October 04, 2010

झुणकाभाकरीची गोडी अन् वेडा कुंभार..

विठ्ठला तू वेडा कुंभार..(येथे ऐका)

वीर सावरकर चित्रपटाच्या निर्मितीचे दिवस होते. दादरला सेनाभवनाच्या अलिकडची गल्ली. तिथे रामचंद्र निवास ही इमारत आहे. तिच्या तिसर्‍या मजल्यावरती बाबूजींनी या चित्रपटाचे कार्यालय थाटले होते. मी अधनंमधनं तिथे दबकत जायचा.. आणि कधी कुठले कागदपत्र फाईल करून ठेव, एखादं बाड इकडून तिकडे पोचव, बँकेची कामं कर, बाबूजींकरता ठाण्याच्या भगवंतराव पटवर्धनांकडे काही काम असेल तर ते कर, अशी बाबूजी सांगतील ती फुटकळ कामं चुपचाप करायचा..कधीमधी उगाचंच त्या कार्याकयात बसून राहायचा.. मग बाबूजीच केव्हा तरी माझ्याकरता चहा मागवायचे.. कधी शांत असत, कधी कुणावर तरी भडकलेले असत, तर कधी कुठल्या विचारात असत..

अशीच एक टळटळीत दुपार.. तेथून जवळच एल जे रस्त्यावर नाना मयेकर नावाचा माझा मित्र राहायचा.. त्याच्याकडे काही कामानिमित्त गेलो होतो. त्याच्या आईनं फक्कडशी झुणकाभाकर केली होती. ती मला वाढू लागली. मी विचारलं, 'बांधून देता का? बाबूजींकडे जायचंय. तिथे खाईन व त्यांनाही देईन." त्या माउलीनं आनंदाने चार भाकर्‍या, लोणी, खर्डा आणि झुणका मला बांधून दिला. मी ती अमृततूल्य शिदोरी घेऊन सावरकर न्यासाच्या कार्यालयात पोहोचलो.

"अरे ये, तुझीच वाट पाहात होतो.."

कुठनंतरी काही कामाचे पेपर्स यायचे होते आणि ते बाड मला बाबूजी देणार होते. ते ठाण्याला भगवंतरावांकडे पोहोचवायचं होतं..

"थोडं जेवायचं आणलं आहे.. आपण जेऊया का?"

झुणकाभाकर पाहताच बाबूजी मनोमन सुखावले.. कार्यालयात आम्ही दोघंच होतो.

"अरे काय योग बघ, कालच मी थोडा वाळा आणून त्या मडक्यात ठेवला आहे.. आता झुणकाभाकर खाऊ अन् वाळ्याचं गार पाणी पिऊ.."

आम्ही तो भाकरतुकडा खाल्ला.. "कुठून आणलास रे? कोण या सुगरण बाई?" बाबूजींनी मनापासून दाद दिली..

आणि अचानक त्या दुपारी माझं भाग्य उजळलं..

'फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला तू वेडा कुंभार..'

जेवणानंतर बाबूजी खुर्चीत बसल्याबसल्या सहजच गुणगुणू लागले.. ! मी त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसलो होतो ते मला प्रशस्त वाटेना. मी उठून त्यांच्या पायाशी बसलो..



"फिरत्या, चाका.. आकारान्त शब्द आहेत. तो आकार स्वच्छ आला पाहिजे, निकोप पाहिजे. नारायणराव बालगंधर्वांच्या तोंडून कधी 'विठ्ठल' हा शब्द ऐकला आहेस का? ठ ला ठ असला तरी त्यात मार्दव हवं, ममत्व हवं.."

बाबूजी बोलत होते.. मी ते ऐकत होतो, शिकत होतो.. गाण्याच्या कुठल्याही क्लासात न शिकवली जाणारी अनमोल शिकवणी माझ्या पदरात पडू लागली..!

"वेडा कुंभार..!" हे शब्द म्हणताना त्यात प्रेम हवं, भक्ति हवी.. अगदी हळवेपणे म्हटले पाहिजेत हे शब्द.. बर्र का!"

'तूच मिसळसी सर्व पसारा..'

"हे गाताना आपण एखाद्या सख्याशी, सुहृदाशी जसं सहजच परंतु आपुलकीनं बोलतो ना, ते भाव आले पाहिजेत.. अरे तू विठ्ठलाशी बोलतो आहेस, त्याच्याशी संवाद साधतो आहेस असं वाटलं पाहिजे ना त्याला? तुझी हाक त्याच्यापर्यंत पोचायला तर हवी!"

"काय म्हमईवाले, कळतंय का आम्ही काय म्हणतोय ते?!" Smile

'तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार..'

"अण्णाची आठवण येते रे.. इतकं सुरेख आणि एकटाकी लिहायचा..!"



बाबूजी अचानक हळवे झाले.. ज्यांच्यासोबत अर्धाअधिक काळ केवळ भांडण्यातच गेला होता, त्या अण्णा माडगुळकरांच्या आठवणीनं त्या सावरकरभक्ताला अचानक भरून आलं.. मंडळी, मी साक्षिदार आहे या घटनेचा!

"आणि बर्र का, 'नसे अंत, ना पार..' ची तान अगदी छान गेली पाहिजे बर्र का. तिथं घसरून पडता उपेगाचं न्हाई!" Smile

बाबूजी मुडात असले म्हणजे मधुनच कलापुरी शब्द वापरायचे! Smile

'घटाघटाचे रूप आगळे,
प्रत्येकाचे दैव वेगळे.."

