Showing posts with label रसग्रहण. Show all posts
Showing posts with label रसग्रहण. Show all posts

December 06, 2014

एक गाणं...

एक गाणं आहे.. ते फक्त आणि फक्त deadly गाणं आहे..

माफ करा.. ते गाणं छानबीन नाहीये बरं का.. गोड वगैरे तर मुळीच नाहीये..

ते गाणं काळजावरून फक्त धारदार सुरा चालवतं.. ते गाणं पोटात खोल खड्डा पाडतं..

या गाण्यात नुसता अंधार नाहीये.. तर अंधाराला पुर आलेला आहे.. या गाण्यात अवेळी चुकचुकणारी अपशकुनी पाल आहे....!

या गाण्याला घरातल्या चिल्ल्यापिल्ल्यांचा कोलाहल हवा आहे.. त्यांची मजा मजामस्ती,गडबडगुंडा हवा आहे...

हे गाणं अंधाराला घाबरतं.. अंधारलेल्या वाटांना घाबरतं......

या गाण्याचे शब्द आहेत...

या चिमण्यांनो परत फिरा रे..

काही काही गाणी साफ भकास करतात तुम्हाला.. ही ताकद सुरांची.. ही ताकद शब्दांची..!

आपलं मराठी संगीत किती श्रीमंत आहे, किती समृद्ध आहे याचं वर्णन निदान मी तरी करू शकत नाही..!

धन्यवाद...

-- तात्या अभ्यंकर..

April 20, 2014

कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे...

कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे
आम्हासि का दिली वांगली रे...

येथे ऐका - http://www.youtube.com/watch?v=Nc16cBewztM

शरीररुपी वस्त्र.. कबीर याला चादर म्हणतात.. तर माउली या करता घोंगडी हा लोभसवाणा शब्द वापरतात..

जसं आपण एखाद्या घोंगडीने आपल्या शरीराला झाकतो.. तसं आपलं शरीर ही देखील एक घोंगडीच आहे जी आपल्या आत्म्याला झाकते.. 

ते त्यांच्या कान्होबाला, विठुरायाला विचारत आहेत की अरे विठुराया.. हे जे आमचं शरीर आहे.. ते सर्व व्याधीविकारांनी ग्रस्त आहे.. अरे तू आम्हाला तुझ्यासारखी घोंगडी का नाही दिलीस?.. आम्हाला का वांगली घोंगडी दिलीस? आमचं घोंगडं तुझ्यासारखं का नाही रे..?

स्व-गत सच्चितानंदे मिळोनि
शुद्ध सत्व गुणे विणली रे..

स्व- गत, सोहम.. ब्रह्म, सच्चितानंद.. किंवा आपण ज्याला आत्मानंद म्हणतो अशांनी मिळून, तुझी चादर ही शुद्ध, सात्विक गुणांनिशी विणलेली आहे.. !

षड्गुण गोंडे रत्नजडित तुज
श्यामसुंदरा शोभली रे..

आणि म्हणूनच हे विठोबा.. तुझी ही चादर रत्नजडीत आहे.. षट्गुण हीच्या त्या चादरीची रत्न आहेत, तिचे गोंडे आहेत आणि अशी चादर तुला शोभून दिसते.. कुठली आहेत ही सहा रत्न..? ज्ञान, ऐश्वर्य, बल, स्फूर्ती, वीरता, आणि तेज..!

षड-विकार, षड-वैरी मिळोनि
तापत्रयाने विणली रे..

आणि आम्हाला तू जी घोंगडी दिली आहेस ती कशी आहे रे? ती षड-विकार, षड-वैरी, आणि तापत्रयाने विणलेली आहे.. 

कुठले षडविकार?  अस्तित्व, जन्म, वाढ, तारुण्यावस्था वा प्रौढावस्था, क्षय किंवा जर्जरता आणि मृत्यू..!

कुठले षड-वैरी..? काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आणि लोभ..!

आणि कुठले तीन ताप किंवा तापत्रय? आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक किंवा आधि-आत्मिक..

बघ कान्होबा.. कशी घोंगडी तू आम्हाला दिली आहेस.. हिला 'वांगली' नाही म्हणायचं तर दुसरं काय म्हणायचं? 

नवा ठायी फाटुनि गेली
ती त्वा आम्हासि दिधली रे..

अशी ठिकठिकाणी फाटलेली घोंगडी तू आम्हाला का दिलीस? अशी घोंगडी कशी पुरी पडणार आमच्या आत्म्याकरता? अशा घोंगडीमुळे आत्मशुद्धी मिळेल का.?

ऋषि मुनी ध्याता मुखि नाम गाता
संदेह वृत्ती नुरली रे...

मोठमोठे संतसज्जन, ऋषिमुनी जेव्हा तुझी ध्यानधारणा करतात.. तुझं नाम गातात.. तेव्हा खरंच रे कान्होबा असं वाटतं की तू आणि मी एकच आहोत..

अखेर तो नाम-महिमाच असा आहे की तू माझ्यात आहेस आणि मी तुझ्यात आहे या अद्वैताची खात्री पटते. कुठलाही संदेह रहात नाही..

संदेह वृत्ती नुरली रे...!

माउलीची शब्दयोजना काय अप्रतिम आहे पाहा..!

बाप-रखुमा देवीवरु विठ्ठलु
त्वत् पदी वृत्ति मुरली रे..

हे विठोबा, रखुमाईच्या वरा.. तुझ्या चरणी, तुझ्या पदी माझी सारी वृत्ती मुरली आहे, मी तिला तुझ्या पदी अर्पण केली आहे..!

देवा रे माझ्या..ज्ञानबामाउलीचं हे फक्त एक काव्य हाच मुळी डॉक्टरेटचा विषय आहे.. अजून सबंध ज्ञानेश्वरी तर दूरच राहिली..! :)

संदेह वृत्ती नुरली रे
त्वत पदी वृत्ती मुरली रे..

याला काव्य म्हणतात..!!!! 



मंडळी, ज्ञानोबांच्या ह्या ओळींचं मी माझ्या पात्रतेनुसार हे थोडंफार तुच्छ विवेचन केलं आहे..माउलीचं काव्य हे सार्‍या ब्रह्मांडाला व्यापून आहे.. कुणाकुणाला त्याचा कसा अर्थ लागेल, ते त्याचं याहूनही कितीतरी पटीने अधिक रसाळ विवेचन करू शकतील याची मला नम्र जाणीव आहे.. कारण मुळातच माउलीच्या काव्याबद्दल काही लिहिताना आपल्यातला "मी" हा बाजूला ठेवायला लागतो.. तरच दोन शब्द लिहिणं जमू शकतं..!

आणि अण्णांची गायकी..? मी काय बोलू? अहो साक्षात माउलींचाच आशीर्वाद असल्यशिवाय अशी गायकी येणार नाही.. स्वयंभू साक्षात्कारी, अधिक गुरुकडील विद्या, अधिक नारायणराव बालगंधर्वांचे संस्कार..!

षड-विकार षड-वैरी मिळोनि.. - यातला थोडा ललत बघा, किंवा नंतर पंचमासहितचा थोडा ललत-भटियार बघा..

किंवा नंतर याच शब्दांना अण्णांनी अचानक जोगियामध्ये कसं विणलं आहे ते बघा.. अण्णांच्या कोमलधैवतातलं दैवी समर्पण बघा.. 

काय बोलावं.. ? !

बाप-रखुमा देवीवरु विठ्ठलु.. या शब्दातली मध्यमाची गायकी पाहा.. अण्णांनी अचानक यमनमध्ये जाऊन कसं सुखावलं आहे ते पाहा.. काय बोलावं आणि लिहावं तरी काय..!

माझं भाग्य की अण्णांची अभंगवाणी खूपदा ऐकायला मिळाली.. अगदी चार चार-पाच पाच तास अण्णा गायचे..आणि दोन अभंगांच्यामध्ये कविवर्य वसंत बापट सरांचं रसाळ निरुपण.. श्रोत्यांना प्रश्न पडायचा की अण्णांचं गाणं ऐकावं की बापटसरांचं निरुपण ऐकावं...!

अण्णा जेव्हा विठ्ठलाला 'बाप रखुमा देवी वरु विठ्ठलु..' असं म्हणून साद घालायचे तेव्हा तो सावळा आपली घोंगडी आणि काठी घेऊन त्या सभागृहातच कुठेतरी ऐकत बसलेला असायचा..!

-- तात्या अभ्यंकर..

November 04, 2013

केसरिया बालम...

केसरिया बालमा आओनी पधारो म्हारे देस..

हे राजस्थानी लोकगीत अनेक कलाकार, अनेक शब्द वापरून गातात. काही चित्रपटातूनही हे गाणं आपल्याला ऐकायला मिळतं.. 

केसरिया.. ज्याची कांती केशरी रंगाची. केशरासारखी आहे असा.. शिवाय केशरी रंग हे शुद्धतेचं आणि शौर्याचं प्रतिक.. 

ज्याची कांती केशरी रंगाची आहे, ज्याचं मन केशरासारखं शुद्ध आहे आणि ज्याच्या ठायी शौर्य आहे असा केसरिया बालमा किंवा केसरिया बालम.

देशांतराला, लढाईला गेलेल्या मांगनियार राजस्थान्याची प्रेयसी/पत्नी त्याला बोलवत आहे.. 

पधारो म्हारो देस..

राजस्थानातल्या पुरातन, प्राचिन हवेलीतलं प्रशस्त संगमरवरी अंगण किंवा सूक्ष्म कोरीव काम केलेल्या त्या हवेलीतला एखादा झरोका किंवा अनेक पायर्‍या असलेल्या विहिरीच्या एखाद्या पायरीवरून किंवा गरम वाळूच्या एखाद्या टेकडीवरून फुलणारं हे गाणं..

हे वर्णन माझे मित्र डॉ अग्रवाल यांचं..



या लोकगीताची तशी बरीच वेगवेगळी कडवी गायली जातात.. शेवटी हे गाणं म्हणजे एक साद आहे.. कधी कुठला रचनाकार त्याच्या प्रतिभेनुसार आणि कल्पनेनुसार ही पधारण्याची साद घालेल हे सांगता यायचं नाही.. राजस्थानातलं हे पारंपारिक लोकगीत, त्यामुळे कुणा एका रचनाकाराची यावर मालकी नाही..

