November 10, 2011

वाजंत्री वाजतात, वाड्यात काय झालं?

राम राम मंडळी,

मासिक धर्म सुरू होणं ही कुठल्याही मुलीच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना. निसर्गाने तिला बहाल केलेलं ते सन्माननीय स्त्रीत्व. आजच्या काळात मासिक धर्म सुरू होऊन जेव्हा एखादी मुलगी वयात येते, ते तिच्या आईशिवाय कुणालाच फारसं कळत नाही. फार तर तिच्या वडिलांना किंवा मोठ्या ताईला हे कळणं शक्य आहे. या व्यतिरिक्त ती घटना फारशी कुणाला कळावी किंवा तिचा गाजावाजा व्हावा असं त्यात विशेष काही नाही. ती एक नैर्सर्गिक गोष्ट आहे.

परंतु दादासाहेब फाळके पारितोषक विजेत्या २२ जून १८९७ या सुंदर चित्रपटात दाखवलं गेल्याप्रमाणे मुलीचं हे ऋतुचक्र सुरू झालं की त्या घरात एक छोटेखानी समारंभवजा प्रसंगच साजरा केला जात असे. एक तर त्या काळात मुलगी वयात यायच्या आधीच तिचं लग्न केलं जात असे, (किंबहुना मुलगी वयात येईपर्यंत बिनलग्नाची राहिल्यास तो एक चर्चेचा विषय होई आणि प्रसंगी तिची व तिच्या आईवडिलांची कुचंबणाही होत असे - संदर्भ - शिरुभाऊंची तुंबाडचे खोत ही कादंबरी) त्यामुळे जेव्हा मुलगी वयात येत असे तेव्हा ती आईऐवजी सासूच्याच सान्निध्यात असे.

२२ जून १८९७ या चित्रपटात मात्र चाफेकरांच्या घरातील एक सूनबाई सीता, (बहुधा चाफेकर बंधुंपैकी वासुदेव हरि तथा बापुराव चाफेकर यांची पत्नी) जेव्हा वयात येते तो समारंभवजा प्रसंग चित्रित केला आहे आणि सोबत एक छान गाणंही आहे. माझा हा लेख मुख्यत्वेकरून त्या गाण्याबाबत आहे. त्या काळात मुलगी वयात आली म्हणजे तिला 'न्हाणं' अथवा 'नहाण आलं', 'ती मखरात बसली', 'तिला पदर आला', इत्यादी शब्दप्रयोग वापरात असायचे. त्यापैकीच 'न्हाणं आलं' हे शब्द सदर गाण्यात वापरले आहेत..

सीताबाईला चाफेकळीला न्हाणं आलं.. (येथे ऐका - चित्रफितीतील गाण्याची सुरवात ४ मिनिटे व १८ सेकंदांनी)

आता मंडळी, खरं सांगायचं म्हणजे या गाण्यात काही गहन अर्थबिर्थ आहे असं मुळीच नाही. आपण फार तर याला माजघरातलं एक गाणं, असं म्हणू शकतो. तरीही या गाण्याची चाल छान आहे, शब्द साधे परंतु मस्त आहेत आणि विशेष म्हणजे यातली यमकं एकदम फक्कड आहेत. लयीची गुंफण तर झकासच आहे. सोबत तालाकरता फक्त एक चौघडाटाईप वाद्य आणि चाळ किंवा घुंगरू. तरीही हे गाणं जमून गेलं आहे..! :)

हम्म. पुण्यातल्या एका रस्त्यावरून मी चाललो आहे. वाटेत खास सदाशिवपेठी एक वाडा लागला आहे. पण त्यातून हा वाजंत्य्रांचा कसला आवाज येतो आहे? काही लग्नबिग्न आहे क्काय त्या वाड्यात..?

छे हो..!

वाजंत्री वाजतात वाड्यात काय झालं?
सीताबाईल चाफेकळीला न्हाणं आलं..! :)

'वाड्यात काय झालं..' मधली 'पपप मगरेग' संगती एकदम मस्त! आणि 'न्हाणं आलं' चा षड्जावरचा न्यास एकदम खणखणीत बरं का. कुणी गायलंय ते माहीत नाही, पण बाईचा आवाज सुरेल आहे, मोकळा आहे. अगदी चित्पावनी आहे असं म्ह्टलंत तरी चालेल! :)

पहिल्यानं न्हाणं आलं सासू वाटिते साखर
सीताबाई हिचा दीर गुंफितो गं मखर..!

सूनबाईला न्हाणं आलं म्हणून आता सासू काय काय वाटते आहे पाहा. सर्वप्रथम ती साखर वाटते आहे. सीताबाईचा दीर आपल्या भावजयीला मखरात बसण्याकरता तिच्याकरता मखर गुंफतो आहे. इथे साखर आणि मखर हे साधं शिंपल यमक जुळवलं आहे. बाय द वे, दीर या शब्दातली 'मध' ही संगती अंमळ सुरेखच..! :)

पहिल्यानं न्हाणं आलं सासू वाटिते बत्तासे
सीताबाई जरी तुझ्या मखरी आरसे..!

साखर झाली. आता बत्तासे! मज्जा आहे बॉ सीताबाईची. मंडळी बाकी काय पण म्हणा, बत्तासे मात्र चवीला झकासच लागतात हो! आणि आरसे/बत्तासे हे यमकही मस्त! :)

बाय द वे, 'सीताबाई जरी तुझ्या मखरी आरसे..!' ह्या ओळीची लय मात्र विशेष सुरेख आहे. आणि सोबत छुन छुन छुन असा घुंगरांचा ठेका.. सी ता बा ई जरी तुझ्या मखरी आरसे हे शब्द किती सुरेख लयीत पडले आहेत पाहा..!

ह्या गाण्याची चाल कुणी बांधली आहे ते माहीत नाही. की पारंपारिकच आहे..?

पहिल्यानं न्हाणं आलं सासू करिते सोहळा
सीताबाई तरी नेस पाटव गं पिवळा..

अगो सीताबाई, अगो रांडच्ये तुझी सासू तुला न्हाणं आलं म्हणून एवढा सोहळा करत्ये, अगो तो पिवळा पाटव तरी नेस गो बये..! :)

मला 'पाटव' या शब्दाचा एक्झॅक्ट अर्थ माहीत नाही परंतु हा शब्द मात्र एकदम मस्त वाटतो. पुन्हा सोहळा-पिवळा हे यमक झकास..! :)

पिव्ळं पिवळं गं पातळ सार्‍यांना सांगितलं
सीताबाई हिला न्हाणं आलं आईकलं..!

धत तेरीकी..! अहो तिला नहाण आल्याचा एवढा सोहळा केलात आणि वर म्हणता काय? तर,

सीताबाई चाफेकरणीला नहाण आलं असं ऐकलं खरं! :)

'पिवळं पिवळं पातळ' हे शब्द लयीत छान बसावेत म्हणून 'पिव्ळं पि व ळं पातळ' असे टाकले आहेत. या गाण्याची सांगितिक बाजू वरकरणी जरी साधी सोपी वाटली, तरी तिला सुरालयीचा भक्कम पाया लाभला आहे हे निर्विवाद..!

'ऐकलं' या शब्दाकरता 'आ ई क लं' ही चार लयदार अक्षरं गाण्यात अधिक छान शोभतात..! :)

पण मंडळी, क्षणभर यातला मजेचा वा सांगितिक भाग सोडून द्या, पण ज्या पार्श्वभूमीवर हे गाणं चित्रित केलं आहे ती पार्श्वभूमी खूप गंभीर आणि भयानक आहे. चाफेकरांच्या घरातल्या आणि इतर चार घरच्या लेकीसुना हा नहाण प्रसंग त्याकाळची एक रीतभात म्हणून निभावतात खरा परंतु,

थोरले चाफेकर दामोदर हरि चाफेकर फासावर गेले आहेत, त्यांची विधवा गाण्यातल्या एका चित्रात सुन्न बसलेली दाखवली आहे. इतर दोघा चाफेकर बंधुंची फाशीही निश्चित आहे. एकाच घरातील तीन तीन तरूण मुलं फासावर जात आहेत त्या बापाची अवस्था काय असेल..? एक साधा कीर्तनकार तो. उद्या मुलं कीर्तन शिकतील, काही कामधंदा करतील यावरच सारी मदार असणारा..! गाण्यातल्या एका चित्रात तो खिन्न, हारलेला, हताश बापही बसलेला दाखवला आहे..!



असो..

कुठून विषय सुरू केला होता, अन् कुठे येऊन पोहोचलो पाहा..!

आता अधिक काही लिहित नाही.. माझा त्या तिघा चाफेकर बंधुंना मानाचा मुजरा..!

-- तात्या अभ्यंकर.

November 01, 2011

..पर अंधेरे से डरता हु मै मां..!

मेरी मां.. (येथे ऐका)


"आई नको ना गं मला इथे एकट्याला ठेऊन जाऊस! मी तसं कधी बोलून दाखवत नाही पण मी अंधाराला खूप घाबरतो गं आई. इथे खूप अंधार आहे.
हो, आहे मी थोडासा खोडकर, पण तू मला खूप आवडतेस आणि मला तुझी खूप काळजीही वाटते. आता हे कसं तुला समजावून सांगू..? पण तुला तर हे सगळं माहित्ये ना आई? मग मला इथे एकट्याला का ठेऊन जातेस? आता खरंच मी चांगला वागेन. मस्ती, द्वाडपणा करणार नाही. प्रॉमिस..! पण मला इथे नाही रहायचं..!"

tjp

"इथे सगळी खूप अनोळखी मुलं आहेत. मला भिती वाटते इथली.. मला इथे ठेऊन जाऊ नकोस. ही गर्दी आहे ना, ती मला काहितरी करेल मग मी परत घरी कसा येऊ शकेन..? मला तुझ्यापासून इतका दूर करू नकोस की माझी आठवणही तुला येणार नाही.. खरंच मी इतका वाईट आहे का गं आई..? सांगा ना..!"

"आई, मला माहित्ये मी तुझा खूप लाडका आहे. बाबा जेव्हा जेव्हा मला जोरांने ओरडतात ना, तेव्हा तू येऊन माझी बाजू घेशील, मला सांभाळशील याची खात्री असते मला! तू जवळ असलीस ना आई, की खूप सुरक्षित वाटतं मला! पण मी बाबांना हे काही सांगू शकत नाही. तुला हे सगळं माहित्ये ना आई..? मला भिती वाटते त्यांची. खरंच भिती वाटते.."

tjp

चवथी-पाचवी पर्यंत आईच्या पदराखाली लाडाकोडात वाढलेला ईशान अवस्थी. एक खोडकर मुलगा. अक्षरं/आकडे समजण्याची आकलनशक्ती क्षीण असलेला, ती समजून घेतांना गडबड होणारा आणि त्यामुळेच 'लेटर्स आर डान्सिंग' असं म्हणणारा ईशान.. तो सुधारावा म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला आता शाळेतून काढून लांब बोर्डिंग शाळेत ठेवला आहे. तिथे सगळं नवीन. मुलं/सवंगडी नवीन. जाड चश्मावाले अन् मिश्यावाले कडक मास्तर. तिथे आता लाड करणारी आई नाही..!

हे गाणं म्हणजे त्या लहानग्याचं मनोगत..! आईवेडं पोर आहे ते. गाण्याचं चित्रिकरण केवळ अप्रतिम...रडवेलं झालेलं ते पोरगं, आता एकटं, एकाकी. आत्तापर्यंत अगदी सकाळी उठवण्यापासून ते पायात मोजे-बुट चढवणारी आई होती. आता हे लाड नाहीत. कडक मास्तरांच्या निगराणीखाली सगळं आपलं आपण करायचं! आत्तापर्यंत कौतुकानं गरम गरम भरवायला आई होती, आता मेसच्या शिस्तीत आपलं आपण जेवायचं! :)

पोरगं खरंच बावरलं आहे, घाबरलं आहे. शेवटी नळ सोडून आपला रडवेला चेहेरा घुतं आणि चुपचाप झोपतं आणि आईविना पहिला दिवस संपतो..! :)

'तारे जमी पर'. एक सुरेख, देखणा, अप्रतिम चित्रपट आणि त्यातलं शंकर महादेवन ने गायलेलं हे अप्रतिम गाणं. जियो..!

पण खरंच मंडळी, हे गाणं ऐकताना/पाहताना पोटात कुठेतरी खूप तुटतं..पडद्यावर हे गाण पाहताना कुठेतरी आपल्या आईची आठवण होते आणि पडद्यावरचं चित्र क्षणभर धुसर होतं.. परमेश्वराने आई अन् तिचं लेकरू हे नक्की कसलं नातं निर्माण करून ठेवलं आहे हे खरंच समजत नाही...!

-- तात्या अभ्यंकर.

October 31, 2011

हाल ए दिल..

राम राम मंडळी,

हाल ए दिल.. (येथे ऐका)

श्री अमिताब बच्चन ऊर्फ अमिताब श्रीवास्तव (यूपीतल्या इलाहाबादच्या या भैय्याचं 'श्रीवास्तव' हे मूळ आडनांव, जे हरिवंशरायांनी 'बच्चन' असं बदलून घेतलं), ऊर्फ बीग बी, ऊर्फ बच्चनसाहेब हा खरोखर एक अजब माणूस आहे. अत्यंत गुणी कलाकार, एक मोठा कलाकार, एक निर्विवाद दिग्गज! गेली ४० दशकं हा बुढ्ढा म्हातारा होतच नाहीये. त्याचा अभिनय, त्याचा आवाज सगळंच जबरा! आणि मुख्य म्हणजे आजही सर्व जुन्या नव्या माणसांना जमवून घेत हा इसम पुढेपुढेच चालला आहे. मग त्याचा केबीसीचा चौथा की पाचवा सीजन असो, की अलिकडेच प्रदर्शित झालेला 'बुढ्ढा होगा तेरा बाप' हा चित्रपट असो..इतका मोठा कालावधी प्रकाशाच्या झोतात रहाणं आणि लौकिकार्थाने 'नंबर वन' पदावर रहाणं फारच कमी लोकांना जमतं त्यापैकीच बच्चन साहेब एक.

तूर्तास मी हे अमिताब पुराण इथेच आवरतं घेतो आणि वळतो एका छानश्या गाण्याकडे. 'बुढ्ढा होगा..' चित्रपटातलंच विशाल-शेखरचं संगीत असलेलं आणि खुद्द बचन साहेबांनी गायलेलं 'हाल ए दिल..' हे यमन रागातलं गाणं. यमन आला रे आला की माझ्यासारख्या यमनभक्तांची समाधी लागलीच म्हणून समजा. मग तो यमन मदनमोहनच्या अनपढ मधला 'जिया ले गयो जी मोरा सावरिया असो', की बाबूजींच्या 'समाधी साधना' तला असो की विशाल-शेखर च्या 'हाल ए दिल..' मधला असो. यमनला तोड नाही, यमनला पर्याय नाही. आपल्या अभिजात रागसंगीताला पर्याय नाही. फक्त काही वेळेस खंत एकाच गोष्टीची वाटते की अलिकडचे संगीतकार त्याची ताकद, त्यातलं अफाट-अनंत असं पोटेन्शियल ओळखू शकत नाहीत, पाहू शकत नाहीत, किंबहुना त्यांची कुवतदेखील कुठेतरी कमी पडत असावी. मला नक्की माहीत नाही.. असो..

या पार्श्वभूमीवर विशाल-शेखरचं नक्कीच कौतुक आणि अभिनंदन की त्यांनी हा छोटेखानी यमन आम्हाला दिला..

हाल ए दिल तुमसे कैसे कहू..