"एकेक स्वर तोलूनमापून लावायला हवा..तसा तो लागायला हवा. तसा मी प्रयत्न केला आहे.."!

'प्रत्येकाचे' चा उच्चार प्रत्त्येकाचे..' असाच आला पाहिजे.. तो शब्द फ्लॅट लागता कामा नये.. 'दैव' शब्दाचा उच्चारदेखील अगदी वळणदार हवा..!"

'मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार..'

"आता हेच बघ रे म्हमईवाल्या.. मला काय म्हाईत की तू भाकरतुकडा आणशील अन् माझ्या तोंडात लोणी पडेल?! पण आत्ता या क्षणी अशी किती माणसं आहेत की त्यांच्या मुखी हे लोणी नाही..आहे तो फक्त अंगार..! खरं सांग, आहे की नाही?!"

गाणं म्हणजे काय. ते शिकणं म्हणजे काय, हे मला कळत होतं..!

गाण्यातले भाव, शब्दोच्चार, स्वर लावण्याची पद्धत, बालगंधर्व, हिराबाई... अनेक विषयावर ते बोलत होते, मी ऐकत होतो, शिकत होतो..

अजूनही शिकतोच आहे.. कारण बाबूजींचं प्रत्येक गाणं हे त्या पांडुरंगाच्या घटांप्रमाणेच आहे.. ज्याच्या उतरंडीला अंत नाही, ना पार..!


आपण आपलं शिकत रहायचं, ऐकत रहायचं..!

त्यातलीच थोडीशी झुणकाभाकर घेऊन मी ती ललीमावशीला नेऊन दिली. तिथून जवळंच घर होतं बाबूजींचं.. विठ्ठलाकडची शिकवणी संपली होती.. झुणकाभाकर घेऊन रखुमाईकडं चाललो होतो..!

-- तात्या अभ्यंकर.

October 03, 2010

लाभले आम्हास भाग्य..

'लाभले आम्हास भाग्य.. '
भटसाहेबांच्या सिद्ध लेखणीतून उतरलेलं, अभिमानानं उर भरून यावा असं मायमराठीचं यथार्थ गुणगान करणारं हे काव्य आणि कौशल इनामदारचं संगीत असलेलं हे समूहगीत.. कौशलच्या हातून घडलेलं एक खूप चांगलं काम, मोठं काम! उत्तम हार्मोनियम वादक आदित्य ओक हा आम्हा दोघांचा कॉमन मित्र.. काही वर्षांपूर्वी एकदा आदित्यच्या घरी कौशल आला होता तेव्हा मलाही जेवायचं आमंत्रण होतं.. मला आठवतंय, जेवणानंतर हार्मोनियम पुढ्यात घेऊन कौशलने अगदी हौशीहौशीने त्याच्या डोक्यात घोळत असलेल्या अनेक चाली मला ऐकवल्या होत्या. तेव्हाही मला त्या वेगळ्या वाटल्या होत्या, कल्पक वाटल्या होत्या..

काहीच दिसांपूर्वी कौशलने बांधलेलं हे समूहगीत कानी पडलं आणि श्रवणसुख लाभलं..कौशलने अनेक गायक-गायिकांकडून गाऊन घेऊन या काव्याची एकेक ओळ गुंफली आहे हे नक्कीच खूप कल्पक आहे.. प्रत्येक गायक-गायिकेची आवाजाची जात वेगळी, शब्दस्वरांचा अंदाज वेगळा, शब्द - आवाज टाकण्याची, गाण्याची पद्धत वेगळी.. परंतु असं असलं तरी गाण्याचा भाव एकच.. हा भाव अर्थातच मायमराठीच्या प्रेमाचा, अभिमानाचा, आणि गौरवाचा!.. आणि त्यामुळेच ही गुंफण विशेष सुरेख झाली आहे, कौतुकास्पद झाली आहे..

या समुहगीताचा अजून एक विशेष असा की या गुंफणीतले काही काही गायक मला व्यक्तिश: आवडत नाहीत, तरीही त्यामुळे गाण्याच्या सौंदर्यावर त्याचा खटकण्याजोगा असा काहीच परिणाम जाणवत नाही.. कारण एक तर प्रत्येकाला एकच ओळ गायची आहे आणि कौशलने लावलेली मूळ चाल खूप छान असल्यामुळे माझे काही नावडते गायकदेखील अगदी सहज खपून गेले आहेत.. Smile

प्रत्येकाच्या आवाजाची जात ओळखून, त्याची गायकी ओळखून त्याप्रमाणे कौशलने प्रत्येकाकडून गाऊन घेतलं आहे, हेही विशेष..

या लेखाच्या निमित्तानं मला या गाण्यातलं काय काय आवडलं हे सांगण्याचा एक प्रयत्न..त्याचप्रमाणे यातील गायकांवर माझी काही मतंही नोंदवण्याची संधी मी या निमित्ताने साधणार आहे..
-----------------------------------------------------------------------------------------
लाभले आम्हास भाग्य.. (येथे ऐका)

'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' - रविंद्र साठे आणि अश्विनी भिडे -देशपांडे.