परंतु मूळ गाण्यात काही सुंदर पंक्ति आहेत..त्या अलीकडे कुणी म्हणताना आढळत नाहीत..

जसे,

मारू थारे देस में निपूजे तीन रतन
एक ढोलो, दूजी मारवन , तीजो कसूमल रंग
पधारो म्हारे देस...

केसर सू पग ला धोवती घरे पधारो जी..
पधारो म्हारे देस...

और बढ़ाई क्या करू पल पल वारूगी
पधारो म्हारे देस आओ म्हारे देस...

आणि या ओळी तर सुरेखच आहेत..

आंबा मीठी आमरी,
चोसर मीठी छाछ.
नैना मीठी कामरी
रन मीठी तलवार

पधारो म्हारे देस नि...

आमच्या एका दोस्ताच्या लग्नाला जोधपूरला गेलो होतो तेव्हा ही डॉ अग्रवाल नावाची आसामी मला भेटली. डॉक्टरसाहेब राजस्थानी लोकगीताचे गाढे अभ्यासक. खूप गप्पा झाल्या त्याच्याशी. अगदी मोकळाढाकळा गप्पीष्ट माणूस. झकास मैफल रंगली त्यांच्यासोबत. खूप जोधपूर फिरलो आम्ही. सोबत डालबाटी आणि राजस्थानी मिठाई..! :)

त्याच्याकडून अगदी भरभरून ऐकायला मिळालं या गाण्याबद्दल.. आपल्याला आश्चर्य वाटेल, त्या अग्रवालांनी मला या गाण्याच्या एकूण ६ निरनिराळ्या चाली ऐकवल्या..!

आपलं भारतीय संगीत किती म्हणजे किती समृद्ध असावं? इतकी राज्यं, इतक्या भाषा.. प्रत्येक मातीतलं गाणं वेगळं आणि तेवढंच ढंगदार..मग ती मराठमोळी लावणी किंवा ठाकरगीत असू दे, किंवा राजस्थानातलं केसरिया असू दे, किंवा मध्यप्रदेशातल्या माळव्यातलं लोकगीत असू दे, किंवा पंजाबातल्या रंगेल मातीतल्या टप्प्याशी दोस्ती करणारं कुठलं कुडी-मुंडाचं प्रेमगीत असू दे.. किती वैभवशाली आहे आपलं संगीत..! विचार करू लागलो की मन थक्क होतं. ह्या सा-याचा अभ्यास करायला सातच काय, सातशे जन्म देखील पुरणार नाहीत.. पुन्हा पुन्हा या भारतीय मातीत जन्म घ्यावा लागेल..!

जोधपूरहून परतीच्या सूर्यनगरी एक्सप्रेसने निघालो. जानेवारीचे दिवस. संध्याकाळ उलटलेली. गाडी सुसाट मुम्बैकडे निघाली होती. बोचरं वारं होतं..आणि सोबत शब्दवेल्हाळ 'केसरिया बालम..' चे स्वर कानात रुंजी घालत होते...!

-- तात्या अभ्यंकर.

August 24, 2013

पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी..

संत तुकाराम चित्रपटातला एक विलक्षण मेलडियस, उत्साहाने, चैतन्याने भरलेला एक अभंग.. 
बिहागसारख्या रागात बांधलेला..

संत तुकाराम चित्रपटातला तुकोबांचा कट्टर विरोधक सालोमालो.. ह्या सालोमालोच्या तोंडी हा अभंग आहे.. 

ह्या सालोमालोचं काम करणारा नट कोण आहे देव जाणे, पण या नटाने अगदी झक्कास अभिनय केला आहे हा अभंग गाताना. हा अभंग कुणी गायला आहे हेही माहीत नाही.. कदाचित तो सलोमालोचं काम करणारा नटच गायकनटही असावा..

परंतु ज्याने कुणी हा अभंग गायला आहे त्याने हा अभंग केवळ अप्रतिम गायला आहे असंच म्हणावं लागेल.. हा जो कुणी आहे तो अतिशय सुरेल मनुष्य आहे... गाण्याची उत्तम तालीम घेतलेला आहे..





मुळत हा अभंग तुकोबांचा.. सालोमालो तो ढापून आपल्या नावावर खपवू पाहात आहे.. त्यांमुळे त्याच्या सादरीकरणात एक प्रकारचं नाट्य आहे, अभिनय आहे.. त्यामुळे त्याची चालही बदलली आहे.. मूळ तुकोबांची चाल ही अतिशय साधी, त्यांच्यासारखीच सात्त्विक आहे जी विष्णूपंत पागनीसांनी गायली आहे.. परंतू सालोमालोची चाल ही बिहागमधली, त्याच्यासारखीच रंगेल आणि राजस गुणांची आहे हे ध्यानात घेण्यासारखं आहे..!

कुठल्याही चित्रपटातल्या एखाद्या गाण्याकडे बघताना अशाच दृष्टीने पाहिलं पाहिजे..कारण ते नुसतं गाणं नसतं तर त्या गाण्याला एक पार्श्वभूमी असते हेही लक्षात घ्यावं लागतं.. आणि त्या दृष्टीने या अभंगाकडे पाहिल्यास आपलाच आनंद अधिक दुणावतो..

पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी..

गंधारावरची सुंदर सम.. वा!

सालोमालोबुवा छान नटूनथटून कीर्तनाला उभे आहेत.. हाती चिपळ्या आहेत.. 

एका श्रोत्याला छान डुलकी लागली आहे.. त्यामुळे सालोमालोबुवा त्याला,

'जागृती-स्वप्नी पांडुरंग..' असं म्हणत खणकन त्याच्या कानाशी चिपळी वाजवाताहेत.. मस्तच जमलंय हे टायमिंग.. 

आणि पांडुरंगातल्या त्या शुद्धनिषादाची क्वालिटी खास बिहागातली. अतिशय सुरेख..

स्वर नुसतेच छान आणि सुरेल लागून उपयोगाचं नाही तर ते त्या त्या रागाच्या क्वालिटीनुसार(च) लागले पाहिजेत..! असो.

'पहिले वळण ऐंद्रिया सकळा..'

वा..! सालोमालोच्या आवाजाचा पोत खरंच सुरेख आहे.. उत्तम फिरत आहे आवाजाला.. आवाजाची जात थोडी सुरेशबुवा हळदणकरांसारखी वाटते आहे.. 

'भाव तो निराळा नाही दुजा.. '

धत तेरीकी..! येथे तुकोबांना काय म्हणायचं आहे हेच मुळी सालोमालोला कळलेलं नाही.. नाहीतर त्याने तुकोबांशी असा दुजाभाव केलाच नसता..!

'भाव तो निराळा.. ' नंतरची थोडी लयकारीवजा गोलाकार आलापी सुंदर आणि त्यानंतर 'नाही दुजा.. ' वरचा पुन्हा एकदा बिहागचा देखणा निषाद आणि त्यानंतर त्या अज्ञात गायकाने धैवत, पंचम आणि मध्यमावर अनुक्रमे केलेला ठेहेराव देखील सुरेख.. मध्यमावरच्या ठेहेरावावरती त्याची डोळ्यातनं टिपं गाळायची नाट्यमयता.. सगळंच सुंदर..!

सालो म्हणे नेत्री केली ओळखण..

हा हा हा.. इथे' तुका म्हणे' च्या ऐवजी त्याने 'सालो म्हणे' टाकलं आहे. ‌शिवाय 'सालो म्हणे.. ' या शब्दांवर विशेष जोर देऊन ते तो ठासून सांगायचा प्रयत्न करतोय तेही मस्त.. त्यावेळची तोड, तिहाया, चौथाया. ‌सगळंच मस्त ..

'तटस्थ ते ध्यान विटेवरी..' असं म्हणताना त्याने कमरेवर हात ठेऊन घेतलेली विठोबाची पोझ.. पण त्याचा तो म्हातार नोकर जो आहे तो हे सगळं ओळखून आहे.. तो आपल्या मालकाच्या 'ध्याना'लाच नमस्कार करतो आहे..! 

गायकीचे बारकावे आणि सुरेलता तर आहेच परंतु इतरही अनेक बारकावे आहेत या गाण्यात..त्यामुळेच एकदा या गाण्यावर भरभरून लिहायचं ठरवलं होर्त.. आज योग आला..

आज इतके वर्ष झाली या चित्रपटाला परंतु त्यातल्या या अभंगाची नोंद कुणी घेतली आहे की नाही माहीत नाही..आणि म्हणूनच मी ती आवर्जून घेतो आहे..

सालोमालोंनी गायलेला हा सुंदर अभंग ऐकून स्वतः तुकोबा इतकंच म्हणाले असते..

"बाबारे, काय छान गातोस.. पांडुरंगाने तुला काय गोड गळा दिला आहे.. वाटल्यास मी माझे सगळे अभंग तुला देतो.. फक्त तुझ्यातला दुजाभाव तेवढा बाजूला ठेव म्हणजे झालं..! "

-- तात्या अभ्यंकर.

July 23, 2013

आकाश पांघरूनी...


आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे
घेऊन एकतारी गातो कबीर दोहे...





संगीताच्या नावाखाली आज बराचसा सुरू असलेला थिल्लरपणा, उथळपणा, जाहिरातबाजी, रातोरात होणारे इंडियन, चायनीज, जॅपनीज आणि कुठलेकुठले आयडॉल्स, महागायक, महागायिका, महागुरु, रातोरात झालेले गौरव महाराष्ट्राचे...!

या सगळ्यांपासून दोन-पाच मिनिटं का होईना, थोडं दूर जायचं आहे? केवळ आणि केवळ तृप्ती आणि समाधान देणारं एक अतिशय साधं परंतु तितकंच सुरेख गाणं ऐकायचंय?

मग मधुकर जोशींनी लिहिलेलं, दशरथ पुजारींनी बांधलेलं आणि हळव्या स्वराच्या सुमनताईंनी गायलेलं हे गाणं कृपया ऐका..

गगनात हासती त्या स्वप्नील मंद तारा
वेलीवरी सुखाने निजला दमून वारा
कालिंदीच्या तिरी या जळ संथ संथ वाहे..

