं ऐकतांना बाबुजींच्या प्रतिभेची अक्षरशः कमाल वाटते. कारण केवळ एकाच रागात हे गाणं नसून एकूण अनेक रागांचा बाबुजींनी फार सुंदर रितीने वापर केला आहे. रागदारी संगीताने नटलेलं एक श्रीमंत गाणं, असंच या गाण्याचं वर्णन करावं लागेल. कितीही वेळा हे गाणं ऐकलं तरी याचा कंटाळा येत नाही, उलट प्रत्येकवेळी हे गाणं तेवढंच ताजं आणि टवटवीत वाटतं आणि मनाला आनंद देऊन जातं.

जाता जाता थोडीशी या गाण्यामागची चित्रपटातील situation समजून घेऊ. हे अशाकरता, की ज्या नायिकेच्या तोंडी हे गाणं आहे तिची मानसिक अवस्था कशी आहे हे समजून घेतलं तर गाणं ऐकतांना अधिक आनंद होईल. हे एक चित्रपटगीत असल्यामुळे या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. या चित्रपटाचा नायक हा सैन्यात लढाईला गेलेला असतो आणि युध्द सुरू असतांना बेपत्ता होतो. त्याचा काहीच थांगपत्ता लागत नाही त्यामुळे त्याच्या घरातली सर्व मंडळी तो मरण पावला असं समजतात. फक्त त्याची बायको तो मरण पावला आहे हे मुळीच मान्य करायला तयार नसते. तिचा नवरा एके दिवशी नक्की परत येईल असा दृढविश्वास तिला असतो. ती त्याची खूप आतुरतेने वाट पहात असते आणि याच प्रसंगावर आधारीत हे गाणं आहे.

दिवसामागून दिवस चालले,
ऋतू मागुनी ऋतू,
जीवलगा, कधी रे येशील तू!

वरती या गाण्याचा दुवा दिलेला आहेच, त्यामुळे हे गाणं आपण ऐकू शकाल, पाहू शकाल. माझे मित्र शशांक जोशी यांच्याशी एकदा याहू निरोपकावर बोलत असतांना मी त्यांना या गाण्यावर लिहायचा विचार आहे असं सांगीतलं आणि त्यांनी अत्यंत उत्साहानी मला या गाण्याचा, आणि शब्दांचा दुवा तातडीने दिला! शिवाय तू लिही, आम्हाला वाचायला नक्की आवडेल अशी दादही दिली. अशी गुणी, दाद देणारी, आणि मदत करणारी माणसं भेटली की माझ्यासारख्यांचं फावतंच! :)

असो, आपल्यापैकी अनेकांनी हे गाणं यापूर्वीही अनेकदा ऐकलं असेल, तरी पण पुन्हा एकदा आपण हे गाणं ऐकावं अशी माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे. म्हणजे यातल्या रागदारी सौंदर्याबद्दल वाचतांना आपल्याला अधिक आनंद होईल असा विश्वास वाटतो. हिंदुस्थानी रागदारी संगीताच्या प्रसाराकरता आणि प्रचाराकरता हा सगळा खटाटोप.

असो, मंडळी, या गाण्यात मला जे सौंदर्य दिसलं ते मी इथे सांगायचा प्रयत्न करणार आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला तसं वाटेलच असं नाही. मी फक्त यातलं रागदारी सौंदर्य समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ही शिकवणी नक्कीच नाही. पण हे गाणं ऐकतांना यातले रागदारी संगीताचे बारकावे मनाला अत्यंत आनंद देऊन जातात. तो आनंद आपल्याबरोबर share करावासा वाटला, आणि या गाण्याला भरभरून दाद द्यावीशी वाटली म्हणून हा लेख.
प्रस्तावनेनंतर आता आपण 'जीवलगा कधी रे येशील तू' या गाण्याच्या शास्त्रीय अंगाकडे पाहुया. या गाण्याचं हे एक शास्त्रीय संगीताच्या दृष्टीतून केलेले एक रसग्रहण आहे असं आपण म्हणुया.