रविंद्र साठे. 'अत्यंत गुणी' या एकाच शब्दात ज्याचं वर्णन करता येईल असा गायक. साठेसाहेबांचा बेसचा आणि मुळातलाच गोडवा असलेला आवाज..स्पष्ट शब्दोच्चार - 'बोलतो मराठी..'तला गंधार छान लागला आहे साठेबुवांचा.
अश्विनी भिडे -देशपांडे. जयपूर गायकीची तालीम मिळालेली गुणी गयिका. आवाजाची जात हळवी.. एरवी या गायिकेकडून ख्यालगायकीतलं हिंदीच अधिक कानावर पडलं आहे त्या पार्श्वभूमीवर तिचे मराठीतले बोल ऐकायला खूप छान वाटतात.. 'बोलतो' तल्या 'तो' वरची लहानशी हरकतवजा तान छान..

'जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..' - सुरेश वाडकर.

सुरेशबाप्पांबद्दल मी काय बोलणार? जादुई, सुरीला आवाज..! मोठा माणूस..!

'धर्म पंथ जात एक जाणतो मराठी' - पद्मजा फेणाणी जोगळेकर - नो कॉमेन्टस्! विशेष काही न गाता उगाचंच मोठी झालेली एक गायिका..!

'एवढ्या जगात माय मानतो मराठी..' - हरिहरन.

सुरवातीलाच _/\_ अशी खुण करतो.. गझलगायकीच्या दुनियेतला अत्यंत सुरीला, रसिला गवई. तलम, जादुई आवाज. खूप कष्टानं स्वत:चं गाणं सिद्ध केलेला.. 'जगात' आणि 'मानतो' शब्दांवरील जागा खासच. अगदी हरिहरन ष्टाईल!

'बोलतो मराठी, ऐकतो मराठी..' - आरती अंकलीकर टिकेकर.

'नो कॉमेन्टस्' असं म्हणणार नाही. मूळची खूप गुणी गायिका. ख्यालगायकीची उत्तम तालीम घेतलेली. पूर्वी गायचीही छान. परंतु नंतर नंतर हिचं गाणं बिघडलं.. गाण्यात रुक्षपणा येऊ लागला. काही वेळेला शब्दोच्चारांमध्ये विनाकारणच लाडिकपणा येऊ लागला. अर्थात, ही माझी व्यतिगत मतं..

'जाणतो मराठी, मानतो मराठी..' - सत्यशील देशपांडे. - नो कॉमेन्टस्. हे कुमारांचे शागीर्द आहेत असं ऐकून आहे. असतीलही! एक मात्र खरं की कुमारांचं गाणं जरी यांच्याकडे नसलं तरी त्यांचं पुष्कळसं ध्वनिमुद्रण मात्र त्यांच्या संग्रही आहे! Smile

'आमुच्या मनामनात दंगते मराठी..' - श्रीधर फडके.

आम्ही काय बोलणार? आमच्या गुरुजींचे आणि ललीमावशीचे चिरंजिव! परंतु अत्यंत गुणी. यांनी बांधलेल्या काही काही चाली छानच आहेत..

'आमुच्या रगारगात रंगते मराठी..' - साधना सरगम.

एक गुणी गायिका. अनेक वर्ष गाते आहे, चांगलं गाते. परंतु अजून स्वत:ची अशी काही खास ओळख नाही.. गुणी असूनही अमूक आवाज म्हणजे साधनाचा आवाज, अमूक गाणं केवळ साधनानेच गावं, अशी दुर्दैवाने ओळख नाही..

वरील ओळीपाशी तबला सुरू होतो ते छान वाटतं..

'आमुच्या उराउरात स्पंदते मराठी..' - स्वप्निल बांदोडकर.

मुलगा गुणी आहे. पण अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. त्याला शुभेच्छा!

'आमुच्या नसानसात नाचते मराठी..' - बेला शेंडे.

पुन्हा एक गुणी आणि सुरीली गायिका.. आवाजाची जात खूप चांगली आहे. हिनं तिचं सोशल लाईफ थोडं कमी करून गाण्याकडे, रियाजाकडे अधिकाधिक लक्ष द्यायला हवं. चांगले चांगले संगीत दिग्दर्शक मिळाल्यास ही मुलगी त्यांच्या चालींचं सोनं करेल यात शंका नाही..

'नाचते मराठी'तला शुद्ध मध्यम केवळ सुरेख. शुद्ध मध्यम हा स्वरच अद्भूत आहे.. एकदा केव्हातरी सवडीनं या शुद्ध मध्यमावर आणि त्यातील गाण्यांवर एक लेखच लिहायचा मानस आहे. 'पायी घागर्‍या करीती रुणझुण..' ह्या शब्दांनंतर 'नाद स्वर्गी..' मधल्या 'नाद' शब्दावर दीदी जो शुद्ध मध्यम लावते तिथे नादब्रह्माचा साक्षात्कार होतो.. असो!

'आमुच्या पिलपिलात जन्मते मराठी..' - देवकी पंडीत.

मुळची गुणी गायिका परंतु हिचं ख्याल गायन मला फारसं आवडलं नाही.. आवाजाची जात खूप छान. परंतु हिला बर्‍याचश्या मालिकांची शीर्षकगीतंच गात बसावं लागलं, हे दुर्दैव..