कुठे २-४ गाणी धड नाही गायलीत तर लगेच दूरदर्शनद्वारा मिळणारी डोक्यात हवा जाणारी, संगीताला घातक असणारी अनाठायी, अवाजवी प्रसिद्धी..मग लगेच मोठमोठाले झगमगटाचे दिमाखदार संगीत सोहळे, ज्यांना गाण्यातला सा देखील माहीत नाही, परंतु नाट्यचित्रसृष्टीतले केवळ सेलिब्रिटी आहेत म्हणून, परंतु संगीताच्या दृष्टीने सर्वथा केवळ अपात्र असणार्‍या व्यक्तिंच्या कॉमेन्ट्स, त्यांची कवतिकं, आणि त्याच संगीतसंध्येच्या निमित्ताने त्यांच्या नवीन येणार्‍या एखाद्या चित्रपटाची जाहिरातबाजी किंवा प्रोमोज..!

संगीतसाधना करणार्‍या माझ्या प्रिय मित्रमैत्रिंणींनो, दमलेल्या त्या वार्‍यासारखीच कदाचित तुमची अवस्था झाली असेल.. तेव्हा त्याच्याच प्रमाणे एखाद्या वेलीवर जरा सुखाने विसावा.. थोडं चिंतन-मनन करा.. केवळ आनि केवळ निखळ, निर्व्याज साधना कशी करता येईल याचा थोडा विचार करा इतकाच विनम्र सल्ला..!

भरला स्वरात त्याच्या भक्तीतला सुगंध
ओठांत आगळाच आनंद काहि धुंद
त्याच्या समोर पुढती साक्षात देव आहे

सारं जग शांत निजलेलं आहे.. कुठलीही जाहिरातबाजी, गोंगाट न करता केवळ एक एकतारी घेऊन दोहे गाणार्‍या त्या कबीराकडून खूप शिकण्यासारखं आहे.. तो फक्त स्वत:च्या समाधानाकरता, स्वानंदाकरता गातो आहे, आणि म्हणूनच पर्यायाने तो त्या श्रीहरीकरता गातो आहे.. आणि त्यामुळेच त्याच्या स्वराला भक्तीचा सुगंध आहे..

सारं जग शांत निजलेलं असताना तो श्रीहरी मात्र त्याचं गाणं तल्लीनतेने ऐकतो आहे... वर म्हटल्याप्रमणे,

त्याच्या समोर पुढती साक्षात देव आहे..!

काहूर अंतरीचे भजनात लोप होई
भक्तीत श्रीहरीच्या मन हे रमून जाई

मला किती एस एम एस मिळतील?, मी जिंकेन का?, मग लगेच मला रातोरात एखाद्या अल्बममध्ये गाण्याचा चान्स मिळेल का?..

नसू देत असं कुठलंही भयानक काहूर तुमच्या अंतरी..!

बघा बुवा पटलं तर.. नायतर द्या सोडून.. पण हे गाणं मात्र नक्की ऐका..

-- तात्या.

September 14, 2012

इष्काची इंगळी...:)

इष्काची इंगळी..
येथे ऐका - http://www.hummaa.com/music/song/mala-ishkachi-ingali-dasali/134557#

जगदिशरावांची झकास लेखणी, आमच्या गावरान रामभाऊ कदमांचं फक्कड संगीत आणि उषाताईंची ठसकेदार गायकी..

सुरवातीची मस्त यमनातली आलापी..


मी एकलीच निजले रातीच्या अंधारात..
नको तिथ्थच पडला अवचित माझा हात
हाताखालती नागं काढून वैरीण ती बसली..!

नागं काढलेल्या इंगळीला 'वैरीण' म्हटलंय..! :)

जोरदारच लावणी बांधली आहे रामभाऊ कदमांनी.. सुंदर ढोलकी आणि हार्मोनियमचे यमनातले तुकडे केवळ अप्रतिम..!

साऱ्या घरात फिरले बाई गं..
मला 'अवशिद' गवलं न्हाई गं..

छ्या..! आजवर कधी कुणाला इष्काची इंगळी डसल्यावर टायमावर अवशिद मिळालंय का..? अहो अजून अशा अवशिदाचा शोध लागायचाय..! :)

'न्हाई गं.. ' हे शब्द उषाताईंनी अतिशय सुरेख म्हटले आहेत.. आणि त्यातला तो यमनामध्ये येणारा शुद्ध मध्यम.. तोही अगदी अवचितच येऊन पडला आहे..

खरंच कुठे गेली हो आता अशी गाणी..?

या इंगळीचा कळला इंगा..
खुळ्यावाणी मी घातला पिंगा..!

माझ्या मते खेबुडकरदादांच्या या ओळी सुवर्णाक्षरात लिहून ठेवाव्या अशा आहेत.. अहो ही इष्काची इंगळी एकदा का कडाडून चावली ना, की अक्षरश: भल्याभल्यांना पिंगा घालायला लावते.. अगदी खुळं करून सोडते बघा..!



या अजरामर लावणीबद्दल उषाताईंना मोठ्ठं 'थँक यू..' आणि खेबुडकरदादांना व रामभाऊ कदमांना विनम्र आदरांजली..!

(इष्काच्या इंगळीचा मांत्रिक) तात्या अभ्यंकर.. :)

March 12, 2012

एकदाच यावे सखया...

एकदाच यावे सखया.. (येथे ऐका)

अशोकजी परांजपेंचे सुंदर शब्द असलेलं अशोक पत्की, सुमनताईंचं एक सुरेख गाणं. साधीच परंतु अत्यंत सात्त्विक अन् गोड चाल आणि सुमनताईंचा तितकाच गोड आणि हळवा गळा. 'सखया' हा शब्द खूप म्हणजे खूपच सुरेख!

पुन्हा गूज अंतरीचे हे कथावे व्यथांनी.. - ही ओळ खूप काही सांगणारी.

मध्यंतरीच्या काळात कुठेतरी अंतर पडले आहे, ते दूर व्हावे आणि पुन्हा एकदा तुझे गीत कानी यावे आणि 'भाव दग्ध विटला हा रे, पुन्हा फुलुनि यावा...!'

'पुन्हा फुलुनि यावा...' या ओळीतील पत्कीसाहेबांच्या अत्यंत हळव्या सुरावटीचं सुमनताईंनी अगदी सोनं केलं आहे. ही जागा त्यांच्या गळ्यातून इतकी सात्त्विकपणे उतरली आहे की क्या केहेने..! 'धुंद होऊनी मी जावे..' ही सुरावट देखील तशीच सुरेख...

प्रेमगीतातील ही सात्त्विकशीलता आणि मर्यादशीलता हल्लीच्या काळात क्वचितच पाहायला मिळते. कितीही जरी निरनिराळ्या राजसी-तामसी पाककृती असल्या, आपण त्यांचा वेळोवेळी आस्वाद घेतला तरी अहो शेवटी केळीच्या पानावरील साधा गरमागरम वरणभात, सोबत साजून लोणकढं तूप याला जशी सर नाही ना, तसंच या गाण्याचं आहे. अखेर कुठेतरी तुम्हाला निवारा मिळेल आणि तुमचं मन शांत होईल ते 'एकदाच यावे सखया', 'केतकीच्या बनी', 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या' किंवा विठ्ठला तू वेडा कुंभार..' याचसारख्या गाण्यांमधून..!

पण आमचं हल्ली असं झालंय की आम्हाला 'कोलावरी डी..' सारखी गाणी हेच काय ते उच्च संगीत वाटतं आणि याचं कारण म्हणजे हल्लीच्या बाजारबसव्या वाहिन्या अशीच गाणी अगदी सतत तुमच्याआमच्या वर लादत असतात..


मग माझ्यासारखा नॉस्टालजियाने पछाडलेला एखादा खुळा उठतो आणि 'एकदाच यावे सखया..' या सारख्या गोड, अवीट गाण्याबद्दल आपलं मन मोकळं करतो इतकंच..!

-- तात्या अभ्यंकर.

November 10, 2011

वाजंत्री वाजतात, वाड्यात काय झालं?

राम राम मंडळी,

मासिक धर्म सुरू होणं ही कुठल्याही मुलीच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना. निसर्गाने तिला बहाल केलेलं ते सन्माननीय स्त्रीत्व. आजच्या काळात मासिक धर्म सुरू होऊन जेव्हा एखादी मुलगी वयात येते, ते तिच्या आईशिवाय कुणालाच फारसं कळत नाही. फार तर तिच्या वडिलांना किंवा मोठ्या ताईला हे कळणं शक्य आहे. या व्यतिरिक्त ती घटना फारशी कुणाला कळावी किंवा तिचा गाजावाजा व्हावा असं त्यात विशेष काही नाही. ती एक नैर्सर्गिक गोष्ट आहे.

परंतु दादासाहेब फाळके पारितोषक विजेत्या २२ जून १८९७ या सुंदर चित्रपटात दाखवलं गेल्याप्रमाणे मुलीचं हे ऋतुचक्र सुरू झालं की त्या घरात एक छोटेखानी समारंभवजा प्रसंगच साजरा केला जात असे. एक तर त्या काळात मुलगी वयात यायच्या आधीच तिचं लग्न केलं जात असे, (किंबहुना मुलगी वयात येईपर्यंत बिनलग्नाची राहिल्यास तो एक चर्चेचा विषय होई आणि प्रसंगी तिची व तिच्या आईवडिलांची कुचंबणाही होत असे - संदर्भ - शिरुभाऊंची तुंबाडचे खोत ही कादंबरी) त्यामुळे जेव्हा मुलगी वयात येत असे तेव्हा ती आईऐवजी सासूच्याच सान्निध्यात असे.

२२ जून १८९७ या चित्रपटात मात्र चाफेकरांच्या घरातील एक सूनबाई सीता, (बहुधा चाफेकर बंधुंपैकी वासुदेव हरि तथा बापुराव चाफेकर यांची पत्नी) जेव्हा वयात येते तो समारंभवजा प्रसंग चित्रित केला आहे आणि सोबत एक छान गाणंही आहे. माझा हा लेख मुख्यत्वेकरून त्या गाण्याबाबत आहे. त्या काळात मुलगी वयात आली म्हणजे तिला 'न्हाणं' अथवा 'नहाण आलं', 'ती मखरात बसली', 'तिला पदर आला', इत्यादी शब्दप्रयोग वापरात असायचे. त्यापैकीच 'न्हाणं आलं' हे शब्द सदर गाण्यात वापरले आहेत..