धृवपद आणि ४ कडवी असं हे गाणं आहे. हे गाणं अत्यंत प्रवाही लयीत आहे. धृवपद आणि पहिलं कडवं अर्थातच आपल्या सर्वांच्या आवडत्या यमन रागात आहे. यमन हा बाबुजींचा अत्यंत आवडता राग. अतिशय प्रसन्न राग. का बरं बाबुजींनी यमन रागाचा उपयोग केला असावा? आपण जरा विचार करूया. आधी सांगीतल्याप्रमाणे चित्रपटाच्या नायिकेचा पती हा युध्दावर गेला असतांना बेपत्ता झालेला असतो. पण तो मरण पावलेला नसून एक दिवस नक्की परत येईल असा विश्वास या नायिकेला असतो. आणि हा विश्वास इतका दृढ असतो की कुठलाही अमंगल विचार तिच्या मनांतदेखील येत नाही. उलट तिची तर ही लाडीक तक्रार आहे की 'दिवसा मागून दिवस चालले ऋतू मागुनी ऋतू मागुनी ऋतू, जीवलगा कधी रे येशील तू?' ती प्रियकराची वाट पहात आहे, तरी तिचं मन प्रसन्न आहे! (अभिनेत्री सीमा यांनी हे काम फार छान केलं आहे.) म्हणूनच यमन निवडला असेल का बाबुजींनी? 'जीवलगा' किंवा 'कधी रे' या शब्दांचं उच्चारण बघा किती प्रेमळ आणि रसीलं आहे! क्या बात है!

'धरेस भिजवूनी गेल्या धारा' मधल्या यमनचा प्रवाहीपणा बघा काय सुरेख आहे. खास करून 'भिजवुनी गेल्या धारा' मध्ये यमनची अनुक्रमे तीव्र मध्यम, शुध्द गंधार, आणि शुध्द निषाद अशी छान उतरती कमान आहे. हे तीनही शब्द बोलतानेच्या स्वरुपात आहेत. 'फुलून जाईचा सुके फुलोरा' हा अगदी स्वाभाविक यमन म्हणावा लागेल. सुके फुलोरा हे शब्द पुन्हा प्रवाही बोलतानेमध्ये बांधले आहेत! पहिल्या ओळीतील 'धारा' या शब्दात तीव्र मध्यमातून जो प्रश्न विचारला आहे, त्याचं सुंदर उत्तर दुसऱ्या ओळीतल्या 'फुलोरा' तल्या षड्जाने दिलं आहे! 'नभ धरणीशी जोडून गेले सप्तरंग सेतू' या ओळीतला "गेले' या शब्दातला प्रवाहीपणा पहा. 'सप्तरंग' हा शब्द काय सुरेख बांधला आहे पहा. अगदी र वरचा अनुस्वार देखील आपल्याला ऐकू येतो!! आणि अर्थातच सेतू तल्या तू वरची खास यमनातली उकाराची तान आपल्याला अगदी स्वाभाविकपणे 'कधी रे येशील तू' या मुखड्यावर आणून सोडते! क्या बात है!

'कधी रे येशील तू' हे शब्द गाण्याकरता आशाताईच हव्यात! आपण नेहमी ऐकतो की बाबुजी शब्दांना आणि त्यातल्या भावांना फार महत्व देतात, त्याच्या प्रत्यय 'जीवलगा, कधी रे येशील तू' ही ओळ ऐकतांना येतो. ही जरी एकच ओळ असली तरी ती ओळ बाबुजींनी 'जीवलगा' आणि 'कधी रे येशील तू' या दोन Phrases मध्ये किती चपखलपणे बांधली आहे पहा!!

