April 20, 2014

कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे...

कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे
आम्हासि का दिली वांगली रे...

येथे ऐका - http://www.youtube.com/watch?v=Nc16cBewztM

शरीररुपी वस्त्र.. कबीर याला चादर म्हणतात.. तर माउली या करता घोंगडी हा लोभसवाणा शब्द वापरतात..

जसं आपण एखाद्या घोंगडीने आपल्या शरीराला झाकतो.. तसं आपलं शरीर ही देखील एक घोंगडीच आहे जी आपल्या आत्म्याला झाकते.. 

ते त्यांच्या कान्होबाला, विठुरायाला विचारत आहेत की अरे विठुराया.. हे जे आमचं शरीर आहे.. ते सर्व व्याधीविकारांनी ग्रस्त आहे.. अरे तू आम्हाला तुझ्यासारखी घोंगडी का नाही दिलीस?.. आम्हाला का वांगली घोंगडी दिलीस? आमचं घोंगडं तुझ्यासारखं का नाही रे..?

स्व-गत सच्चितानंदे मिळोनि
शुद्ध सत्व गुणे विणली रे..

स्व- गत, सोहम.. ब्रह्म, सच्चितानंद.. किंवा आपण ज्याला आत्मानंद म्हणतो अशांनी मिळून, तुझी चादर ही शुद्ध, सात्विक गुणांनिशी विणलेली आहे.. !

षड्गुण गोंडे रत्नजडित तुज
श्यामसुंदरा शोभली रे..

आणि म्हणूनच हे विठोबा.. तुझी ही चादर रत्नजडीत आहे.. षट्गुण हीच्या त्या चादरीची रत्न आहेत, तिचे गोंडे आहेत आणि अशी चादर तुला शोभून दिसते.. कुठली आहेत ही सहा रत्न..? ज्ञान, ऐश्वर्य, बल, स्फूर्ती, वीरता, आणि तेज..!

षड-विकार, षड-वैरी मिळोनि
तापत्रयाने विणली रे..

आणि आम्हाला तू जी घोंगडी दिली आहेस ती कशी आहे रे? ती षड-विकार, षड-वैरी, आणि तापत्रयाने विणलेली आहे.. 

कुठले षडविकार?  अस्तित्व, जन्म, वाढ, तारुण्यावस्था वा प्रौढावस्था, क्षय किंवा जर्जरता आणि मृत्यू..!

कुठले षड-वैरी..? काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आणि लोभ..!

आणि कुठले तीन ताप किंवा तापत्रय? आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक किंवा आधि-आत्मिक..

बघ कान्होबा.. कशी घोंगडी तू आम्हाला दिली आहेस.. हिला 'वांगली' नाही म्हणायचं तर दुसरं काय म्हणायचं? 

नवा ठायी फाटुनि गेली
ती त्वा आम्हासि दिधली रे..

अशी ठिकठिकाणी फाटलेली घोंगडी तू आम्हाला का दिलीस? अशी घोंगडी कशी पुरी पडणार आमच्या आत्म्याकरता? अशा घोंगडीमुळे आत्मशुद्धी मिळेल का.?

ऋषि मुनी ध्याता मुखि नाम गाता
संदेह वृत्ती नुरली रे...

मोठमोठे संतसज्जन, ऋषिमुनी जेव्हा तुझी ध्यानधारणा करतात.. तुझं नाम गातात.. तेव्हा खरंच रे कान्होबा असं वाटतं की तू आणि मी एकच आहोत..

अखेर तो नाम-महिमाच असा आहे की तू माझ्यात आहेस आणि मी तुझ्यात आहे या अद्वैताची खात्री पटते. कुठलाही संदेह रहात नाही..

संदेह वृत्ती नुरली रे...!

माउलीची शब्दयोजना काय अप्रतिम आहे पाहा..!

बाप-रखुमा देवीवरु विठ्ठलु
त्वत् पदी वृत्ति मुरली रे..

हे विठोबा, रखुमाईच्या वरा.. तुझ्या चरणी, तुझ्या पदी माझी सारी वृत्ती मुरली आहे, मी तिला तुझ्या पदी अर्पण केली आहे..!

देवा रे माझ्या..ज्ञानबामाउलीचं हे फक्त एक काव्य हाच मुळी डॉक्टरेटचा विषय आहे.. अजून सबंध ज्ञानेश्वरी तर दूरच राहिली..! :)

संदेह वृत्ती नुरली रे
त्वत पदी वृत्ती मुरली रे..

याला काव्य म्हणतात..!!!! 



मंडळी, ज्ञानोबांच्या ह्या ओळींचं मी माझ्या पात्रतेनुसार हे थोडंफार तुच्छ विवेचन केलं आहे..माउलीचं काव्य हे सार्‍या ब्रह्मांडाला व्यापून आहे.. कुणाकुणाला त्याचा कसा अर्थ लागेल, ते त्याचं याहूनही कितीतरी पटीने अधिक रसाळ विवेचन करू शकतील याची मला नम्र जाणीव आहे.. कारण मुळातच माउलीच्या काव्याबद्दल काही लिहिताना आपल्यातला "मी" हा बाजूला ठेवायला लागतो.. तरच दोन शब्द लिहिणं जमू शकतं..!

आणि अण्णांची गायकी..? मी काय बोलू? अहो साक्षात माउलींचाच आशीर्वाद असल्यशिवाय अशी गायकी येणार नाही.. स्वयंभू साक्षात्कारी, अधिक गुरुकडील विद्या, अधिक नारायणराव बालगंधर्वांचे संस्कार..!

षड-विकार षड-वैरी मिळोनि.. - यातला थोडा ललत बघा, किंवा नंतर पंचमासहितचा थोडा ललत-भटियार बघा..

किंवा नंतर याच शब्दांना अण्णांनी अचानक जोगियामध्ये कसं विणलं आहे ते बघा.. अण्णांच्या कोमलधैवतातलं दैवी समर्पण बघा.. 

काय बोलावं.. ? !

बाप-रखुमा देवीवरु विठ्ठलु.. या शब्दातली मध्यमाची गायकी पाहा.. अण्णांनी अचानक यमनमध्ये जाऊन कसं सुखावलं आहे ते पाहा.. काय बोलावं आणि लिहावं तरी काय..!

माझं भाग्य की अण्णांची अभंगवाणी खूपदा ऐकायला मिळाली.. अगदी चार चार-पाच पाच तास अण्णा गायचे..आणि दोन अभंगांच्यामध्ये कविवर्य वसंत बापट सरांचं रसाळ निरुपण.. श्रोत्यांना प्रश्न पडायचा की अण्णांचं गाणं ऐकावं की बापटसरांचं निरुपण ऐकावं...!

अण्णा जेव्हा विठ्ठलाला 'बाप रखुमा देवी वरु विठ्ठलु..' असं म्हणून साद घालायचे तेव्हा तो सावळा आपली घोंगडी आणि काठी घेऊन त्या सभागृहातच कुठेतरी ऐकत बसलेला असायचा..!

-- तात्या अभ्यंकर..