March 20, 2011

वसंता पोतदार..!

अण्णांना जाऊन आता जवळ जवळ दोन महिने पूर्ण होतील. अण्णा गेले तेव्हादेखील मनात कुठेतरी वसंताचीही आठवण झाली. वसंता अण्णांच्या बराच आधी गेला होता.

वसंता पोतदार!

"ए तात्या, मला चक्क 'अरे वसंता' असं म्हणायचं बरं का! वसंतराव किंवा अहो-जाहो ची भानगङ नाय पाहिजे!"
वास्तविक वसंता माझ्यापेक्षा वयाने. ज्ञानाने कितीतरी मोठा! तरीही मी त्याला केवळ त्याच्या आग्रहाखातर 'वसंता' अशी एकेरीच हाक मारायचा.

अण्णांचं गाणं आणि त्यावर आत्यंतिक प्रेम हाच माझ्या आणि वसंताच्या मैत्रीचा मुख्य मुद्दा. अण्णांच्या गाण्याला वसंता अनेकदा भेटायचा आणि मग गप्पा रंगायच्या, धमाल चालायची!

वसंता हा अत्यंत व्यासंगी आणि विद्वान माणूस. एक चांगला लेखक, उत्तम वक्ता! स्वामिजींवरचं 'योद्धा सन्यासी', भाईकाकांवरचं 'एका पुरुषोत्तमाची गाथा', गाडगेबाबांवरचं 'तोचि साधू ओळखावा', अण्णांवरचं 'भीमसेन' ही त्याची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. वसंता स्वामिजींवर व्याख्यानही फार छान द्यायचा.
अण्णांवर पुस्तक लिहिण्याकरता म्हणून वसंता काही काळ सतत अण्णांसोबत असे. आणि अण्णांचं मुंबईत कुठेही गाणं असलं म्हणजे तिथे माझी हजेरी ही असायचीच. त्यातूनच माझी आणि वसंताची ओळख झाली, परिचय वाढला, दोस्ताना वाढला.

एकदा एका कार्यक्रमाच्या वेळी ग्रीनरूममध्ये साक्षात अण्णांनीच,

"हे अभ्यंकर. मुंबैच्या हायकोर्टात वकील आहेत आणि आमचे चाहते आहेत..!"
(मी मुंबैच्या हायकोर्टात वकील आहे हा अण्णांचा समज शेवटपर्यंत तसाच होता. मी एकदोनदा खुलासाही करून पाहिला होता. असो.)
तर,"हे अभ्यंकर. मुंबैच्या हायकोर्टात वकील आहेत आणि आमचे चाहते आहेत..!" अशी आपल्या खर्जातल्या धीरगंभीर आवाजात अण्णांनी वसंताला माझी ओळख करून दिली होती. वास्तविक मी अण्णांच्या लाखो भक्तांपैकीच एक, तसा नगण्यच! परंतु साक्षात अण्णांनीच ओळख करून दिल्यावर आणखी काय पायजेल?!

"क्या बात है, मिलाव हाथ!"

हे त्यावेळचे वसंताचे मनमोकळेपणे आणि आनंदाने उच्चारलेले शब्द मला आजही आठवताहेत!


एका कार्यक्रमानंतर चालायला त्रास होत असल्यामुळे मी आणि वसंता अण्णांना सोबत घेऊन जात आहोत.

त्यानंतर मुंबैतल्याच अण्णांच्या एका चाहत्याच्या घरी अण्णांचा मुक्काम होता. त्या घरी जाऊन विसावतो न विसावतो तोच बुवांचा पुन्हा मूड लागला आणि तंबोरे गवसणीच्या बाहेर निघाले! आणि काय सांगू मंडळी, पुन्हा एकदा जमलेल्या त्या बहारदार मैफलीबद्दल! अण्णांनी आमच्या पुढे दरबारीचा अक्षरश: महाल उभा केला होता! ऐकायला गिनेचुने श्रोते. भाईकाकांच्या शब्दात सांगायचं तर बेहोश झाला होता सारा मामला! वसंता आणि मी बाजूबाजूला बसलो होतो आणि अण्णांच्या दरबारीच्या सुरासुरांवर जीव ओवाळून टाकत होतो!

असो,

आज वसंता हयात नाही, अण्णाही गेले.

आठवणी फक्त उरल्या आहेत..!

-- तात्या अभ्यंकर.

3 comments:

Anonymous said...

Wah buwa!!!

-abhijit kaskhedikar

Dhananjay Mehendale said...

तात्या, अहो तुम्ही वेड लावलं... काय लिहिता हो तुम्ही.................

Tatyaa.. said...

Dear Kashya and Dhananjay,

Thx a lot..

Tatyaa.