झालं. आता ऋत्तू बदलला. अजून जीवलग येत नाहीये! शरद ऋतु सुरू झाला, आणि संपला देखील!
'शारद शोभा आली गेली,
रजनीगंधा फुलली सुकली'!
मंडळी, हे कडवं बाबुजींनी 'केदार' रागात बांधलं आहे. राग केदार! मंडळी, केदार म्हणजे स्वरांचा उत्सव! एक रसिला, रंगीला राग! केदारची महती मी काय वर्णावी? आपल्याला पटकन संदर्भ लागावा म्हणून इथे एक उदाहरण देत आहे. गुड्डी चित्रपटातलं 'हमको मन की शक्ती देना' हे गाणं आठवून पहा. हे सुंदर गाणं केदार रागात बांधलेलं आहे. "शारद शोभा आली गेली, रजनीगंधा फुलली सुकली'! वा वा! काय सुंदर केदार मांडला आहे इथे! 'शारद शोभा' तला शुध्द मध्यम पहा! मंडळी, शुध्द मध्यम हा स्वर म्हणजे केदारातला एक अधिकरी स्वर! संपूर्ण केदार रागात या शुध्द मध्यमाची सत्ता असते. 'आली गेली' तल्या 'गेली' तल्या ली वरचा लाडीक धैवत पहा काय गोड आणि नटखट आहे! 'रजनीगंधा फुलली सुकली' तल्या फुलली तल्या ली वरून सुकली तल्या सु वरचं मोहक मिंडकाम पहा! 'चंद्रकलेसम वाढून विरले' हा पुन्हा स्वाभाविक केदार! 'चंद्रकलेसम' च्या सुरावटीतलं केदारचं शृंगारीक अंग! क्या बात है! आणि 'वाढुन विरले' तल्या विरले मधल्या शुध्द मध्यमाचा सवाल, आणि त्याला 'अंतरीचे हेतू' चा जवाब तर केवळ लाजवाब! आणि मंडळी आता करायचं काय? गाणं तर यमन रागात सुरू झालं होतं, आणि आपण आहोत केदारमध्ये! हे कडवं पुरं होऊन पुन्हा यमनतल्या धृवपदात जायचं कसं?!! इथे बाबुजींना का मोठं म्हणायचं ते समजतं. 'अंतरीचे हेतू' तल्या तू वरची जी उकारची तान आहे ती आपल्याला अतिशय बेमालूमपणे यमन मध्ये घेऊन जाते!!! ही तान आणि तिच्या माध्यमातून केदारचा यमनात प्रवेश!! ओहोहो.. एखादी वीज चमकावी असं क्षणभर वाटतं! मला या गाण्यातली ही गोष्ट सर्वात जास्त आकर्षित करते! ही उकाराची तान जेव्हा केदार मधून यमन रागात जाते ना, तेव्हा कानांना विलक्षण सुख देऊन जाते. बरं ही तान नुसतीच यमन मध्ये घेऊन जात नाही तर लगेच तिला जोडून 'कधी रे येशील तू' मधला मुळचा यमन पुन्हा प्रस्थापित करते! मंडळी, ही गोष्ट ऐकायला किंवा वाचायला फार सोप्पी वाटते, परंतु हे एक फार मोठं सांगितीक कौशल्य आहे!!
हेमंती तर नुरली हिरवळ
शिशीर करी या शरीरा दुर्बळ