हुश्श.. दमलो बुवा.. अजून गेलाबाजार बरेच म्हणजे बरेच गायक शिल्लक आहेत. त्यापैकी शंकर महादेवन या गुणवंताची आवर्जून नोंद घेतो आणि हा लेख संपवतो..

एकंदरीत मात्र कौशलचं खूप कौतुक वाटतं.. भटसाहेबांचं हे आभाळाइतकं मोठं काव्य, मध्येच यमनाची आठवण करून देणारी कौशलची अनोखी चाल, गायक-गायकांनी केलेली गुंफण, सारंच सुरेख. गाणं अगदी लयदार झालं आहे. व्हायलीन आदींचं वाद्यसंयोजन, सुंदर कोरस, वापरलेले ठेके.. बहुत अच्छा काम किया है कौशलने..अगदी भारदस्त काम केलं आहे..! जियो...

बाबारे कौशल,

मी अश्याच चांगल्या चांगल्या गाण्यांचा भुकेला आहे.. माझ्या झोळीत असंच काही चांगलं वाढ.. आजपर्यंत बाबूजी, हृदयनाथ मंगेशकर, खळेसाहेब, वसंत प्रभू, राम कदम, आनंद मोडक, भास्कर चंदावरकर अश्या अनेक दिग्गजांनी माझ्या झोळीत दान टाकलं आहे. मध्येच कधी 'शब्द शब्द जपून ठेव..' ह्या जबरदस्त गाण्याचं दान देऊन विश्वनाथ मोरे यांनी, तर कधी 'केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर..' या हळव्या गाण्याचं दान देऊन अशोक पत्कींनी माझी झोळी भरून टाकली आहे..

यापुढेही असंच काही मोठं काम कर, सुरीलं काम कर, इतकंच सांगणं..

या गाण्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील सांगितिक वाटचालीकरता शुभेच्छा..

तुझा,
तात्या.

September 27, 2010

घाल घाल पिंगा वा-या - कमलाकर भागवतांना विनम्र आदरांजली..

मी प्रभादेवी येथील जी एम ब्रेवरीज मध्ये नौकरीला असतानाची गोष्ट..

सर जिमि विल्यम आल्मेडा हे आमच्या कंपनीचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक.. तिथे त्यांना भेटायला नेहमी एक वयस्कर गृहस्थ यायचे.. त्यांचं नाव कमलाकर भागवत. ते जिमीसाहेबांचे दोस्त.

मी एकदा काही कामानिमित्त जिमी साहेबांच्या केबीन मध्ये गेलेला असताना तिथे भागवत साहेब बसलेले होते.
"हा आमचा अभ्यंकर..गाण्यातला दर्दी आहे पण त्यामुळेच काही वेळा कामात चुकतो..!" जिमीसाहेबांनी मिश्किलतेने भागवतसाहेबांशी ओळख करून दिली..त्यानंतर जेव्हा जेव्हा भागवतसाहेब कार्यालयात यायचे तेव्हा प्रथम माझ्याशी गप्पा मारायचे..

"काय, अलिकडे कुणाची मैफल ऐकलीस?"

आम्ही गाण्यावर अगदी मनमुराद बोलायचो..सवडीने केव्हातरी नक्की त्यांच्याचवर एखादा लेख लिहायचा विचार आहे.. पण तूर्तास मूड नाही आणि वेळही नाही..

संगीतकार कमलाकर भागवत. माझ्या गणगोतातलेच एक. अलिकडेच वारले. तूर्तास त्यांचं व्यक्तिचित्र रंगवणे पेन्डिंग ठेवतो..

काही महिन्यापूर्वी त्यांच्याच एका अप्रतिम गाण्याबद्दल मी चार ओळी लिहिल्या होत्या त्या इथं पुन्हा एकदा देतो आणि त्यांना विनम्र आदरांजली वाहतो..

(भागवतसाहेबांचा लाडका) तात्या.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

घाल घाल पिंगा.. (येथे ऐका)

सुमन कल्याणपुरांचा अत्यंत सुरेल, थेट काळजाला भिडणारा आवाज

घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात
माहेरी जा, सुवासाची कर बरसात..

भादव्यातच जेमतेम वर्ष झालेल्या सासरी सखा तरी कोण मिळणार? त्यामुळे वार्‍यालाच सखा मानलं आहे आणि त्याच्याशी संवाद साधला आहे..

'सुखी आहे पोर' सांग आईच्या कानात..

अतिशय म्हणजे अतिशय हळवी ओळ! इतका सुंदर रिषभ आणि गंधार फार क्वचितच पाहायला मिळतो. 'रे सख्या वार्‍या, माझ्या माहेरी गेलास तर घरात इतर काही मंडळी असतील, वडीलधारी मंडळीही असतील.. त्यांच्यासमोर काही बोलू नकोस.. तसाच थेट माजघरात जा. तिथं माझी आई असेल.. माझं इकडचं सुख हळूच, हलकेच तिच्या कानात सांग.. खूप सुखावेल रे ती..! लगेच तुला खरवस किंवा बेसनाचा लाडू खायला देईल! खूप छान करते रे माझी आई बेसनाचे लाडू!

परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे?

धाकटा दीर असावा तसा संवाद आहे हा वार्‍याशी.. 'अरे माझं माहेरही खूप समृद्ध आहे रे.. तेथल्या परसातला पारिजातक मी इथं बसून पाहते आहे.. मला हवी आहेत रे ती सारी फुलं!

