December 05, 2007

समर्थ भोजनालय, गिरगाव, मुंबई-४

राम राम मंडळी,

रामचंद्र सहदेव प्रभू, ऊर्फ रामभाऊ प्रभू!

हे नांव म्हणजे काही लोकमान्य टिळकांचे नांव नव्हे की ते सर्वांना माहीत असायला हवे! :) परंतु तरीही हे नांव माझ्याकरता खूप मोठे आहे. माझ्याकरताच नव्हे, तर माझ्यासारख्या अनेक मत्स्यप्रेमींकरता, खानावळीच्या जेवणावर दोन टाईम अवलंबून असण्यार्‍यांकरता या नांवाचे महत्व आहे.

रामभाऊ हे मुळचे आमच्या कोकणातल्या कुडाळचे! पत्ता- मुक्कामपोष्ट पाट, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग! रामभाऊ हे कुडाळदेशकर, परंतु कोकणातल्या 'बाल्या' समाजातले! कोकणातले बाले! :)

साठाच्या दशकात पोटापाण्याच्या उद्योगाकरता रामभाऊ कोकणातून मुंबईस आले अन् मुंबईत बाँबेडाईंग कंपनीत गिरणी कामगार म्हणून कामावर रुजू झाले. कोकणातला बाल्या आता मुंबईकर 'बाल्या' झाला! :) गिरगावातील दोन खोल्यांच्या भाड्याच्या जागेत रामभाऊंचा संसार सुरू झाला. रामभाऊंच्या पत्नी रजनीबाई म्हणजे साक्षात मालवणी अन्नपूर्णा! त्यांच्या हाताला जबरदस्त चव. मच्छीमटणाचे प्रकार तर सोडाच, पण रजनीबाईंनी साधा आमटीभात जरी केला तरी साक्षात भगवंत जगाच्या पाठीवर जिथे कुठे असेल तिथून रामभाऊंच्या गिरगावातल्या घरी जेवायला येईल! :)

रामभाऊंना तीन मुलं. एकट्याच्या पगारात भागेना म्हणून १९७२ साली रामभाऊंनी राहत्या घरातच पत्नीच्या मदतीने घरगुती स्वरुपाची खानावळ सुरू केली. स्वयंपाकाची संपूर्ण जबाबदारी अर्थातच रजनीबाईंनीं आपल्या अंगावर घेतली आणि अगदी घरगुती स्वरुपाच्या शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची ही खानावळ उत्तम तर्‍हेने सुरू झाली. जेवायला येणारी गिर्‍हाईकं म्हणजे आजुबाजूचे सर्व मध्यमवर्गीय मराठी गिरगावकर चाकरमानी! बरीचशी कनिष्ठ मध्यमवर्गीयच मंडळी. त्या काळात गिरगावात मराठी माणसांची वस्ती बर्‍यापैकी होती. आजुबाजूच्या चाळी बर्‍यायचश्या चाकरमानी मराठी कुटुंबियांनी भरलेल्या होत्या. त्या काळात गुजराती, मारवाडी समाजाचा गिरगावातील शिरकाव आजच्या मानाने अगदीच कमी होता. असो! तर काय सांगत होतो?

तर 'समर्थ भोजनालय' या नांवाने ही खानवळ सुरू झाली. सुरमई, बांगडा, पापलेट, बोंबिल, कोलंबी, मांदेली, मुडदुशा, गाबोळी, कुर्ल्या, आदी मत्स्यप्रकार तसेच मटणवडे, कोंबडी, सुकं मटण, कोकम कढी असा न्यारा बेत ह्या खानावळीत शिजू लागला. अप्रतिम अशी घरगुती चव, वातावरणही घरगुती, आणि दरही वाजवी, त्यामुळे रामभाऊंची ही खानावळ अगदी उत्तम रितीने चालू लागली. आजतागायत अनेक मंडळी येथून जेवून, पोटातला अग्नी शांत करून गेली आहेत/आजही जात आहेत!



कामधंद्याच्या निमित्ताने मला बरीचशी मुंबई फिरण्याचा योग आला. मासे, मटण खायची आवड असल्यामुळे बोरीबंदर जवळच्या पलटणरोड पोलिस ठाण्याजवळचं उत्तम खिमा मिळणारं आमच्या लक्ष्मणशेठचं 'ग्रँट हाऊस कँटीन', गिरगावातलंच ठाकुरद्वारचं 'सत्कार हॉटेल', त्याच्याच भावाचं डोंबिवलीतलं हॉटेल 'श्रीसत्कार', गिरगावातलंच उत्तम मटण-भाकरी मिळणारं 'भारतीय लंच होम', लालबागेतील गिरण्यांमधल्या कोकणी चाकरमानी गिरणी कामगारांचं आश्रयस्थान असलेलं 'क्षिरसागर हाटेल', बजारगेट स्ट्रीटवरचं 'संदीप भोजनालय', त्याच्याच भावाचं हॉर्निमन सर्कलचं 'प्रदीप भोजनालय', खोताच्या वाडीतलं खडपेबंधुंचं 'अनंताश्रम' (येथे प्रसिद्ध लेखक जयवंत दळवी नेहमी जेवायला यायचे. दळवी हे आमच्या कोकणभूमीचेच सुपुत्र! :) अश्या अनेक ठिकाणी माझा नेहमीचा राबता असे. (या सगळ्या हॉटेलांवर मी सवडीने, परंतु अगदी भरभरून लेखन करणार आहे!)