मंडळी आता ऋतू बदलला. शारदातली शोभा संपली. 'हेमंती तर नुरली हिरवळ' ही ओळ बाबुजींनी सोहनी रागात बांधलेली आहे. मंडळी, सोहनी हा एक स्वतंत्र प्रस्थ असलेला राग आहे. एक विलक्षण आस असलेला हा राग आहे. मारवा थाटातला असल्यामुळे एक अनामिक हुरहूर सतत या रागात जाणवते. आपण वसंतरावांनी गायलेलं अभिषेकीबुवांचं 'सुरत पिया किन छिन बिसराई' हे गाणं ऐकून पहा! (अर्थात हे संपूर्ण गाणं सोहनी, मालकंस, आणि केदार या रागात आहे.) यातल्या 'हर हर दम उनकी याद आयी' या ओळीतली जी हुरहूर आहे ना तीच तर नाही ना 'हेमंती तर नुरली हिरवळ' या ओळीत? पहा बरं आपणच तपासून! :) किंवा मोगल ए आजम मधलं बडे गुलामअलीखासाहेबांचं 'प्रेम जोगन बन' ऐकून पहा बरं! ओहोहो! दिलिपकुमार आणि मधुबालेचा प्रणय, आणि पार्श्वभूमीवर खासाहेबांच्या लोचदार गायकीतला हा सोहनी!! किंवा कुमारजींचं 'रंग ना डारो शामजी' हे ऐकून पहा. मी वर म्हटल्याप्रमाणे एक अनामिक हुरहूर सतत जाणवते या रागात. तसं म्हटलं तर शृंगाररसही आहे आणि त्याच्या पूर्ततेकरताची लागलेली एक हुरहूर. तीही आहे! असं अजब रसायन असलेला हा राग आहे! 'हेमंती तर नुरली हिरवळ' ही ओळ सोहनी मध्ये बांधतांना बाबुजींना हेच तर नसेल ना सांगायचे? 'शिशीर करी या शरीरा दुर्बळ'! मंडळी, हे अर्थातच 'हेमंती तर नुरली हिरवळ' या सोहनीला उत्तर आहे. हा सोहनी नाही. कारण या ओळीतलं 'या' हे अक्षर पंचमावर आहे आणि पंचम हा स्वर सोहनीत वर्ज्य आहे. मग या ओळीतली सुरावट काय सांगते? पुरियाधनाश्री? त्याचं नक्की स्वरूप स्पष्ट होत नाही. मग आता पुढे काय? सोहनी तर नाही. मग आता कोण? हेमंतातली नुरलेली हिरवळ, शिशीरातली कडाक्याची थंडी, सोहनीमुळे झालेलं एक आतूर, अस्वस्थ वातावरण! जीवलग तर येत नाहीये! मंडळी, याचं उत्तर आपल्याला पुढच्या ओळीत मिळतं!!

'पुन्हा वसंती डोलू लागे,
प्रेमांकित केतू'!!
काय, मिळालं का उत्तर? :)

अहो हा आपल्या सगळ्यांचा लाडका बसंत!
झाली की नाही मगासची शिशीरातली सगळी हुरहूर, आतुरता क्षणांत दूर?! अहो, बसंत रागच तसा आहे! बसंत म्हणजे उत्साह, एक नवी उमेद. बसंत राग म्हणजे वैभव! वसंत ऋतूत सगळा निसर्गच अक्षरशः गात असतो!! बाबुजींनी 'पुन्हा' या शब्दात शुध्द मध्यमाचा अत्यंत प्रभावी उपयोग करून, 'पुन्हा वसंती' या शब्दद्वयाद्वारे गाणं एका क्षणात बसंत रागात नेलं आहे! मंडळी, आशाताईंनी गायलेला 'डोलू लागे' हे शब्द आपण नीट ऐका. एवढा काळ लोटूनसुध्दा त्या नायिकेचाचा नवरा युध्दावरून नक्की परत येणारच अशी जी खात्री तिला आहे ना, ती खात्री, ती आशा या 'डोलू लागे' या दोन शब्दात स्पष्ट दिसते!! पुढच्या 'प्रेमांकित केतू' तल्या 'प्रेमांकित' या शब्दाने बसंत पूर्ण झाला आहे आणि 'केतू' तल्या 'तू' वरून गाडी पुन्हा 'जीवलगा कधी रे येशील तू' या ध्रुवपदातल्या यमनच्या मूळ साम्राज्यात!! 'पुन्हा वसंती डोलू लागे, प्रेमांकित केतू', 'जीवलगा कधी रे येशील तू' नीट ऐका मंडळी, गाडीने कुठे फाटा बदलला तो!! :)
पुनरपी ग्रीष्मी तीच काहिली,
मेघावली नभी पुनरपी आली,
पुनश्च वर्षा लागे अमृत,
विरहावर ओतू

