January 25, 2015

ये रे ओबामा..

ये रे ओबामा..

लेका आमच्या भारतात तुझं स्वागत...!

एका अनोख्या, जगावेगळ्या आणि जगातल्या सर्वात सुंदर भूमीवर उतरला आहेस तू..!

आमचे वेदपुराण, आमचं तत्त्वज्ञान, आमची संस्कृती, आमचं काव्य, आमचं साहित्य, सा-या जगात एकमेवाद्वितीय ठरलेलं आमचं रागसंगीत, आमच्या प्रत्येक राज्यातले वेगळे पेहेराव, विविध खाद्यपदार्थ, आमच्या विविध चालीरीती, आमचे अनोखे, आनंददायी सण-उत्सव..आमचे सामोसे, आमची रबडी, आमचे पराठे, आमची बिर्याणी, आमची पुरणपोळी, आमचा मऊभात-तूप-मेतकूट..!

किती किती लिहू..माझ्या या मातृभूमीबद्दल..?

एकता में अनेकता..आणि अनेकता में एकता..तुला फक्त आणि फक्त इथेच, या माझ्या भारतभूमीतच बघायला मिळेल..!

ये रे ओबामा..लेका आमच्या भारतात तुझं स्वागत...!

भाग्यावान आहेस लेका..म्हणून आमच्या पवित्र भूमीत तुला पाय ठेवायला मिळाला..!

तुझा,
-- (अभिमानी भारतीय) तात्या..

in built यूट्यूब किंवा mp३ player..!

माझ्या मते एखाद्याचा मृत्यू आपल्या मनाला जिंकू शकत नाही..

ठीक आहे..काळाच्या ओघात काही पानं..काही व्यक्ती विस्मृतीत जाऊ शकतात. थोडी धूळ जमू शकते.. परंतु एखादी आठवण, एखादी घटना, एखादा वास, एखादं गाणं. क्षणात ती धूळ पुसून टाकतं आणि ती अगदी २५-३० वर्षांपूर्वी गेलेली व्यक्ती जशीच्या तशी आपल्यासमोर उभी राहते..

मग तो प्रसंग, त्या व्यक्तीची ती आठवण जशीच्या तशी आपल्याला दिसते..ऐकू येते..आणि त्याकरता यूट्यूब किंवा mp३ player असं कुठलंही बाह्य साधन लागत नाही..

निसर्गानं ते यूट्यूब किंवा mp३ player आपल्या मनाला in-built दिलेलं असतं..!

अर्थात.. इथे मला मृत्यूला कुठेही degrade करायचं नाही.. त्याच्यासारखा दुसरा सखा नाही हेही तितकंच खरं..

असो.. मृत्यू या संकल्पनेविषयी पुन्हा केव्हातरी..

तूर्तास तुम्ही या रम्य सकाळी एखाद्या कसदार गायकाचा सात्विक अहिरभैरव ऐका.. तो तुम्हाला बरंच काही शिकवून जाईल..तुमच्याशी संवाद साधेल..आपल्या रागसंगीतात ती ताकद आहे..

वाटल्यास.. मन्नदांचं अहिरभैरावातलं 'पुछो ना कैसे..' हे गाणं ऐका..

बघा.. हे वाचल्यावर तुमच्या मनात लगेच हे गाणं सुरू झालं ना..? मन्नादांचा गोड आवाज कानात रुंजी घालायला लागला ना..?

म्हणूनच मगाशी म्हटलं होतं की निसर्गानं ते यूट्यूब किंवा mp३ player आपल्या मनाला in-built दिलेलं असतं..! :)

मन्नादांचा मृत्यू आजही आपल्याला जिकू शकलेला नाही.. आणि कधी शकणारही नाही..!

-- (महान तत्त्ववेत्ता) तात्या अभ्यंकर...

January 22, 2015

गरम वडापाव..

अधूनमधून फोरासरोडला चक्कर मारलेली बरी असते.. काल मलाही तोच अनुभव पुन्हा आला आणि माझ्यासकट आपल्या तमाम फेबू कम्युनिटीचं हसू आलं.. :)

आपण सगळे किती चिंताग्रस्त असतो..आणि त्या निमित्ताने एकमेकांच्या किती उखाळ्या-पाखाळ्या काढत असतो..एकमेकांचा द्वेष करत असतो..हमरीतुमरीवर येऊन आपापले मुद्दे मांडत असतो.. !

