January 06, 2012

इस दर्द को लेकर जिता है, इस दर्द को लेकर मरता है.. (भाग - २)

हिंदुस्थानी घराणेदार रागसंगीत, नारायणराव बालगंधर्व, अब्दुल करीमखासाहेब, भीमसेनअण्णा, बापुराव पलुस्कर, भाईकाका, बाबूजी, दीदी, पंचमदा, किशोरदा, मधुबाला, वहिदाआपा.. इ इ अनेक, हे सारे आमचे जबरदस्त दुखरे बिंदू. त्यांचा अभ्यास आणि त्यांच्यावरची भक्ति ही कधीही न संपणारी आहे!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
या पूर्वी -
इस दर्द को लेकर जिता है, इस दर्द को लेकर मरता है.. (भाग - १)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

वसंता पोतदार तसा वेडझवाच होता, परंतु दोस्त होता आपला. भीमण्णा हा आमच्या दोस्तीतला दुवा. एकेदिवशी केव्हातरी वसंताचा फोन आला,

"तात्या, मधुबालेवर प्रेम करतोस ना..?"

"हो..काही कोटींपैकी मीही एक.." मी उत्तरलो.

"एक पत्ता लिहून घे..."

संशोधन करणं हे वसंताचं व्यसन होतं. त्यामुळे वसंता जे काही सांगेल ते ऑथेन्टिकच असेल म्हणून मी पत्ता लिहू लागलो. वसंताने 'दाईमा' नावाच्या कुणा स्त्रिचा पत्ता मला दिला. ही दाईमा मधुबालेच्या शेवटच्या काळातील तिची नोकर होती. तिचा पत्ता म्हणजे डोंगरी अग्निशमन दलाजवळची कुठलीशी एक चाळ होती. वसंताने दिलेल्या पत्त्यावर मी पोहोचलो. मधुबालेची आवडती गुलाबाची काही फुलं आणि तिला अत्यंत प्रिय असलेला कलाकंद सोबत घेतला होता. चाळ शोधून काढली. दारावर टकटक केली. साधारण ८० च्या आसपास असलेल्या एका वृद्ध स्त्रिने दरवाजा उघडला. तीच दाईमा होती.

"नमस्ते. मंझली आपा के बारे मे कुछ जानना है.." (मधुबालेला बरेचजण 'मंझली आपा' या नावाने ओळखत.)

दाईमाच्या चेहेर्‍यावर स्मितहास्य उमटलं ( मधुबालेच्या संगतीत राहिल्यामुळे तेही गोडच होतं! :) ) आणि तिनं मला घरात घेतलं. पाणी विचारलं. मी गुलाबाची फुलं आणि कलाकंद तिला दिला. दाईमाचं अस्पष्ट बोलणं आणि तिचं हिंदी, हे मला प्रयत्नपूर्वक समजून घ्यायला लागत होतं. प्रास्ताविक झालं आणि कुठलेच आढेवेढे न घेता म्हातारी भूतकाळात हरवली. वय बरंच असल्यामुळे तिच्या बोलण्यात सुसंगतेचा थोडा अभावच होता. ती माझ्याशी हिंदीतच बोलत होती, पण इथे मी ते मराठीत लिहिणार आहे..

"ती खूप म्हणजे खूपच खोडकर होती.."  दाईमा आता सांगू लागली..

काही वेळेला आपल्या मधाळ सौंदर्याचा उपयोग ती काही लोकांची गंमत करण्यासाठी करत असावी. पटकन कुणाच्याही प्रेमात पडावं इतकी काही ती नासमझ नव्हती. तिनं मनापासून प्रेम केलं ते फक्त युसुफमियावर.. किशोरबाबावर पण तिचा जीव होता, नाही असं नाही! पण एकंदरीत अवखळ वृत्ती, खळाळून हसणं हा तिचा स्थायीभाव होता. पटकन हास्याच्या कारंज्यात शिरायला तिला काही विशेष कारण लागत असे असं नाही.. पुष्कळदा शक्ति सामंता, देवसाब सारखे लोक तिचं हसू थांबायची वाट पाहात असत. "झालं का गं बये तुझं पोटभर हसून? म्हणजे आम्हालाही काही तुझ्याशी बोलता येईल." असं ते म्हणायचे.. :)

आपल्या आवडत्या व्यक्तिला गुलाबाचं फूल द्यायची तिची एक सवय होती.