वसंतपण संपला आणि ग्रीष्मातील काहिली सुरू झाली! ग्रीष्मही रखरखीतच गेला, पण जीवलग अजून काही आला नाही. आता ग्रीष्मही संपत आला, आणि हे दाखवण्याकरता बाबुजींनी'पुनरपी ग्रीष्मी तीच काहिली' ही ओळ मिया मल्हारात बांधली आहे! 'पुनरपी ग्रीष्मी' या थोड्याश्या अवखळ मल्हारच्या सवालाला बाबुजींनी 'तीच काहिली' च्या सुरावटीतून मल्हारातूनच तेवढंच वजनदार उत्तर दिलं आहे! खास करून काहिली या शब्दाचं वजन पहा! क्या बात है!! 'मेघावली नभी पुनरपी आली'!! मंडळी, ही ओळ नीट ऐका. बाबुजींनी छान चढत्या क्रमाने, आरोही अंगाच्या मल्हाराचे फार सुरेख रूप या ओळीत दाखवले आहे! 'मेघावली नभी' हे दोन शब्द छानपणे सप्तकाच्या पूर्वांगात आहेत, आणि 'पुनरपी आली' हे दोन शब्द उत्तरांगात! बोलबोलता अंधारून येतं आणि हळुहळू पाऊस सुरू होऊन काही वेळातच चांगलाच जोर धरतो असं वाटतं की नाही? मंडळी, हीच तर ताकद आहे मल्हारची! 'पुनश्च वर्षा लागे अमृत विरहावर ओतू'! आहाहा! गाणं गेलं की हो संपूर्णपणे मल्हारच्या ताब्यात!! :) 'पुनश्च वर्षा लागे' ची सुरावट ऐकतांना धो धो पाऊस सुरू आहे आणि त्यातच मधूनच एखादी कडाडून वीज चमकावी असं वाटतं की नाही? आणि 'लागे अमृत' हे शब्द थोड्याश्या विलंबानेच, अवकाशानेच उच्चारले आहेत, त्यामुळे संपूर्ण आसमंतात दूरदूरपर्यंत सुसाट पाऊस सुरू आहे, असा परिणाम त्यातून बाबुजींनी साधला आहे! क्या बात है!'विरहावर ओतू' तल्या 'वर' या शब्दातून आपण पुन्हा अत्यंत चपखलपणे मूळच्या यमनमध्ये जातो! येथे आपण असं म्हणू शकतो की 'पुनश्च वर्षा लागे अमृत' या मल्हाराच्या सवालाला 'विरहावर ओतू, जीवलगा कधी रे येशिल तू' हे यमनचं फार सुरेख उत्तर बाबुजींनी दिलं आहे!!!

असो! मंडळी काय आणि किती लिहू या गाण्यावर? माझ्या परिने मी या गाण्याच्या शास्त्रीय अंगाकडे बघायचा प्रयत्न केला आहे. जो आनंद हे गाणं ऐकतांना मला स्वतःला झाला तो मी आपल्याला सांगायचा हा एक प्रयत्न केला आहे. जे काही चुकलं असेल तर ते माझं, आणि जे काही चांगलं लिहीलं असेल ते माझ्या बाबुजींचं!!

वास्तवीक, हे एक तीन-चार मिनिटात संपणारं गाणं, पण काय काय सांगीतलं आहे त्यात बाबुजींनी इतक्या थोड्या अवधीत?! खरंच कमाल वाटते!! गदिमांच्या शब्दांची जादू केवळ अवर्णनीय! आणि आशाताई? जाऊ दे मंडळी. त्यांच्याबद्दल मी काय