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय..

इथे शब्द संपतात..!

मराठी भावसंगीतातलं एक अतिशय सुरेख गाणं..नव्यानेच सासरी गेलेल्या मुलीचं यापरीस हळवं मनोगत ते कोणतं?!

-- तात्या अभ्यंकर.

September 14, 2010

मेरे मौला करम हो करम..

मेरे मौला करम हो करम... (येथे ऐका)

मेरे मौला मौला, मेरे मौला मौला हो करम...
मेरे मौला करम हो करम
मेरे मौला करम हो करम...

हे देवा, हे मौला, खुदा, तुझ्या दारी आलो आहे..रेहेम कर, कृपा कर. खूप थकलो आहे, दर दर भटकतो आहे, फाके पडले आहेत..

१ ली ओळ - मेरे मौला करम हो करम

शुद्ध निषाद, शुद्ध रिखभ आणि कोमल गंधार यांचं राज्य. या तिघांनी मिळून साकारलेली करुणता. हात जोडले आहेत- प्रार्थनेकरता..! Low tone मध्ये.

२ री ओळ - मेरे मौला करम हो करम

डोकं ठेवतो बा तुझ्या पायावर.. माझ्या अश्रुंनी भिजवले आहेत तुझे चरण. दया कर!
नी़सारेम रे ...! किरवाणी रागातली 'तोहे बिन मोहे चैन नही आवे..' ही राशिदखाची सुरेख बंदिश सहजच आठवली.. 'रेप' संगती जीव हळवा करून जाते..!

'तुमसे फर्याद करते है हम...'

दुसरीकडे कुठे मी माझं गार्‍हाणं मांडणार? तुझ्याचकडे येणार ना? तेवढा हक्क आहे रे माझा तुझ्यावर! 'फर्याद' शब्दावरची छोटेखानी हरकत आतपर्यंत पोहोचते..!

पटदिपातली 'मपनीसांधप...संगती! हीच संगती 'मर्मबंधातली ठेव ही..' करता वापरली आहे... रे देवा, माझ्या मर्मबंधाची गाठ तुझ्यापाशीच बांधली आहे रे..'दु:ख देवासि सांगावे..' असं म्हटलं आहे आमच्या बाबूजींनी..! तूच माझा सुहृद..!

मेरे मौला करम हो करम..!

मग सांग मी कुठे जाऊ? तुझ्याकडेच येणार ना रे? मान्य करतो की सर्वत्र तुझंच राज्य आहे.. तुझ्या कृपेनंच होतं सर्वकाही.. तू सगळ्यांचं ऐकतोस असं ऐकून आहे..मग माझंही ऐक ना रे..! तू अभाग्यांचा सहारा.. तू बुडत्याचा आधार..संकटांची वादळं तू क्षणात दूर कातोस.. मग माझ्याही आयुष्यातली घोंघावणारी वावटळ शमव की रे..!

'तू करे जो मेहेरबानिया, दूर हो जाए हर एक ग़म!'

सुंदर ओळ, सुंदर सुरावट!

ही मूळ उर्दू प्रार्थना थोडे शब्द बदलून खाकी या चित्रपटाकरता फार सुंदर रितीने वापरली आहे. टची आहे!
एक साधा, सरळ, सहृदयी, सेवाभावी डॉ अन्सारी.. त्याला दहशतवादी ठरवण्यात येतं.. तो निर्दोष आहे हे फक्त चार पोलिस अधिकार्‍यांना माहीत असतं.. अखेर तो मारला जातो. दहशतवादी ठरवला गेल्यामुळे त्याच्या मयतालाही कुणी जात नाही. अखेर तेच चार पोलिस अधिकारीच त्याला दफन करतात..गाण्याचं चित्रिकरण केवळ सुरेख..!



सोबत त्याचं अनाथ झालेलं पोरगं आणि त्याची असहाय्य, म्हातारी विधवा आई. ती तिथे हजर असते..



मेरे मौला करम हो करम...

कोण विचारतो त्या माउलीला? कोण ऐकतो तिची ही प्रार्थना?!

-- तात्या अभ्यंकर.

September 03, 2010

शाहीन..!

"लौकरच तुझ्यावर मी एक लेख लिहिणार आहे. तुझ्या फोटोसकट. तुझी परवानगी आहे का?" -- मी.
"माझं आयुष्य म्हणजे एक ओपन कार्ड आहे तात्या.. माझी फुल्ल परवानगी आहे" - शाहीन.


दिलिपअन्ना शेट्टी. मुलुंडच्या शास्त्री मार्गावर उमापॅलेस नावाचा एक डान्स बार आहे, त्याचा चालक-मालक. त्या सा-या शेट्टी फॅमिलीचा मी आयुर्विमा दलाल. त्याची बायको, दोन मुली - सा-यांच्या आयुर्विमा पॉलिसीज उतरवण्याचे काम माझ्याकडे. माणूस मालदार आहे त्यामुळे सतत कुठल्या ना कुठल्या पॉलिसीज माझ्याकडून घेत असतो. 

असाच एके दिवशी मी पॉलिसीजच्याच काही कामानिमित्त त्याच्याकडे गेलो होतो. शेट्टी बिझी होता. मला म्हणाला, " तात्यासाब बैठो व्हीआयपी रूम मे. क्वार्टरवार्टर पियो.. बाद मे बात करेंगे.."