स्वभावत:च हे गाणं म्हणजे एक गुणगुणणं आहे. स्वत:शीच साधलेला संवाद आहे. माझं 'हाल ए दिल..' बाई गं तुला कसं सांगू? 'नी़रेग' ही यमनची अगदी 'बेसिक लेसन' असलेली संगती छानच गायली आहे बच्चनसाहेबांनी. त्याच 'हाल ए दिल' ची 'प परे' ही अजून एक संगती. आणि 'कैसे कहू..' तला षड्ज. व्वा बच्चबबुवा!

यादो मे ख्वाबों मे..

डायरेक्ट धैवतावर न्यास असलेली 'यादो मे' तली 'गपध' संगती पुन्हा छान आणि 'ख्वाबो मे' तली 'धनीनीध..' ही सुरावट घेऊन बच्चनसाहेब ज्या रितीने पंचमावर स्थिरावतात ते केवळ सुरेख आणि कौतुकास्पद. हा पंचम अत्यंत सुरीला..!

'आपकी छब मे रहे..'

इथे 'आप की' शब्दातली पपम' संगती. हा तीव्र मध्यम यमनाची खुमारी वाढवतो, जादुई तीव्र मध्यम हा..! आणि 'छब मे रहे..' मध्ये हळूच लागलेला शुद्ध मध्यम आणि शुद्ध गंधारावरचा नाजूक न्यास! हा शुद्ध मध्यम आल्यामुळे मात्र आमचा यमन हळूच लाजतो आणि क्षणात त्याचा 'यमनकल्याण..' होतो. सांगा पाहू, कोणता बरं हा शुद्ध मध्यम? 'क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा..' ही ओळ आठवा पाहू क्षणभर. यातल्या 'मेळ' या शब्दात तुम्हाला हाच शुद्ध मध्यम सापडेल. हे आपले उगीच तात्यामास्तरांच्या शिकवणीतले दोन बोल, जे वाचक संगीताचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता बर्र् का! :)

'आठवणीत आणि स्वप्नात मी तुझ्याच 'छब' मध्ये राहतो गं बये. आता काय नी कसं सांगू तुला..!' :)

आणि ही बया तरी कोण..? तर साक्षात ड्रीमगर्ल हेमा. हो, आमच्या धर्मा मांडवकाराची हेमा! खरंच कमाल आहे बुवा या बाईची. इतकं वय झालं तरी अजूनही काय दमखमातली दिसते!


तर अशी ही दमखमातली हेमा आणि आमचा पिकल्या फ्रेन्च कट मधला गॉगल लावलेला बुढ्ढा जवान बच्चन यांच्यावरचं या गाण्याचं चित्रिकरणही छान. आणि सोबत बच्चनचा सादगीभरा सुरीला आवाज, छान सुरेल लागलेले यमनाचे स्वर आणि हाल ए दिल सांगणारे शब्द..!

विशाल शेखर, तुमचं अभिनंदन आणि कौतुक. अशीच चांगली चांगली गाणी, सुरावटी अजूनही बांधा रे बाबांनो. थांबू नका. हल्लीच्या काळात चांगलं सिनेसंगीत ऐकायला मिळत नाही. आम्ही भुकेले आहोत. चांगली चांगली गाणी बांधा, तुमच्या उष्ट्याकरता नक्की येऊ..!

-- तात्या अभ्यंकर.

October 26, 2011

मोरा गोरा रंग..

माझ्या सर्व मायबाप वाचकांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!

मोरा गोरा रंग.. (येथे ऐका)


थोरल्या बर्मनदांचं बंदिनी चित्रपटातलं एक अप्रतीम गाणं. दिग्दर्शक बिमलदा, गीत- गुलजारसाहेब, संगीतकार थोरले बर्मनदा, सोज्वळ सौंदर्यवती नूतन आणि मा दिनानाथरावांची थोरली हृदया, अर्थात लतादिदि मंगेशकर. (आपल्या महितीसाठी - दिदिचं पाळण्यातलं नांव - 'हृदया' हे होय.)

सगळी टीमच भन्नाट. फक्त आणि फक्त उत्कट कलेशी बांधिलकी असलेली. यातलं ना कुणी त्या बापुडवाण्या झी/सोनी वहिनीच्या उथळ इंडियन आयडॉलच्या स्पर्धेतलं, ना कुणी महागायक/महागयिका, महाराष्ट्राचा गौरव इत्यादी समस चा लाचारी जोगवा मागणर्‍या खेदजनक स्पर्धेतलं. तरीही सारेच अव्वल..!

मोरा गोरा अंग लइ ले
मोहे शाम रंग दइ दे
छुप जाऊँगी रात ही में
मोहे पी का संग दइ दे

एका तरुणीचं मनोगत. लइ ले आणि दइ दे ही क्रियापदं अगदी वळणदार..किती सुरेख शब्द आहेत या गाण्यात! हिंदी भाषेचा गोडवा काही औरच आणि त्यातले लइ दे, दइ दे, हमका बताइ दे इत्यादी उच्चार केवळ दिदिनेच करावेत..

एक लाज रोके पैयाँ
एक मोह खींचे बैयाँ

क्या बात है! जेवढा मोठा मोह, तितकीच मोठी अदब आणि संस्कार..! मोहाने बाही खेचली जातेय परंतु संस्कार पाउलांना थांबवताहेत..! 'एक मोह खिचे पैया' तल्या दिदिच्या कोमल गंधाराबाबत काही भाष्य करायला मी फार छोटा माणूस आहे! 'बैयाँ' शब्दातली 'नीसां' संगती केवळ लाजवाब. आणि त्यानंतरचं दिदिचं 'हाए..!'

असं 'हाए' गेल्या दहा हज्जार वर्षात झालं नाही आणि पुढे होणार नाही..! (जाता जाता - तेच 'हाए' अनुराधा या अप्रतीम चित्रपटात पं रवीशंकरांनी दिदिच्या 'कैसे दिन बिते कैसे बिती रतिया..' या गाण्यात घेतलं आहे!)



जाऊँ किधर न जानूँ
हम का कोई बताई दे

'जाऊँ किधर न जानूँ..' या ओळीतलं कोमल निषाद आणि शुद्ध धैवताचं तसं अनोखं परंतु छान अद्वैत..आणि त्याच नीध चं 'हम का कोई बताई दे' या ओळीनं पंचमावर न्यास करून केलेलं छान समाधान..!

बदरी हटा के चंदा
चुप के से झाँके चंदा

हम्म! इतका वेळ ढगाआड लपलेला चंदा आता हळूच त्या मुलीचं मनोगत ऐकायला आला आहे. प्रकट झाला आहे.

तोहे राहू लागे बैरी
मुस्काये जी जलाइ के

पण तिला ते तेवढंसं आवडलेलं नाहीये. तिच्या चेहेर्‍यावरचा तो लटका राग केवळ क्लास! आणि मग 'तोहे राहू लागे बैरी..' असं म्हणून त्या चंद्राला 'तुझ्यामागे राहूचं शुक्लकाष्ट लागो..' अशी दिलेली प्रेमळ धमकी!

आपले गुलजारसाहेब शनीच्या ऐवजी बहुधा राहूला अधिक घाबरत असावेत. म्हणूनच ते नायिकेकरवी चंद्राच्या मागे चक्क राहूची पीडा लावू इच्छितात..! :)

कुठे अवखळपणा तर कुठे थोडा नखरा, कुठे लटकेपणा तर कुठे 'मोहे पी का संग..' किंवा 'तोहे राहू लागे बैरी..' तली मनलुभावणी मेलडी. एखादं गाणं किती देखणं असावं, सुरेख असावं..?

कहाँ ले चला है मनवा
मोहे बाँवरी बनाइ के

क्या केहेने! इथे किती मोठी गोष्ट सांगून गेलेत गुलजारसाहेब! प्रत्येक तरुणीच्या आयुष्यात असं एक वेडं वय येतं जेव्हा कुणीतरी भेटावसं वाटतं, कुणासोबततरी हातात हात धरून कुठेसं जावसं वाटतं. मस्त वार्‍यावर फडफडणारं मन. अगदी खरोखर 'बाँवरी' बनवणारं ते वय..!

मंडळी, एखादं गाणं आपल्याला ऐकायला आवडतं, कानांना गोड वाटतं. परंतु मी इथे इतकंच सांगेन की आपण त्याही पुढे जाऊन त्या गाण्याकडे कसं बघतो, त्यातल्या स्वरसंगती, न्यासस्वर, लयतालाची बाजू, त्यातले शब्द अन् त्याची चाल कशी समजून घेतो हेही महत्तवाचं आहे. त्यामुळे ते गाणं आपल्याला निश्चितच अधिकाधिक आनंद देऊन जाईल..

उगाच कुठेही गोंगाट नसलेला कमीतकमी वाद्यमेळ, सुंदर शब्द, वजनदार ठेका, तरीही अगदी भरपूर मेलडी असलेलं हे गाणं. नूतनची मोहक छबी आणि तिचा सहजसुंदर गाण्यानुरूप अभिनय. का माहीत नाही परंतु नूतनकडे बघताना मला उगाचंच आमच्या मुमताज जहान बेगम दहलवी 'आपा'ची आठवण झाली! :)

आता कुठे गेली हो अशी गाणी? खरंच, कुठे गेली..? :(

आहे तो केवळ बराचसा गोंगाट अन् मेलडीचा अभाव असलेले भडक वाद्यमेळ..!

असो..

-- (दिदिची व्यक्तिपूजा, विभूतीपूजा करणारा तिचा एक लोटांगणवादी चाहता) तात्या अभ्यंकर.

October 10, 2011

हाथ छुटे भी तो...


आज पुन्हा एकदा खूप काही हरवलं आहे. पोटात खूप काही तुटतं आहे. जगजीत सिंग साहेबांसारख्या एका मनस्वी सुरील्या, भावतरल गळ्याच्या धन्याला आज आपण मुकलो आहोत. एक खूप मोठा कलाकार आज आपल्यातून निघून गेला आहे.

जगजित सिंग यांच्याच एका गाण्याचे रसग्रहण करण्याचा माझा हा एक प्रयत्न. हीच माझी त्यांना विनम्र आदरांजली..!

हाथ छुटे भी तो..!
(इथे ऐका)

'पिंजर' चित्रपटातलं उतम सिंग यांचं संगीत असलेलं जगजित सिंग यांनी गायलेलं हे गाणं. केवळ अप्रतीम. हे गाणं ऐकलं की काव्य, संगीत आणि गायन या सर्वार्थाने एक अत्यंत उच्च दर्जाचं गाणं ऐकल्याचं समाधान मिळतं, जीव तृप्त होतो!

हाथ छुटे भी तो रिश्ते नही छुटा करते,
वक्त की शाख से लम्हे नही टुटा करते!

पुरियाधनाश्रीचे बेचैन स्वर. राग पुरियाधनाश्री. समाधीचा राग..!

'वक्त की शाख से लम्हे..' या ओळीतील 'लम्हे'वर कोमल धैवत विसावतो, उदास सायंकालच्या सावल्या लांबतात आणि ते 'लम्हे' काळजात घर करतात..!

जिसने पैरों के निशा भी नही छोडे पिछे,
उस मुसाफिर का पता भी नही पुछा करते..!

क्या केहेने..! या ओळीचं चित्रिकरण तर विशेष सुरेख आहे!

जिसने पैरो के..' ही ओळ जेव्हा तार षड्जाला स्पर्ष करते तिथे पुरियाधनाश्री जीव कासावीस करतो. ते पुरियाधनाश्रीचं समर्पण! आणि त्यानंतरची पंचामवरची अवरोही विश्रांती. हा खास पुरियाधनाश्रीतील पंचम. प्रार्थनेचा पंचम..! आणि ही सारी जगजितसिंग साहेबांच्या सुरांची आणि त्यांच्या विलक्षण भावपूर्णता असलेल्या ओल्या रसिल्या गळ्याची किमया..!

'छुट गये यार ना छुटी यारी मौला..' चा कोरस सुंदर. कोरसचं सरगम गायनही अगदी परिणामकारक. गाण्याच्या चित्रिकरणातील उर्मिला अभिनयात, दिसण्यात नेहमीप्रमाणेच लाजवाब!

प्रिय जगजित सिंग साहेब,

हाथ छुटे भी तो रिश्ते नही छुटा करते,
वक्त की शाख से लम्हे नही टुटा करते!

खरं आहे आपण म्हणता ते. आज आपण आम्हा सर्वांचा हात सोडून निघून गेला आहात, परंतु आपल्यातलं सुराच नातं कधीही तुटणार नाही. आम्हाला तृप्ती, समाधान आणि आनंद देणर्‍या आपल्या अनेक मैफलींमधले, गायकीमधले लम्हे कधीही पुसले जाणार नाहीत, विसरले जाणार नाहीत.

सुरांनी बांधलेली नाती कधीही तुटत नाहीत हेच खरं..!

-- तात्या अभ्यंकर.

August 05, 2011

नंदावैनी...

"अरे नका जीव खाऊ माझा! मी मेले की सुटाल सगळे एकदाचे..!"

"राहूल, का उठलास जेवता जेवता? एवढाच भात उरला आहे तो संपवून टाक पाहू पटकन.."

"अरे वा! आमची अस्मिताताई आली का शाळेतून! आज काय बुवा मज्जा आहे एका मुलीची. आज वाढदिवस म्हणून नवा ड्रेस घालून शाळेत गेली होती वाटतं माझी राणी! चल, हातपाय धुवा बेटा लौकर. गरमगरम वरणभात खायचाय ना?"

"अरे देवा, थांब मी आल्ये..! काय खाल्लस काय रात्री? अरे थांब थांब, उभा रहा तिथेच. नाहीतर ते बरबटलेले कुले घेऊन हिंडशील गावभर.." असं म्हणून पदरबिदर खोचून नंदावैनी त्या कुणा लहानग्याला उचलून घाईघाईत संडासात घेऊन जाते!

"प्रसाद, तू का घेतलास त्याचा चेंडू? अरे अद्वैत, मारू नको ना त्याला. मी आता उठले ना, की झोडून काढेन हां सर्वांना!"

"मी मेले की सुटाल सगळे एकदाचे..!"

दुपारचे काहितरी बारा-साडेबारा वाजलेले असतात आणि नंदावैनी मुक्त कंठाने घरातलं पाळणाघर हाकत असते. एकिकडे,

"गोविंदा माझा कृष्णमुरारी..." असं कुठलंसं गाणं म्हणत मांडीवरल्या कुणा तान्ह्या आर्चिसला खेळवत असते, त्याला ग्राईपवॉटर का कायसं पाजत असते! चिन्मय, प्रसाद, नेहा, राहूल, अस्मिता, अथर्व, चैत्राली अशी दहापंधरा बाळगोपाळ मंडळी नंदावैनीच्या पाळणाघरात आहेत. या सार्यांचे आईवडिल मोठ्या विश्वासाने आपापली पिल्लं नंदावैनीकडे सोपवतात आणि दिवसभरच्या रोजीरोटीकरता मुंबईत कुठे कुठे कामावर निघून जातात. आता त्या पिल्लांची आई, बाप, काकू, मावशी सारं काही नंदावैनीच असते!

नंदावैनी..!

आमचीच चाळकरी. दोन मुलींना मागे ठेवून नवरा या जगातून चालता झाल्यावर शिवणकामाच्या मिळणार्‍या तुटपुंज्या पैशात नंदावैनीचं भागेनासं झालं. सुरवातीला एक, मग दोन, असं करत करत नंदावैनीचं सगळं घरच मुलांनी भरलं, त्या घराचं पाळणाघर झालं! अगदी चार-सहा महिन्यांच्या तान्ह्या आर्चिसपासून ते दुसरी-तिसरीत शिकणार्या प्रसाद -अस्मितेपर्यंत सर्व वयांची मुलं आज नंदावैनीच्या पाळणाघरात आहेत. आमची नंदावैनी या सार्‍यांची रिंगमास्टर! सकाळची-दुपारची शाळा सांभाळून आठवी/नववीत असलेल्या नंदावैनीच्या दोन मुलीही या बाळगोपाळांची अगदी प्रेमाने काळजी घेतात, त्यांना सांभाळतात.