किरण बेदी भाजपात गेली म्हणून कुणाला आनंद तर कुणाला दु:ख, मोदी हा माणूस या देशाचं भलं करणार..कुणाला याची खात्री तर कुणाला शंका.. दिल्लीत किरण सी एम बनणार की अरविंदा..म्हणून आपण चितेत..२६ जानेवारीला ओबामा येणारे म्हणून आपण आनंदीत..! :)

पण कालच्या त्या फोरासरोडच्या दुनियेत या सगळ्यापासुन मी खूप दूर गेलो..तिथे किरण बेदी काय, शाजीया इल्मी काय.. फडणवीस काय आणि मोदी काय.. कुणाला त्यांच्याबद्दल काहीही पडलेली दिसली नाही..एवढी चर्चा करायला तिथे कुणाला वेळच नव्हता.. माझा आजचा वडापाव महत्वाचा. माझा आजचा भुर्जीपाव महत्वाचा.. वह सेठ बडा दयावान है.. उसने मेरेकू पचास रुपिया टीप दिया..!

बास.. That's All..!

काल त्या नाजनीनकडे आम्ही सगळे होतो.. मी, नाजनीन, फरीदा, ढक्कन, मन्सूर.. पण ओबामा भारतात येतोय...ही गोष्ट कदाचित मला एकट्यालाच माहीत असावी..! :)

अरविंदा, शाजीया, मोदी, बेदी, फडणवीस, ओबामा, साक्षी महाराजम भाजपा, सेना, आप, पंजा..हे सगळे तुम्हाआम्हा लोकांचे भरल्या पोटी चघळायचे विषय..

फोरासरोडच्या दुनियेत १० रुपायाचा गरम वडापाव या सगळ्याहून अधिक महत्वाचा..!

-- तात्या अभ्यंकर.. 

साखरफुटाणे...

आज बरेच दिवसांनी आमच्या फोरासरोडला गेलो होतो.. नाजनीनचा आयुर्विम्याचा सहामाही हप्ता घेण्याकरता.. नाजनीनची जवानी आजही आहे..त्यामुळे आजही तिचा धंदा बरा आहे..

मी गेलो तेव्हा ती बसली होती एकासोबत..मला थांबावं लागलं..त्यांचा कार्यक्रम झाल्यावर नाजनीनने माझं हसत स्वागत केलं..

"आओ तात्यासेठ.. आप का हप्ता निकाल के रखेली है.."

नाजनीनकडेच मन्सूर भेटला.. जो मला एकेकाळी सर्वात प्रथम रौशनीकडे घेऊन गेला होता..जरा वेळाने तिथे डबल ढक्कन आला...

डब्बल ढक्कन.. एकेकाळी चरसी होता..रस्त्यात पडलेला असायचा.. मी त्याला तेव्हा Bombay Mercantile बँकेचा डेली कलेक्शन एजंट बनवला होता.. आता तो पोस्टाचंही काम करतो..मला आनद वाटला..

"अबे ढक्कन..इथर आ भोसडीके..जा एक IB हाफ लेके आ..सोडा और चन्ना भी.."

नाजनीनचा ठेवणीतला आवाज.. सोबत शिव्या..

मला खरं तर ते आवडलं नाही.. फोरासरोडच्या एका वेश्येकडे तिच्या खर्चाने मी कशाला दारू पिऊ..?
पण नाजनीनचा आग्रहच असा होता की तो मोडवेना..

मग मी आणि नाजनीनने दोघांनी मिळून ती हाफ मारली.. जुन्या गप्पा झाल्या. नाजनीनची कुणी एक भाचीही तिथे होती.. नुकतीच आली होती यु पी मधून.. किंवा आणली गेली होती..नव्यानेच धंदा शिकली होती..!

"तात्यासेठ.. ये फरीदा.. बोले तो एकदम गरम पावभाजी है.. बैठोगे क्या..?"