'चला, फुकट क्वार्टर तर मिळाली!' असं म्हणून मी व्ही आय पी रूममध्ये बसलो आणि ब्लॅकलेबलची ऑर्डर दिली. 'चमचम करता..' हे गाणं मोठ्यानं सुरू होतं. माझ्या आजुबाजूला मुलुंड आणि आसपासच्या परिसरातले अमिरजादे गुज्जूभाई बसले होते.. समोर तरण्याताठ्या खुबसुरत पोरी थिरकत होत्या..

माझ्या शेजारीच एक गुज्जू आपल्या पुढ्यात साधारण ५० ते ६० हजार रुपये घेऊन बसला होता. २० च्या, ५० च्या, १०० च्या को-या करकरीत नोटा. उडवत होता भोसडीचा बेभान होऊन समोर नाचत असलेल्या एका पोरीवर. माझा जीव जळत होता.. साला, आयुर्विमा दलालीच्या आशेनं तिथं मी गेलेला.. मुलखाचा गरीब..!
त्याच्यासमोर नाचणारी मुलगी मात्र खरंच कुणीही पागल व्हावं अशी होती.. झक्कास ठुमकत होती..

जरा वेळानं मला शेट्टीनं बोलावणं पाठवलं व मी उठून त्याच्या कॅबिन मध्ये गेलो. आम्ही कामाचं बोललो. शेट्टीनं आता खायला मागवलं आणि एका वेटरला म्हणाला, "शाहीन को अंदर भेजो..":

ती मगासची त्या आमिरजाद्या म्होरं नाचणारी छोकरी आत आली. क्लासच दिसत होती.

" तात्यासाब, ये शाहीन है"

"हम्म. तुम्हारा नंबर दो एकदुसरे को. तात्यासाब, ये लडकी का इन्शुरस्न वगैरा करवा दो. मुझे पुछ रही थी. तुम जब टाईम मिले तो तात्यासाबको फोन करना. चलो भागो.." शेट्टीनं तिला पिटाळली..

'चला, बरं झालं. अजून काही विम्याचा धंदा मिळाला तर बरंच..' असं म्हणून मीही तेथून सटकलो.

दोनचार दिवसातच माझा फोन वाजला. शाहीनचा फोन होता. ती ठाण्याच्या घोडबंदर रोडला राहते. जवळच्याच एका हाटेलात चा पिण्याकरता आणि विम्याचं बोलण्याकरता मी शाहीनला भेटायला गेलो..आम्ही भेटलो. चा सँडविच वगैरे मागवलं. साला बया दिसायला लै भारी होती, आव्हानात्मक होती.

चा पिता पिता मी तिला विम्याबद्दल माहिती दिली. सारा तपशील सांगितला. ती तिचा आणि तिच्या बहिणींचा विमा घ्यायला तैय्यार झाली. मी पुढच्या फॉर्म वगैरे भरण्याच्या कारवाईला लागलो..लौकरच ती माझी अशील बनली..

त्यानंतर थोडाबहुत टाईम गेला असेल.. माझा फोन वाजला. शाहीनचा होता..पुढे पिक्चरमध्ये वगैरे घडतं तसं घडणार होतं याची मला कल्पना नव्हती..

"तात्यासेठ, एल आय सी के बारेमे कुछ बात करनी है.. शाम को मिलोगे? आज मेरी छुट्टी है..फलाना जगह रुकना.. मै मिलने आउंगी.."

मी ठरल्यावेळी ठरल्या ठिकाणी तिची वाट पाहात उभा राहिलो.. थोड्याच वेळात एक होन्डा सिटी गाडी माझ्या पुढ्यात थांबली.. मागचं दार उघडलं गेलं.. आत श्वेतवस्त्र परिधान केलेली, केवळ सुरेख दिसणारी शाहीन बसली होती. मी गाडीत दाखल झालो.. "ड्रायवर, चलो, वरली..!" शाहीननं हुकूम सोडला..

साला डान्सबार मध्ये नाचणारी शाहीन ब-यापैकी मालदार होती..

"वरली सीफेस चलेंगे. खानावाना खाएंगे..!" शाहीनंच ठरवलं सगळं..

साला, मी मुलखाचा भिकारचोट.. मुंबैचा बाजार फिरलेला. माझी कशाला ना असणारे?

हायवेवरून मुलुंड गेलं असेल नसेल, शाहीन मला खेटली. मी समजलो, पोरगी डेंजर वाटते..!
थोड्याच वेळात शाहीन साता जन्माची ओळख असल्यासारखी गप्पा मारू लागली. ती चालू वगैरे आहे हा माझा गैरसमज हळूहळू दूर होत होता.. हां, पण चालू नसली तरी बिनधास्त मात्र होती.. फ्री होती.  

ती मूळची दिल्लीची.. कनाट प्लेसमधल्या शाळेत काही बुकं शिकलेली. उफराटं रूप.. आली पैका कमवायला मुंबैला.. त्या सुमारास मुंबैत डान्सबार जोरात सुरू होते. शाहीन लौकरच मुंबैचे तोरतरीके शिकली. आयटम बनली.. साला, मोप पैका उडू लागला तिच्यावर.. पोरीचे पाय मुंबैच्या चारआठ बार मध्ये थिरकले आणि पैका जमला. घोडबंदर रोडला तिनं फ्लॅट घेतला, आणि आपल्या आजारी व बेकार असलेल्या वडिलांना, आईला व दोन धाकट्या बहिणींना मुंबैला घेऊन आली.. चार जणांची पोशिंदी बनली..!