नंदावैनी तशी फटकळ, परंतु प्रेमळही तेवढीच. एखाद्या मुलाच्या आईवडिलांनी आपल्याला पैसे दिले आहेत म्हणूनच केवळ त्यांना सांभाळलं पाहिजे अशी कोरडी कर्तव्यभावना तिच्यापाशी कधीच नसे. नंदावैनी त्या सर्व मुलांचं अतिशय प्रेमाने करायची, प्रेमाने सांभाळायची! परंतु शेवटी मुलंच ती! त्यामुळे दंगामस्तीही अगदी भरपूर करत. त्यामुळे मग नंदावैनीचा तोंडपट्टाही सुरू व्हायचा. कुणाला रागव, कुणला धपाटा मार, कुणी अगदी छान, निमूट वागलं की त्याचं भरभरून कौतुक कर, "तू का त्याला उलट बोललास? दादा आहे ना तो तुझा?" असे मुलांवर नकळत संस्कार कर.. असे नानाप्रकार नंदावैनीकडे दिवसभर चालत असत. पाळणघर कसलं, नंदावैनीकडे रोज सकाळी भरणारं गोकूळच होतं ते! आणि का कुणास ठाऊक, परंतु मुलांनाही नंदावैनीचा लळा फार लौकर लागायचा. मग नंदावैनी कितीही ओरडू देत, रागावू देत, मुलांना नंदावैनी कधी परकी वाटायची नाही..

छान बोलका चेहेरा, दिसायला आखीव-रेखीव, मध्यम उंची, मध्यम बांधा असलेली पंचेचाळीशीतल्या घरातली आमची नंदावैनी आणि तिचं पाळणाघर हा आमच्या चाळीतला एक जिवंत झरा. नंदावैनी मुलांना सांभाळायचे जे पैसे घ्यायची त्यात त्या मुलांचं दुपारचं जेवण, मधल्यावेळचं खाणंही असे. दुपारच्या जेवणात वरणभात-तूप-मीठ-लिंबू हा पूर्णाहार कंपलसरी! तो प्रत्येक मुलाने खाल्लाच पाहिजे असा नंदावैनीचा कायदा असे. शिवाय सोबत भाजी पोळी, कधी तूपसाखरेच्या किंवा लसूणचटणी घातलेल्या पोळीची गुंडाळी मुलांनी खाल्लीच पाहिजे असाही नंदावैनीचा नियम असे. मॅगी, केलॉग्ज्स वगैरे शब्दांनादेखील त्या घरात बंदी होती! विविध वयोगटाच्या दहापंधरा मुलांचा त्या घरात मुक्त वावर असूनही नंदावैनीचं घर नेहमीच अतिशय स्वच्छ व टापटीप असे. आपल्याकडे लहान मुलं असतात तेव्हा कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडे स्वच्छता असलीच पाहिजे अशीच नंदावैनीची तिच्या दोन्ही मुलींना शिकवण होती..

दुपारच्या वेळेस ती बालगोपाळ मंडळी जरा वेळ झोपायची तेवढाच काय तो नंदावैनीला थोडा आराम. मग पुन्हा नंदावैनी मधल्या वेळच्या खाण्याच्या मागे असे. कधी उकड, कधी मोकळी भाजणी, कधी तिखटामिठाचा शिरा असा बेत असे. मग त्या सर्व मुलांचं मधल्यावेळचं खाणं चालायचं. त्यानंतर कुणाकडून कविता म्हणून घे, कुणाकडून पाढे म्हणून घे, एखाद्या लहानग्याला तुकडेतुकडे जोडून वाघ किंवा हत्ती पूर्ण करायला सांग, असे नानाप्रकार चालायचे. कुणी काही चांगलं वागलं की नंदावैनी त्या मुलाला किंवा मुलीला "बघा, आमची ताई कित्ती शहाणी आहे, म्हणूनच माझी लाडकी आहे..!" असं सगळ्यांदेखत मुद्दाम तोंडभरून कौतुक करत असे. मग इतर मुलंही नकळत चांगलं वागून नंदावैनीच्या गुडबुक्स मध्ये जायचा प्रयत्न करायची!

मुंबईच्या धकाधकीच्या दुनियेत कामावरून घरी परतायला आईवडिलांना संध्याकाळचे सात साडेसात तरी वाजत. इकडे संध्याकाळ होऊ लागली की नंदावैनी पुन्हा एकदा रिंगमास्टर बनायची.

"चला, प्रत्येकाने स्वच्छ हातपायतोंड घुवून घ्या, पर्वचा म्हणायचा आहे ना? मग जायचंय ना सर्वांना आपाल्या घरी?"

असं म्हणून कडेवरच्या कुणा लहानग्या अर्चनाचा पापा घेऊन, "आता जायच्ययं ना आईकडे?" असं म्हणायची. ती लहानगी अर्चना काही कळल्यासारखं अगदी गोड हसायची! नंदावैनीसकट घरातल्या सगळ्याच बाळगोपाळांना ते निरागस हास्य निखळ, निर्विष आनंद देऊन जायचं!

मग नंदावैनी स्वत:च प्रत्येक मुलाला फ्रेश करायची, स्वच्छ करायची. ती आणि तिच्या मुली प्रत्येकाचा भांग, पावडरकुंकू वगैरे करायच्या. मग सगळ्यांनी हात जोडून देवापुढे बसायचं. एखादी सुरेखशी उदबत्ती आणि मंद ज्योतीची समई नंदावैनीच्या देवघरात तेवत असायची. आणि मग सुरू व्हायचं -

"शुभंकरोति कल्याणम्.."

तोवर एकेका आईवडिलांचं आपापल्या पिल्लाला नेण्याकरता नंदावैनीच्या घरी येणं सुरू झालेलं असायचं. मग,

"आज काही जेवलाच नाही.."

"आज एक मुलगा मुळ्ळीसुद्धा रडला नाही बरं का!"

"आज प्रणवला चांगला धपाटलाय बरं का! पाढे पाठ करत नाहीत आणि दिवसभर नुसती मस्ती..!"

"आज जरा डॉक्टरलाच दाखवा, दिवसभर रेघा मारतोय..!"

असा प्रत्येक मुलाच्या/मुलीच्या आईवडिलांकडे त्या त्या मुलाचा नंदावैनी रिपोर्ट करायची!

आपलं पोरगं नंदावैनीकडे आहे म्हणजे सुखरूप आहे असा विश्वास प्रत्येक आईवडिलांना होता. नंदावैनीने रट्टा मारलेला असणार म्हणजे आपल्याच लेकाचं काहीतरी चुकलेलं असणार.. अशी खात्री होती प्रत्येकाची! २६ जुलै सारख्या प्रलयातही, जेव्हा कुणाच मुलाचे आईवडिल रात्रभर घरी येऊ शकले नव्हते तेव्हाही ते मुलांच्या बाबतीत मात्र निश्चिंत होते. "अगदी रात्रभर जरी मुलांना नंदावैनीकडे रहायला लागलं तरी चिंता नको.." अशी त्यांची निचिंती होती. नंदावैनीवरचा तो विश्वास होता..!

त्या दिवशी संध्याकाळी कुणा प्रणवचे आईवडिल नंदावैनीचा निरोप घ्यायला आले होते. लाडक्या प्रणवला नंदावैनीकडून सेन्डऑफ होता.. अगदी ३-४ महिन्यांचा असल्यापासून ते ३ वर्षांचा होईस्तोवर प्रंणव नंदावैनीकडेच सांभाळायला होता. आता प्रणवचे आईवडिल दोघेही त्याला घेऊन अमेरीकेला चालले होते..! निरोपाची वेळ आली. नंदावैनीनी कपाटातून छानश्या सोनेरी कागदात पॅक केलेली कुठलीशी एक भेटवस्तू काढली आणि प्रणवला जवळ बोलावलं. काहीतरी वेगळं जाणवून छोटासा प्रंणवही जरा कावराबावराच झाला होता..

नंदावैनीनी प्रणवला उचलून कडेवर घेतला. त्याचा एक गोड पापा घेऊन हातातली भेटवस्तू त्याच्या हातात दिली,

"पुन्हा येशील ना रे मला भेटायला? अमेरिकेला गेल्यावर नंदावैनीला विसरणार नाहीस ना रे? की विसरशील गधड्या मला?"

"मी तुला खूप मारलं ना रे लहानपणी?"

असं म्हणून त्या लहानग्या प्रणवला उराशी कवटाळत नंदावैनी हमसून हमसून रडू लागली! प्रणवही रडू लागला, प्रणवच्या आईबाबांच्या डोळ्यातही पाणी आलं..!

"अरे नका जीव खाऊ माझा! मी मेले की सुटाल सगळे एकदाचे..!"

नेहमीप्रमाणेच दुसरा दिवस उजाडला आणि नंदावैनीकडचं गोकूळ पुन्हा एकदा भरलं..!

आज त्या गोकुळात प्रंणव नव्हता. उद्या तो चांगला शिकून कुणीतरी मोठा यशस्वी डॉक्टर/विंजिनियर होईल, त्याचं नांव होईल, त्याच्या आईवडिलांचं नांव होईल. पण त्याच्या त्या यशात कुठेतरी नंदावैनीकडच्या गरमगरम वरणभाताचा अन् तीनसांजेच्या शुभंकरोतीचाही वाटा असेल..!

-- तात्या अभ्यंकर.

July 14, 2011

जियो मुंबै आणि एका देवमाणसाचा हस्तस्पर्श..!

काल संध्याकाळीच मुंबैतील स्फोटांच्या बातम्या विविध वाहिन्यांवरून पाहिला मिळाल्या. निरपराध नागरिकांवरील अमानुष हल्ल्यामुळे मन सुन्न झाले. २६/११ च्या आठवणी जाग्या झाल्या.
२६/११ च्या वेळी रात्री उशिरा जशी रक्तदानाकरता धावपळ केली होती तेच विचार पुन्हा एकदा मनात घोळू लागले. झाल्या प्रकारात आपण काय करू शकतो तर ते इतकंच की रक्तदानाकरता थोडीशी धावपळ. अस्वस्थ मनाने दादर विभागातल्याच ४-५ ओळखिच्यांना, मित्रांना फोन केले आणि आम्ही एकूण ३ मंडळी रात्री ९ च्या सुमारास जे जे ला पोहोचलो.
पोटात खड्डा पडावा, तुटावं अशी तेथील काही दृष्य बघितली. जखमींकडे बघवत नव्हते. पोलिस, डॉक्टर्स, परिचारिका यांची धावपळ सुरू होती. आम्ही प्रवेशद्वारातून आत पोहोचलो. आजूबाजूला गर्दी तर बरीच होती. रक्तदानाबाबत कुणाला विचारावं, रक्त कुठे घेत आहेत हा विचार सुरू असतानाच माझ्या पाठमोर्‍या एका खोलीतून जे जे चा काही कर्मचारी वर्ग बाहेर आला. मागून माझ्या खांद्यावर हलकेच एक हात पडला आणि गर्दीतून वाट काढत असताना माझ्या खांद्यावर हात ठेऊन ती व्यक्ति मला म्हणत होती..
"जरा वाट द्या प्लीज. जाऊ द्या प्लीज.."
मी त्या व्यक्तिकडे बघितलं आणि त्या प्रसंगात, त्या गर्देतदेखील मला क्षणभर भरून आलं. माझ्या खांद्यावर हात ठेवत वाट काढू पाहणारी ती व्यक्ति होती डॉ तात्याराव लहाने..! ते सध्या जेजे रुग्णालयाचे डीन आहेत.
"कृपया नातेवाईकांनी काळजी करू नये. येथे दाखल झालेल्या व्यक्ति या आमच्या भाऊबहिण आहेत याच भावनेने आम्ही सर्व ते उपचार करत आहोत. आमच्याकडून कसलिही कसूर होणार नाही.."
डॉ तात्याराव लहाने गर्दीला उद्देशून सांगत होते...!
किती मृदु परंतु आश्वासक स्वर! किती विनम्रपणा! किती साधेपणा..! आजपावेतो अक्षरश: हजारो डोळ्यांना प्रकाश दाखवणारा तो देवमाणूस..! भला माणूस, लाख माणूस..!
खरं तर एकदा मिपावर त्यांचं व्यक्तिचित्र/व्यक्तिमत्वचित्र या बद्दल एखादा विस्तृत मुलाखतवजा लेख लिहायचा असं डोक्यात होतंच परंतु काल असं अचानक त्यांचं क्षणिक दर्शन झालं, हजारोंना दृष्टी देणारा त्यांचा हात माझ्या खांद्यावर पडला आणि धन्य झालो. देवाघरचाच हात तो..!
त्यानंतर रक्तदानाकरता माहिती मिळाली आणि आम्हाला ..'तूर्तास जरूर नाही, तरीही वाटल्यास बाहेरच्या व्हरांड्यात थांबा..' असं सांगण्यात आलं. बाहेर येऊन पाहतो तर जवळ जवळ दीड-दोनशे माणसं आधीच तेथे रक्तदान करण्याकरता आली होती. अगदी स्वखुशीने, कुणीही न बोलावता, कुणीही कसलंही आवाहन न करता..!
पाऊस जोरावर होता. मुख्य व्हरांड्यात रुग्णवाहिकांमधून जखमींना दाखल करणारे अनेक सामान्य मुंबैकर आणि रक्तदानाकरता जमलेलेही सामान्य मुंबैकर..!
कालच्या घटनेत सामान्य परंतु धीरोदात्त मुंबैकराने पावसापाण्यात केलेली धावपळ बघितली, अनुभवली. आणि म्हणूनच आम्हाला अभिमान आहे मुंबै नामक या आमच्या अजब-गजब नगरीचा..! म्हणूनच आमचं विलक्षण प्रेम आहे आमच्या मुंबापुरीवर..! जियो मुंबै..!
कालच्या मुंबै हल्ल्यात शहीद झालेल्यांना विनम्र आदरांजली आणि जखमींना लौकरात लौकर आराम मिळो, हीव आई मुंबादेवीपाशी प्रार्थना..!
-- तात्या अभ्यंकर.

June 18, 2011

आजची खादाडी, आजची बाई..१

लोकहो,

राम राम..

'आजची खादाडी, आजची बाई..' हे नवं सदर आम्ही आजपासून सुरू करत आहोत. अर्थात, वेळेच्या अभावी आम्ही हे सदर अगदी रोजच्या रोज लिहू शकू याची शाश्वती नाही. तरीही आमचा प्रयत्न मात्र तोच असेल.

मुळात खादाडी आणि बाई या दोन्ही गोष्टी आमच्या आणि इतरही अनेकांच्या इंटरेस्ष्टच्या आहेत, आवडत्या आहेत असा आमचा विश्वास आहे.. आता सभ्य आणि सुसंस्कृतपणाचे नसते ढोंगी बुरखे पांघरलेला कुणी म्हणेल की 'तात्याने हे नवं काय आरंभलं आहे? हे स्त्री-प्रदर्शन कशाकरता..?' वगैरे वगैरे..!

त्यावर आमचं इतकंच उत्तर आहे की आवडत्या खाद्यपदार्थासोबत आवडत्या बाईचंही चित्रं टाकलं आणि त्यावर दोन शब्द लिहिले म्हणजे आम्ही फार मोठ्ठं काही पापकर्म करत आहोत असं आम्ही तरी समजत नाही..

तेव्हा कुणी काय म्हणेल याची आम्हाला शाटमारी पर्वा नाही..

ते असो..

