November 26, 2014

प्राणसाहेब..

संगीतक्षेत्रातले भीमण्णा, बाबूजी, पंचमदा आणि सिनेक्षेत्रातले दादामुनी, प्राणसाहेब, हृषिदा, ओमप्रकाश, उत्पल दत्त, हंगलसाहेब यांचं जाणं मी कधी पचवूच शकलो नाही.. रोज ही कुणी ना कुणी मंडळी माझ्यासोबत असतात..माझी छान सोबत करतात..!

प्राणसाहेब जायच्या फक्त एक महिना आधी मी एक पोस्ट लिहिली होती.. आज प्राणसाहेबांची खूप आठवण येते आहे म्हणून ती पोस्ट पुनर्प्रकाशित करत आहे..आदल्या दिवशीच मी प्राणसाहेबांना भेटून आलो होतो..

-----------------------------------------------------------------------------------------------------------

(पुनर्प्रकाशित)

माझा जुन्यात रमण्याचा स्वभाव मला स्वस्थ बसू देत नाही..

काल पुन्हा एकदा काही कामाकरता खारला जाणे झाले आणि अक्षरशः माझ्या नकळतच माझे पाय युनिअन पार्काकडे वळले..

२५ युनिअन पार्क, खार. प्राणसाहेबांचं निवासस्थान..

मला नाही वाटत भीड. फार तर काय होईल, हाकलून लावतील ना? फाशी तर देणार नाहीत? प्रत्येकाच्या काही अडचणी असतात, त्यामुळे प्रत्येकाने मला भेटलंच पाहिजे आणि न भेटलं तर त्यांनी माझा फार मोठा अपमान वगैरे केला असं मी मुळीच मानत नाही.. पण नशीब बलवत्तर असेल तर मात्र भेटता येतं माझ्या आवडीच्या काही आसामींना..

काल असंच झालं. इमारतीखालच्या वॉचमनने पहिला अपमान केला. तरीही त्याला मी हट्टाने प्राणसाहेबांच्या घरी इंटरकॉम जोडायला सांगितला. त्यांची मुलगी होती फोनवर. 'मी प्राणसाहेबांचा एक सामान्य चाहता आहे, दुरून आलो आहे. मला फक्त २ मिनिटं त्यांना भेटू दिलंत तर मेहेरबानी होईल. मी त्यांच्या पाया पडून लगेच जाईन..' असं मी सांगितल्यावर तिने अगदी थोडे आढेवेढे घेत मला घरी यायची परवानगी दिली..

प्राणसाहेब काल खूपच थकलेले वाटले. त्यांना थोडे बसते करून ठेवले होते. अगदी हळू आवाजात जेमतेमच बोलत होते.

'तुमचा एक चाहता तुम्हाला भेटायला आला आहे..' असं मुलीने त्यांच्या जवळ जाऊन सांगितल्यावर त्यांनी हातानेच मला जवळ बसायची खूण केली..

त्यांच्या थकलेल्या चेहेर्‍यावर हास्य उमटलं.त्यांनी प्रेमाने माझ्या पाठीवरून हात फिरवला.. विलक्षण समाधान मिळालं..!

तब्येत कशी आहे वगैरे जुजबी बोललो.

'अभी थोडे फ्रेश लग रहे है.. आप बैठिये थोडी देर. कोई बात नही..'

असं मला त्यांची मुलगी पिंकी भल्ला म्हणाली..

पण मी त्यांच्याशी काय बोलणार? शेवटी काहितरी बोलायचं म्हणून मग मीच त्यांना त्यांनीच एकदा सांगितलेल्या आठवणीची याद दिली आणि प्राणसाहेबांच्या चेहेर्‍यावर पुन्हा एकदा समाधानाचं हास्य पसरलं..

'हम सब चोर है..' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानची गोष्ट. त्यात शम्मी कपूर आणि प्राणसाहेब होते. चित्रीकरण सुरू असताना एके दिवशी ईस्ट बंगाल आणि मोहन बगान (चूभूदेघे) असा फुटबॉलचा सामना होता. शम्मी कपूर आणि प्राण, या दोघांनाही तो सामना बघायचा होता म्हणून त्यांनी त्या चित्रपटाचे निर्माते शशधर मुखर्जी यांच्याकडे चित्रीकरण सोडून जाण्याची परवानगी मागितली. मुखर्जींनी ती नाकारली..