पुढे ती व मी खूप वेळा भेटलो.. मस्त आहे ती.. अगदी बोलघेवडी.. पण मनानं खूप चांगली..

असाच एकदा तिच्यासोबत वरळी सीफेसवर बसलो होतो. शाहीन तेवढी मूडात नव्हती..

'उस की मा का..!"

शाहीनच्या तोंडात शिवी उमटली.. अहमदाबादचा एक कुणी गुज्जू.. गेले काही दिस मोप पैका उडवत होता तिच्यावर.. आणि दोनच दिसांपूर्वी त्यानं साहजिकच तिला 'बाहर आती है क्या रुममे?" असं विचारलं होतं..

"मग काय चुकलं त्याचं? तुझ्यावर साला तो पैसे उडवतो.. तुला भोगायला मिळावं म्हणूनच ना?" मी.

"तो मत उडाए पैसा.. ! मुझे नही जाना है उसके साथ..! साला टिचकी वाजवून मला म्हणतो..'चल किसी होटल के रूम मे.. २५००० फेकुंगा..! भिकारी साला, २५००० मे मुझे खरीदने चला..!"

"मग काय तुला २५ लाख हवेत?"

आणि एकदम शाहीनच्या चेह-यावर खुलं हसू उमटलं.. "जानू, तू चल ना मेरे साथ.. चल, तेरेको फोकोटमे..!" सुरेखसा डोळा मारला तिनं...!

आपण साला क्लीन बोल्ड..! मी तिचा 'जानू..' केव्हा झालो?!

मीही तसा हरामखोरच. शाहीनसोबत कधी कुठल्या हाटेलच्या रुममध्ये गेलो नसलो तरी तिच्या ए सी गाडीच्या बंद अंधा-या काचेत डायवरला बाहेर चा प्यायला पाठवून चुम्माचाटी मात्र भरपूर केली.. सा-या वासना असणारा माणसासारखा माणूस मी. मी विवेकानंद नव्हतो की समर्थ नव्हतो.. काकाजी नसलो तरी केरसुणीनं समुद्राच्या लाटा परतवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा आचार्यही नव्हतो..!

एके दिवशी शाहीनच्या घरी एक विमापावती देण्याकरता गेलो होतो.. पत्ता होता माझ्याकडे. प्रथमच तिच्या घरी जात होतो..स्वच्छ, टापटीप आवरलेलं घर.. शाहीनच्या आईनं कोण कुठले विचारलं.. आतल्या खोलीतून शाहीन बाहेर आले.. माझं मनमोकळं स्वागत केलं.. बसा म्हटलं..

"तात्यासाब, अंदर आईये..इधरही बात करते है.."

मी आत गेलो आणि जे दृष्य पाहिलं ते पाहून मला भरून आलं खूप..

आपल्या पक्षाघाती अपंग बापाला शाहीन कसलंसं खिमट भरवत होती.. ते भरवता भरवता त्याचाशी आपुलकीनं बोलत होती. मध्येच त्याच्या तोंडातून खिमट बाहेर येत होतं ते पुन्हा चमच्याने नीट त्याला भरवत होती..म्हात-याच्या चेह-यावर फक्त कृतज्ञता होती पोरीबद्दल..!

मी ते दृष्य पाहात होतो.. भारावला गेलो होतो.. भक्तिमार्गाचा एक नमुना पाहात होतो..!



आणि शाहीनच्या एका अवखळ प्रश्नाने माझी समाधी भंग पावली..

"क्यो तात्यासाब, जमाईराजा बनोगे इस बुढ्ढेके?!" Smile

शाहीनबद्दल अजून खूप काही लिहायचं आहे.. लिहीन कधितरी..!

-- तात्या अभ्यंकर.

September 01, 2010

प्रिय राहुल देशपांडे,

प्रिय राहुल देशपांडे,

(केवळ वयाने मोठा असल्यामुळे) अनेक आशीर्वाद,

मी तात्या अभ्यंकर. तुझा एक चाहता. तुझ्या गाण्यावर लोभ असलेला. साक्षात वसंतरावांचा नातू म्हणून तुझं खूप कौतुक असलेला. वसंतरावांच्या आणि कुमारांच्या गायकीचा एक छान ब्लेन्ड आहे तुझ्या गाण्यात. मुकुल कोमकलींसारख्या अवलियाचा तू शागिर्द. जे काही गातोस ते सुरेल गातोस, लयदार गातोस. एका बड्या खानदानी गवयाचा नातू म्हणून कुठेही दुराभिमान नाही, बडेजाव नाही, की त्यांची कुठे भ्रष्ट नक्कल नाही. स्वत:च्या बुद्धीने गातोस, कसदार गातोस, जमून गातोस.

तीनेक वर्षांपूर्वी प्रथमच तुझी संपूर्ण मैफल मी ऐकली होती आणि दाद देण्याकरता हा लेखही लिहिला होता.. असो.