आज शनिवार. आठवडाखेर. आज जरा छानश्या चुलबुल्या मिनिशा लांबा सोबत गरमागरम कोंबडी टिक्का खाउया... :)



आमची मिनिशा तशी मुळातच चटपटीत आणि चुलबुलीत.
अवखळ आहे. पटदिशी लाडात काय येईल, तुमचा गालगुच्चा काय घेईल, मुका काय घेईल.. काही विचारू नका..! :)



किडन्यॅप चित्रपटात तिच्या पोहण्याचा एक शीन आहे त्यात ती फारच आकर्षक दिसते बुवा.

आम्ही जळ्ळं चुकून पाण्यात पडलो तर आम्हाला पैशे तर सोडाच, आम्हाला बाझवला साधं वाचवायलाही कुणी येणार नाही. मिनिशाला मात्र छानपैकी पोहायचे छानपैकी पैशेही भेटले असतील..! :)

असो..

मिनिशा मात्र आम्ही लाडकी आहे हो. तिला अनेकोत्तम शुभेच्छा..!

तात्या.

June 07, 2011

एक आठवण, धुळीतली...!

परवाच कुठेतरी नभोवाणीवर कुणी गात असलेली बिलावलमधली 'कवन बटरिया गईलो..' ही बंदिश कानावर पडली आणि माझं मन एकदम काही वर्ष मागे गेलं. वर्ष आता आठवत नाही परंतु सवाई गंधर्व महोत्सवातील आठवण आहे ही..अण्णांनी खास करीमखासाहेबांची 'प्यारा नजर नही..' ही बंदिश आणि त्यालाच जोडून 'कवन बटरिया..' फार सुरेख गायली होती त्याची आठवण झाली.

पं अच्युतराव अभ्यंकर यांनी माझ्या कानावर केलेले किराणा गायकीचे संस्कार आणि वारंवार समजावून दिलेले करीमखासाहेब आणि पुढे जाऊन त्याच गायकीतील भक्कम वीण समाजावून देणारे आमचे दस्तुरबुवा आणि अण्णा. दस्तुरबुवांचं अत्यंत सुरेल किराण्याचं गाणं. कधी त्यांचा स्वराचा एकेक मोती उलगडून दाखवणारा यमन, तर कधी खासाहेबी गोपाला मेरी करुना, किंवा जादू भरेली कौन अलबेली..! तर कधी अण्णांनी अनेकदा उलगडून दाखवलेला शुद्ध कल्याण किंवा तोडी. झालंच तर पुरीया.!

सवाईं गंधर्वांची ही शिष्यजोडी मलाही अगदी भरपूर लाभली. तो दिसच माझ्या आयुष्यातला खूप भाग्याचा दिस होता. अण्णांच्या आणि दस्तुरबुवांच्या पायाशी बसण्याचे खूप दिवस मनात होते, अखेर ती इच्छा पूर्ण झाली. आमचे दस्तुरबुवा म्हणजे ख्वाजा मोईउद्दीन चिस्तीने पाठवलेला एक अवलिया स्वर-जादुगार; तर आमचे अण्णा म्हणजे माझ्याकरता साक्षात पंढरीचा विठोबाच..!



त्या दिवशी खरंतर अण्णा माझ्यावर जरा वैतागलेलेच होते. का? तर मी मस्त मांडी ठोकून खाली धुळीत बसलो म्हणून..! :)

"च्च.. अरे इथे धुळीत काय बसतोस? कपडे मळतील की? तुला आमच्यासोबत फोटोच काढायचा आहे ना? मग बाजूला खुर्चीत बस की..!"

"नको हो अण्णा, मी आपला धुळीतच बरा..!" :)

असो..

आता अश्या अनेक आठवणी निघतात आणि मन उदास होतं. आजही कधी ग्रँटरोडला जाणं होतं. दस्तुरबुवा राहायचे त्या बिल्डिंगपाशी दोन क्षण उभा राहतो. पटकन दोन जिने चढून जावं आणि दस्तुरबुवा भेटावेत, त्यांच्या पायांना मिठी मारावी असं वाटतं. तर कधी दादरच्या प्रकाशचा बटाटवडा बाबुजी-ललीमावशीची आठवण करून देतो..!

चार-आठ दिसांपूर्वीच पुण्याला गेलो होतो. पाय नकळत कलाश्री बंगल्याकडे वळले. क्षणभर वाटलं की बंगल्यात जावं आणि किमान अण्णांच्या तंबोर्‍यांना तरी नमस्कार करावा. पण धीर नाही झाला. वळलो तसाच माघारी..!

-- तात्या अभ्यंकर.

बाबा रामदेव, वेळीच जागा हो..! :)

१) मी स्वत: कट्टर काँग्रेस अन् सोनिया विरोधी आहे,
२) भ्रष्टाचार हटवण्याची किंवा काळा पैसा भारतात आणण्याची आजच्या केन्द्र सरकारची मानसिकता नाही आणि तशी प्रबळ राजकीय इच्छाशक्तिही नाही हेही मी ठामपणे नमूद करतो.
३) मी स्वत: रामबाबाच्या योगविद्येचा आदर करतो आणि त्याकरता माझा त्याला दंडवतच आहे.

तरीही असे लिहावेसे वाटते की,

पोलिसांनी आंदोलकांना रामलीला मैदानातून हाकलताना बायकांना आणि लहान मुलांना मारले असे रामबाबा सांगत आहे. परंतु त्यात फारसे तथ्य दिसत नाही. अन्यथा पोलिस लहानमुलांना आणि बायकांना फटकावताहेत, हे चित्र कुठल्या ना कुठल्या वाहिनीवर नक्कीच दिसले असते; कारण प्रत्येकच वाहिनी मध्यरात्रीची ती प्रत्यक्ष दृष्ये दाखवत होती. अर्थात, खरोखरच जर त्यांना मार पडला असेल तर ती सरकारची केव्हाही चूकच आहे..

तरीही पोलिस हरकत में आ गई आणि केवळ शक्तिप्रदर्शनाकरता जमवलेल्या ५०००० च्या त्या गर्दीला तेथून रातोरात हाकलले ते एका अर्थी बरेच झाले. त्या गर्दीत फुकाचे साधुसंत आणि यूपीतले बरेचसे रेमेडोके भय्येच अधिक दिसत होते हे आग्रहाने नमूद करावेसे वाटते..!

बाकी सांगायचे म्हणजे एकूणच रामबाबाच्या ह्या आंदोलनात त्याने **अत्यंत ढोबळ अन् बेफाट** मागण्यांच्या निमित्ताने केलेले राजकीय (?) शक्तिप्रदर्शनच अधिक होते.

** १) आत्ताच्या आत्ता परदेशात जा अन् तेथील बँकातील काळा पैसा घेऊन या..!
-  म्हणजे पोतीच्या पोती घेऊन परदेशात गेले आणि तेथील सारा काळा पैसा घेऊन पुढच्याच विमानाने भारतात परत आले इतके हे सोप्पे आहे का?

**२) ५०० आणि १००० च्या नोटा लग्गेच फर्मान काढून रद्द करा..!
- अहो पण याला काही अन्य पर्याय..?

**३) वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांत द्या..
- पण तुमच्याकडे तसा अभ्यासक्रम तयार आहे का? तसे शिक्षक आहेत का? तश्या काही ठोस योजना तयार आहेत का?

वगैरे वगैरे.. **

योगविद्या शिकवणारा रामबाबा गेल्या काही काळापासून भलताच अहंकारी होत चालला होता. शिवाय तो एक हलक्या कानाचा अन् हुऱळून जाणारा साधूही आहे. त्याला आंदोलनाच्या ह्या हरबर्‍याच्या झाडावर कुणीतरी चढवला आणि तो सुसाट चढत सुटला. त्यातच अण्णांच्या आंदोलनाला सार्‍या देशाने आणि आंतरजाल जगताने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्याद्वारे रातोरात ष्टार झालेले अण्णा, हे पाहून रामबाबाही अंमळ खुळावला असावा, किंबहुना त्याचा जळफळाटच अधिक झाला असावा. आणि त्यामुळेच अण्णांचे हे आंदोलन तो काहीही करून हायजॅक करू पाहू लागला. मिडियाचे आपल्याकडे लक्ष जाऊन आपण सतत प्रकाशाच्या झोतात कसे राहू हे तो पाहू लागला.

अण्णांच्या आंदोलनाला/उपोषणाला जशी काही एक भक्कम वैचारीक बैठक आहे तशी काहीही बैठक रामबाबाची नाही. शिवाय अण्णांच्या मागे अरविंद केजरीवाल नामक एक चाणक्यही आहे जो अत्यंत हुशार मनुष्य आहे, काही एक चांगले करू पाहणारा आहे. अत्यंत कर्तबगार आणि निस्पृह पोलिस अधिकारी असलेल्या डॉ किरण बेदी याही अण्णांच्या पाठीशी आहेत. तसे या रामबाबाच्या मागे कुणी आहे का?

रामलीला मैदानावरील आंदोलनाच्या मंचावर ही ऋतंबरा कशाकरता आली होती? (तिला सारेजण 'साध्वी' ऋतंबरा असे संबोधतात. परंतु तिच्याबद्दल कुठलीही व्यक्तिगत माहिती मला नसताना मला व्यक्तिश: तिला 'साध्वी' असे संबोधणे उचित वाटत नाही. मनुष्यप्राणी हा जबर स्खलनशील आहे असा माझा ठाम विश्वास आहे. असो..!) :)

दिल्लीहून हुसकून हरिद्वारला पाठवलेला रामबाबा तिथे गेल्यावर अजूनही काही वाट्टेल ते बरळतो आहे. म्हणे ५००० माणसे बेपत्ता आहेत, मला ठार मारण्याचा सरकारचा डाव होता वगैरे वगैरे..

अरे रामबाबा, मेल्या योगी ना तू? मग तू कसा काय इतका जबर अहंकारी? अण्णा हजारेंवर जळ जळ जळून तुझा नक्की काय फायदा होणार आहे? 'तुझे आहे तुजपाशी' नाटकात पुलं म्हणाले होते की सन्याशाची वस्त्र ही भयंकर असतात, ती सारे अंग भाजून काढतात. रामबाबा, तूर्तास तुझीही नेमकी तशीच अवस्था झाली आहे. लेका, तुझ्यासारख्या योग्यापेक्षा आठवड्याला एक-दोनदा क्वार्टर अन् मच्छीचं जेवण जेवणारे, सुंदर-आकर्षक आणि कमनीय बायकांकडे पाहून मनातल्या मनात पाघळणारे आमच्यासारखे भोगी बरे की रे..! :)

तेव्हा रामबाबा, जागा हो. आजही तू एक मोठा योगाचार्य आहेस. तेव्हा तू आपला तुझी योग्यविद्याच आम्हा सार्‍या भारतीयांना शिकवून सोड कसा..!

जमल्यास तुझ्या योगसामर्थ्याच्या बळावर मस्तपैकी एकसे एक स्त्री शिष्यांना पटव ( तूर्तास तसं काही नसावं हा माझा अंदाज! ;) ) आणि मस्त मजा कर, असा आपला जाता जाता माझा तुला एक व्यक्तिगत सल्ला..! ;)

काय बोल्तो..? :)

तुझा,
तात्या.

May 19, 2011

टकल्या बापटाचा संताप, मी आणि अण्णा - १

अण्णांना जाऊन आता चार महिने पुरे होतील. मागे उरल्या आहेत त्यांच्या मैफली आणि त्यांच्या आठवणी. आठवयला गेलो की साधारणपणे ८४-८५ सालापासूनचा काळ आठवतो. दोन तानपुर्‍यांमध्ये बसलेला तो स्वरभास्कर आणि त्याचा उत्तुंग स्वराविष्कार. आभाळाला गवसणी घालणारा तो बुलंद आवाज. त्याची गाज..!

वर्ष कुठलं ते आता आठवत नाही. परंतु असाच एकेदिशी डायरेक्ट त्यांना फोन लावला. कारण काहीच नाही. फोनवर त्यांचा आवाज ऐकला की बरं वाटायचं, भरून पावायचं एवढंच एकमेव कारण. आणि दुसरं म्हणजे माझ्यासारख्या सामान्याशी ते अगदी नावानिशी ओळख ठेऊन आपुलकीने दोन शब्द बोलयचे त्यामुळे भीडही चेपलेली. माझ्यातला त्यांचा चाहता, त्यांचा भक्त याच चेपलेल्या भिडेचा थोडा फायदा/गैरफायदा घेऊन त्यांच्याशी दोन शब्द बोलायचं धाडस करायचा इतकंच. पण बरं वाटायचं जिवाला. आणि गैरफायदा तरी कशाचा? तर एक दिग्गज गवई आपल्याशी अगदी साधेपणाने बोलतो याचंच खूप अप्रूप वाटायचं, धन्य वाटायचं..!

अण्णांच्या फोनची रिंग वाजत होती. पलिकडून फोन उचलला गेला.

"हॅलो..". खर्जातला घनगंभीर आवाज.! झालं, आम्ही अवसान आणून, धीर गोळा करून म्हटलं,

"नमस्कार अण्णा. ठाण्याहून अभ्यंकर बोलतोय. ओळखलंत का? सहजच फोन केला होता."

"ओळखलं तर! काय म्हणता? कसं काय?" फलाण्या दिवशी येतोय मुंबैला. तुमच्या मुंबै विद्यापिठात राजाभाई टॉवरला माझं गाणं आहे. तिथे या वेळ असला तर.."

"अहो पण अण्णा, त्या कार्यक्रमाचं तिकिट खूप महाग आहे.." मी घाबरत घाबरत उत्तरलो.

"धत तेरीकी! तुम्हाला काय करायचंय तिकिटाशी? तुम्ही या तर खरं. महाग की स्वस्त ते आपण नंतर पाहू..!"
अण्णा अगदी साधेपणाने म्हणाले.

झालं. आपण एकदम खुश. त्या कार्यक्रमाविषयी मला माहीत होतं परंतु किमान तिकिटच मुळी दोन हजार रुपये इतकं होतं. मुंबै विद्यापिठाचा तो कुठलासा एकदम प्रेस्टिजियस कार्यक्रम होता. परंतु तिकिट लै म्हाग असल्यामुळे माझं त्या कार्यक्रमाला हजेरी लावणं कठीणच होतं. परंतु आता साक्षात अण्णांनीच बोलावल्यामुळे आपण एकदम बिनधास्त!

ठरल्या दिवशी वेळेवर कार्यक्रम स्थळी पोहोचलो. लै झ्याकपाक मंडप होता. आसपास सगळी बडी बडी मंडळीच दिसत होती. वातावरण एकदम हायफाय. गुलबपाण्याच्या फवार्‍याचे, लोकांच्या सेंट-अत्तराचे कसले कसले सुगंध सुटले होते त्या वातावरणात. वास्तविक अश्या ठिकाणी माझं मन रमत नाही. परंतु तिथे माझा देव यायचा होता आणि मुख्य म्हणजे तोही तितकाच साधा होता, सादगीभरा होता. जागतिक कीर्तीच्या पं भीमसेन जोशींकरता ही झकपक काही नवीन नव्हती. देश-विदेशात अश्या अनेकानेक धुंद, श्रीमंत, हायफाय वातावरणातल्या मैफली त्यांनी जिंकल्या होत्या. पक्क कळीदार पान आणि काळ्या बारीक तंबाखू-चुन्याचा भक्कम बार भरून जमवलेला पुरिया वातावरणातली ही झकपक केव्हाच पुसटशी करायचा अन् तिथे उरायचा तो फक्त पंढरीनिवासी सख्या पांडुरंगाचा प्रासादिक अविष्कार..! असो.