"पण त्या फुलासोबत 'तू मला खूप आवडतोस. माझ्याशी लग्न करणार असलास तर हे फूल स्विकार कर.. - अशी एक चिठ्ठीही द्यायची ना..?"  -- मी दाईमाला विचारलं.

त्यावर दाईमा स्वत:च खळखळून हसली.

"हम्म.. पण तशी चिठ्ठी प्रत्येक वेळेलाच द्यायची असं नाही. एक बार ऐसा मजाक उसने प्रेमनाथ के साथ किया था..! बेचारा प्रेमनाथ. बुद्दू कहिका..!" :) -- इति दाईमा.

"बेटा, चाय पियोगे..? रुको, 'मंझली आपा' को प्यारी तुलसीपत्तेवाली चाय बनाके लाती हू.."

दाईमा आता स्वत:च मुडात येऊ लागली होती..

पहिल्या दिवसापासूनच प्रेमनाथने मधुबालेवरती गोंडा घोळायला सुरवात केली होती. म्हणून मग गंमत म्हणून मधुबालेनं गुलाबाचं फूल आणि चिठ्ठी त्याला दिली.. प्रेमानाथ बिचारा उभ्याउभ्याच जमिनीवर कोसळून पडायचा बाकी होता.. सार्‍या दुनियेतली सर्वात सुंदर स्त्री आपल्याला फूल देते आहे..! ओहोहो..! :)

पुढे मग काही दिवस प्रेमानाथचं आणि मधुबालेचं प्रेमप्रकरण हा चित्रसृष्टीतला एक चर्चेचा विषय ठरला. पण तुला अंदरकी बात सांगते - प्रेमनाथच्या गोंडा घोळण्याच्या स्वभावामुळे मधुबालेनेच त्याची मस्करी केली होती. तिला भोगू पाहणारे खूप म्हणजे खूप होते रे तेव्हा आजूबाजूला. पण मंझलीआपा त्या सर्वांची वस्ताद होती. त्या सगळ्यांची ती मस्तपैकी फिरकी घ्यायची. मनमुराद हसत आणि एन्जॉय करत! :)

काही दिवसांनी काय झालं कोण जाणे, प्रेमनाथ दुरावला तिला.. एकदा केव्हातरी प्रेमनाथने म्हणे त्या गुलाबाची अन् चिठ्ठीची हकिकत मोठ्या विश्वासाने अशोककुमारला सांगितली. त्यावर अशोलकुमार त्याला चमकून म्हणला,

"काय सांगतोस..? अरे पण अशी चिठ्ठी आणि गुलाबाचं फूल तिनं मलाही दिलं आहे..!"

एवढं सांगून दाईमा तोंडातलं बोळकं दाखवत मोकळी हसली आणि तिनं माझ्याकडे पाहून आपला म्हातारा मिचमिचा डोळा मारला.. ;)

"पण खर सांगू का तुला, खर्‍या प्रेमाकरता ती नेहमी भुकेली राहिली आणि भुकेलीच मेली रे.."



घटकेपूर्वी हसून मला डोळा मारणार्‍या दाईमाच्या डोळ्यात कधी पाणी उभं राहिलं हे तिचं तिलाही कळलं नाही..!

(क्रमश: ..)

-- तात्या अभ्यंकर.

January 05, 2012

इस दर्द को लेकर जिता है, इस दर्द को लेकर मरता है.. (भाग - १)

लेखाधार - अनेकांकडून तिच्याबद्दल लिहिले गेलेले आठवणीवजा लेख.

अलिकडेच केव्हातरी ठाण्याजवळच्या घोडबंदर रस्त्यावरून चाललो होतो. आता या घोडबंदर परिसराचा संपूर्ण कायापालट झाला आहे. लांबलचक रुंद रस्ता आणि आजुबाजूला मोठमोठे घरप्रकल्प आणि सर्वत्र सिमेन्टचं जंगल. परंतु एकेकाळी मात्र इथे अगदी भरपूर वनश्री होती, झाडंझुडपं होती. सर्व परिसरच अत्यंत रमणीय होता.