अश्यातच एके दिवशी गिरगावातील गायवाडी बस स्टॉप जवळच्या गल्लीतील 'समर्थ भोजनालयात' जेवायचा योग आला आणि जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं! मी समर्थ भोजनालयाचा झालो आणि समर्थ भोजनालय माझं झालं! तिथली माशाची आमटी खाल्ली, तळलेली मांदेली खाल्ली अन् अण्णांच्या अभंगातील,

'याचसाठी केला होता अट्टाहास,
शेवटचा दिस गोड व्हावा'


च्या ऐवजी 'शेवटचा दिस गोड झाला!' असे म्हणावेसे वाटले! :)

मंडळी, आमचे रामभाऊ हा वृत्तीने देव माणूस! खानावळ चांगली चालली आहे म्हणून हावरेपणाने वाट्टेल तसे दर वाढवणारा, जेवणात काहीतरी चालू माल वापरून गिर्‍हाईकांना फसवणारा किंवा लुटणारा नव्हे! सगळ्यांशी आपलेपणाने वागणारा, प्रसंगी दाराशी आलेल्या एखाद्या गरीबाला स्वतः आस्थेने जेवू घालणारा! कधी कधी पुढे बरीच कामाची गडबड असे म्हणून मी सकाळी ११ वाजताच त्यांच्या खानवळीत जेवायला जायचो. त्या सुमारास फारशी गर्दी नसायची. मग रामभाऊ हळूच गल्ल्यावरून उठून माझ्या शेजारी येऊन बसायचे. "काय तात्या, आज लवकर? आज सुरमई अगदी ताजी फडफडीत मिळाली आहे. देऊ?" मग माझ्या उत्तराची वाट न पाहताच, "अरे संज्या, तात्याला एक सुरमई ताट आण रे" असा मुदपाकखान्यातील त्यांचा मुलाला, संजयला हुकूम सोडायचे! :)

मंडळी, शेवटी काहीही झालं तरी रामभाऊ हा आमच्या कोकणातला. त्यामुळे कोर्टकचेर्‍या न करेल तरच नवल! रामभाऊचा आणि त्यांच्या भाड्याच्या जागेच्या मालकाचा काही कारणावरून कोर्टात खटला सुरू होताच! 'मग आता मी अन् माझा वकील काय काय कारवाया करणार आहोत, 'ही केस आपणच कशी जिंकणार', 'आपले सगळे मुद्दे कसे स्ट्राँग आहेत', हे सगळं सांगायला रामभाऊंना आस्थेने ऐकणारं कुणीतरी हवं असे! मी ते काम जेवता जेवता एकदम चोख करीत असे! :) मग मध्येच बोलण्याच्या भरात रामभाऊंचं माझ्या पानाकडे लक्ष जात असे. "अरे तात्या, अजून चपाती घे रे. हे काय? फक्त दोनच चपात्या? अरे संज्या, तात्याला गरम गरम चपाती आण रे. आणि थोडंसं कोलंबीचं कालवण पण घेऊन ये. बघ तरी तात्या, आज कोलंबी किती छान मिळाली आहे ती. अरे बाबा, कोलंबीच्या कालवणाचे पैशे नको देऊ फार तर! ते वाटल्यास माझ्याकडून भेट समज!" असं हसून म्हणायचे! आणि बिल देतेवेळी खरोखरंच ते पैसे रामभाऊ माझ्याकडून घेत नसत! आज रामभाऊ या जगात नाहीत. १९९९ साली रामभाऊ वारले. ती बातमी समजल्यावर घरचंच कुणीतरी गेल्यासारखं मला वाटलं आणि खूप भरून आलं!

हे आमचे रामभाऊ प्रभू. मुंबईच्या खानावळ संस्कृतीचे एक प्रतिनिधी!