म्हातारीचे संस्कार.. मी ती २१ वर्षाची गरम पावभाजी कशी खाणार होतो..?

आणि गरम पावभाजी..? नाजनीन कुठून आणते हे असले शब्द..? साली आमच्या मुंबईची भाषाच अजब आहे..त्याकरता इथल्या अजब मातीशीच सलगी हवी.. त्याकरता पोटात आग हवी.. ती भडकल्याशिवाय एक स्त्री. दुस-या एका तरूण मुलीला "गरम पावभाजी" कसं म्हणेल..?

असो..

आमचं तिच्यायला mental constipation च जास्त..! सभ्य, सुशिक्षित पांढरपेशा सामाजातला होतो ना मी..!

खरंच..मुंबईचा तो बाजार म्हणजे वासनेचा तो एक अक्षय धंदा आहे..रोज तिथे नव्या नव्या मुली येत असतात.. आणल्या जात असतात.. नवे नवे कस्टमर येत असतात.. पैशाच्या बदल्यात शरीर..आणि पर्यायाने पोटाची आग..!

एक डाळभात किंवा भुर्जीपाव किंवा साधा एक वडापाव..याची खरी किंमत तिथेच कळते..!

खूप मोठी दुनिया आहे ती..! तिला काळगोरं, चांगलं वाईट ठरवणारा मी कोण..?

हाफ सोबत ढक्कनने माझ्याकरता बच्चूच्या वाडीतले कबाब आणले होते..नाजनीनने बाजूच्या गाडीवरचा तवा पुलाव मागवला..मन्सूरने १२० पान आणून दिलं..

कुठली ही अजब आपुलकी आणि माया..?

बस पकडून भायखळ्याला आलो.. तिथे अचानक काही भगवी निशाण घेतलेली मंडळी भेटली.. ते शिर्डीला चालत जाणारे लोक असतात ना.. ती मंडळी होती..त्यातील एकाने अचानक माझ्या हातावर प्रसादाचे साखरफुटाणे ठेवले..!

२०-२१ वर्षाच्या त्या गरम पावाभाजीकडे बघून ती न खाता माझं मन क्षणभर हळवं झालं..म्हणून तर लगेच बाबांनी मला प्रसादरुपी साखरफुटाणे दिले नसतील ना..?..!

-- तात्या अभ्यंकर..

January 18, 2015

स्वर आले दुरुनी..

हल्लीचा तो खूप काहीतरी चमत्कारिक अभ्यास.. वयाला न शोभणारा..!

पालकांचे इंटरव्ह्यू, महागड्या फिया.. पेरेंट्स डे वगैरे वगैरे.. छ्या..! सगळा बकवास..हे सगळं बघितलं की मी बापडा लगेच इतिहासात रमतो..!

प्रधान बिल्डींग, ठाणे स्थानकाजवळ..खंडेलवाल मिठाईवाल्याच्या समोर.. साल १९७५ की १९७६...

P E Society ची प्राथमिक शाळा..इयत्ता पहिलीत शिकणारा एक कुणी शेखर अभ्यंकर..

साधीसुधी शाळा.. वर्गात खाली बसायला चक्क जाजमं घातलेली..

गोडसे बाई, जोशी बाई..

आम्हा लहानग्यांची शी शू काढणा-या ताराबाई..कमलताई..

लाकडी जिने.. प्रशस्त वर्ग..

फळा..खडू.. आणि शाईचं पेन..वर्गातली धमाल मजा मस्ती..

शनिवारी शाळा लवकर सुटायची..माझा मामा मला न्यायला यायचा..मग समोरच्या खंडेलवाल मिठाईवाल्याकडे कधी सामोसा, तर कधी खमणी..

कधी गोखाल्याकडे मिसळ आणि पियुष..:)

आज वाटतं की एखादं गणित चुकांवं आणि गोडसेबाईनी माझा कान पकडावा..पण त्यांच्या कान पकडण्यातही त्यांचं प्रेमच दिसावं..!

काहीशा करारी चेहे-याच्या ताराबाई..गोड,स्वोज्वळ चेहे-याच्या ताराबाई..