आणि त्यामुळेच खिशात सेकंडक्लासचं तिकिट असलेला साध्या मळखाऊ शर्टप्यँटीतला मी तिथे बिनधास्तपणे कुठल्याश्या मर्सिडीजला टेकून पान चघळत उभा होतो!

कार्यक्रमाची वेळ झाली तशी तिकिट-पासेस असलेली, झकपक कापडं घातलेली बडी बडी श्रीमंत स्त्रीपुरुष मंडळी फुलांनी सजवलेल्या छानश्या पॅसेजमधून आत जाऊ लागली. माझ्याकडे ना तिकिट, ना पास. म्हणजे अण्णांच्याच भाषेत सांगायचं तर खरं तर मी फ्री पास होल्डरच होतो!

त्यामुळे बॅकष्टेजने कुठे आत घुसता येईल हे पाहायला मी मंडपाच्या मागल्या बाजूस गेलो. तिथे जरा एक साधासुधा दिसणारा भला इसम उभा होता.

"साहेब, हाच रस्ता रंगमंचाच्या मागल्या बाजूस जातो ना? मला अण्णांना भेटायचंय"

"हो. तिथे दारापाशी ते बापट उभे आहेत ना, त्यांना विचारा.."

मी बापटसाहेबांपाशी पोहोचलो. अक्षरश: सुवर्णकांती शोभावी असा लखलखीत गोरा असलेला, उच्च-हुच्च पेहेराव केलेला, सोनेरी काड्यांचा ऐनक लावलेला, तापट चेहेर्‍याचा आणि मुख्य म्हणजे साफ गरगरीत गुळगुळीत टक्कल असलेला बापट तिथे उभा होता. अण्णांचं गाणं राहिलं बाजूला, माझ्यातल्या व्यक्तिचित्रकाराला खरं तर या टकल्या बापटानेच पाहता क्षणी भुरळ घातली होती..!

त्या साध्यासुध्या माणसाकडनं मला हेही कळलं होतं की तो बापट मुंबै विद्यापिठातला कुणी बडा अधिकारी आहे. त्याच्याशी संवाद साधायला काहितरी जुजबी बोलायला पहिजे म्हणून मी सजहच विचारलं,

"नमस्कार. अण्णा आले आहेत ना?" ग्रीनरूममध्ये असतील ना?"

"अहो अण्णा आले आहेत ना म्हणून काय विचारता? आता ५-१० मिनिटात आम्ही कार्यक्रम सुरू करणार आहोत!"

हे बोलताना खेकसणे, भडकणे, ओरडणे, टाकून बोलणे, अपमान करणे, पाणउतारा करणे या सार्‍या क्रिया बापटाने एकदम केल्यान! टकल्या बापट अगदी सह्ही सह्ही माझ्या अपेक्षेप्रमाणेच निपजला. "भाईकाकाकी जय..!' असा माझे व्यक्तिचित्रकार गुरू पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना मी मनातल्या मनात दंडवत केला..!

आता पुढची पायरी होती ती रंगमंचावर ब्यॅकष्टेज प्रवेश मिळवण्याची. आणि गाठ टकल्या बापटाशी होती..!

क्रमश:...

-- तात्या अभ्यंकर.

May 11, 2011

रस्त्यावरचे सस्ते बालगंधर्व...

कालपरवाच जालावर खालील फोटो पाहायला मिळाला आणि माझं मन एकदम काही वर्ष मागे गेलं. एच एम व्ही च्या याच मालिकेतली एक फिरती संगीत थाळी (Record) माझ्याकडे आहे त्याची आठवण झाली.
मुंबैचा चोरबाजार. म्हणजे गोल देउ़ळ, भेंडीबाजारचा भाग. या चोरबाजाराबद्दल पुन्हा केव्हातरी सवडीने आणि डिट्टेलमध्ये. इथे काय काय मिळू शकतं, त्याचे भाव काय असतात, भावाची घासाघीस कशी चालते, अवचित गुंडगिरी-दादागिरी कशी चालते ते सगळं मी अनुभवलं आहे. पण एकुणात चोरबाजारात विंडो शॉपिंग करणं हा खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे. नानाविध जुन्यापुराण्या वस्तू पाहायला मिळतात आणि मन नॉस्टॅल्जिक होतं. एच एम व्ही च्या जुन्या जुन्या दुर्मिळ संगीतथाळ्या आणि जुने परंतु चांगल्या अवस्थेतले फोनोही इथे पाहायला मिळतात. काही थाळ्या तर बर्‍यापैकी महागड्या मिळतात. खूप भाव करायला लागतो. असो..
असाच एकदा जुन्या वस्तू पहात या चोरबाजारात हिंडत होतो. पावसाळ्याचे दिवस होते. एक स्टँडसारखी मोठीशी छत्री घेऊन पदपथावरच एक माणूस नानाविध जुन्या वस्तू घेऊन विकायला बसला होता. पाऊस होता त्यामुळे जिथे शक्य होतं तिथे त्याने प्लॅस्टिकचं कव्हर आच्छादलं होतं. सहज माझी नजर गेली ती त्याने जी चटई अंथरली होती तिच्या टोकाला असलेल्या, अर्धवट पावसात भिजत असलेल्या ७८ आर पी एम च्या एच एम व्ही च्या एका जुन्या जीर्ण संगीत थाळीकडे. मी सहजच ती थाळी उचलून पाहू लागलो, तिच्यावरची अक्षरं निरखून पाहू लागलो. पुसटशीच अक्षरं होती.
'नाथ हा माझा' - स्वयंवर - यमन - sung by BalGnadharva.
"ही रेकॉर्ड? कितनेको दिया??"
त्या विक्रेत्याने माझ्याकडे दयाबुद्धीने पाहिलं. 'अरेरे, बिच्चारा गरीब दिसतो आहे. पावसात भिजत उभा आहे. काय सांगावी बरं ह्याला किंमत?'
"दो दो, १५-२० रुपीया..!"
थोडक्यात, 'तुझ्याकडे काय असतील ते १५-२० रुपये दे आणि टळ इथून एकदाचा भोसडीच्या' - असाच भाव होता त्याच्या चेहेर्‍यावर..! स्मित
आभाळातून संततधार सुरू होती. आता माझ्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहण्याच्या बेतात होत्या. खूप भरून आलं. आसपासचं जग आपापल्या उद्योगात मग्न होतं. माझ्या मनात काही विचार आले आणि मी त्या विक्रेत्याकडे पाहिलं. मनातल्या मनात त्याच्याशी संवाद सुरू केला..
'मला भोसडीच्या म्हणतोस काय? अरे, तुला माहित्ये का की तू काय विकतो आहेस? किती मौल्यवान वस्तू तुझ्या पदरी आहे? आणि ती अशी रस्त्यावरच्या पाण्यात तू अर्धवट भिजत्या अवस्थेत विकायला ठेवली आहेस?'
'पण तुझा तरी काय दोष म्हणा? तुझी रोजीरोटी आहे. रस्त्याने येणारे-जाणारेही फोकलीचे कपाळ करंटेच..! या अश्या जुनाट भिजत्या संगीतथाळीकडे कुणीच पाहायला तयार नाही, ना कुणी चौकशी करतोय. त्यापेक्षा समोर हा इसम उभा आहे त्यालाच ही थाळी विकावी. तेवढेच १०-१५ रुपये भेटले तर भेटले..!'
'तुझंही बरोबरच आहे म्हणा..'
मीच काय तो येडाखुळा. भ्रांतचित्त झालो होतो आणि वरील स्वगत बडबडत होतो. प्रत्येकालाच त्या संगीतथाळीविषयी ममत्व हवं असा आग्रह मी तरी का धरावा?
चुपचाप खिशातनं १५ रुपये काढले आणि त्या विक्रेत्याला दिले.
नारायणराव रस्त्यावर भिजत पडले होते. त्यांना स्वच्छ पुसले, आणि छातीशी धरून थोडी उब देत घरी आलो. आजही ती थाळी माझ्यापाशी आहे, परंतु जाहीर फोटो टाकावा अश्या अवस्थेत नाही..!
-- तात्या अभ्यंकर,

May 09, 2011

बालगंधर्व...

नारायणराव बालगंधर्वांची नाटकं जोरात सुरू आहेत. नुकताच एका कर्जाचा डोंगर उतरून कधी नव्हे ते रु ३०००० इतकी रक्कम नारायणरावांच्या सहकार्‍यापाशी शिल्लक आहे. नारायणराव बसले आहेत. त्यांच्या पुढ्यात नानाविध उंची अत्तरं मांडलेली आहेत. नारायणरावांनी नुकतीच अत्तरांची खरेदी आटोपली आहे. माझ्या नाटकाला येणार्‍या रसिकांकरता उंची अत्तर हवंच, हा नारायणरावांचा अट्टाहास आहे. नारायणराव रसिकतेने अत्तराचा सुवास घेत आहेत.

"नारायणराव, आता हे ३०००० रुपये बँकेत जमा करतो.."

"हो, चालेल. एवढं अत्तरांचं बील चुकतं करा आणि उरलेली रक्कम बँकेत टाका.."

"किती झाले अत्तरांचे..?"

"२५०००..!!"

याला म्हणतात रसिकता, याला म्हणतात षौक..!

गडकरी मास्तर तसे जरा आजारीच वाटताहेत. नारायणराव त्यांना भेटायला आले आहेत. "मास्तर, मला एक नाटक द्या.." नारायणरावांच्या चेहेर्‍यावर मास्तरांबद्दलची भक्ति आणि आदर..!
मास्तर म्हणतात, "अहो नारायणराव, द्रौपदी, सुभद्रा, भामिनी या सगळ्या तुमच्या नायिका. भरजरी वस्त्र नेसणार्‍या. माझ्या नाटकाची सिंधू गरीब आहे. चालेल तुम्हाला?"
"मास्तर, तुमच्या नाटक मिळणार असेल तर फाटक्या वस्त्रातली नायिकाही मी करायला तयार आहे. पण मला नाटक द्या."
'ठीक आहे' असं म्हणून गडकरी मास्तर 'एकच प्याला'ची वही नारायणरावांच्या हाती ठेवतात.
एकच प्याल्याच्या तालमी सुरू होतात आणि त्याच वेळेला गडकरी मास्तर गेल्याची बातमी येते. नारायणराव हात जोडत आभाळाकडे पाहात 'मास्तर....!" असा टाहो फोडतात. अक्षरश: गलबलून येतं असं दृष्य.

ऐन प्रयोगाच्या वेळेस स्वत:च्या मुलीच्या निधनाची वार्ता समजूनही 'शो मस्ट गो ऑन..' या न्यायानुसार 'रसिकजनांच्या सेवेत जराही कुचराई होणे नाही..' असं म्हणत रंगमंचावर 'नाही मी बोलत..' हे पद लडिवाळपणे रंगवणारे नारायणराव बालगंधर्व आणि सुबोध भावेचा त्यावेळचा अप्रतिम अभिनय..!

रंगमंचावर 'रवी मी..' रंगलं आहे. संगीतसूर्य केशवराव भोसल्यांच्या भूमिकेत असलेला वसंतरावांचा नातू राहूल देशपांडे मस्त झुपकेदार मिश्या, फेटा वगैरे बांधून धैर्यधर झाला आहे. रंगमंचावर त्याच्यासोबत साक्षात नारायणराव बालगंधर्वांची भमिनी उभी आहे. संयुक्त मानापमानाचा प्रयोग सुरू आहे. राहूल 'रवी मी' त मस्त फिरतो आहे. श्रोत्यांमधून मनमुराद दाद येते आहे. 'खर्चाची पर्वा नाही, रसिकांकरता जे जे उत्तम, उदात्त, उच्च असेल तेच मी देईन..' या सततच्या ध्यासापायी आमचे नारायणराव नेहमी कर्जात बुडालेले. संयुक्त मानापमानाच्या प्रयोगामुळे बर्‍यापैकी रक्कम जमते. पण स्वत:च्या कर्जाची पर्वा न करता नारायणराव ती रक्कम टिळकांच्या स्वराज्य फंडाला देतात. पण उदार, उमद्या मनाचे केशवराव नारायणरावांना म्हणतात, "तुम्ही काळजी कशाला करता? मी आहे तुमच्यासोबत. आपण अजून प्रयोग करू आणि तुमचं कर्ज फेडू!" पण नारायणराव बालगंधर्व या शापित यक्षाच्या नशीबी काही वेगळंच. हे सगळं ठरतं आणि खुद्द केशवराव भोसलेच निवर्ततात...!

बोलपटाचा जमाना येतो आणि नाटकधंदा मागे पडतो. मराठी रसिकांच्या पदरात अलौकिकतेचं, संपन्नतेचं, समृद्धीचं, श्रीमंतीचं दान टाकणार्‍या, एका जमान्यात उत्तुंग वैभवाचे दिवस पाहिलेल्या नारायणराव बालगंधर्व या शापित यक्षाच्या आयुष्याला उतरती कळा लागते. महाराष्ट्र वाल्मिकी गदिमांचं एक वचन आहे - 'जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे..' तेच खरं..!

... आणि अखेरीस वार्धक्याने झुकलेले, थकलेले, खचलेले, किंचित लंगडणारे बालगंधर्व मावळत्या सूर्याला नमस्कार करताहेत आणि पडदा पडतो. नो रिग्रेटस्!

जा बाई नियती, तुला माफ केलं मी..!

मंडळी, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'बालगंधर्व' या सिनेमाबद्दल मी काय अन् किती बोलू? शुक्रवार ६ मे, २०११ या दिवशी मराठी रजतपटाच्या पत्रिकेत उच्चीचे सारे ग्रह एकवटले आणि नितीन देसाई कृत बालगंधर्व हा चित्रपट प्रदर्शित झाला...!

नितीन देसाईने हे अवघड, अजोड शिवधनुष्य फार सुरेखरित्या पेललं आहे. अक्षरश: भव्यदिव्य, आभाळाएवढं मोठं काम नितीनने आणि त्याच्या सार्‍या टीमने केलं आहे. नितीन देसाई हा स्वत: एक उच्च दर्जाचा कलादिगदर्शक. त्यामुळे जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते सारं काही आपल्या चित्रपटात हवंच हा नितीनचा अट्टाहास, हे वेड. परंतु या वेडापायीच 'बालगंधर्व' हा उच्च दर्जाचा चित्रपट निर्माण होतो. चित्रपटातील बालगंधर्वांच्या उंची, भरजरी पैठण्या, दागदागिने, केशभूषा, वेशभूषा हे सगळं अतिशय नेत्रसुखद! चित्रपटात दाखवल्या गेलेल्या गंधर्व नाटक मंडळींच्या त्या रोजच्या शे- दिडशे माणसांच्या चांदीच्या ताटातल्या त्या जिलबीयुक्त जेवणावळी..! काय सांगू? किती बोलू..?

दिगदर्शक रवी जाधव, पटकथा संवादकार अभिराम भडकमकर, महेश लिमयेची अप्रतीम सिनेमॅटोग्राफी, चित्रपटातले सारे कलाकार. खूप खूप मेहनत घेतली आहे या सगळ्यांनी.

चित्रपटात जरी नारायणरावांचीच जुनी पदं घेतली असली तरी त्याचं उत्तम संगीत संयोजन कौशलने केलं आहे आणि या कामात त्याला मोलाची मदत झाली आहे या चित्रपटाचा सह-संगीत संयोजक आदित्य ओक याची. डॉ विद्याधर ओक यांच्या घरात अभिजात शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत याचीच पूजा केली जाते त्यामुळे आदित्य या त्यांच्या चिरंजिवाकडे ही परंपरा चालतच आलेली. अगदी पदं निवडण्यापासून ते ऑर्गनची साथसंगत करण्यापर्यंत आदित्यने या चित्रपटाकरता परिश्रम घेतले आहेत..!