गुरुदत्तच्या मिस्टर अँड मिसेस ५५ चित्रपटाचं काम सुरू होतं आणि गुरुदत्तने चित्रपटाचा काही भाग चित्रित करण्यासाठी याच रमणीय परिसराची निवड केली होती. चित्रपटाचे संवादलेखक अब्रार अल्वीही सोबत होते. वास्तविक चित्रिकरणाच्यावेळी त्यांचं काहीच काम नव्हतं परंतु केवळ गुरुदत्तच्या आग्रहाखातर ते ऐन उन्हाळा असूनही सोबत आले होते. चित्रिकरणस्थळी पोहोचल्यावर त्यांनी एक छानसी हवेशीर सावली पाहून एका झाडाखाली निवांत बैठक मारली. एकिकडे चित्रिकरणाची लगबग सुरू होती तेवढ्यात 'ती' अल्वींच्या शेजारी आली आणि 'अरे वा! यहा बैठे हो आरामसे, आपके तो मजे है..' असं म्हणत तिनेही त्यांच्या शेजारीच मस्त बैठक मारली. मनमोकळं, निरागस, अल्लड, जीव खलास करणारं हास्य, मोहक अदा....! मूर्तीमंत सौंदर्यच अल्वींच्या शेजारी काही क्षण विसावलं होतं!



काही दिवसांपूर्वी अल्वींची ही आठवण वाचनात आली होती.

मालाडला बाँबे टॉकिजच्या लगतची झोपडपट्टी. तिथे अताउल्लाखान नावाचा एक पठाण राहायला आला होता. सोबत त्याच्या बायकोचा व ८-९ पोरांचा कुटुंबकबिला. त्यापैकीच एक बेबी मुमताज. बेबी मुमताज दिसायला सुरेख, वागण्याबोलण्यात चांगलीच चंट आणि हुशार. गायचीही आवड. बेकार असलेल्या अताउल्लाखानने लेकीचं नशीब आजमावण्याकरता आणि त्यायोगे उत्पन्नाची काही सोय होते का ते पाहायला बेबी मुमताजला शेजारीच असलेल्या बाँबे टॉकिजात नेलं. तिथं त्यांची गाठ पडली बाँबे टॉकिजचे अध्वर्यू हिमांशू राय आणि देविकाराणी यांच्याशी. त्यांनी पाहताचक्षणी बेबी मुमताजला पसंद केलं आणि लगोलग तिचं 'बसंत' ह्या चित्रपटातून भारतीय रजतपटावर पहिलावहिलं आगमन झालं. ८-१० वर्षाच्या एका मोहक चिमुरडीनं रंगमंचावरून 'मेरे छोटेसे मन मै छोटीसी दुनिया रे...' हे गाणं गायलं आणि गाण्यानंतर 'आप लोग कल आईये तो और सुनाउंगी गाना..' असं म्हणत चटकन एक छानशी अर्धगिरकी घेऊन मागे वळली. ती तिची पहिली मोहक अदा..!

ते वर्ष होतं १९४२. तेव्हापासून प्रवास सुरू झाला एका निस्सीम मनमोहक सौंदर्याचा. प्रवास सुरू झाला एका जीवघेण्या मोहक हास्याचा, प्रवास सुरू झाला मधाळतेचा अन् मादकतेचा.. 'प्रेम' या संकल्पनेवरच जिनं जिवापाड प्रेम केलं अशा एका शापित यक्षिणीचा प्रवास सुरू झाला. देविकाराणीने त्या बेबी मुमताज, अर्थात मुताज जहान बेगम दहलवीचं 'मधुबाला' असं नामकरण केलं आणि....

Venus of Indian Cinema चा उदय झाला..!