वर्गातला तो एक सामुहिक वास..! मुलांचा, त्यांच्या दफ्तरांचा, वह्या-पुस्तकांचा, डब्यातल्या मटकीची उसळ आणि पोळीचा.. तूपगूळ पोळीच्या गुंडाळीचा..!

तेव्हा केलोग्ज वगैरे नव्हते..तूपगूळ पोळीची गुंडाळी.. लसूणचटणी पोळीची गुंडाळी..तेव्हा त्याला franky की कुठलासा फालतू शब्द वापरत नसत.. गुंडाळीचं म्हणत असतं..!

अवचित कधी बाबूजींचं 'स्वर आले दुरुनी..' हे गाणं कानी पडतं आणि मी हळवा होतो..

मग आजही गोडसेबाईंची आठवण होते..बाई आता कुठे असतील हो..? वयस्कर असतील खूप.. असंच जाऊन कडकडून त्यांना भेटावं वाटतं..

"बाई..मी शेखर.. आजपासून ३८-३९ वर्षांपूर्वी तुमचा विद्यार्थी होतो..असं म्हणावसं वाटतं..!

काळाच्या ओघात सगळं हरवलं..

पण मनात कुठेतरी ताराबाईच्या चेहे-यावरचा सोज्वळपणा आणि तूपगूळ पोळीच्या गुंडाळीतला गोडवा मात्र आजही जपून ठेवला आहे..!

-- तात्या अभ्यंकर...

January 11, 2015

बुवा..बाई आणि बोवा..

पंडित किंवा पंडितजी.. वगैरे पदव्या आमच्या भीमाण्णाना खरं तर आवडत नसत..अगदी मनापासून आवडत नसत..

मुंबईच्या नेहरू सेंटरच्या हायफाय वातावरणात एकदा अण्णांचं गाणं होतं.. आता नेहरू सेंटर म्हणजे काही गिरगाव ब्राह्मण सभा नव्हे, की कोल्हापुराचा देवल क्लब नव्हे की एखादी जुनी गायन सभा नव्हे.. नेहरू सेंटर काय किंवा NCPA काय.. तिथे दिखाऊपणाच जास्त.. गाणं समजण्यापेक्षाही "आम्ही क्लासिकलची concert attend केली.." असं म्हणण्यात धन्यता मानणारे लोकच अधिक..:)

नेहरू सेंटरला सगळंच हायफाय वातावरण.. पंडितजी पंडितजी म्हणून अण्णाना फुकट परेशान करणारं पब्लिकच जास्त.. आणि आमचे अण्णा अगदी म्हणजे अगदीच साधे हो.. सादगीभरे..!

चामारी, भक्कम चुना-तंबाखूवालं पान जमवलं..आणि एकदा का तंबोरे लागले की गाणं सुरू.. कुठे माईकच चेक कर..त्याचा बासच कमी-अधिक करायला सांग.. उगाच उजवा हात छातीवर ठेऊन लोकांकडे पाहून नाटकी हास.. अशी नाटकं अण्णांना जमत नसत..:)

मी नेहरू सेंटरला पोहोचलो..ग्रीनरूममध्ये गेलो.. स्वारी पान जमवत बसली होती..तबले-तंबोरे जुळत होते..

मी पायावर डोकं ठेवलं..

"या..अभ्यंकर..काय म्हणतंय ठाण..?" -- अण्णांनी त्यांच्या खास खर्जाच्या आवाजात नेहमीची चौकशी केली..

"ठाण ठीक आहे.. तुम्ही कसे आहात बुवा..?"

आणि इथे मात्र कधी फारसं न बोलणा-या अण्णांना एकदम बोलावसं वाटलं.. ते कुठेतरी नेहरु सेंटरच्या त्या दिखाऊ हायफाय वातावरणाला आणि पंडितजी पंडितजी ला कंटाळले असावेत.. ते एकदम म्हणाले,

"व्वा..! बुवा हाच खरा शब्द..! पंडितला काही अर्थ नाही.. हल्ली बाजारात गल्लोगल्ली पंडित झालेत.. आमच्या वेळेला बुवा, बोवा आणि बाई हे तीनच शब्द होते.. गाणारा तो बुवा..वझेबुवा, भास्करबुवा.. आणि गाणारी ती बाई.. मोगुबाई, हिराबाई.. आणि कीर्तन करणारे ते बोवा..!"