सीताबाईला चाफेकळीला न्हाणं आलं.. (येथे ऐका - चित्रफितीतील गाण्याची सुरवात ४ मिनिटे व १८ सेकंदांनी)

आता मंडळी, खरं सांगायचं म्हणजे या गाण्यात काही गहन अर्थबिर्थ आहे असं मुळीच नाही. आपण फार तर याला माजघरातलं एक गाणं, असं म्हणू शकतो. तरीही या गाण्याची चाल छान आहे, शब्द साधे परंतु मस्त आहेत आणि विशेष म्हणजे यातली यमकं एकदम फक्कड आहेत. लयीची गुंफण तर झकासच आहे. सोबत तालाकरता फक्त एक चौघडाटाईप वाद्य आणि चाळ किंवा घुंगरू. तरीही हे गाणं जमून गेलं आहे..! :)

हम्म. पुण्यातल्या एका रस्त्यावरून मी चाललो आहे. वाटेत खास सदाशिवपेठी एक वाडा लागला आहे. पण त्यातून हा वाजंत्य्रांचा कसला आवाज येतो आहे? काही लग्नबिग्न आहे क्काय त्या वाड्यात..?

छे हो..!

वाजंत्री वाजतात वाड्यात काय झालं?
सीताबाईल चाफेकळीला न्हाणं आलं..! :)

'वाड्यात काय झालं..' मधली 'पपप मगरेग' संगती एकदम मस्त! आणि 'न्हाणं आलं' चा षड्जावरचा न्यास एकदम खणखणीत बरं का. कुणी गायलंय ते माहीत नाही, पण बाईचा आवाज सुरेल आहे, मोकळा आहे. अगदी चित्पावनी आहे असं म्ह्टलंत तरी चालेल! :)

पहिल्यानं न्हाणं आलं सासू वाटिते साखर
सीताबाई हिचा दीर गुंफितो गं मखर..!

सूनबाईला न्हाणं आलं म्हणून आता सासू काय काय वाटते आहे पाहा. सर्वप्रथम ती साखर वाटते आहे. सीताबाईचा दीर आपल्या भावजयीला मखरात बसण्याकरता तिच्याकरता मखर गुंफतो आहे. इथे साखर आणि मखर हे साधं शिंपल यमक जुळवलं आहे. बाय द वे, दीर या शब्दातली 'मध' ही संगती अंमळ सुरेखच..! :)

पहिल्यानं न्हाणं आलं सासू वाटिते बत्तासे
सीताबाई जरी तुझ्या मखरी आरसे..!

साखर झाली. आता बत्तासे! मज्जा आहे बॉ सीताबाईची. मंडळी बाकी काय पण म्हणा, बत्तासे मात्र चवीला झकासच लागतात हो! आणि आरसे/बत्तासे हे यमकही मस्त! :)

बाय द वे, 'सीताबाई जरी तुझ्या मखरी आरसे..!' ह्या ओळीची लय मात्र विशेष सुरेख आहे. आणि सोबत छुन छुन छुन असा घुंगरांचा ठेका.. सी ता बा ई जरी तुझ्या मखरी आरसे हे शब्द किती सुरेख लयीत पडले आहेत पाहा..!

ह्या गाण्याची चाल कुणी बांधली आहे ते माहीत नाही. की पारंपारिकच आहे..?

पहिल्यानं न्हाणं आलं सासू करिते सोहळा
सीताबाई तरी नेस पाटव गं पिवळा..

अगो सीताबाई, अगो रांडच्ये तुझी सासू तुला न्हाणं आलं म्हणून एवढा सोहळा करत्ये, अगो तो पिवळा पाटव तरी नेस गो बये..! :)

मला 'पाटव' या शब्दाचा एक्झॅक्ट अर्थ माहीत नाही परंतु हा शब्द मात्र एकदम मस्त वाटतो. पुन्हा सोहळा-पिवळा हे यमक झकास..! :)

पिव्ळं पिवळं गं पातळ सार्‍यांना सांगितलं
सीताबाई हिला न्हाणं आलं आईकलं..!

धत तेरीकी..! अहो तिला नहाण आल्याचा एवढा सोहळा केलात आणि वर म्हणता काय? तर,

सीताबाई चाफेकरणीला नहाण आलं असं ऐकलं खरं! :)

'पिवळं पिवळं पातळ' हे शब्द लयीत छान बसावेत म्हणून 'पिव्ळं पि व ळं पातळ' असे टाकले आहेत. या गाण्याची सांगितिक बाजू वरकरणी जरी साधी सोपी वाटली, तरी तिला सुरालयीचा भक्कम पाया लाभला आहे हे निर्विवाद..!

'ऐकलं' या शब्दाकरता 'आ ई क लं' ही चार लयदार अक्षरं गाण्यात अधिक छान शोभतात..! :)

पण मंडळी, क्षणभर यातला मजेचा वा सांगितिक भाग सोडून द्या, पण ज्या पार्श्वभूमीवर हे गाणं चित्रित केलं आहे ती पार्श्वभूमी खूप गंभीर आणि भयानक आहे. चाफेकरांच्या घरातल्या आणि इतर चार घरच्या लेकीसुना हा नहाण प्रसंग त्याकाळची एक रीतभात म्हणून निभावतात खरा परंतु,

थोरले चाफेकर दामोदर हरि चाफेकर फासावर गेले आहेत, त्यांची विधवा गाण्यातल्या एका चित्रात सुन्न बसलेली दाखवली आहे. इतर दोघा चाफेकर बंधुंची फाशीही निश्चित आहे. एकाच घरातील तीन तीन तरूण मुलं फासावर जात आहेत त्या बापाची अवस्था काय असेल..? एक साधा कीर्तनकार तो. उद्या मुलं कीर्तन शिकतील, काही कामधंदा करतील यावरच सारी मदार असणारा..! गाण्यातल्या एका चित्रात तो खिन्न, हारलेला, हताश बापही बसलेला दाखवला आहे..!



असो..

कुठून विषय सुरू केला होता, अन् कुठे येऊन पोहोचलो पाहा..!

आता अधिक काही लिहित नाही.. माझा त्या तिघा चाफेकर बंधुंना मानाचा मुजरा..!

-- तात्या अभ्यंकर.

November 01, 2011

..पर अंधेरे से डरता हु मै मां..!

मेरी मां.. (येथे ऐका)


"आई नको ना गं मला इथे एकट्याला ठेऊन जाऊस! मी तसं कधी बोलून दाखवत नाही पण मी अंधाराला खूप घाबरतो गं आई. इथे खूप अंधार आहे.
हो, आहे मी थोडासा खोडकर, पण तू मला खूप आवडतेस आणि मला तुझी खूप काळजीही वाटते. आता हे कसं तुला समजावून सांगू..? पण तुला तर हे सगळं माहित्ये ना आई? मग मला इथे एकट्याला का ठेऊन जातेस? आता खरंच मी चांगला वागेन. मस्ती, द्वाडपणा करणार नाही. प्रॉमिस..! पण मला इथे नाही रहायचं..!"

tjp

"इथे सगळी खूप अनोळखी मुलं आहेत. मला भिती वाटते इथली.. मला इथे ठेऊन जाऊ नकोस. ही गर्दी आहे ना, ती मला काहितरी करेल मग मी परत घरी कसा येऊ शकेन..? मला तुझ्यापासून इतका दूर करू नकोस की माझी आठवणही तुला येणार नाही.. खरंच मी इतका वाईट आहे का गं आई..? सांगा ना..!"

"आई, मला माहित्ये मी तुझा खूप लाडका आहे. बाबा जेव्हा जेव्हा मला जोरांने ओरडतात ना, तेव्हा तू येऊन माझी बाजू घेशील, मला सांभाळशील याची खात्री असते मला! तू जवळ असलीस ना आई, की खूप सुरक्षित वाटतं मला! पण मी बाबांना हे काही सांगू शकत नाही. तुला हे सगळं माहित्ये ना आई..? मला भिती वाटते त्यांची. खरंच भिती वाटते.."

tjp

चवथी-पाचवी पर्यंत आईच्या पदराखाली लाडाकोडात वाढलेला ईशान अवस्थी. एक खोडकर मुलगा. अक्षरं/आकडे समजण्याची आकलनशक्ती क्षीण असलेला, ती समजून घेतांना गडबड होणारा आणि त्यामुळेच 'लेटर्स आर डान्सिंग' असं म्हणणारा ईशान.. तो सुधारावा म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला आता शाळेतून काढून लांब बोर्डिंग शाळेत ठेवला आहे. तिथे सगळं नवीन. मुलं/सवंगडी नवीन. जाड चश्मावाले अन् मिश्यावाले कडक मास्तर. तिथे आता लाड करणारी आई नाही..!

हे गाणं म्हणजे त्या लहानग्याचं मनोगत..! आईवेडं पोर आहे ते. गाण्याचं चित्रिकरण केवळ अप्रतिम...रडवेलं झालेलं ते पोरगं, आता एकटं, एकाकी. आत्तापर्यंत अगदी सकाळी उठवण्यापासून ते पायात मोजे-बुट चढवणारी आई होती. आता हे लाड नाहीत. कडक मास्तरांच्या निगराणीखाली सगळं आपलं आपण करायचं! आत्तापर्यंत कौतुकानं गरम गरम भरवायला आई होती, आता मेसच्या शिस्तीत आपलं आपण जेवायचं! :)

पोरगं खरंच बावरलं आहे, घाबरलं आहे. शेवटी नळ सोडून आपला रडवेला चेहेरा घुतं आणि चुपचाप झोपतं आणि आईविना पहिला दिवस संपतो..! :)

'तारे जमी पर'. एक सुरेख, देखणा, अप्रतिम चित्रपट आणि त्यातलं शंकर महादेवन ने गायलेलं हे अप्रतिम गाणं. जियो..!

पण खरंच मंडळी, हे गाणं ऐकताना/पाहताना पोटात कुठेतरी खूप तुटतं..पडद्यावर हे गाण पाहताना कुठेतरी आपल्या आईची आठवण होते आणि पडद्यावरचं चित्र क्षणभर धुसर होतं.. परमेश्वराने आई अन् तिचं लेकरू हे नक्की कसलं नातं निर्माण करून ठेवलं आहे हे खरंच समजत नाही...!

-- तात्या अभ्यंकर.

October 31, 2011

हाल ए दिल..