अत्यंत प्रतिभाशाली अन् नैसर्गिक अभिनय क्षमता, लहान वयापासूनच असलेला विलक्षण आत्मविश्वास, जगाला वेड लावणारं हास्य - कधी स्मितं तर कधी अल्लड खळखळणारं, आणि सार्‍या विश्वात एकमेवाद्वितीय ठरावं असं सौंदर्य.. या सगळ्याचं बेमालूम मिश्रण म्हणजे ती..! १४ फेब्रुवारी हा तिचा जन्मदिन. सारी दुनिया तो दिवस 'प्रेमदिन' म्हणून साजरा करते.. माझ्या मते १४ फेब्रुवारी हा जसा प्रेमदिन आहे तसाच तो 'The Devine Beauty Day..' म्हणूनही तिच्या नावे सार्‍या जगभरात, निदान भारतात तरी साजरा व्हावा..!

एव्हाना मालाडच्या झोपडीतून तिचं कुटुंब पेडररोडवरच्या अपमार्केट मध्ये राहायला आलं होतं. एकाच वेळेला अनेकानेक चित्रपटांचं चित्रिकरण सुरू झालं होतं आणि सुरेन्द्र, सप्रू, सुरेश इत्यादींपासून ते अशोककुमार, देवसाब, आरके यासारख्या नामवंतांसोबत ती अगदी लीलया सराईतपणे आपला ठसा उमटवीत होती. परंतु लहान वयापासूनच चित्रपटात काम सुरू केल्यामुळे फॉर्मल शिक्षण म्हणून जे असतं ते तिच्याजवळ नव्हतं. त्यामुळे डॉ सुशिलाराणी पटेल यांच्याकडे संभाषणात्मक इंग्रजीचे धडे गिरवायला तिने सुरवात केली..

बाबुराव पटेल हे 'फिल्म इंडिया' या पहिल्या सिमेमासिकाचे संपादक तसंच सिनेदिगदर्शक. त्यांच्या पत्नी डॉ सुशिलाराणी पटेल याही लेखक, अभिनेत्री तसंच पत्रकारही. या पटेल दाम्पत्याचा तिच्यावर विलक्षण लोभ.. सुशिलाराणींनी आठवण सांगितली होती - 'त्या काळात रोज संध्याकाळी चित्रिकरण संपलं की तेवढ्याच उत्साहाने ती आमच्या घरी यायची. जेवढी सुरेख-मोहक, तेवढीच अल्लड आणि निष्पाप मनमोकळ्या स्वभावाची होती ती. घरच्या गरिबीपायी फॉर्मल शिक्षण नव्हतं परंतु बुद्धीमत्ता होतीच. त्यामुळेच ती माझ्याकडे अवघ्या ३ महिन्यात अगदी उत्तम इंग्रजी बोलायला शिकली. बर्‍याचदा तिचं आमच्याकडे खाणं-पिणंही व्हायचं.. त्यातून ' गरमागरम पकोडे' हे तिचे विशेष लाडके! Smile

ती जेव्हा अगदी प्रथम त्यांच्या घरी आली तेव्हा सुशिलाराणींनी लिहून ठेवलं आहे -

"She was wearing no make up. Her dazzling smile and lovely olive complexion required no artificial help. She was well built and complete natural..!"

असो..

तूर्तास थोडा हळवा झालो आहे म्हणून इथेच थांबतो. साक्षात कर्दनकाळ असलेल्या बापालाही 'नो रिग्रेटस्' असं म्हणून माफ करणारा तिचा स्वभाव, तिची दानशूरता, तिचं आणि दिलिपकुमारचं प्रेमप्रकरण, तिचं आणि किशोरदाचं बस्तान न बसलेलं लग्न, सार्‍या दुनियेची हृदयं काबीज करणारी ती, परंतु तिचा स्वत:चा मात्र जीवघेणा हृदयरोग आणि त्यानंतरचं भयानक एकाकीपण व त्यातच तिचं अकाली जाणं...! अजून खूप काही लिहिन म्हणतो. जमेल की नाही ते सांगता येणार नाही..!

'मेरे छोटेसे मन मै छोटीसी दुनिया रे...' या गाण्याचा उल्लेख वर केला आहे. याच गाण्याच्या काही ओळी आहेत,

'छोटी सी दुनिया की छोटी छोटी बाते,
छोटे छोटे दिन और छोटी छोटी राते..
छोटी उमरिया रे.."