नारायणरावांच्या पदांव्यतिरिक्त कौशलची स्वत:चीही तीन गाणी या चित्रपटात आहेत तीही सुंदर. खास करून 'परवर दिगार..' ही प्रार्थना. 'नाथ हा माझा..' हे पद आणि बालगंधर्व हे समानार्थी शब्द आहेत. अभिजात संगीतातली आजची आघाडीची तरूण गायिका वरदा गोडबोलेने हे पद फार सुरेख गायले आहे. सुरेल आवाज आणि सुंदर तान ही वरदाची खासियत..! बेला शेंडेही नेहमीप्रमाणे छानच गायली आहे. खूप गुणी मुलगी आहे ती.

आनंद भाटे! सॉरी, आनंद भाटे नव्हे, आनंद गंधर्वच तो..! नारायणरावांची पदं गाणं हे या चित्रपटातलं सर्वात मोठं आव्हान. आणि तेच आनंदने लीलया पेलंलं आहे. या मुलाच्या गळ्यातून नारायणराव खूप छान उतरतात. सुरेल, भावपूर्ण, लडिवाळ गायकी असलेला आनंद..!

आनंदा, जियो रे...!

आणि सुबोध भावे? हे माझ्या महाराष्ट्रातल्या आया-बहिणींनो, दृष्ट काढा रे त्या पोराची..! नारायणराव बालगंधर्वांच्या स्त्री वेषातला, भरजरी पैठणी नेसलेला, सुरेख, सुंदर, अप्रतिम, देखणा असा सुबोध भावे..! सुबोधच्या रंगमंचावरील सिंधू, द्रौपदी, भामिनी, सुभद्रा एकापेक्षा एक देखण्या जमल्या आहेत..!



बाबारे नितीन देसाई, अरे तू किती मोठं काम केलं आहेस हे तुझं तुला तरी महित्ये का रे? नारायण श्रीपाद राजहंस, अर्थात साक्षात बालगंधर्व आणि त्या निमित्ताने मराठी संगीत, मराठी कला, वैभवशाली असलेली मराठी संगीत रंगभूमी, मराठी माणसाची कला आणि त्याची कलासक्ति याची समर्थ ओळख तू आजच्या तरूण पिढीला करून दिलेली आहेसच, परंतु केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर सार्‍या जगालाही करून दिली आहेस..! मराठी रजतपटाची मान तू सार्‍या जगतात उंचावली आहेस. खूप धन्य वाटलं रे तुझा हा चित्रपट पाहून...!



चटकाच लावून जातात बालगंधर्व. स्वयंवरात 'दादा ते आले ना..? अशी एन्ट्री घेत जगाला 'नाथ हा माझा'चं स्वरामृत भरभरून पाजणार्‍या नारायणराव बालगंधर्वांना अखेरीस रंगमंचावर संवाद म्हणताना ठसका लागतो आणि त्यांची तोंडातली कवळी खाली पडते. आणि तेव्हाचा सुबोध भावेचा तो चेहेरा..! अपमानीत, खिन्न, रडवेला..!

कोण आहे ही नियती? काय आहे तिचा न्याय? माहीत नाही..! तुमच्याआमच्या पदरी शेवटी उरतं ते फक्त यमनातलं 'नाथ हा माझा..' आणि तेच अमृत आहे, तेच अक्षय आहे, तेच चिरंतन आहे..!

-- तात्या अभ्यंकर.

April 29, 2011

माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..! - अंतीम भाग

माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..! - भाग १

बापरे..! 'मला यांच्या गणपतीची पुजा करायच्ये?' मला काही खुलासा होईना.. 'बघू नंतर काय होईल ते होईल, आपण आपली पुढ्यातली ही डिश खाऊन काहितरी कारण सांगून सटकू इकडनं..' अस ठरवून मी समोरच्या बर्फीचा एक तुकडा तोंडात टाकला.. सुरेखच होती बर्फी.. अगदी ताजी!

समोरच्या डिशमधलं थोडंफार खाल्लं मी. जरा वेळ तसाच तिथे बसून राहिलो. 'आता दर्शन घ्यायचं आणि निघायचं' असा मनाशी विचार केला आणि उठलो.. तोच तो मगासचा टकल्या हिजडा आणि इतर दोघेचौघे हिजडे पुढे सरसावले. त्यापैकी एकाच्या हातात मोठासा स्वच्छ नॅपकीन!

"आओ तात्यासेठ, अब न्हानेका और पूजा करनेका..!"

न्हानेका और पूजा करनेका? मला काहीच समजेना. अल्लाजान होताच माझ्यासोबत. तो त्यांच्यातलाच.. त्याच्याशी बोलताना मला कळलं की आज मी त्यांचा पेश्शल पाहुणा आहे आणि मला पूजा करायच्ये किंवा सांगायच्ये!

ही कुठली पद्धत? कुणाला विचारून? मला क्षणभर काय करावं ते कळेचना! 'सगळं झुगारून निघून जावं का इथून?' हा विचार माझ्या मनात सारखा येत होता. पण माझ्या आजुबाजूला जमलेल्या, माझी इज्जत करणार्‍या त्या हिजड्यांच्या चेहर्‍यावर मला खूप आनंद दिसत होता, उत्साह दिसत होता..

'देखे क्या होता है.. जो भी होगा, देख लेंगे..' या माझ्या नेहमीच्या स्वभावानुसार मी ती मंडळी म्हणतील ते करायचं ठरवलं. अधिक माहिती विचारता अल्लाजानकडून मला असं समजलं की मी एक पांढरपेशा उच्चभ्रू आहे असा त्यांचा समज आहे आणि माझ्या हातून आज त्यांच्या गणपतीची पूजा व्हावी अशी त्या मंडळातल्या हिजड्यांची इच्छा आहे आणि तशी पद्धतही आहे..!

साला, मी एक पांढरपेशा उच्चभ्रू? जाऊ दे, तो चर्चेचा विषय आहे! झमझम बारमध्ये महिन्याकाठी सताठशे रुपये पगार मिळणारा मी उच्चभ्रू?!

त्या गल्लीच्या मागल्या बाजूसच एका चाळवजा इमारतीत वेश्यायवसाय चालतो.. मला त्या लहानश्या खुराड्यातील तेवढ्याच लहानश्या मोरीवजा बाथरुमात नेण्यात आले.. त्या घरची मावशी अन् आजूबाजूच्या वेश्या यांनी मला वाट करून दिली.. एरवी बाराही महिने फक्त पोटातल्या भुकेच्या डोंबाचा अन् पर्यायाने केवळ वासनेचाच वावर असणार त्या खोलीत.. परंतु त्या दिवशी मला तसं काही जाणवलं नाही.. सण-उत्सवाचा, गणपतीच्या वातावरणाचा परिणाम? भोवती त्या वेश्यांची दोन-चार कच्चीबच्ची घुटमळत होती. कुणाच्या हातात गणपतीच्या पुढ्यातलं केळं तर कुणाच्या हाताता आराशीमधली चुकून सुटलेली रंगेबेरेंगी नकली फुलांची माळ, कुणाच्या हातात साखरफुटाणे तर कुणाच्या हातात कुठुनशी आलेली एखादी झांज! मला क्षणभर अभिमान वाटला तो माझ्या उत्साही व उत्सवप्रिय मुंबापुरीचा! काय काय दडवते ही नगरी आपल्या पोटात!

सोबत तो टकला हिजडा होता. त्यानं माझ्या हातात एक नवीन साबणाची वडी आणि स्वच्छ टॉवेल ठेवला..
मी स्नान करून, टॉवेल नेसून बाहेर आलो.. आसपासच्या वेश्यांचं तोंड चुकवून अंगात शर्टप्यान्ट चढवली.. त्या टकल्या हिजड्याचं मात्र मला खरंच खूप कौतुक वाटत होतं.. तो मोरीच्या बाहेरच थांबला होता.. 'हा आज आपला पाहुणा आहे आणि याला काय हवं नको ते आपण पाहिलं पाहिजे.' एवढी एकच तळमळ दिसत होती त्याच्या चेहर्‍यावर..! उच्चभ्रू समजातल्या सो कॉल्ड हॉस्पिटॅलिटीचा त्यानं कोणताही कोर्स केलेला नव्हता..!

तेवढ्या पाच मिनिटात त्या मावशीने चा करून माझ्या पुढ्यात कप धरला.. कोण ही मावशी? ८-१० वेश्यांचं खुराड सांभाळणारी.. तिनं मी अंघोळीहून येईस्तोवर माझ्याकरता चा देखील टाकाला?!

कपडे घातल्यावर त्या टकल्यानं ते अय्यप्पाचं पवित्र मानलं गेलेलं कुठलंसं वस्त्र उपरण्यासारखं माझ्या खांद्यावर घातलं.. आम्ही त्या खोलीतून बाहेर गणपतीपाशी आलो आणि मी मुख्य गाभार्‍यात शिरलो..

"तात्यासेठ, ये लक्ष्मी है.. इसको बोलो पूजा कैसे करनेका, क्या करनेका..!"

त्यांच्यातला एक लक्ष्मी नावाचा एक तरूण रूपवान हिजडा छानशी साडीबिडी नेसून तिथंच पूजा करायला म्हणून उभा होता.. माझं सहजच समोरच्या तयारीकडे लक्ष गेलं.. फुलं, अक्षता, अष्टगंध, समया, उदबत्त्या.. सगळी तयारी अगदी अपटूडेट होती.. ते सगळं पाहिल्यावर मी स्वत:ला विसरलो.. आपण एक सुशिक्षित सुसंस्कृत पांढरपेशे आहोत आणि मुंबैच्या कामाठीपुर्‍यात उभे आहोत ही गोष्ट मी विसरून गेलो. माझं मन एकदम प्रसन्न झालं..

सुसंस्कृत, सुसंस्कृत म्हणजे तरी काय हो? नस्ता एक बोजड शब्द आहे झा़लं.. त्या क्षणी माझ्या आजुबाजूचे ते सारे हिजडे सुसंस्कुत नव्हते काय?!

"प्रारंभी विनती करू गणपती.."

दशग्रंथी तात्या अभ्यंकराने पूजा सांगायला सुरवात केली.. तशी त्या पार्थिवाची प्राणप्रतिष्ठा वगैरे पहिल्या दिवशीच झाली असणार.. मी सांगत होतो ती केवळ संध्याकाळची धूपार्ती!

'प्रणम्य शिरसा देवं', 'शांताकारं भुजगशयनं.', गणपती अथर्वशीर्ष...' च्यामारी येत होते नव्हते ते सारे श्लोक तिथे बिनधास्तपणे आणि मोकळ्या मनाने म्हटले! अगदी गेला बाजार शिवमहिन्म स्तोत्रातल्याही सताठ ओळी मला येत होत्या त्याही म्हटल्या -

महिन्मपारंते परमविदुषो यद्यसदृषि
स्तुतिर्ब्रह्मादिनाम् अपितदवसंनास्त्वयिगिरा:
अथावाच्य..

आता आठवत नाही पुढलं काही.. पण कधी काळी ल्हानपणी मामांकडून शिवमहिन्माची संथा घेतली होती ती आता कामी येत होती. आपल्याला काय हो, शंकर तर शंकर.. तो तर बाप्पाचा बापुसच की!

ओल्या बोंबलाच्या कालवणाने चलबिचल होणारा मी, अगदी पूर्णपणे एका भिक्षुकाच्या भूमिकेत शिरलो होतो... सहीसही ती भूमिका वठवत होतो.. 'काय साला विद्वान दशग्रंथी ब्राह्मण आज आपल्याला लाभला आहे!' असे भाबडे कृतज्ञतेचे भाव आजुबाजूच्या हिजड्यांच्या चेहर्‍यावर मला दिसत होते.. त्यांचा तो म्होरक्या टकला हिजडा तर अक्षरश: कृतकृत्य होऊन रडायचाच बाकी होता.. श्रद्धा, श्रद्धा म्हणजे दुसरं तरी काय असतं हो?!

'गंधाक्षतपुष्पं समर्पयमि..' असं म्हणून लक्ष्मीला गंध, अक्षता व फुलं वाहायला सांगितलं..

"अबे भोसडीके उस्मान गांडू.. वो फुल उधर नजदिक रख ना..!"

फुलाचं तबक थोडं दूर होतं ते रागारागाने एका हिजड्याने कुणा उस्मानला नीट गणपतीच्या जवळ ठेवायला सांगितलं..!

गणेशपुजन सुरू असतांनाच, "अबे भोसडीके उस्मान गांडू"?

पावित्र्याच्या अन् शुचिर्भूततेच्या व्याख्या प्रत्येकाच्या, किंबहुना प्रत्येक समाजाच्या वेगळ्या असतात..!

"धूपं समर्पयामि, दीपं सर्पमर्पयामि.." दशग्रंथी अभ्यंकर सुरूच होते! आणि माझ्या सूचनांनुसार लक्ष्मी सगळं काही अगदी यथासांग, मनोभावे करत होती..की होता?!

सरते शेवटी पूजा आटपली, आरती झाली.. मला पुन्हा एकदा आतल्या एका खोलीत नेण्यात आलं.. त्या मंडळातले सारे कमिटी हिजडे अगदी कृतकृत्य होऊन माझ्याभोवती जमले होते..

'अब मुझे जाना होगा..देर हो गई है..' असं मी म्हटल्यावर थोडं तरी काही खाऊन गेलंच पाहिजे असा मला त्या टकल्यासकट इतर हिजड्यांनी आग्रह केला.. पाचच मिनिटात कुणीतरी गरमागरम पुर्‍या, छोले, गाजरहलवा असा मेनू असलेलं ताट माझ्या पुढ्यात घेऊन आला..

अखेर दशग्रंथी विद्वान तात्या अभ्यंकर अल्लाजनसोबत तेथून निघाले.. एक वेगळाच अनुभव घेतला होता मी.. गणपतीकडे त्या यजमान हिजड्यांकरता काय मागणार होतो मी? 'यांचा शरीरविक्रयाचा धंदा चांगला होऊ दे' - हे मागणार होतो? आणि मुळात त्यांच्याकरता देवाकडे काही मागणारा मी कोण? माझीच झोळी दुबळी होती.. त्यांच्या झोळीत माप टाकायला गणपती समर्थ होता..!

निघण्यापूर्वी त्या टकल्या हिजड्यानं माझ्या हातात एक पाकिट आणि हातात एक पिशवी ठेवली आणि मला नमस्कार करू लागला.. वास्तविक मलाच त्याच्या पाया पडावसं वाटत होतं..वयानं खूप मोठा होता तो माझ्यापेक्षा...!

तेथून निघालो. पाकिटात शंभराची एक कोरी नोट होती.. सोबत ही पिशवी कसली?

'आमच्याकडे जाताना भिक्षुकाला शिधा द्यायची पद्धत आहे..' अल्लाजानने माहिती पुरवली..

मी पिशवी उघडून पाहिली तो आतमध्ये एका पुढीत थोडे तांदूळ, दुसर्‍या पुडीत थोडी तूरडाळ..आणि दोनचार कांदेबटाटे होते.. डाळ-तांदुळाचा तो शिधा पाहून मला क्षणभर हसूच आलं..

'अरे हे काय? डाळ-तांदुळाचा शिधा?' मी अलाजानला विचारलं..

"डालचावल के अलावा इन्सानको जिंदगीमे और क्या लगता है?!"

अल्लाजानच्या तोंडून सहजच निघालेलं ते वाक्य बी ए, एम ए, पीएचडी... सार्‍या विद्यांना व्यापून त्यांच्या पल्याड जाणारं होतं, गेलं होतं.. !

मला आजही त्या शिध्यातले डाळतांदूळ पुरत आहेत..!

-- तात्या अभ्यंकर.

माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..! - भाग १

१९९१-९२चा सुमार. मी तेव्हा नौकरी करत होतो.. फोरासरोडवरील झमझम नावाच्या सरकारमान्य देशी दारूच्या बारमध्ये..क्यॅशियर कम म्यॅनेजर होतो मी..आजूबाजूला सारी वेश्यावस्ती, दारुवाले, मटकेवाले, पोलिस, गुंड.. यांचंच सारं राज्य.. आयुष्यात एके से एक अनुभव आले त्या दुनियेत. कधी सुखावणारे, कधी दुखावणारे, कधी विचार करायला लावणारे, काही चित्र, काही विचित्र, काही नैसर्गिक, काही अनैसर्गिक..अस्वस्थ करणारे..आजूबाजूला अनेक प्रसंग रोजच्या रोज घडत होते.. स्वाभाविक, अस्वाभाविक..पण प्रत्येक प्रसंग एक अनुभव देऊन गेला..

बारमध्ये असंख्य प्रकारची माणसं येत.. रोजचे नियमित-अनियमित बेवडे हजेरी लावायचेच..त्याशिवाय रोज एखादी 'काय अभ्यंकर, सगळं ठीक ना? काय लफडा नाय ना?" असं विचारणारी नागपाडा पोलिस स्टेशनच्या कदम हवालदाराची किंवा त्याच्या सायबाची फेरी.. मग कुठे बरणी उघडून फुकट चकली खा, चा पी असं चालायचं.. कधी हलकट मन्सूर किंवा अल्लाजान वेश्यांकरता भूर्जी, आम्लेट, मटन सुका, खिमपाव असं काहीबाही पार्सल न्यायला यायचे.. कधी अफूबाज, चरसी डब्बल ढक्कन यायचा..कधी बोलबोलता सहज सुरा-वस्तरा चालवणारे हसनभाय, ठाकूरशेठ सारखे गुंड चक्कर काटून जायचे.. "क्यो बे तात्या, गांडू आज गल्ला भोत जमा हो गया है तेरा.. साला आजकल बंबैकी पब्लिकभी भोत बेवडा हो गएली है..साला, एक हज्जार रुप्या उधार दे ना." असं म्हणून मला दमात घ्यायचे..

कधी त्या वस्तीत धंदा करणारे हिजडे यायचे.. उगीच कुठे ठंडा, किंवा अंडापाव, असंच काहीबाही पर्सल न्यायला यायचे.. 'ए तात्या... म्येरा पार्सल द्येव ना जल्दि.. कितना मोटा है तू..' अश्या काहितरी कॉमेन्टस करत माझ्या गल्ल्याशी घुटमळत..मी त्रासाने हाकलून द्यायला लागलो की काडकन टाळी वाजवून 'सौ किलो..!' असं मला मिश्किलपणे चिडवायचे! अक्षरश: नाना प्रकरची मंडळी यायची त्या झमझम बारमध्ये आणि केन्द्रस्थानी तात्या अभ्यंकर!

गणपतीचे दिवस होते.. रस्ता क्रॉस केल्यावर आमच्या बारच्या समोरच्याच कामाठीपुर्‍यातल्या कोणत्याश्या (११ व्या की १२ व्या? गल्ली नंबर आता आठवत नाही..) गल्लीत हिजड्यांचाही गणपती बसायचा. हो, हिजड्यांचा गणपती! वाचकांपैकी बर्‍याच वाचकांना कदाचित ही गोष्ट माहीत नसेल. परंतु मुंबैच्या कामाठीपुर्‍यात अगदी हिजड्यांचाही गणपती बसतो.. साग्रसंगीत त्याची पूजा केली जाते.. कामाठीपुर्‍यात काही तेलुगू, मल्लू भाषा बोलणारे, तर काही उत्तरप्रदेशी हिजडे आहेत ते दरसाल गणपती बसवतात.. बरेचसे मुस्लिम हिजडेही त्यात आवर्जून सहभाग घेतात..

झमझम बारचा म्यॅनेजर म्हणून मला आणि आमच्या बारच्या सार्‍या नौकर मंडळींना त्या हिजड्यांचं सन्मानपूर्वक बोलावणं असायचं.. 'तात्यासेठ, गनेशजीको बिठाया है.. 'दरसन देखने आनेका.. खाना खाने आनेका..' असं आग्रहाचं बोलावणं असायचं..! अल्लाजान मला घेऊन जायचा त्या गणेशोत्सवात..

संध्याकाळचे सात वाजले असतील.. मी गल्ल्यावर होतो..पूजाबत्ती करत होतो. तेवढ्यात अल्लाजान मला बोलवायला आला.. "गनेशके दरसन को चलनेका ना तात्यासेठ?"

मी दिवाबत्ती केली.. अर्जून वेटरला गल्ल्याकडे लक्ष द्यायला सांगितलं आणि हिजड्यांच्या गणपतीच्या दर्शनाला अल्लाजानसोबत निघालो. कामाठीपुर्‍याच्या त्या गल्लीत गेलो.. खास दक्षिणेकडची वाटावी अशी गणेशमूर्ती होती.. नानाविध फुलं, मिठाई, फळफळावळ, थोडे भडक परंतु सुंदर डेकोरेशन केलेला हिजड्यांचा नानाविध अलंकारांनी नटलेला 'अय्यप्पा-गणेश' स्थानापन्न झाला होता.. एका म्हातार्‍या, स्थूल व टक्कल पडलेल्या हिजड्यानं माझं स्वागत केलं.. तो त्यांचा म्होरक्या होता. बसायला खुर्ची दिली.. झमझम बारचा म्यॅनेजर तात्याशेठ! म्हणून मोठ्या ऐटीत माझी उठबस त्या मंडळींनी केली.. अगदी अगत्याने, आपुलकीने..!

हिजड्यांबद्दल काय काय समज असतात आपले? परंतु ती देखील तुमच्याआमच्यासारखी माणसंच असतात.. आपल्यासारख्याच भावभावना, आवडीनिवडी, रागलोभ असतात त्यांचे.. ते हिजडे कोण, कुठले, या चर्चेत मला शिरायचं नाही. ते धंदा करतात एवढं मला माहित्ये. चक्क शरीरविक्रयाचा धंदा.. पोटाची खळगी भरणे हा मुख्य उद्देश. आणि असतातच की त्यांच्याकडेही जाणारी आणि आपली वासना शांत करणारी गिहाईकं! कोण चूक, कोण बरोबर हे ठरवणारे आपण कोण?

मला सांगा - एखाद्या सिने कलाकाराने म्हणा, किंवा अन्य कुणा सेलिब्रिटीने म्हणा, दगडूशेठला किंवा लालबागच्या राजाला भेट दिल्यानंतर त्याचं होणारं आगतस्वागत आणि कामाठीपुर्‍यातल्या हिजड्यांच्या गणेशोत्सवाला तिथल्याच एका देशीदारूच्या बारच्या तात्या अभ्यंकराने भेट दिल्यावर हिजड्यांनी त्याच आपुलकीनं त्याचं केलेलं आगतस्वागत, यात डावंउजवं कसं ठरवायचं?

लौकरच एक अतिशय स्वच्छ प्लेट आली माझ्या पुढ्यात. वेफर्स, उतम मिठाई, केळी, चिकू, सफरचंद इत्यादी फळांच्या कापलेल्या फोडी, दोनचार उत्तम मावा-बर्फी, काजुकतलीचे तुकडे..!

तो म्हातारा हिजडा मोठ्या आपुलकीनं आणि प्रेमानं मला म्हणाला..

"मालिक, थोडा नाष्टा करो.."
"बादमे तुम्हे हमारा गणेशका पूजा करना है. और बादमे खाना भी खानेका..!"

बापरे..! 'मला यांच्या गणपतीची पुजा करायच्ये?' मला काही खुलासा होईना.. 'बघू नंतर काय होईल ते होईल, आपण आपली पुढ्यातली ही डिश खाऊन काहितरी कारण सांगून सटकू इकडनं..' अस ठरवून मी समोरच्या बर्फीचा एक तुकडा तोंडात टाकला.. सुरेखच होती बर्फी.. अगदी ताजी!


माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..! - अंतीम भाग

April 26, 2011

पिउनी अमृत, घेउनी संचित...!


पाखरा जा.. (येथे ऐका)
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थात पु लं. चित्रपटकार, नाटककार, व्याख्याता, साहित्यिक, एकपात्री, दाता, इ इ इ असलेला एक अफाट खेळिया. परंतु या छोटेखानी लेखाचा संबंध संगीतकार आणि गायक पुलंशी आहे..
'गमपसां धसां' असा आलाप असलेली गाण्याची सुरवात. 'जा' या अक्षरावरचा सुंदर निषाद. गमम, गमधप रेसा या स्वरावलींनी पूर्ण होणारे 'प्रेमळ, शीतल छाया..' हे शब्द. सारंच अतिसुंदर! नंद रागाचा भक्कम बेस असलेलं हे गाणं. मुळातच या गाण्याचा असलेला नंदसारख्या अत्यंत प्रसन्न रागाचा मुखडाच मन प्रसन्न करून जातो. राग नंद, छान-सुंदर अध्धा ताल, पुलंचा लडिवाळ आवाज, आणि तेवढीच उच्च गायकी. फारा वर्षापासून लिहायचं होतं मला या गाण्यावर..!
हे गाणं ऐकताना खरंच खूप कौतुक वाटतं पुलंचं. कारण हे गाणं ऐकायला जितकं साधं-सोपं वाटतं तेवढंच ते गाण्याकरता तसं सोपं नाही. पुलंच्या अनोख्या आणि उच्च दर्जाच्या गायकीचं दर्शन होतं आपल्याला. उभ्या महाराष्ट्राचं आणि खास करून पुलंचं दैवत असलेल्या नारायणराव बालगंधर्वांचे संस्कार आणि त्यांची गायकी आपल्याला पुलंच्या या गाण्यात पुरेपूर दिसते. सुरेलपणा, लडिवाळपणा ही बालगंधर्वांच्या गायकीची ठळक वैशिठ्ये आणि तीच आपल्याला पुलंच्या या गायकीत दिसतात. नारायणराव बालगंधर्वांचा प्रभाव कुमारजी, मन्सूरअण्णा, भीमण्णा यांच्यासारख्या भल्याभल्या गायकांवर झाला; पुलंही त्याला अपवाद नाहीत.
प्रेमळ, शीतल छाया हे शब्द अगदी खास करून कान देऊन ऐकण्यासारखे. कुठेही उगाच खटका नाही, आघात नाही. 'छाया' शब्दातलं 'छा' हे अक्षर आणि त्या उच्चार अगदी मुद्दाम आवर्जून ऐकण्यासारखा..! नारायणराव असते तर त्यांनी 'छाया' हा शब्द अगदी अस्साच म्हटला असता!
हरितात्या मला सांगत होते,
"अरे हा पुरुषोत्तम पक्का गवई बरं का! गिरगाव ब्राह्मण सभेतल्या हरी केशव गोखले हॉलमध्ये असे आम्ही गाणं ऐकायला बसलेले. आमच्या शेजारी कोण बसलं होतं सांग पाहू? साक्षात नारायणराव बालगंधर्व! आणि हा देशपांड्यांचा पुरुषोत्तम गात होता. नारायणराव थक्क होऊन त्याचं गाणं ऐकत होते आणि तुला सांगतो तात्या, 'प्रेमळ शीतल छाया..' हे शब्द घेऊन पुरुषोत्तम 'पाखरा जा..' च्या समेवर असा काही आला की नारायणरावांच्या डोळ्यात पाणी आलं हो! ते म्हणाले, 'देवा, पुरुषोत्तमा, काय सुरेख समेवर आलास..!'
'खोटं नाही, अगदी पुराव्याने शाबीत करीन..!' Smile
पसरले विश्व अपार..
भेदुनी गगनाला बघुनी ये देवलोक सारा
पिउनी अमृत, घेउनी संचित
परतुनी ये घरा..!
सुंदर शब्द, सुरेख अर्थ..!
रे पाखरा, नंदच्या स्वरांवर स्वार हो झकासपैकी, आणि घे पाहू भरारी या अफाट पसरलेल्या विश्वात! नंदची लडिवाळता, प्रसन्नता तुला साथ करील. जा जरा देवलोकात आणि त्यांनाही ऐकव जरा नंद! त्या बदल्यात परत घेऊन ये देवलोकातलं ते अमृताचं संचित..!
व्वा भाईकाका, 'भेदुनी गगनाला..' हा अंतरा रंगवतानाची तुमची गायकी मस्तच, अगदी कसदार! खरं सांगतो भाईकाका, तुम्ही खरे तर एक उत्तम गवईच व्हायचात. अजून काही काळ हिंदुस्थानी गायकीत पर्फॉर्मर म्हणून का नाही रमलात? अगदी भीमण्णांसारखा बडा ख्यालिया राहू देत परंतु मध्यलयीतल्या काही प्रचलित, अप्रचलित रागरागिण्या का नाही रंगवल्यात? अजून काही काळ तालिम का हो घेतली नाहीत कागलकरबुवांकडून, मंजिखांकडून वा मन्सूरअण्णांकडून? बेळगाव लौकर सोडलंत म्हणून, की लेखनामध्ये आणि एकपात्रीमध्येच अधिक रमलात म्हणून? Smile
असो. तरीही खूप बरं वाटलं ती नंदतली तुमची लै भारी गायकी ऐकून. जीव तृप्त झाला. तुमच्या स्वभावानुसार एखाद्याला अगदी सहज प्रेमाने पाठीवर हात ठेऊन काही सांगावं, त्याच साधेपणानं आणि त्याच सात्त्विकतेनं तुम्ही पाखराशी साधलेला संवाद मनापासून आवडून गेला.
अजून काय लिहू? तुम्ही आयुष्यभर नारायणरावांच्या, मन्सूरअण्णांच्या गायकीचं भरभरून कौतुक केलंत. पण आज म्या पामराने तुमच्या गायकीचं हे मनमोकळं कौतुक करण्याचं हे धाडस केलं आहे, तेवढं गोड मानून घ्या इतकंच सांगायचं होतं..!
तुमचा,
तात्या.

April 19, 2011

तुमच्या उष्ट्यासाठी आलो...!

आपल्या अभिजात संगीताच्या दुनियेत गुरू-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे. किंबहुना ह्या परंपरेशिवाय हे संगीत सुरूच होत नाही, त्याची अभिव्यक्ति केवळ अशक्य आहे.

स्वर, लय, ताल, राग, गायकी, ह्या सगळ्या गोष्टी गुरूकडूनच शिकायला मिळतात, शिकायच्या असतात. गुरुकडे गाण्याची तालीम घेत असताना/घेतल्यावर गुरुचं बोट धरून शिष्यही ह़ळूहळू गाऊ लागतो, गाता होतो. पण गुरुकडून काय शिकायचं असतं बरं?

गुरूकडून गाण्याकडे बघण्याची जी एक नजर असावी लागते ती नजर शिकायची असते, गायकी शिकायची असते. गायकी कशात आहे, कुठे आहे, हे गुरूच शिकवतो. परंतु पुढची वाटचाल मात्र शिष्याला स्वत:च करायची असते. उदाहरणार्थ, यमन राग कसा आहे, त्याचं जाणंयेणं कसं आहे, हे गुरू शिकवतो. थोडक्यात सांगायचं तर तो यमन रागाची वाट दाखवतो. 'बाबारे, हे स्वर असे आहेत, असा असा, या या वाटेने पुढे जा, अमूक स्वरावली अशी आहे, तमूक तशी आहे!' रागाच्या या सगळ्या खाणाखुणा, बारकावे, हमरस्ते अन् पाऊलवाटा सगळं काही गुरू दाखवत असतो. परंतु एकदा गुरूकडून या सगळ्याची रीतसर तालीम घेतल्यावर मात्र शिष्याला त्या वाटेवरून एकट्यालाच जायचं असतं/जावं लागतं. गुरूकडून मिळालेल्या तालमीमुळे, गाण्याच्या सततच्या चिंतन-मननामुळे, केलेल्या रियाजामुळे, गुरुने दाखवलेल्या त्या यमनच्या वाटेवरून शिष्य जाऊ लागतो, परंतु त्याचसोबत त्याच वाटेवर राहून स्वत:ची अशी एक वेगळी अभिव्यक्ति तो करू लागतो, स्वत:चे विचार मांडू लागतो, स्वत:चं गाणं गाऊ लागतो!