"फुटबॉल वगैरे काही नाही.. तुम्ही चला. दिग्दर्शक जोहर तुम्हाला दृष्य समजावून सांगेल. मी एक काम आटपून येतोच आहे..."

परंतु शम्मी कपूर आणि प्राणसाहेबांनी मनोमन काय ते ठरवलं..

त्यानंतर शम्मी कपूर धावत येऊन एका टेबलावरून उडी मारतो असं एक दृष्य चित्रीत करायचं होतं..

ठरल्याप्रमाणे शम्मी कपूर धावत येऊन उडी मारतो आणि बेशुद्ध पदल्याचं नाटक करतो..

'अरे क्या हुआ? बेहोश हो गये.. इसे मै अभी के अभी अस्पताल लेके जाता हू..' असं म्हणत प्राणसाहेबांनी बोंबाबोंब केली आणि घाईघाईत शम्मी कपूरना घेऊन ते तिथून गाडी घेऊन जे निघाले ते थेट फुटबॉलचा सामना पाहायला मैदानात पोहोचले..मोहन बगानचा सामना सुरू होता..

पण थोड्याच वेळात त्या गर्दीत प्राणसाहेबांच्या खांद्यावर हात पडला. वळून बघतात तो ते शशधर मुखर्जी स्वत:च होते. प्राणसाहेब, शम्मी कपूर आणि शशधर मुखर्जी तिघेही दिलखुलास हसले आणि पुढचा सामना पाहू लागले..

हा खूप जुना म्हणजे १९५४/५५ च्या आसपासचा किस्सा. पुढे हाच किस्सा हृषिदा, अर्थात हृषिकेश मुखर्जींना कळला आणि त्यांनी आपल्या पद्धतीने हाच किस्सा गोलमाल चित्रपटात वापरला.

अमोल पालेकर 'आईला बरं नाही..' अशी उत्पल दत्तला थाप मारून फुटबॉलचा सामना बघायला जातो. उत्पल दत्तही त्या सामन्याला आलेला असतो तिथे त्याला अमोल पालेकर दिसतो. पुढे आपलं बिंग फुटू नये म्हणून मग अमोल पालेकर जुडवा भाईचं नाटक करतो ही कथा आपल्या सर्वांनाच माहित आहे..

काल मी ह्या किश्श्याची प्राणहेबांना याद दिली आणि खरंच खूप खुलला त्यांचा चेहरा..

त्यांना आता जास्त बोलवत नाही परंतु त्यांचा चेहरा आजही खूप काही बोलून जातो..

समोर ठेवलेली काजूकतली खाऊन झाली होती. आता निरोपाची वेळ. मी त्यांना नमस्कार केला आणि निघालो. तर त्यांनी त्या काजूकतलीच्या प्लेटकडे पाहून मला खूण केली..

"माझ्यातर्फे अजून थोडी काजुकतली खा..असं ते म्हणताहेत" - त्यांची मुलगी मला म्हणाली..

मी प्लेटमधला अजून एक तुकडा उचलला आणि प्राणसाहेबांनी थंब्सअप ची खूण करत फक्त 'जियो..!' इतकंच म्हणाले..!



परतीच्या वाटेला लागलो.. त्यांची तब्येत मात्र खरंच खूप उतरली आता. वरचेवर आजारी असतात.

माझ्या डोळ्यासमोर मात्र 'यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी..' असं गात मस्तीभरे नाचणारे प्राणसाहेबच सतत येत होते...!

-- तात्या.

November 21, 2014

आवाज.. नाद..!

त्याला वेड होतं वेगवेगळ्या आवाजांचं, त्याला वेड होतं नादाचं, त्याला वेड होतं रिदमचं..

आवाज.. वेगवेगळे आवाज.. मग ते कुठलेही असोत.. कधी वा-याचा आवाज, तर कधी कुठल्या भांड्यांचा आवाज.. कधी आगगाडीची धडधड तर कधी चक्क एखाद्या कंगव्यामधून निघणारा आवाज..!