असं म्हणून छान समाधान पसरलं त्यांच्या चर्येवर.. पंडितजी पंडितजीच्या त्या हायफाय वातावरणात माझं बुवा म्हणण त्यांना कुठेतरी सुखावून गेलं होतं..!

कानडाउ भीमसेनु करनाटकु
तेणे मज लावियला वेधू..

असं एकदा कविवर्य वसंत बापट म्हणाले होते..!

असो.. अनेक आठवणी आहेत आणि आता त्याच फक्त उरल्या आहेत..!

-- (कानडाउ भीमसेनुचा भक्त) तात्या..

January 02, 2015

माझा वाढदिवसं...

आज म्हणे माझा वाढदिवस आहे..

एका वर्षाने वाढलो, अजून थोडा गधडा झालो... दुनियाही बदलली.. संगणक, मोबाईल, Tab, whatsapp सगळं काही आलं..

Moll आले, Multiplex आले.. सारं काही आलं.. बोलबोलता मुंबई पुणे express way ही झाला.. लहानपणी दिसणा-या केवळ फियाट आणि आम्बासेडर, या व्यतिरिक्त इतरही अनेक छान छान गाड्या दिसू लागल्या..

पण मी मात्र अजून मुंबई ब वर सकाळी ६ वाहता लागणा-या अण्णांच्या अभंगातच अडकलो आहे.. मी मात्र अजून बाबूजींच्या स्वर आले दुरुनी मध्येच अडकलो आहे..मी मात्र अजून भाईकाकान्च्या म्हैस आणि अंतू बर्व्यातच अडकलो आहे..

मी अजून शाळेतल्या त्या फौंटन पेन मध्येच अडकलो आहे..

माझे कान मात्र अजून सकाळी सात वाजता "सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत.." हे खणखणीत शब्द ऐकण्याकरताच आसुसले आहेत...

मला मात्र अजून सकाळी ११ वाजताचं कामगार विश्व ऐकता ऐकता जेवायचं आहे आणि शाळेचं दफ्तर भरायचं आहे..

मला प्रसन्न जोशी, निखिल वागळे कुणी कुणी नकोत.. मला आजही ते दाढीवाले अनंत भावे आणि प्रदीप भिडेच माझे वाटतात..

मी आजही आसुसलो आहे सुहासिनी मुळगावकरने सादर केलेल्या गजरा ह्या कार्यक्रमाकरता..

मी मात्र आजही अडकलो आहे संध्याकाळी मुंबई ब वर फक्त १५ मिनिटं लागणा-या घाल घाल पिंगा वा-या किंवा तीनही सांजा सखे मिळाल्या या गाण्यात..

नारळ वीस रुपये झाला म्हणे..! मला मात्र आजही नाक्यावारच्या वाण्याकडून २ रुपायाची नारळाची वाटी आणायची आहे..!

मला २४ तास टीव्ही नको आहे..वाहिन्या तर कोणत्याच नको आहेत.. मला फक्त मुंबई दूरदर्शन केंद्रावरचं गुरुवारी लागणारं छायागीत हवं आहे..

मला नको आहेत कोणतेही संगणक आणि व्हिडियो खेळ.. मला फक्त हवे आहेत ऐकलंम खाजा धोबी राजा वाले ढप आणि गोट्याचे खेळ..

मला कोणतेही Realty show नको आहेत.. मला हवी आहे फक्त संध्याकाळची रामरक्षा आणि पर्वाचा आणि पाढे..!

मला बाकावर उभं राहायचं आहे,,मला वर्गाबाहेर आंगठे धरून उभं राहायचं आहे..

म्हणे आज माझा वाढदिवस आहे..! मग गिफ्ट म्हणून काय हवं आहे मला..?

मला संध्याकाळी ७ वाजताच घरोघरी लागणा-या कुकरच्या शिट्या ऐकायच्या आहेत.. त्यात शिजणा-या सात्विक वरणभाताचा घास मला हवा आहे.. आणि हो.. पोळीसोबत थोडी शिक्रणही हवी आहे मला.. आईनं केलेली..!

-- तात्या अभ्यंकर..