एखादा उत्तम शिष्य हा स्वत:च्या गुरूने दिलेल्या तालमीसोबतच इतरही अनेक जणांकडून, त्यांची गायकी ऐकून त्यातल्या चांगल्या गोष्टी उचलत असतो, अक्षरश: वेचत असतो. आपल्या गुरुची गायकी तर तो शिकत असतोच, त्याबद्दल काही वादच नाही, परंतु आपल्या गुरुसमान असणार्‍या इतरही अनेक दिग्गजांचं गाणं, त्यातली सौंदर्यस्थऴं तो टिपत असतो. आणि या सगळ्याच्या परिपाकातूनच एक चांगला, तैय्यार आणि खानदानी गवई तयार होत असतो, होतो!

एखादा गवई (आता आपण शिष्य हा स्वत:च एक गवई झाला आहे असं समजून पुढे जाऊया! ) स्वत:च्या गाण्याची अभिव्यक्ति करत असतांना, मध्येच त्याच्या गायकीत - त्याच्या गुरूच्या गायकीची, त्याच्या घराण्याच्या गायकीची आणि घराण्यातील इतर पूर्वजांच्या जागांची (ज्या त्याला त्याच्या गुरुनेच दाखवलेल्या असतात!) आणि त्याने केलेल्या, आपल्या गुरुसमान असणार्‍या इतर दिग्गजांच्या गायकीच्या सततच्या चिंतन-मननाची, अभ्यासाची एक छानशी सावली पडते! मंडळी, माझ्या मते ही सावली म्हणजेच कलेची एक अत्यंत उच्च, प्रतिभावान अशी अभिव्यक्ति आहे. मंडळी, ही नक्कल नव्हे, नक्कीच नव्हे! मी याला गाण्यातली बहुश्रुतता म्हणेन! आणि मला असं वाटतं की कुठल्याही उत्तम गवयाकडे अशी बहुश्रुतता हवी तरच त्याचं गाणं हे अधिकाधिक समृद्ध होत जातं, समृद्धतेकडे वाटचाल करू लागतं!

याची अनेक म्हणजे अनेक उदाहरणे देता येतील. कुमार गंधर्व! वास्तविक स्वत: एक अत्यंत प्रतिभावन कलावंत. स्वत:च्या वाटेनं जाणारा, स्वत:चं असं एक वेगळं गाणं निर्माण करणारा! परंतु त्यांच्यावरही नारायणराव बालगंधर्वांचा इतका प्रभाव पडला की त्यांनाही कुठेतरी नायारणरावांचं गाणं लोकांना उलगडून दाखवावंसं वाटलं! आणि त्यांनी 'मला उमजलेले बालगंधर्व' या नावाचा एक कार्यक्रमच केला, त्याची ध्वनिफीतही काढली. पण म्हणजे त्यांनी बालगंधर्वांची नक्कल केली का हो? नक्कीच नाही!

बाबूजींचंही उदाहरण देता येईल. त्यांच्या गायकीमध्येही हिराबाई, बालगंधर्व यांचा खूप प्रभाव होता.

मंडळी, आजपर्यंतच्या आयुष्यात मला अनेक दिग्गजांच्या जाहीर तसेच खाजगी मैफली ऐकण्याचा अगदी भरपूर योग आला. कित्येकदा गवई गाता गाता रंगात येऊन, मध्येच एखादी छानशी जागा, सुरावट त्याच्या गायकीत घेऊन मोठ्या कौतुकाने, "हे निवृत्तीबुवांचं बरं का!, हे करिमखासाहेबांचं बरं का!, हे अमक्याचं बरं का!, हे तमक्याचं बरं का!" असं चक्क भर मैफलीमध्येच बोलताना मी ऐकलं आहे. म्हणजे तो गवई निवृत्तीबुवांची किंवा करीखासाहेबांची नक्कल करत असतो का हो? नाही! मी मगाशी 'गाण्यातली बहुश्रुतता' हे जे शब्द वापरले ना, तीच ही बहुश्रुतता!

आमच्या भीमण्णांचंही उदाहरण देता येईल. खरंच किती बहुश्रुत होतं अण्णांचं गाणं! सवाईगंधर्वांची तालीम असल्यामुळे त्यांची गायकी तर अण्णांच्या गाण्यात पुरेपूर दिसतेच! सवाईगंधर्वांना आवाजाचा बर्‍याचदा त्रास व्हायचा, कित्येकदा त्यांचा आवाज लागायला वेळ लागायचा. त्यामुळे कदाचित दर मैफलीत आवाजाच्या त्रासामुळे त्यांना जे गाणं दाखवायचं असेल ते गाणं ते दाखवू शकतच असत असं नव्हे! या मुद्द्यावर भाईकाका एकदा असं म्हणाले होते की सवाईंचं गाणं हे खर्‍या अर्थाने भीमसेननेच जगाला दाखवलं, जगापुढे उत्तमरित्या मांडलं!

पण मंडळी, सवाईंचं उदाहरण एक वेळ सोडून द्या, कारण ते तर अण्णांचे प्रत्यक्ष गुरूच होते. परंतु अण्णांच्या गाण्यात किराणा घराण्याचे प्रमूख असलेल्या खुद्द करीमखासाहेबांच्याच गाण्याची इतकी सुंदर सावली दिसते की क्या केहेने! अण्णा गातांना मध्येच कधी पटकन खासाहेबांची एखादी जागा घेतील, खास त्यांच्या ष्टाईलने एखादा सूर ठेवतील की केवळ लाजवाब! आणि हे सगळं अण्णांना मुद्दामून करावं लागत नाही तर या गोष्टी अगदी नकळतपणे आणि तेवढ्याच सहजतेने त्यांच्या गायकीत उतरल्या आहेत. कधी केसरबाईंच्या आवाजाची चांदीच्या बंद्या रुपायासारखी खणखणीत नादमयता अण्णांच्या गाण्यात दिसते, त्यांच्या तानांचे अनेक उत्तमोत्तम पॅटर्नस् अण्णांच्या गायकीत अगदी एकरूप झालेले दिसतात, तर कधी आमिरखासाहेबांसारख्या गवयांचे गवई असलेल्या दिग्गजाच्या आलपीतली गहनता अगदी अवचितपणे अण्णांच्या गाण्यात डोकावते, कधी बडेगुलामअली खासाहेबांच्या अत्यंत लोचदार आलापीला अण्णा सहज स्पर्श करतात, तर कधी एखाद्या अभंगात नारायणराव बालगंधर्वांची एखादी जीवघेणी सुरावट किंवा एखादी झरझर लडिवाळ तान त्यांच्या गाण्यात उतरते! आणि एवढं सगळं करूनदेखील आज अण्णांचं गाणं हे स्वतंत्र आहे, जगाला त्यांच्या स्वत:च्या गाण्याची अशी एक ओळख आहे! मंडळी, मी गाण्यातली बहुश्रुतता म्हणतो ती हीच! अण्णाच नेहमी असं म्हणतात की एखाद्याची नक्कल करणं खूप सोप्प आहे परंतु त्या नकलेचं अस्सलमध्ये रुपांतर करून ते स्वत:च्या गाण्यात समर्थपणे मांडणं मुश्कील आहे!

 मंडळी, असाच एकदा अण्णांशी दोन घटका बोलत होतो. माझ्या सुदैवाने अण्णांचाही मूड होता आणि गाण्यातील बहुश्रुतता हा विषय निघाला. मी सहजच त्यांना म्हटलं की "अण्णा, नारायण बालगंधर्वांची गायकी आपल्या अभंगात फार सुंदरतेने दिसते, तर शुद्धकल्याणात करीमखासाहेबांची काही वेळेला अगदी सहीसही याद येते!"
त्यावर अण्णा हसून परंतु विनम्रपणाने इतकंच म्हणाले,

"अरे त्यात माझं कसलं रे कौतुक? पूर्वीच्या लोकांनीच इतकं भरपूर गाणं करून ठेवलंय की तेच आम्हाला आजपर्यंत पुरतं आहे. आम्ही त्यांचंच उष्ट खातो रे! हो, पण ते उष्ट म्हणजे उकिरड्यावरच्या पत्रावळीवरचं शिळं उष्ट नव्हे बरं का! ते उष्ट आहे चांदीच्या ताटातल्या बदामाच्या शिर्‍याचं, साखरभाताचं! आम्ही जे काही कण वेचले ते त्या बदामाच्या शिर्‍याचे अन् साखरभाताचेच..!"

अण्णा, तुमची खूप आठवण येते. तुम्ही वेचलेल्या त्या बदम्याच्या शिर्‍याचे अन् साखरभाताचे काही कण तुम्ही कधी प्रेमाने मलाही खाऊ घातलेत हे माझं भाग्य. अण्णा, तुमची जायची वेळ झाली अन् तुम्ही चांदीच्या ताटावरून उठून गेलात, परंतु त्याच ताटातले काही उष्टे कण मला मात्र आयुष्यभर पुरणार आहेत, माझी साथ करणार आहेत..!

 -- तात्या अभ्यंकर.

March 31, 2011

पाकसिद्ध बल्लवाचार्य गणपा..!

फाईन आर्टस्. कोणत्या? संगीत, क्रीडा, साहित्य, शिल्प, चित्र, नाट्य आणि सर्वात महत्वाची फाईन आर्ट म्हणजे पाककला..! या कला परमेश्वर सर्वांच्याच हाती देत नाही, देत नसतो. लाखोकऱोडोत एक लता होते, एक भीमण्णा होतात, एक सचिन होतो. त्याचप्रमाणे असंख्य मराठी ब्लॉग्जवर एक ब्लॉग जन्म घेतो - खा रे खा..! आणि या ब्लॉगचा कर्ता असतो माझा मित्र गणपा..!
पाककला, पाककृती, किंवा पाकक्रिया या शब्दांच्याही वरचढ एक शब्द आहे आणि तो म्हणजे पाकसिद्धी..! गणपाचं पाककौशल्य पाहिलं की त्याला या कलेतील सिद्धी प्राप्त झाली आहे असंच म्हणावं लागेल. सिद्धी असल्याशिवाय अशी देखणी, चवदार पाककृती हातातून उतरत नाही. सिद्धीला वयाचं वावडं नसावं आणि म्हणूनच इतक्या तरूण वयात गणपा 'बल्लवाचार्य' या पदास पोहोचला आहे हे सांगायला मला सार्थ अभिमान वाटतो. 'पाककलेतील सिद्धपुरुष', 'बल्लवाचार्य', 'पाकसिद्धीमहामहोपाध्याय' अश्या अनेक पदव्या आमच्या गणपाला शोभून दिसतील..!
गणपाचा खारेखा हा ब्लॉग अक्षरश: बघत राहावा असा आहे. किती नानाविध पदार्थ? तेही सचित्र, सुरेख मांडलेले..! असं म्हणतात की एखादी सुंदर नटलेली, थटलेली बाई डयरेक्ट बघण्यापेक्षा ती जेव्हा तिचा तो साजशृंगार करत असते, तिचा केशसंभार सवारत असते, खोपा घालीत असते, नाकी नथ आणि गोर्‍यापान दंडावर छानशी जाळीदार वाक चढवत असते तेव्हाच तिला पाहावं..! भाईकाका म्हणायचे की गाण्याच्या सुरवातीला जेव्हा वाद्य लागत असतात, तबले-तानपुरे-सारंग्या जुळत असतात ते श्रवणसुख काही औरच..!
त्याचप्रमाणे गणप्याच्या पाककृती जेव्हा जन्म घेत असतात तेव्हापासूनच त्या पाहण्यात खरी गंमत आहे, मौज आहे, आनंद आहे. पाककृतीचं छानसं मांडलेलं साहित्य, नानाविध मसाले, कच्चामाल या सगळ्याची पूर्वतयारी याचेही अगदी स्टेप-बाय-स्टेप सुरेख फोटो गणप्याने दिले आहेत. आणि या सार्‍यासोबत गणपाची पाकवाणीही तेवढीच वाचनीय आणि चवदार .! 
चला आता एक लहानशी सफरच करू या गणपाच्या या ब्लॉगची..
काय? सुरवातीलाच गरमागरम आलूपराठा खायचा म्हणता..? हा घ्या..
हे त्याचं नटणं-थटणं पाहा किती लोभसवाणं..
आणि हा घा तैय्यार आलूपराठा. हा वाढताना गणपा म्हणतो - " ताज्या ताज्या दह्या /लोणच्या बरोबर , आवडी नुसार तळलेल्या / कच्या मिरच्यांसोबत लुफ्त घ्या गरमा गरम आलु के पराठे का " 
आता काय? डायरेक्ट दम बिर्याणी खायची म्हणता? अहो थांबा थांबा, जरा तैय्यार तर होऊ द्या. तिला जरा 'दम'देणं सुरू आहे..! 
हम्म.. आता खा मनसोक्त... 
तुम्हाला जयपूर गायकी आवडते का? म्हणजे तुम्हाला अनवट राग आणि अनवट पदार्थ नक्कीच आवडत असणार..! त्याकरता ही घ्या खास तुमच्याकरता सुरणाच्या वड्यांची देखणी पूर्वतयारी.. तेलात सूर मारण्यापूर्वीचे हे सुरणाचे वडे..! तैय्यार वडे पाहायला तुम्हाला त्या ब्लॉगवरच मी पाठवणार आहे..! 
असो..
अहो इथे किती आणि कशाकशाची झलक दाखवू? अजून खूप खूप खादाडी शिल्लक आहे गणप्याच्या ब्लॉगवर. कुठे युरोपियन डोसाच आहे, तर कुठे इदेचा शीरखुर्मा आहे. कुठे पेपर चिकन आहे तर कुठे शाकाहार्‍यांकरता व्हेज बिर्याणी आणि सुक्या मटणाची व्हेज व्हर्जन आहे. कुठे केळफुलाचे जोरदार कबाबच आहेत तर कुठे देशप्रेम जागृत करणारे तिरंगा कबाब आहेत. मधेच छानशी कोथंबीर वडी सजूनधजून उभी आहे! 
कुठे उडपी उत्तपा हुशारी करतो आहे तर कुठे बोंडाची भाकरी तुमचा जीव एवढुसा करते आहे. कुठे चिकन साते, तर कुठे पात्रानी मच्छी. कुठे लाजवाब वांग्याचं भरीत तर कुठे तुमचा आत्मा थंड करणारी मलई कुल्फी..!
हा ब्लॉग निर्माण करून 'देता किती घेशील दो कराने' अशी तुमची माझी अवस्था करून ठेवली आहे गणप्याने! खरंच खूप कौतुक वाटतं, कमाल वाटते..!
या ब्लॉगवर वावरत असताना सतत कुठेतरी एक प्रसन्नता डोकावत असते. ती एकापेक्षा एक अजोड पाकशिल्प पाहताना त्या मागे असलेला दैवी परीसस्पर्श सतत जाणवतो..
आमचे अण्णा माडगुळकर म्हणतात-
या वस्त्राते विणतो कोण?
एकसारखी नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्‍याचे..!
त्याचप्रमाणे गणप्याच्या पाककृतींमागे असलेले साक्षात आई अन्नपूर्णेचे अदृष्य हात आपल्याला दिसत नाहीत इतकंच..!
-- तात्या अभ्यंकर.