August 26, 2015

सुखी आहे पोर सांग आईच्या कानात..

मोबाईल नव्हते, FB नव्हतं, whats app नव्हतं.. त्यामुळे..

"सुखी आहे पोर सांग आईच्या कानात.."

असा निरोप वाऱ्यातर्फे आपल्या आईला पाठवावा लागे.. छान निळ्या शाईने लिहिलेलं एखादं पोस्टकार्ड किंवा आंतरदेशीय पत्र किती सुरेख दिसायचं.. कधी एकदा ते वाचतो असं वाटायचं..

कसं वाटत असेल तेव्हाच्या सूनबाईला..? माझ्या आईचं पत्र आलंय, माझ्या बाबांचं पत्र आलंय! किती उत्सुकता, किती कौतुक असेल!

आता काय whats app आले, सेल्फी आले. मान्य आहे की जग जवळ आलं. पटकन संपर्काची सोय झाली. मला नव्याला दोष द्यायचा नाही..

पण वाऱ्यासोबत पाठवलेल्या त्या निरोपाचा किंवा त्या पोस्टकार्डाचा ओलावा मात्र गेला तो गेलाच!.

whats app वर पाठवलेल्या एका वाक्याच्या त्या निर्जीव मेसेजला भरगच्च लिहिलेल्या त्या आंतरदेशीय पत्राची सर नाही..

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय..

हा निरोप पोहोचवायला तो पिंगा घालणारा वाराच हवा..whatsapp चं ते काम नाही!

-- तात्या अभ्यंकर..

August 09, 2015

राधेमा सारख्यांची मानसिकता..

disclaimer - माझं हे लेखन सरसकट सर्वच्या सर्व स्त्रीजातीबद्दल मुळीच नाही हे कृपया लक्षात घ्या. परंतु मी जी काही मुंबई बघितली आहे, मग त्यात भुर्जीपावला महाग असलेला आमचा गरीब फोरास रोड आला, महागडे डान्सबार आणि त्यातल्या अत्यंत नखरेल मुली आल्या आणि जुहू-कुलाब्याचे पबही आले. या सर्वातून आणि अनुभवातून माझं जे मत बनलं आहे ते आपल्यासमोर मांडतो आहे..
--------------------------------------

आता जरा माझा एक सिरीयस ष्टडीच तुमच्यासमोर मांडतो..चक्क अभ्यासच म्हणा ना..!

एकंदरीतच दिल्ली-आग्रा-यूपी-आणि पंजाब येथील ब-याचशा मुली या जरा छानछोकी प्रिय असतात. स्वत:चंच कौतुक करून घेण्यात या पुढे असतात. त्याना डिझायनर कपडे, डिझायनर ज्वेलरी, शॉपिंग, अंगात थोडी फिल्लमबाजी इत्यादी-इत्यादीची जात्याच आवड असते. अवास्तव खर्च करणे, दिखावा करणे या गोष्टीही यात आल्या.

आता एकंदरीतच छानछोकी, डिझायनर कपडे, डिझायनर ज्वेलरी, शॉपिंग, अंगात थोडी फिल्लमबाजी या सगळ्याला अत्यंत पूरक असं वातावरण हे मुंबईत आहे. त्यामुळे यांना लहानपणापासूनच मुंबईबद्दल एक सुप्त परंतु जबर आकर्षण असतं.

या मुली रंगारुपानं ब-या असतात. कधी सुरेख असतात, कधी नाजूक असतात तर कधी चांगल्या उफाड्याच्या असतात. कुणी काही म्हणा..उत्तर हिंदुस्थानच्या मातीतच तो रंग आहे..

तर अशाच काही मुलींना कुणी एक भेटतो. हा कुणी एक जवळजवळ प्रत्येकच ठिकाणी असतो. हा त्या मुलीना मुंबईची स्वप्न दाखवतो. मी वर म्हट्ल्याप्रमाणे छानछोकी, डिझायनर कपडे, डिझायनर ज्वेलरी, शॉपिंग, अंगात थोडी फिल्लमबाजी या सगळ्याला तो इसम पुरेपूर हवा देतो. आणि believe me, त्या मुली आपली सगळी अक्कल अचानक गहाण ठेवून तो इसम म्हणेल ते, अगदी म्हणेल ते करायला तयार होतात. मायाजाली मुंबईचं आणि छानछोकीचं जबरदस्त आकर्षण त्यांची सगळी विचारशक्तीच गमावून बसतं..