कुठलाही.. अक्षरश: कुठलाही आवाज.. कुठलाही नाद...

तो सोनं करत असे त्या आवाजाचं.. 

सत्ते पे सत्ता चित्रपटात जेव्हा बाबूची एन्ट्री असते तेव्हा एक वेगळाच आवाज आला आहे.. हा आवाज कसला आहे..? त्याने चक्क एका बाईला गुळण्या करायला लावल्या आहेत.. तो आवाज त्या गुळण्याचा आहे..!

एखादी भन्नाट स्वरवेल आणि त्यात वेगवेगळ आवाज, नाद आणि त्याचा विलक्षण लयदार रिदम..

आवाजांचा, स्वरांचा, नादाचा, लयीचा एक विलक्षण शोध.. एक ध्यास.. 

या ध्यासाचं नांव..या वेडाचं नांव..

R D Burman.. अर्थात पंचमदा...

____/\____

-- (पंचमभक्त) तात्या..

November 15, 2014

काहीच नको शिकुया..

तिथे पुण्यात वेडझव्यासाराखा पाउस पडतोय म्हणे..
इथे मुंबईत भयानक, विचित्र उकडताय कोंडल्यासारखं.. जीवघेण..

कापून काढा डोंगरच्या डोंगर..
अजून करा बेसुमार वृक्षतोड..
चालवा २४ तास वाहने, मोटारी आणि ट्रक
आणि सतत सोडा हवेमध्ये विष..!

निसर्गाचा समतोल जेवढा ढाळता येईल
तेवढा ढाळू आपण सर्वजण.. अगदी कसोशीने..!

२६ जुलैच्या महाप्रलायातून काहीच नको शिकूया..
केदारेश्वरकडून काहीच नको शिकूया..
माळीण गावाकडून काहीच नको शिकूया..

-- (मुक्तछंद कवी) तात्या अभ्यंकर..

November 14, 2014

नीता रेवणकर..


सातवी-आठवीत असेन काहीसा.. तिचं आडनाव रेवणकर.. नीता रेवणकर.. वर्गात होती माझ्या.. छान दिसायची.. उजळ.. बोलके डोळे.. दोन वेण्या.. आणि शाळेतल्या मुलींच्या निळ्या-पांढ-या गणवेषातली..

छान दिसायची अगदी..

मी ब-याचदा तिच्याकडे पाहात बसायचो.. हळूच लाईन मारायचो तिच्यावर.. :)

कुठल्यातरी एका श्रावणी शुक्रवारी वर्गातल्या सगळ्या मुलांचा चण्यांचा बेत असायचा.. मग आम्ही मुलंच एक एक दोन दोन रुपये वर्गणी काढायचो..मग त्यातून चणे आणायचे..कांदा, मिरची, कोथमिर.. मग ते सगळं छान एकत्र करायचं आणि सगळ्यानी चणे खायचे.. :)

"ए तू येतोस आमच्यासोबत चणे आणायला..? मी आणि कुसुम चाललो आहोत.."

आई ग्गं.. आयुष्यात माझ्याशी पहिल्यांदा बोलली होती ती..!

तेव्हा FB असतं तर feeling awesome असं स्टेटसं टाकलं असतं.. पण मरायला १९८० साली कसलं आलंय FB..? :)

पुढे कॉलेजात अनेक जणीना बिनाधास्त भिडलो.. फ्रेंडशिप मागितली, इंट्रो मागितले.. होकार घेतले, नकार पचवले..! :)

पण सातवीतल ते वय.. तेव्हा फक्त ती आवडायची.. बस इतकंच.. डायरेक्ट भिडायचं वगैरे ते वय नव्हतं..! :)

पुढे आमचे वर्ग बदलले..

पण believe me.. आज इतक्या वर्षानंतरही श्रावणातल्या एखाद्या शुक्रवारी तिची आठवण येते.. तिचा निरागस चेहेरा डोळ्यासमोर येतो..

"ए तू येतोस आमच्यासोबत चणे आणायला..? मी आणि कुसुम चाललो आहोत.."

हेही आठवतं..! :)

उजळ.. बोलके डोळे.. दोन वेण्या.. आणि शाळेतल्या मुलींच्या निळ्या-पांढ-या गणवेषातली.. नीता रेवणकर..