कसा योगायोग असतो पाहा.. 'छोटी उमरिया रे..' असं म्हणून ते कडवं संपतं. पण तीच ओळ तिच्याबाबतीतही 'छोटी उमरिया रे..' म्हणून खरी ठरते आणि मुमताज जहान बेगम दहलवी अवघ्या ३६ व्या वर्षीच या जगाचा निरोप घेते..!



(पुढील भाग सवडीने)

-- तात्या अभ्यंकर.

January 02, 2012

आप के हसीन रुख..

आप के हसीन रुख.. (येथे ऐका)



यमन रागाच्या पार्श्वभूमीवरचं नय्यरसाहेबांचं रफिसाहेबांनी गायलेलं एक शांत, तरल, सुरेख गाणं..

गिटारने दिलेली लय आणि पियानोचे सुंदर तुकडे. मोजका वाद्यमेळ. तरीही नय्यरसाहेबांची अत्यंत अनोखी आणि प्रतिभाशाली धून आणि रफिसाहेबांचा रसाळ, सुरीला आवाज या अवघ्या दोन भक्कम बाजुंमुळे गाण्याचं सोनं झालं आहे. किंचित ठाय असलेली 'एक-दो,एक-दो' ही खास नय्यर ठेवणीतली लय आणि त्या लयीचा अक्षरश: गालावरून मोरपीस फिरावं इतकाच आटोपशीर, संयत आघात. काय बोलावं नय्यरसाहेबांच्या चिरतरूण प्रतिभेबद्दल..?!

'खुली लटोकी छाव में खिला खिला ये रूप है..'

'रूप है..' शब्दावरचा शुद्ध गंधार कायच्या काय सुरीला. तानपुर्‍यातल्या गंधाराची आठवण करून देणारा..!

'घटा से जैसे छन रही सुबह सुबह की धूप है..'

या ओळीतून उलगडत जाणार्‍या यमनबद्दल काय बोलावं महाराजा..? ही अत्यंत स्वाभाविक आणि नैसर्गिक अशी यमनची स्वरसंगती. परंतु तेवढीच ताजी व नवी वाटणारी!
'घटा', 'से', 'जैसे', 'छन', 'रही' हे शब्द फक्त कसे पडले आहेत ते पाहा म्हणजे नय्यरसाहेबांनी 'लय' ही गोष्ट किती पचवली होती हे लक्षात येईल. पुढे 'जिधर नजर मुडी..' तली तोड आणि त्यानंतरचा पॉज..! नय्यरसाहेबांच्या प्रतिभेला मी शब्दात कसं बांधू..?!

गाण्याच्या चित्रीकरणातली माला सिन्हा आम्हाला विशेष पसंत नाही, परंतु तनुजावर आम्ही प्रेम करतो.. ऐन जवानीत काय दिसायची तनुजा! व्वा.. वा..!

आणि अगदी कोवळ्या तरूण वयातला धर्मा मांडवकर काय सुरेख दिसतो.. अगदी हँडसम...! 'त्याला फारसा अभिनय येत नाही', 'नाचता येत नाही..' असे त्याच्यावर आरोप केले जातात. परंतु आम्हाला मात्र या गाण्यातला लाजराबुजरा आणि शोलेत टाकीवर चढून बसंती आणि मौसीला पटवणारा बिनधास्त बेधडक धर्मा मांडवकर अत्यंत प्रिय आहे! Smile

एकंदरीत गाणं ऐकून तृप्ती होते, जीव शांत होतो.

हल्ली मात्र आमची रसिकताच लाचार झाली आहे त्यामुळे आम्ही 'मुन्नी बदनाम', 'शीला की जवानी.' यासारख्या अत्यंत फालतू आणि 'कोलावरी..' सारख्या अत्यंत सामान्य गाण्यावरच समाधान मानतो..!

चालायचंच.. कालाय तस्मै नम:

रफीसाहेबांना आणि नय्यरसाहेबांना मात्र मानाचा मुजरा..!

-- तात्या अभ्यंकर.