राम राम मंडळी,

हाल ए दिल.. (येथे ऐका)

श्री अमिताब बच्चन ऊर्फ अमिताब श्रीवास्तव (यूपीतल्या इलाहाबादच्या या भैय्याचं 'श्रीवास्तव' हे मूळ आडनांव, जे हरिवंशरायांनी 'बच्चन' असं बदलून घेतलं), ऊर्फ बीग बी, ऊर्फ बच्चनसाहेब हा खरोखर एक अजब माणूस आहे. अत्यंत गुणी कलाकार, एक मोठा कलाकार, एक निर्विवाद दिग्गज! गेली ४० दशकं हा बुढ्ढा म्हातारा होतच नाहीये. त्याचा अभिनय, त्याचा आवाज सगळंच जबरा! आणि मुख्य म्हणजे आजही सर्व जुन्या नव्या माणसांना जमवून घेत हा इसम पुढेपुढेच चालला आहे. मग त्याचा केबीसीचा चौथा की पाचवा सीजन असो, की अलिकडेच प्रदर्शित झालेला 'बुढ्ढा होगा तेरा बाप' हा चित्रपट असो..इतका मोठा कालावधी प्रकाशाच्या झोतात रहाणं आणि लौकिकार्थाने 'नंबर वन' पदावर रहाणं फारच कमी लोकांना जमतं त्यापैकीच बच्चन साहेब एक.

तूर्तास मी हे अमिताब पुराण इथेच आवरतं घेतो आणि वळतो एका छानश्या गाण्याकडे. 'बुढ्ढा होगा..' चित्रपटातलंच विशाल-शेखरचं संगीत असलेलं आणि खुद्द बचन साहेबांनी गायलेलं 'हाल ए दिल..' हे यमन रागातलं गाणं. यमन आला रे आला की माझ्यासारख्या यमनभक्तांची समाधी लागलीच म्हणून समजा. मग तो यमन मदनमोहनच्या अनपढ मधला 'जिया ले गयो जी मोरा सावरिया असो', की बाबूजींच्या 'समाधी साधना' तला असो की विशाल-शेखर च्या 'हाल ए दिल..' मधला असो. यमनला तोड नाही, यमनला पर्याय नाही. आपल्या अभिजात रागसंगीताला पर्याय नाही. फक्त काही वेळेस खंत एकाच गोष्टीची वाटते की अलिकडचे संगीतकार त्याची ताकद, त्यातलं अफाट-अनंत असं पोटेन्शियल ओळखू शकत नाहीत, पाहू शकत नाहीत, किंबहुना त्यांची कुवतदेखील कुठेतरी कमी पडत असावी. मला नक्की माहीत नाही.. असो..

या पार्श्वभूमीवर विशाल-शेखरचं नक्कीच कौतुक आणि अभिनंदन की त्यांनी हा छोटेखानी यमन आम्हाला दिला..

हाल ए दिल तुमसे कैसे कहू..

स्वभावत:च हे गाणं म्हणजे एक गुणगुणणं आहे. स्वत:शीच साधलेला संवाद आहे. माझं 'हाल ए दिल..' बाई गं तुला कसं सांगू? 'नी़रेग' ही यमनची अगदी 'बेसिक लेसन' असलेली संगती छानच गायली आहे बच्चनसाहेबांनी. त्याच 'हाल ए दिल' ची 'प परे' ही अजून एक संगती. आणि 'कैसे कहू..' तला षड्ज. व्वा बच्चबबुवा!

यादो मे ख्वाबों मे..

डायरेक्ट धैवतावर न्यास असलेली 'यादो मे' तली 'गपध' संगती पुन्हा छान आणि 'ख्वाबो मे' तली 'धनीनीध..' ही सुरावट घेऊन बच्चनसाहेब ज्या रितीने पंचमावर स्थिरावतात ते केवळ सुरेख आणि कौतुकास्पद. हा पंचम अत्यंत सुरीला..!

'आपकी छब मे रहे..'

इथे 'आप की' शब्दातली पपम' संगती. हा तीव्र मध्यम यमनाची खुमारी वाढवतो, जादुई तीव्र मध्यम हा..! आणि 'छब मे रहे..' मध्ये हळूच लागलेला शुद्ध मध्यम आणि शुद्ध गंधारावरचा नाजूक न्यास! हा शुद्ध मध्यम आल्यामुळे मात्र आमचा यमन हळूच लाजतो आणि क्षणात त्याचा 'यमनकल्याण..' होतो. सांगा पाहू, कोणता बरं हा शुद्ध मध्यम? 'क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा..' ही ओळ आठवा पाहू क्षणभर. यातल्या 'मेळ' या शब्दात तुम्हाला हाच शुद्ध मध्यम सापडेल. हे आपले उगीच तात्यामास्तरांच्या शिकवणीतले दोन बोल, जे वाचक संगीताचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता बर्र् का! :)

'आठवणीत आणि स्वप्नात मी तुझ्याच 'छब' मध्ये राहतो गं बये. आता काय नी कसं सांगू तुला..!' :)

आणि ही बया तरी कोण..? तर साक्षात ड्रीमगर्ल हेमा. हो, आमच्या धर्मा मांडवकाराची हेमा! खरंच कमाल आहे बुवा या बाईची. इतकं वय झालं तरी अजूनही काय दमखमातली दिसते!


तर अशी ही दमखमातली हेमा आणि आमचा पिकल्या फ्रेन्च कट मधला गॉगल लावलेला बुढ्ढा जवान बच्चन यांच्यावरचं या गाण्याचं चित्रिकरणही छान. आणि सोबत बच्चनचा सादगीभरा सुरीला आवाज, छान सुरेल लागलेले यमनाचे स्वर आणि हाल ए दिल सांगणारे शब्द..!

विशाल शेखर, तुमचं अभिनंदन आणि कौतुक. अशीच चांगली चांगली गाणी, सुरावटी अजूनही बांधा रे बाबांनो. थांबू नका. हल्लीच्या काळात चांगलं सिनेसंगीत ऐकायला मिळत नाही. आम्ही भुकेले आहोत. चांगली चांगली गाणी बांधा, तुमच्या उष्ट्याकरता नक्की येऊ..!

-- तात्या अभ्यंकर.

October 26, 2011

मोरा गोरा रंग..

माझ्या सर्व मायबाप वाचकांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!

मोरा गोरा रंग.. (येथे ऐका)


थोरल्या बर्मनदांचं बंदिनी चित्रपटातलं एक अप्रतीम गाणं. दिग्दर्शक बिमलदा, गीत- गुलजारसाहेब, संगीतकार थोरले बर्मनदा, सोज्वळ सौंदर्यवती नूतन आणि मा दिनानाथरावांची थोरली हृदया, अर्थात लतादिदि मंगेशकर. (आपल्या महितीसाठी - दिदिचं पाळण्यातलं नांव - 'हृदया' हे होय.)

सगळी टीमच भन्नाट. फक्त आणि फक्त उत्कट कलेशी बांधिलकी असलेली. यातलं ना कुणी त्या बापुडवाण्या झी/सोनी वहिनीच्या उथळ इंडियन आयडॉलच्या स्पर्धेतलं, ना कुणी महागायक/महागयिका, महाराष्ट्राचा गौरव इत्यादी समस चा लाचारी जोगवा मागणर्‍या खेदजनक स्पर्धेतलं. तरीही सारेच अव्वल..!

मोरा गोरा अंग लइ ले
मोहे शाम रंग दइ दे
छुप जाऊँगी रात ही में
मोहे पी का संग दइ दे

एका तरुणीचं मनोगत. लइ ले आणि दइ दे ही क्रियापदं अगदी वळणदार..किती सुरेख शब्द आहेत या गाण्यात! हिंदी भाषेचा गोडवा काही औरच आणि त्यातले लइ दे, दइ दे, हमका बताइ दे इत्यादी उच्चार केवळ दिदिनेच करावेत..

एक लाज रोके पैयाँ
एक मोह खींचे बैयाँ

क्या बात है! जेवढा मोठा मोह, तितकीच मोठी अदब आणि संस्कार..! मोहाने बाही खेचली जातेय परंतु संस्कार पाउलांना थांबवताहेत..! 'एक मोह खिचे पैया' तल्या दिदिच्या कोमल गंधाराबाबत काही भाष्य करायला मी फार छोटा माणूस आहे! 'बैयाँ' शब्दातली 'नीसां' संगती केवळ लाजवाब. आणि त्यानंतरचं दिदिचं 'हाए..!'

असं 'हाए' गेल्या दहा हज्जार वर्षात झालं नाही आणि पुढे होणार नाही..! (जाता जाता - तेच 'हाए' अनुराधा या अप्रतीम चित्रपटात पं रवीशंकरांनी दिदिच्या 'कैसे दिन बिते कैसे बिती रतिया..' या गाण्यात घेतलं आहे!)



जाऊँ किधर न जानूँ
हम का कोई बताई दे

'जाऊँ किधर न जानूँ..' या ओळीतलं कोमल निषाद आणि शुद्ध धैवताचं तसं अनोखं परंतु छान अद्वैत..आणि त्याच नीध चं 'हम का कोई बताई दे' या ओळीनं पंचमावर न्यास करून केलेलं छान समाधान..!

बदरी हटा के चंदा
चुप के से झाँके चंदा

हम्म! इतका वेळ ढगाआड लपलेला चंदा आता हळूच त्या मुलीचं मनोगत ऐकायला आला आहे. प्रकट झाला आहे.

तोहे राहू लागे बैरी
मुस्काये जी जलाइ के

पण तिला ते तेवढंसं आवडलेलं नाहीये. तिच्या चेहेर्‍यावरचा तो लटका राग केवळ क्लास! आणि मग 'तोहे राहू लागे बैरी..' असं म्हणून त्या चंद्राला 'तुझ्यामागे राहूचं शुक्लकाष्ट लागो..' अशी दिलेली प्रेमळ धमकी!

आपले गुलजारसाहेब शनीच्या ऐवजी बहुधा राहूला अधिक घाबरत असावेत. म्हणूनच ते नायिकेकरवी चंद्राच्या मागे चक्क राहूची पीडा लावू इच्छितात..! :)

कुठे अवखळपणा तर कुठे थोडा नखरा, कुठे लटकेपणा तर कुठे 'मोहे पी का संग..' किंवा 'तोहे राहू लागे बैरी..' तली मनलुभावणी मेलडी. एखादं गाणं किती देखणं असावं, सुरेख असावं..?