आज रामभाऊंच्या पश्चात आमच्या रजनीमावशी अन् त्यांची दोन मुलं संजय (संज्या) आणि विश्वनाथ (नाथा) आता ही खानावळ चालवतात. मंडळी, ही सगळी मंडळी त्यांच्या कुटुंबातलाच एक असल्यासारखं मला वागवतात. संज्याचं तर माझ्यावर भारी प्रेम. मी अजून लग्न केलं नाही याची माझ्यापेक्षा संज्यालाच अधिक चिंता! :) अगदी आजही कधी त्यांच्या खानावळीत जेवायला गेलो की संज्या मला मुली सुचवतो. "तात्या, अरे अमूक अमूक मुलगी आहे. आमच्या नात्यातलीच आहे. तुला चांगली मच्छी करून खाऊ घालेल आणि तुझ्या आईचीही काळजी घेईल. लग्न करून टाक बाबा आता. किती दिवस असा राहणार?!":)

माझ्या लग्नाच्या चिंतेत असलेला आमचा देवभोळा संज्या! :)



मंडळी, रामभाऊ, रजनीमावशी, संज्या, नाथा, ही सगळी कोण आहेत माझी? ना रक्ताच्या नात्याची, ना गोत्याची! पण एक धागा आहे ज्याने मला व त्यांना जोडलं आहे, अगदी घट्ट बांधून ठेवलं आहे. तो धागा आहे परब्रह्म अश्या अन्नाचा, घरगुती चवीचा, अन् खानावळ संस्कृतीचा! आजच्या लोप पावत चाललेल्या या खानावळ संस्कृतीत हा धागा अजूनच घट्ट होत जाईल याची मला खात्री आहे!

तात्या जेवायला बसला आहे. तो मुंबईच्या खानावळ संस्कृतीचा एक वारकरी आहे!


आज मुंबईतच काय, तर सार्‍या जगात शेट्टी हाटेलांचे साम्राज्य पसरले आहे. अत्यंत महाग दर आणि तीच तीच पंजाबी चव! कधी टॉमेटोच्या मिश्रणात काजू पेस्ट, तर कधी काजूपेस्टमध्ये टोमेटो प्युरी वापरून केलेल्या त्या महागड्या पंजाबी भाज्या! मंडळी, हे सगळं पाहिलं की गिर्‍हाईकाला आस्थेने, घरगुती चवीचे पदार्थ वाजवी दरात जेवू घालणार्‍या रामभाऊंसारख्या किंवा अनंताश्रमच्या खडप्यांसारख्या खानावळवाल्यांचं महत्व लक्षात येतं. आजही अशी अनेक मंडळी आहेत की काही कारणांमुळे त्यांना घरचं जेवण मिळत नाही. अश्या मंडळींचं समर्थ भोजनालय सारख्या घरगुती खानावळी म्हणजे एक मोठं आश्रयस्थान आहे, आधार आहे. अहो नाहीतर रोज रोज पोटातली आग विझवायची कुठे? शेट्टीच्या हॉटेलातील महागड्या सोडा मारून केलेल्या पदार्थांनी तर साली पोटाची वाट लागायची!

असो, आता पुन्हा एकदा समर्थ भोजनालयात जाईन आणि आमचा नाथा मला फक्कडसं बोंबलाचं कालवण वाढेल, अन् संज्या पुन्हा एखादी चांगल्याश्या सालस, सोज्वळ अश्या मुलीचं स्थळ मला सुचवेल! मी 'अन्न हे पूर्णब्रह्म' असं म्हणत जेवून तृप्त होईन आणि नकळत माझं लक्ष भिंतीवरील रामभाऊंच्या तसबिरीकडे जाईल आणि त्यांच्या आठवणीने मन भरून येईल!

--तात्या अभ्यंकर.

8 comments:

ध्रुव said...

taatyaa photo laii zaak bara kaa!!
-dhruva

thelaukik said...

अशा प्रकारची बरीच हाटेलं गोव्यात आहेत. आमचा मातोश्रींस मच्छी बनवता येत नाही त्यामुळे समदुःखी पोटांस इतर माउल्या छोट्या छोट्या खानावळींतूंन समुद्रान्न आपुलकीने खाऊ घालतात.
माझ्या मते जर एखाद्याला मांसाहार सोडायचा असेल तर त्याने चांगल्या कोकणी माशाची चव कधी चाखु नये. हे एक न सुटणारे व्यसन आहे.

Tejas said...

phar uttam lihile aahe. Mi aata Mumbaila gelo ki nakki jain.

Tejas said...

pan nakki kuthe ahe te sangnar ka?

Anonymous said...

tatya me naren kadhi solapur la yaa nonveg khup cchaan milate mazya ghari ya aamhi sali lok pan matan karanyat khup dardi ahot me sagale prakar khayala ghalen amachyakade sawaji matan suddha khup femous ahe

Sundar Samant said...

Great blog tatya...

Sundar Samant said...

Great blog tatya...

Sundar Samant said...

22 B,Rele Building,Girgoan,Mumbai-400004(Close Every Thursday).