मी हळूच लाईन मारायचो तिच्यावर.. :)

-- तात्या अभ्यंकर..

November 06, 2014

भटुरड्यांची फुकटची शेखी..!

भटुरड्यांची फुकटची शेखी..!

न ला न आणि ण ला ण म्हणणारा मुख्यमंत्री :

अलीकडे ही नवीनच शेखी मी ऐकतो आहे.. आणि ही फुकटची शेखी मिरवणार्‍यांना यातून असे सुचवायचे आहे की 'बघा..! आता ब्राह्मण मुख्यमंत्री झाला.. आता तो शुद्धच बोलणार..!"

इथे एक गोष्ट नमूद करू इच्छितो की मी स्वत:ही अगदी चित्तपावन कोकणस्थ ब्राह्मण आहे..परंतु मी केवळ ब्राह्मण आहे म्हणून मला दोनच्या ऐवजी तीन गोट्या आहेत आणि माझा बाबूराव सोन्याचा आहे असा माझा कोणताही गैरसमज नाही..! :)

परंतु माझेच काही ज्ञातीबांधव सध्या ही जी काही न आणि ण ची शेखी मिरवत आहेत.. ते मात्र हास्यास्पद आहे..

मुळात बोलीभाषा ही कुणाच्याही बापाची खाजगी मालमत्ता नाही.. ठीक आहे.. लिहिताना एक प्रमाणभाषा असावी, व्याकरणाचे काही नियम असावेत हे मीही मानतो..

परंतु बोलीभाषेत देखील आम्ही न ला न म्हणतो..आणि ण ला ण म्हणतो.. आणि इतरांनीही तेच करावे नाहीतर आम्ही त्यांची शेलकी कुचेष्टा करणार.. हा काय प्रकार आहे..??

बोलीभाषेचे एक आपले वेगळे सौंदर्य आहे.. प्रत्येक बोलीभाषेची स्वत:ची एक गोडी आहे.. मग तिथे न चा ण किंवा ण चा न होऊ शकतो.. त्यात केवळ ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून बहुजनांची कुचेष्टा करणे हा केवळ माज आहे..!

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय.. या प्रश्नावर..

आरं संगतीनं तुज्या मी येनार नाय..

हेच उत्तर हवं.. नाहीतर सगळ्या गाण्याचीच चव बिघडेल..!

माझा आगरी मित्र मला जेव्हा असं म्हणतो की.. "तात्या..तुंज्याकरता मोहाची आनतो आनी तुला मांदेली फ्राय पन खाऊ घालतो..

येव्हा त्या आनी आणि पन मधला न हा माझ्या कानाला सर्वाधिक गोड लागतो..!

-- (भाषावेल्हाळ) तात्या अभ्यंकर..

--------------------------

पोस्ट ढापणार्‍यांकरता एक विनम्र सूचना - पोस्ट अवश्य ढापा परंतु एकाच बापाचे आहात याची खात्री असेल तर कृपया पोस्ट ढापल्यावर माझे नावंही पोस्टच्या खाली लिहा..

-- (मूळ पोस्टकर्ता) तात्या.. :)

November 05, 2014

एक घाव दोन तुकडे...

व्यक्तिश: मला तरी शाटमारी असं वाटत नाही की सेनेने केलेली १० मंत्रीपदाची मागणी कमळी मान्य करेल..!

पण मला हेही कळत नाहीये की अजूनही सेनावाले वारंवार भाजपाशी हात मिळवण्याची स्वप्न का बघत आहेत..?

एक तर स्वबळावर लढून बहुमतच्या आसपासही नाही.. शिवाय भाजपाच्या तुलनेत फक्त अर्धे आमदार आले ही FACT आहे.. आणि दुसरं म्हणजे निवडणुकांपूर्वीच जी युती रीतसर तुटली आहे ती पुन्हा असं अर्ध्या आमदारांनिशी लाचार होऊन जोडण्यात काय अर्थ..?

मी पक्षप्रमुख असतो तर 'गाढवाच्या बोच्यात गेली ती सत्ता..जनतेचा कौल मान्य.. आम्ही विरोधात बसू..!' असं पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितलं असतं..!