कहाँ ले चला है मनवा
मोहे बाँवरी बनाइ के

क्या केहेने! इथे किती मोठी गोष्ट सांगून गेलेत गुलजारसाहेब! प्रत्येक तरुणीच्या आयुष्यात असं एक वेडं वय येतं जेव्हा कुणीतरी भेटावसं वाटतं, कुणासोबततरी हातात हात धरून कुठेसं जावसं वाटतं. मस्त वार्‍यावर फडफडणारं मन. अगदी खरोखर 'बाँवरी' बनवणारं ते वय..!

मंडळी, एखादं गाणं आपल्याला ऐकायला आवडतं, कानांना गोड वाटतं. परंतु मी इथे इतकंच सांगेन की आपण त्याही पुढे जाऊन त्या गाण्याकडे कसं बघतो, त्यातल्या स्वरसंगती, न्यासस्वर, लयतालाची बाजू, त्यातले शब्द अन् त्याची चाल कशी समजून घेतो हेही महत्तवाचं आहे. त्यामुळे ते गाणं आपल्याला निश्चितच अधिकाधिक आनंद देऊन जाईल..

उगाच कुठेही गोंगाट नसलेला कमीतकमी वाद्यमेळ, सुंदर शब्द, वजनदार ठेका, तरीही अगदी भरपूर मेलडी असलेलं हे गाणं. नूतनची मोहक छबी आणि तिचा सहजसुंदर गाण्यानुरूप अभिनय. का माहीत नाही परंतु नूतनकडे बघताना मला उगाचंच आमच्या मुमताज जहान बेगम दहलवी 'आपा'ची आठवण झाली! :)

आता कुठे गेली हो अशी गाणी? खरंच, कुठे गेली..? :(

आहे तो केवळ बराचसा गोंगाट अन् मेलडीचा अभाव असलेले भडक वाद्यमेळ..!

असो..

-- (दिदिची व्यक्तिपूजा, विभूतीपूजा करणारा तिचा एक लोटांगणवादी चाहता) तात्या अभ्यंकर.

April 26, 2011

पिउनी अमृत, घेउनी संचित...!


पाखरा जा.. (येथे ऐका)
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थात पु लं. चित्रपटकार, नाटककार, व्याख्याता, साहित्यिक, एकपात्री, दाता, इ इ इ असलेला एक अफाट खेळिया. परंतु या छोटेखानी लेखाचा संबंध संगीतकार आणि गायक पुलंशी आहे..
'गमपसां धसां' असा आलाप असलेली गाण्याची सुरवात. 'जा' या अक्षरावरचा सुंदर निषाद. गमम, गमधप रेसा या स्वरावलींनी पूर्ण होणारे 'प्रेमळ, शीतल छाया..' हे शब्द. सारंच अतिसुंदर! नंद रागाचा भक्कम बेस असलेलं हे गाणं. मुळातच या गाण्याचा असलेला नंदसारख्या अत्यंत प्रसन्न रागाचा मुखडाच मन प्रसन्न करून जातो. राग नंद, छान-सुंदर अध्धा ताल, पुलंचा लडिवाळ आवाज, आणि तेवढीच उच्च गायकी. फारा वर्षापासून लिहायचं होतं मला या गाण्यावर..!
हे गाणं ऐकताना खरंच खूप कौतुक वाटतं पुलंचं. कारण हे गाणं ऐकायला जितकं साधं-सोपं वाटतं तेवढंच ते गाण्याकरता तसं सोपं नाही. पुलंच्या अनोख्या आणि उच्च दर्जाच्या गायकीचं दर्शन होतं आपल्याला. उभ्या महाराष्ट्राचं आणि खास करून पुलंचं दैवत असलेल्या नारायणराव बालगंधर्वांचे संस्कार आणि त्यांची गायकी आपल्याला पुलंच्या या गाण्यात पुरेपूर दिसते. सुरेलपणा, लडिवाळपणा ही बालगंधर्वांच्या गायकीची ठळक वैशिठ्ये आणि तीच आपल्याला पुलंच्या या गायकीत दिसतात. नारायणराव बालगंधर्वांचा प्रभाव कुमारजी, मन्सूरअण्णा, भीमण्णा यांच्यासारख्या भल्याभल्या गायकांवर झाला; पुलंही त्याला अपवाद नाहीत.
प्रेमळ, शीतल छाया हे शब्द अगदी खास करून कान देऊन ऐकण्यासारखे. कुठेही उगाच खटका नाही, आघात नाही. 'छाया' शब्दातलं 'छा' हे अक्षर आणि त्या उच्चार अगदी मुद्दाम आवर्जून ऐकण्यासारखा..! नारायणराव असते तर त्यांनी 'छाया' हा शब्द अगदी अस्साच म्हटला असता!
हरितात्या मला सांगत होते,
"अरे हा पुरुषोत्तम पक्का गवई बरं का! गिरगाव ब्राह्मण सभेतल्या हरी केशव गोखले हॉलमध्ये असे आम्ही गाणं ऐकायला बसलेले. आमच्या शेजारी कोण बसलं होतं सांग पाहू? साक्षात नारायणराव बालगंधर्व! आणि हा देशपांड्यांचा पुरुषोत्तम गात होता. नारायणराव थक्क होऊन त्याचं गाणं ऐकत होते आणि तुला सांगतो तात्या, 'प्रेमळ शीतल छाया..' हे शब्द घेऊन पुरुषोत्तम 'पाखरा जा..' च्या समेवर असा काही आला की नारायणरावांच्या डोळ्यात पाणी आलं हो! ते म्हणाले, 'देवा, पुरुषोत्तमा, काय सुरेख समेवर आलास..!'
'खोटं नाही, अगदी पुराव्याने शाबीत करीन..!' Smile
पसरले विश्व अपार..
भेदुनी गगनाला बघुनी ये देवलोक सारा
पिउनी अमृत, घेउनी संचित
परतुनी ये घरा..!
सुंदर शब्द, सुरेख अर्थ..!
रे पाखरा, नंदच्या स्वरांवर स्वार हो झकासपैकी, आणि घे पाहू भरारी या अफाट पसरलेल्या विश्वात! नंदची लडिवाळता, प्रसन्नता तुला साथ करील. जा जरा देवलोकात आणि त्यांनाही ऐकव जरा नंद! त्या बदल्यात परत घेऊन ये देवलोकातलं ते अमृताचं संचित..!
व्वा भाईकाका, 'भेदुनी गगनाला..' हा अंतरा रंगवतानाची तुमची गायकी मस्तच, अगदी कसदार! खरं सांगतो भाईकाका, तुम्ही खरे तर एक उत्तम गवईच व्हायचात. अजून काही काळ हिंदुस्थानी गायकीत पर्फॉर्मर म्हणून का नाही रमलात? अगदी भीमण्णांसारखा बडा ख्यालिया राहू देत परंतु मध्यलयीतल्या काही प्रचलित, अप्रचलित रागरागिण्या का नाही रंगवल्यात? अजून काही काळ तालिम का हो घेतली नाहीत कागलकरबुवांकडून, मंजिखांकडून वा मन्सूरअण्णांकडून? बेळगाव लौकर सोडलंत म्हणून, की लेखनामध्ये आणि एकपात्रीमध्येच अधिक रमलात म्हणून? Smile
असो. तरीही खूप बरं वाटलं ती नंदतली तुमची लै भारी गायकी ऐकून. जीव तृप्त झाला. तुमच्या स्वभावानुसार एखाद्याला अगदी सहज प्रेमाने पाठीवर हात ठेऊन काही सांगावं, त्याच साधेपणानं आणि त्याच सात्त्विकतेनं तुम्ही पाखराशी साधलेला संवाद मनापासून आवडून गेला.
अजून काय लिहू? तुम्ही आयुष्यभर नारायणरावांच्या, मन्सूरअण्णांच्या गायकीचं भरभरून कौतुक केलंत. पण आज म्या पामराने तुमच्या गायकीचं हे मनमोकळं कौतुक करण्याचं हे धाडस केलं आहे, तेवढं गोड मानून घ्या इतकंच सांगायचं होतं..!
तुमचा,
तात्या.

March 28, 2011

नाविका रे...

नाविका रे, वारा वाहे रे,
डौलाने हाक जरा आज नाव रे..
(येथे ऐका)
 हे सांगतांना त्या नविकाबद्दल एक विश्वास आहे. जणू काही तो नाविक कुणी माहेरचाच मनुष्य आहे, ज्याला विश्वासाने काही सांगावं!
डौलाने हाक जरा आज नांव रे..!
मग? मला जायचंय पैलतिरी असलेल्या माझ्या घरी! छान वारा वाहतोय, सुंदर मूड आहे. मनी एखादी आस असली तरी सुंदर मूड तयार होतो, अन् त्या मुडातूनच मनीचं गुज सहजासहजी असं ओठांवर येतं, एखाद्या नाविकासमोर उघड होतं!
मग नाव कशी हाकायला हवी? डौलानेच ना? 
त्यामुळे 'डौलाने हाक जरा आज नांव रे..' ही ओळही तशीच डौलदार वाटत. ज्या डौलाने नाव हाकणं अपेक्षित, तोच डौल त्या ओळीतही! की त्या ओळीतल्या डौलामुळे नाव खरोखरच डौलदारपणे हाकायला हवी हे पटतं? की हेच गाण्याचे शब्द अन् त्याची चाल यांचं अद्वैत?
सांजवेळ झाली आता पैल माझे गाव रे..!
'पैल माझे गाव रे..' हे सागताना 'अरे समजून घे रे जरा, तीन सांजा झाल्या अन् पैलतीरी असलेल्या माझ्या गावाला मला लौकर जायचंय रे.. अशी समजावणी, एक आर्जव! आणि कुण्या जवळच्या सुहृद मित्राला सांगावं असा विश्वास..! एका नाविकाचं आणि स्त्री प्रवाश्याचं इतकं सुंदर नातं असू शकतं? धाकल्या दिरासारखं किंवा पाठच्या भावासारखं!
आषाढाचे दिसं गेले, श्रावणाचा मास सरे, भादवा आला
माझा राऊ मनामंदी बोलुनि गेला
धाव घेई बघ माझे मन, नाही त्याला ठाव रे...!
काय संवाद साधला माझ्या राऊनी माझ्यापाशी? आता तो संवाद त्या नाविकाला सांगायचाय! 'पैल माझे गाव रे..' ह्या आर्जवाने त्याला कधीच आपलासा केलाय! मग आता मनातल्या राऊचे संवाद त्याला सांगायला काय हरकत आहे अशी एक स्वाभाविकता..!
आषाढ गेला, श्रावण गेला अन् आता भादवा आला! भादवा हा शब्द असा गाऊन ठेवलाय की त्या एका शब्दात आषाढ आणि श्रावणाची प्रतिक्षा उभी केली आहे! आषाढ-श्रावणातली ती मौनप्रतिक्षा अखेर झालीच शेवटी प्रकट भादवा या शब्दातून..! 
एक म्हणणं मांडलं आहे 'भादवा' ह्या शब्दातून..!
आणि आता नावेत बसल्यावर अवचित त्या नाविकासमोर आषाढ-श्रावणातला विरह ओठी आला आहे!
भादवाही येऊन उभा राहिला आहे त्यामुळे आता पुढल्या अश्विनातलं शरदाचं चांदणं अन् अश्चिनातल्या पौर्णिमेची आस आता चांगलीच जाणवू लागली आहे! आता नाही धीर धरवत..!
नेमकं हेच जाणवतं का हो 'धाव घेई बघ माझे मन, नाही त्याला ठाव रे...!' या ओळीतनं? Smile
असो..