आणि मग या मुली मुंबईला येतात किंवा आणल्या जातात. आणि मग इथूनच पुढे शेकडो वाटा फुटतात हे लक्षात घ्या. मग कुणी माधुरी दीक्षित होता होता एखादी extra होऊनच रहाते, कुणी कुठल्या पबमध्ये entertainer बनते, कुणी escort services वाल्यांच्या हाती लागते, कुणी डान्सबर मध्ये थिरकत लाखो कमावते, कुणी एखादी छोटी-मोठी नोकरी करून इतर वेळी चक्क call girl चा व्यवसाय करते..

अर्थात, अशाही अनेक जणी आहेत की ज्या मुंबईचं वास्तव लक्षात आल्यावर वेळीच सावरून सन्मार्गालाही लागतात, सन्माननीय मार्गाने स्वत:चं करीयर घडवतात..

ही सुखविंदर कौर ऊर्फ so called राधेमा ही ह्याच सर्वाची बळी आहे. पंजाबात लग्न केलं, दोन मुलं झाली, नवरा आखातात गेला.. परंतु मूळचं जरा बरं रंगरूप..आणि वर म्हटल्याप्रमाणे मुंबईचं सुप्त आकर्षण.. मला खात्री आहे..तू सुरेख दिसतेस, तू खूप मोठी स्टार होशील, तू देवी आहेस..वगैरे वगैरे कुठल्याही बहाण्याला ती सहज फसणारी होती आणि फसलीच..

पुढे मुंबईत आली. पण हिच्या बाबतीत तेवढी एकाच वेगळी गोष्ट झाली आणि ती म्हणजे पब, call girl, डान्स बार, escort वगैरे नेहमीच्या वाटेत न शिरता ही अध्यात्म नावाच्या बाजारात शिरली. देवी झाली. तुम्ही तिचा डिझायनर मेकप बघा, कपाळावरचा फिल्मी टिळा बघा, उंची ड्रेस, महागड्या चपला बघा..माझा वर मांडलेला मुद्दा तुम्हाला पटेल. end of the day, अध्यात्माच्या बाजारातही तिच्या मनातली छानछोकी पूर्ण झालीच की..!

पुढे तिच्या चौक्या, तिचे दरबार, तिचे महागडे भक्त..या सगळ्या गोष्टी अनिवार्यच होत्या त्यामुळे त्या इतिहासात मी जात नाही. ते आता सर्वांनाच माहीत आहे..

मी फक्त कुठेतरी या सगळ्यामागचं मूळ आणि या सगळ्यामागची मानसिकता शोधण्याचा प्रयत्न केला आहे इतकंच..

एरवी..माझ्या आध्यात्माच्या व्याख्या फार वेगळ्या आहेत. एका वेश्येत सुद्धा विठोबा पाहून तिला नमस्कार करणारे तुकोबा हीच माझी आध्यात्माची साधीसोपी व्याख्या आहे. असो!

-- (मुंबईचा) तात्या अभ्यंकर..

August 08, 2015

साखर-खोबर्याचा गोडवा...

तयासि तुळणा कैसी, मेरु मांदार धाकुटे..

वा! काय सुंदर शब्द आहेत!

खूप वर्षांपूर्वी..म्हणजे साधारण १९७६-७७ च्या सुमारास मी अगदी तिसरी-चौथीत असताना मला आठवतंय..आमच्या सोसायाटीमध्ये एक मेहेंदळे नावाचं कुटुंब रहायचं. त्यातले भाऊ मेहेंदळे तीन सांजा झाल्या की दर शनिवारी आम्हा सगळ्या बाळगोपाळाना इमारतीच्या गच्चीत जमवायचे. आणि मग ती हनुमंताची पर्वत उचलणारी लहानशी तसबीर ठेऊन, छान उदबत्ती वगैरे लावून आम्ही सगळे भीमरूपी महारुद्रा म्हणायचे. त्यानंतर नारळ फोडून त्याचे लहान तुकडे करून आणि त्यात साखर घालून आम्ही सगळे लहान लहान हनुमान तो सुंदर प्रसाद खायचो. पुढे काळाच्या ओघात ती आरतीही केव्हातरी बंद झाली..