५ वर्षांनी काही फरक पडत नाही.. पुन्हा नव्या जोमाने काम करू..पक्ष बांधू.. आई एकविरा पाठीशी आहेच..! असं सांगून मोकळा झालो असतो..!

बाळासाहेबांनी आम्हाला हाच बाणा शिकवला आहे.. परंतु सध्या उद्धव ठाकरेंचे हे जे तळ्यात-मळ्यात सुरू आहे, हे एक जुना शिवसैनिक म्हणून निदान मला तरी पसंद नाही..

भले चूक असो की बरोबर.. एक घाव दोन तुकडे..हीच खरी आमच्या जुन्या शिवसेनेची ओळख..!
असो..

-- (कंटाळलेला) तात्या..

November 04, 2014

ब्राह्मण-बहुजन वगैरे..!

व्यक्तिगत माझ्यापुरतं बोलायचं झालं तर देवेन्द्र ब्राह्मण आहे म्हणून मला त्याच्याबद्दल प्रेम नाही आणि नाथाभाऊ बहुजन आहेत म्हणून त्यांच्याबद्दल रागही नाही..

जो तो आपापल्या जागी मोठा आहे.. मला ब्रह्मणही प्रिय आहेत तेवढेच बहुजनही प्रिय आहेत..

कुणाचाच दुस्वास नाही.. दुस्वास करायचाच झाला तर तो मी फक्त ओवेसीचा करेन. ते सुद्धा तो केवळ मुसलमान आहे म्हणून नव्हे तर हिंदूंना कापून काढायची त्याची आणि त्याच्या भावाची राक्षसी महत्वाकांक्षा आहे म्हणून..!

दुस्वास करायचाच असेल तर तो मी अबू आझमीचा करेन.. कारण तो महाराष्ट्र आणि मुंबैचा द्वेष्टा आहे म्हणून..

एरवी आमच्या फोरासरोडवरचे अनेक मुसलमान मला तितकेच प्रिय आहेत..

राहता राहिला प्रश्न देवेंद्रला मुख्यमंत्रीपद मिळण्याचा तर ते त्यांना रीतसर लोकशाही पद्धतीनुसार मिळाले आहे असंच मी मानतो..

धन्यवाद.. माझ्यापुरता हा विषय संपला आहे..

-- तात्या बंदरकर,
मुंबै मच्छिमार समिती.. :)

आपण फक्त आपल्यापुरतं बोलावं...

हम्म.. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आणि नाथाभाऊंनी केलेल्या विधानापासून एकंदरीतच गेल्या दोन दिवसात FB वर ब्राह्मण-बहुजन असा बराच राडा वाचायला मिळाला..

असो..

प्रत्येकाची मतं.. प्रत्येकाचे विचार...

माझ्यापुरतं बोलायचं तर आमचे गुरुवर्य पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या आज्ञेनुसार जातीपाती या फक्त खाद्यपदार्थांपर्यंतच मर्यादित असाव्यात हेच मी मानतो.. जातीपाती टिकाव्यात..परंतु त्या फक्त खाण्यापिण्यापुरत्या..

म्हणजे ब्राह्मणाकडे अळूचं फदफदं, डाळिंबी उसळ.. कायस्थाकडे वालाचं बिरडं, कानवले.. एखाद्या बावनकशी शाण्णव कुळी मराठ्याकडे झणझणीत मटण.. एखाद्या कुडाळ देशकराकडे तिरफळं घातलेलं बांगड्याचं कालवण..तर एखाद्या कोळ्याकडे किंवा आगर्‍याकडे त्यांच्या पद्धतीचं मटण किंवा मग सुक्या बांगड्याचं भुजणं..!

बास.. जातीपाती या इतपतच असाव्यात..

असो..

पण गेल्या दोन दिवसात FB वर एकंदरीतच जी काही गरळ वाचायला मिळाली त्याने जरा दु:खी झालो आहे.. अर्थात, मला दोष कुणालाच द्यायचा नाही.. प्रत्येकाची मतं.. आपण फक्त आपल्यापुरतं बोलावं...

-- (जातीने ब्राह्मण, मनाने कोळी) तात्या वेसावकर.. :)