एक हृदयाला हात घालणारं गाणं! एखाद्या सर्जनशील, संवेदनशील चित्रकराला हे गाणं नुसत ऐकून हातात कुंचला घ्यावासा वाटेल आणि त्याच्या कॅन्व्हासवर डौलाने जाणारी ती छानशी शिडाची होडी उतरेल, मंद वारा वाहणारी ती सांजवेळ उतरेल.. त्या चित्रात पार्श्वरंग असतील भादवा आला ह्या म्हणण्याचे आणि असेल एक ओढ लगोलग येऊ घातलेल्या अश्विनातली...!
-- तात्या अभ्यंकर.

March 22, 2011

सजदा..

माय नेम इज खान सिनेमातलं एक वेगळंच गाणं. सुफी संगीताची पार्श्वभूमी असलेलं..
(येथे ऐका)

रोम रोम तेरा नाम पुकारे
एक हुए दिन रैन हमारे..

मिश्र खमाज म्हणता यावा अशी गाण्याची खानदानी सुरवात. (चूभूदेघे.)

'सजदा..'

ख्यालसंगीताची उत्तम बैठक असलेला राहत फतेचा आणि रिचा शर्माचा अविष्कार. आवाजाची जात, फेक ही सारी सुफी गायकीत जमा होणारी. सुरवतीची बोल आलापी संपल्यानंतर गाणं छानशी लय पकडतं..

तेरी काली अखियोसे जिंद मेरी जागे
धडकन से तेज दौडू सपनो से आगे..

शब्द आणि त्यांचा लहेजा उत्तमच..

अब जा लुट जाए
ये जहा लुट जाए..

यातली 'जहा' शब्दावरची जागा आणि गायकी खानदानी..! इथून पुढे गाणं केरव्याची छान लय पकडतं...

'संग प्यार रहे मै रहू ना रहू...'

या ओळीतली सुरावट म्हणजे या गाण्याचा प्राण, त्याचं मर्मस्थान. 'संग..' शब्दातली 'रेम'म' संगती आणि 'रहू ना रहू..' मधली 'रेग, गमधपरेसा..' ही संगती केवळ अप्रतिम..! त्यानंतरचा 'सजदा..' चा कोरसही सुरेख. त्याच्या पार्श्वभूमीवरील सजदा शब्दाची तार शड्जाशी संगती करणारी बोल आलापी आणि गायकी उत्तमच..
रिचा शर्मा या गायिकेची जोडही उत्तम. बाईनं खानदानी आवाज लावला आहे. नक्कीच सुरेल आहे. ही दुगल गाण्याला आवश्यक आणि तेवढीच शोभूनही दिसणरी..

एकंदर पाहता गाण्याला लाभलेली अभिजात गायकीची बैठक नक्कीच कौतुकास्पद आहे..शंकर एहेसान लॉयचं कौतुक वाटतं..

रांझणा नैनो के तीर चल गये
साजना सासो दिल सिल गये..

यातला शुद्ध मध्यम नेहमीप्रमाणेच अद्भूत आणि सुख देणारा..



शाहरुख हा इसम आवडतो मला. लेकाचा तसा प्रो मुस्लिम आणि पाक-धार्जिणा वाटतो पण आवडतो मला. हा प्राणी टॅलेन्टेड आहे हे माझं मत. आणि आमच्या तनुजाच्या काजोलबद्दल काय बोलू? लै आवडते ती मला. हल्लीच्या नट्यांपैकी अभिनयाच्या बाबतीत एक तब्बू मला पयला नंबरवर आवडते आणि त्यानंतर काजोल. काजोलच्या चेहेरा विलक्षण बोलका आहे. तिचे यजमानही मला आवडतात. गंगाजल मध्ये छान काम केलं होतं त्यांनी..!

असो, सिनेमाच्या गप्पा पुन्हा केव्हातरी. तूर्तास सजदा हे गाण ऐका. छानच गाणं आहे..

-- तात्या अभ्यंकर.

February 21, 2011

याचे करू आता काय मला सांग.. :)



जरा वेडासा खुळासा पण साधासा भोळासा......
..................याचे करू आता काय मला सांग.. (येथे ऐका)

काही गोष्टी घडतात तेव्हा कुणा एका व्यक्तिचं नव्हे, कुणा एका प्रांताचं, राज्याचं, देशाचं नव्हे, सार्‍या विश्वाचं नव्हे, एखाद-दुसर्‍या आकाशगंगेचं नव्हे तर सार्‍या अंतराळाचंच भाग्य उजळून निघतं. यमनचा जन्म झाला तेव्हा नेमकं हेच झालं..!

'गलगले निघाले' मधला जरा वेडासा खुळासा पण साधासा भोळासा भरत जाधव. त्याच्या प्रेमात पडलेली केतकी थत्ते. आणि मग या भरतच्या वर्णनाचं स्वरचित्र रेखाटताना अशोक पत्कींना आधार मिळतो यमनचा आणि एक छोटेखानी, जलद लयीचं नितांत सुंदर गाणं जन्माला येतं..!

बोले मनातील भाषा, याचा थोडासा हा लोचा, याचे करू आता काय मला सांग..!

गरे नी़नी़नी़ रे गरे , गरे म'म'म'म'म'म' म'धनीरेंनीध गरेगरेसा..!

तुम्ही अण्णांचा एखादा 'नामाचा गजर गर्जे भीमातीर.'. सारखा अभंग घ्या किंवा बाबूजींच्या 'समाधी साधन संजीवन नाम..' सारख्या लै भारीतल्या भारी ओळी घ्या.. किंवा मग '....याचा थोडासा हा लोचा याचे करू आता काय मला सांग..' या ओळी घ्या; आपला यमन सगळ्यांना पुरून उरतो हो. अक्षरश: त्या गाण्याचं सोनं करतो..!

'याचे करू आता काय मला सांग..' ची ' म'धनीरेंनीध गरेगरेसा..' ही संगती केवळ क्लास, त्यातलं कौतुक क्लास..! अगदी आपली वाटते ही संगती. वैशाली सामंतने छान गायलं आहे हे गाणं..

यमनासोबतच या गाण्यातली जलद लय मला फार आवडली.. पुढे छानसं यमनचं इंजिन आणि त्याला जोडलेले शब्दास्वरांचे रंगीबेरंगी डबे; अशी ती गाडी छोटी छोटी वळणं घेत मस्त चालली आहे असं वाटतं..हास्य

मन नितळ नितळ
नाही इतरासारखे
नाही मनामध्ये पाप मुखी राम राम..!

' मुखी राम राम..!'

आला..! शुद्ध मध्यम आला...!

' नाही मनामध्ये पाप मुखी राम राम..' या ओळीत शेवटी येणारा शुद्ध मध्यम केवळ अद्भूत..! शुद्ध मध्यमाबद्दल मी बापडा काय बोलणार..? मला अद्याप नीटसा कळलेलाच नाही हा स्वर..! हास्य

एकंदरीत खूप बरं वाटतं हे गाणं ऐकून, खूप प्रसन्न वाटतं..!

गाण्याचं चित्रिकरणही मस्त. आणि केतकी थत्ते..?

मला जर कुणी विचारलं की सार्‍या अंतराळात छान, सुंदर, सुरेख, झकास, फक्कड दिसणारी मुलगी कोण, तर मी क्षणात केतकी थत्ते हे उत्तर देईन..!हास्य



केतकी, जियो..! हास्य

-- तात्या अभ्यंकर.

January 13, 2011

मकरसंक्रांती पेश्शल - प्पत्तंग उडवीत होते..! :)


राम राम मंडळी,

सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा.

तीळगुळ घ्या अन् ग्वाड बोला..!

मकरसंक्रांती दाराशी उभी आहे. या दिवसाचं आणि पतंग उडवण्याचं काही वेगळंच नातं. खास करून अहमदाबाद आदी गुज्जू शहरात याचं खास महत्व. त्या मानाने आपल्या महाराष्ट्रात कमी. परंतु या पतंग उडवण्यावर मात्र एक झक्कास लावणी आपल्याकडे आशाताईंनी गाऊन ठेवली आहे.

प्पत्तंग उडवीत होते..!
(कृपया येथे ऐका)

च्यामारी, सुरवातच लै ठसकेबाज आहे. उच्चारी अगदी प ल प आणि त ल त जोडलेला आहे. लावणीच्या सुरवातीलाच 'पतंग' हा शब्द असा काही पडला आहे की क्या बात है..! मंडळी, अगदी गंमत म्हणून तुम्हीच गुणगुणून पाहा. आधी नुसतं 'पतंग उडवीत होते..' हे गुणगुणा. अगदी मिळमिळीत मुगडाळ खिचडीची चव लागेल. परंतु त्यानंतर लगेच 'प्पत्तंग उडवीत होते..' हे म्हणून पाहा.. झणझणीत, ठसकेबाज मिसळीची मजा येईल..! Smile

पतंग शब्दाचा 'प्पत्तंग' हा उच्चार हे या लावणीचं मला भावलेलं मर्मस्थान..! गाणं ऐकावं हे अर्थातच महत्वाचं, परंतु ते कसं एकावं हे अधिक महत्वाचं..!

चढाओढीनं चढवीत होते,
गं बाई मी प्पत्तंग उडवीत होते..!

आहाहा काय साला सीन आहे..!