तेव्हा संध्याकाळचा पर्वचा, पाढे, रामरक्षा, भीमरूपी महारुद्रा या गोष्टी घराघरात चालायच्या. अर्थात, त्यातल्या १९, २९ वगैरे पाढ्याना मी आजही घाबरतो तो भाग वेगळा! :)

पण तेव्हा तीन सांजेला देवाला नमस्कार करून घरातल्या सगळ्या वडिललधा-यांना नमस्कार करायची पद्धत होती. मी आजही संध्याकाळी दिवाबत्ती करून म्हातारीच्या पाया पडतो!

आता whatsapp आले, video games आले, स्कायपी आल्या, सेल्फी आले.. चालायचंच. माझी कुठलीच तक्रार नाही..

पण भाऊ मेहेंदळे यांच्यासारख्या बुजुर्गांनी किंवा आपल्या आई-वडिलांनी आपल्याला संध्याकाळचा पर्वचा, पाढे, रामरक्षा, भीमरूपी महारुद्रा हा अनमोल ठेवा दिला आहे. तो आपण टिकवला पाहिजे!

काळाच्या ओघात भाऊ मेहेंदळेही गेले. पण त्या साखर-खोबर्याचा गोडवा आजही कायम आहे. कारण तो अक्षय आहे!

असो..

-- तात्या अभ्यंकर.

August 06, 2015

भिडे आजोबा.. :)

मगाशी साक्षात एक शिल्पं बघितलं. रस्त्याने एक अत्यंत आकर्षक तरुणी चालली होती. पांढरा शुभ्र पंजाबी बिनबाह्यांचा ड्रेस, चालण्यात एक रुबाब. हातात पर्स, छत्री वगैरे. मी तर साला ते अफाट सौंदर्य बघून क्षणभर स्तब्धच झालो.

तेवढ्यात तिचा चपलेचा काहीतरी problem झाला की चप्पल सटकली असं काहीसं झालं असावं, म्हणून ती क्षणभर थबकली आणि पुन्हा मार्गस्थ झाली.

क्षणभर एक वादळच येऊन गेलं की काय असं वाटलं. पण नंतर माझ्या लक्षात आलं की मी जेव्हा क्षण्भर थबकलो होतो तेव्हा माझ्यापुढे १०-१२ फुटावर चालत असणारा एक म्हाताराही तिच्याकडे पाहत जागीच थबकला होता. मुलगी तर केव्हाच आम्हाला पास झाली होती. तिच्या वाटेने निघून गेली होती. पण त्या म्हाता-याबद्दल मला उत्सुकता होती म्हणून मी थोडा पुढे गेलो आणि त्याला गाठला.

बघतो तर पुष्पांजली सोसायटीतले आमचे भिडे आजोबा. एकदम मस्त friendly म्हातारा आहे! :)

"काय आजोबा.. कसं काय..? कोण होती हो ती मुलगी..? छान होती ना..?"

मी डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला तशी म्हाताराही खुलला..! :)

"हो रे.. खरंच छान होती रे. बहुतेक ऑफिसला चालली असावी.."

"मग..? बाकी काय कसं आजोबा, कुठपर्यंत फेरी..?"

"अरे नेहमीची फेरी. अंघोळ वगैरे आटपून जरा देवदर्शन. मग यायचं जरा एक चक्कर मारून. एरवी मी दुस-या वाटेने जातो पण आज जरा पोष्टात काम होतं म्हणून इकडून आलो.."

"आता उद्यापासून ह्याच वाटेने सकाळचा फेरफटका पूर्ण करत जाईन. वेळ बघून ठेवली आहे.."

"कुठली वेळ..?"  मला एक क्षण कळेचना.

"अरे तिच्या ऑफिसला जायची रे.. कुठल्या ऑफिसला वगैरे जात असेल तर हीच वेळ असेल ना.? ख्या ख्या ख्या..!" :)

"अरे बाबा..ही वेळा बघून ठेवायची सवय खूप जुनी आहे. आता या वयात कशी सुटेल..?"

म्हातारा आपली कवळी दाखवत मनमुराद हसला.. :)

"भिडे आजोबा..गुरु आहात..!"

"हा हा हा.. दे टाळी.. चल जरा चहा घेऊ.."

चहा घेताना आजोबा मिश्कीलपणे पुटपुटले..

"संध्याकाळी ऑफीस किती वाजता सुटतं कुणास ठाऊक.."

-- (भिडे आजोबांचा नातू) तात्या.. :)