'चढाओढीनं चढवीत होते..!'

मंडळी, आणा पाहू डोळ्यासमोर, एक झक्कास मर्‍हाटमोळी ठसकेबाज बया, नऊवारीबिव्वारी नेसून मस्त मोकळ्या हवेत प्पत्तंग बदवते आहे, चढवते आहे. मोप वारं सुटल आहे तिच्यायला. बाईचा पदर मस्त वार्‍यावर फडफडतो आहे, कपाळावर जीवघेणी बट मस्त खेळते आहे अन् बाई प्पत्तंग उडवत आहे..!

किती कौतुक करावं गदिमांचं आणि आशाताईंचं..!

होता झक्कास सुटला वारा
वर प्पत्तंग अकरा बारा
एकमेकांना अडवीत होते..

डोळ्यासमोर अक्षरश: चित्र उभं करण्याचं कसब तो देशस्थ रांगडा गडी गदिमाच करू जाणे..!

काटाकाटीस आला गं रंग
हसू फेसाळे घुसळीत अंग..!

आता प्पत्तंग उडीवतांना काटाकाटी ही चालायचीच की राव. नायतर काय मजा? Smile

दैव हारजीत घडवीत होते.!

मंडळी, हे आमचे अण्णा माडगुळकर. 'दैवजात दु:खे भरता..' लिहिणारे हेच अण्णा मडगुळकर..!

दैव काय अन् नियती काय..! तिथे जीत कमी. त्या मानाने हारच जास्त..!

मंजूर हाय आमास्नी ही हारजीत...!

काटाकाटी होईल. त्यात कदाचित आपला पतंग गूल होईल, काटला जाऊन झोकांड्या खाईल..!

दैव हारजीत घडवीत होते

तरीही,

प्पत्तंग उडवीत राहिलं पाहिजे, हेच महत्वाचं..!

-- तात्या अभ्यंकर.

December 23, 2010

(४३) - आलो कुठून कोठे..


(येथे ऐका)
'आलो कुठून कोठे..' - नीधनीसां.. 
या संगतीने किंचितशी 
मल्हाराची आठवण करून देणारी सुरवात..परंतु पुढच्याच 'तुडवीत पायवाट..' ची 'मधध' ही संगती मल्हाराची पायवाट सोडून अचानक शहाण्यात (शहाणा कानडा) शिरते तेव्हा त्या बदललेल्या पायवाटेचं कौतुक वाटतं.. कानांना सुखावतं ते शहाण्यातलं वळण..!

काटे सरून गेले..उरली फुले मनात..! - यातला शुद्ध रिखभ आश्वासक वाटतो. पायवाटेत भेटलेले काटे सरून गेले. त्याचं आता दु:ख नाही.. मनात उरली आहेत ती फक्त त्या वाटेवरली फुलं..!

प्रत्येक पाउलाचे होते नवे इशारे..
सार्‍या ऋतूत लपला हृदयातला वसंत..!


गाण्याचा अंतराही छान. 'तू तिथे मी..' चित्रपटातले आयुष्यभर नौकरी करून, सोबत सार्‍या सांसारिक जिम्मेदार्‍या पार पाडून निवृत्त झालेले मोहन जोशी - ऊर्फ नाना आता निवांतपणे आरामखुर्चीत विसावले आहेत. सुहास जोशी ही त्यांची 'अगं..' देवापाशी काहीबाही पोथी वाचत बसली आहे. आता अगदी कृतार्थ आहेत म्हातारा-म्हातारी..! Smile

संगीतकार आनंद मोडकांचं हे एक छोटेखानी गाणं. गाण्याची चाल अगदी मोकळी परंतु तितकीच सुरेख. छान जमलेला अध्ध्या त्रितालाचा ठेका. गाण्यातली संतूरही अगदी प्रसन्न..! शेवटी काय हो, ' काटे सरून जाऊन मनात फुलं उरणं हेच महत्वाचं..!

-- तात्या अभ्यंकर.

December 22, 2010

कृष्णा नी बेगने..

कृष्णा नी बेगने..(येथे ऐका)

(हे माझं रसग्रहण हे मूलत: गाण्याच्या सांगीतिक भागावर आहे..काही वर्षांपूर्वी एकदा अण्णांशी निवांतपणे संवाद साधायची संधी मिळाली होती.. बोलताना अण्णांनी मला 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' आणि 'कृष्णा नी बेगने..' या कन्नड गाण्यांचा मराठीत अर्थ समजावून सांगितला होता, तो पुसटसा आठवतो आहे, तसा लिहितो आहे. येथे कुणी कन्नड जाणणारा/जाणणारी असल्यास मी जे कानडी शब्द लिहिले आहेत, आणि पदाचा जो अर्थ लिहिला आहे त्यात अवश्य सुधारणा करावी. त्याचं स्वागतच आहे..)

कानडी भाषेतलं कृष्णावरचं फार सुंदर गाणं.. व्यासतीर्थांची रचना.. यमुना कल्याणी रागातलं.. कर्नाटक-संगीतातला यमुना कल्याणी, आपल्या हिंदुस्थानी संगीतातला यमन कल्याण! दाक्षिणात्य गायिका चित्राने गायलं आहे हे गाणं..

साजूक तुपातली मिठाई तीच.. यमनची! फक्त बॉक्सेस वेगवेगळे! :)

'कृष्णा नी बेगने बारो' - रे कृष्णा इकडे (माझ्याकडे ) ये रे लवकर..!

'ष्णा' अक्षरावरच्या शुद्ध गंधारात अक्षरशः देवत्व आहे.. साक्षात श्रीकृष्णच वस्ती करून राहिला आहे त्या स्वरात.. किती कौतुक आहे त्या 'कृष्णा' शब्दात.. किती गोडवा आहे! एखादी आई आपल्या लाडक्या लेकाला ज्या ममत्वाने हाक मारते तेच ममत्व या 'कृष्णा' च्या स्वरात आहे.. फक्त दोनच स्वर - सा आणि ग!
'बेगने बारो..' तल्या 'बारो' शब्दावरची 'प रे' संगती म्हणजे अगदी ऑथेन्टिक यमन! :)

'बेगने बारो मुखवन्ने तोरो' - रे कृष्णा लौकर इकडे ये रे आणि मला तुझं मुखावलोकन करू दे..

खूप छान गायली आहे ही ओळ.. ह्यातल्या शुद्ध मध्यमाबद्दल मी काय बोलावं? यमनकल्याणातल्या शुद्ध मध्यमाबद्दल मी काय बोलावं? इतकंच सांगेन की तो शुद्ध मध्यम म्हणजे यमनाच्या गालावरचा सुरेखसा तीळ! हवं तर आपण त्याला बाळकृष्णाच्या गालावरील तीट म्हणू.. जी असते दृष्ट लागू नये म्हणून, कुठलंही अमंगल टाळण्याकरता असते ती.. परंतु ती तिट स्वत: मात्र अतिशय पवित्र.. सुमंगल आणि देखणी! तसा आहे यमनकल्याणातला शुद्ध मध्यम! :)

'बेगने बारो' गाताना चित्राने 'ध़नी़रेग..' ची एक सुरावट अशी घेतली आहे की नारायणरावांच्या 'नयने लाजवीत..' पदातल्या 'जणु धैर्यधर धरित धनदासम धन' मधल्या 'धनदासम' ची आठवण व्हावी! :)

काशी पितांबर कैयल्ली कोळलू
मीयोळू पुसिद श्रीगंध घमघम..



रे कृष्णा, तू सुरेखसं काशीचं केशरी पितांबर नेसला आहेस आणि तुझ्या हातात बासरी आहे..चंदनलेपाने अभ्यंगित अशी तुझी कांती आहे!..

मंडळी, हे अभ्यंग चंदनलेपाचं नव्हे, ते आहे यमनकल्याणच्या स्वरांचं.. काशीच्या भरजरी केशरी कदाचं जे सौंदर्य, तेच सौंदर्य यमनकल्याणचं..! :)

तायिगे बायल्ली मुज्जगवन्ने तोरिद
जगदोद्धारक नम्म उडुपीय श्रीकृष्ण..

कृष्ण, ज्याने बालपणी आपल्या मातेला आपल्या मुखात सार्‍या विश्वाचं दर्शन घडवलं होतं, असा सार्‍या जगाचा उद्धार करणारा असा उडुपीचा श्रीकृष्ण!



कृष्णाने सार्‍या जगाचा उद्धार केला आहे की नाही ते माहीत नाही, परंतु हिंदुस्थानी रागसंगीताचा प्रसाद वाटून सार्‍या संगीत रसिकांचा मात्र त्याने उद्धार केला आहे.. आपलं रागसंगीत हे त्यानं आपल्या पदरी घातलेलं सर्वात मोठं दान!

असो,

कन्नड भाषेतलं हे फार सुंदर गाणं.. याचं हरिहरनने फ्यूजन केलं आहे तेही खूपच सुंदर आहे.. येशूदासही सुंदर गातो हे गाणं..

सदरच्या ध्वनिफितीत चित्रानेही हे गाणं अगदी मन लावून गायलं आहे.. सोबतची बासरी आणि सतारदेखील खूप छान! बरं वाटतं हे गाणं ऐकून, समाधान वाटतं, पवित्र वाटतं, मंगल वाटतं..! हे देणं देवाघरचं, हे स्वरसामर्थ्य यमनकल्याणाचं..!

अण्णांशी जेव्हा या गाण्याबद्दल बोललो तेव्हा अर्थ सांगताना अण्णांनीही सहजच गुणगुणलं होतं हे गाणं. पण अक्षरश: शब्दातीत गुणगुणलं होतं..! फक्त माझ्यासाठी.. मी एकटा श्रोता, त्या अलौकिक स्वरांचा साक्षीदार!
अहो, सबंध गाणं तर सोडाच.. अण्णांनी सुरवातीचे नुसते 'कृष्णा नी ' हे शब्द गायले आणि मी जागीच संपलो.. कल्पना करा - अण्णांचा आवाज आणि कृष्णा नी मधले षड्ज, गंधार! अक्षरश: शंखध्वनी, नादब्रह्म!



असो..
हा लेख मी त्या जादुगार कृष्णाच्या, कानडाऊ विठ्ठलू असणार्‍या आमच्या पांडुरंगाच्या आणि कानडाऊ भीमसेनूंच्या चरणी अर्पण करत आहे..

-- तात्या अभ्यंकर.