अभिषेकीबुवा आणि वसंतराव यांनी अमर केलेलं, मराठी संगीत रंगभूमीला नवसंजिवन देणारं, नवचैतन्य देणारं 'कट्यार..' तू करायला घेतलंस तेव्हा तर मला तुझा अभिमान वाटला होता, आजही वाटतो.. 'कट्यारच्या..' एखाददोन तालमींनाही मी हजर होतो..

पण.......

दोनच दिसांपूर्वी मी सहज म्हणून मी झी मराठी सुरू केला आणि मला दु:खद धक्का बसला. मराठी झी सारेगमप मध्ये तू चक्क परिक्षक?? इतकी कशी काय तुझी अधोगती? आणि ती ही अशी अचानक?

मान्य करतो, तिथे जी मुलं गायला येतात ती आपापल्या परिने गुणी असतात. संगीतात काही एक प्रयत्न करणारी असतात, धडपडणारी असतात. अरे पण तुला हे माहित्ये का?(माहिती असेलच नक्की) की तो केवळ एक संगीताचा बाजार आहे? तिथे परिक्षकांच्या मताला पूर्ण किंमत नसते. तिथे अर्धअधिक राज्य हे प्रेक्षकांच्या/श्रोत्यांच्या मतांचं असतं आणि पर्यायाने झी आणि आयडिया सेलच्या आर्थिक राजकारणाचं असतं..

सन्माननीय परिक्षक या नात्याने आणि न्यायाने तू तुझ्या सांगितिक ज्ञानानुसार, अनुभवानुसार एखाद्या स्पर्धकाची गुणवत्ता तपासणार.. परिक्षक या नात्याने जर तुला तो योग्य वाटला, तुझ्या पसंतीस उतरला तर तू त्याला 'क्ष' गुण देणार.. पण कुणीही चार आंडुपांडू श्रोते/प्रेक्षक दुस-याच एखाद्या स्पर्धकाला एसएमएस पाठवून '४क्ष' गुण देणार..!

मला सांग, यात काय राहिली तुझी किंमत? झी मराठी आणि आयडियाला त्या स्पर्धकांशी किंवा तुझ्या गुणग्राहकतेशी काहीही देणंघेणं नसून त्यांचा मतलब आहे तो त्या चार आंडुपांडूंनी पाठवलेल्या एसएमएसशी...!

राहुल देशपांडे म्हणजे नुसतं एक शोभेचं बाहुलं..?

अरे काय रे हे? केवळ एसएमएसच्या अर्थकारणाकरता जी स्पर्धा चालते किंवा जिचे निकाल मॅनिप्युलेट होऊ शकतात अश्या स्पर्धेचा तू एक परिक्षक?

कुणी म्हणेल - एसएमएस पाठवतो तो जनता जनार्दन..!

मान्य.. अगदी मान्य..! साक्षात नारायणराव बालगंधर्व त्यांचा उल्लेख 'मायबाप' असा करायचे..! पण जनता जनर्दनाचं काम दाद देण्याचं, कौतुक करण्याचं. गांभिर्याने जर एखादी सांगितिक स्पर्धा सुरू असेल तर स्पर्धकांना मार्क देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गुणवंत, जाणकार परिक्षकांचा..! केवळ एक बटण दाबून एसएमएस पाठवून जनता जनार्दनाला तो अधिकार प्राप्त झाला आहे असं तुला खरोखरच वाटतं का? (तसं वाटत असेल तर या माझ्या पत्राचं काही प्रयोजनच नाही.. मी हे पत्र बिनशर्त मागे घेतो आणि तुझी क्षमा मागतो)
अरे ती स्पर्धा म्हणजे लोकसभेची निवडणूक नाही की जिथे फक्त एक बटण दाबून मत देता येतं.. अत्यंत दुर्लभ अश्या गानविद्येची स्पर्धा आहे ना ती?

तू कसा काय असा झी मराठी आणि आयडियाच्या बरबटलेल्या सिस्टिमचाच एक भाग झालास?

अरे तेवढाच जर फावला वेळ तुझ्याकडे असेल तर स्वत:चं गाणं कर की.. खूप चांगला गातोस, अजूनही चांगला गाशील. वसंतराव, भीमण्णा, कुमार यांची नावं घेतली की संगीत म्हणजे 'स्काय इज द लिमिट..' हे मी तुला सांगायला नको.. कर की जरा चिंतनमनन. अजूनही कर की जरा मिळालेल्या तालमीचा वैचारिक आणि रियाजी रवंथ..!

दोन सूर धडपणे नाही गाता आले तर लगेच कालपरवाच्या पोरांची नसती कौतुकं, फजिल लाडावलेलं निवेदन, स्पर्धकांचे आणि त्यांच्या मायबापसांचे रुसवेफुगवे, सारी जाहिरातबाजी, शोबाजी असलेल्या आणि मुख्य म्हणजे एसएमएसच्या अर्थकारणाने बरबटलेल्या झीमराठी आणि आयडियाच्या वाममार्गाला कसा काय लागलास बाबा तू?!

तू एक उत्तम गवई आहेस, याचं कारण तू एक उत्तम शिष्य आहेस, गाणं टिपणारा आहेस..वसंतराव, कुमारजी, आणि अवलिया मुकुल शिवपुत्रांची परंपरा तुला लाभली आहे. मला सांग - वसंतराव, कुमारांनी केलं असतं का रे असं धेडगुजरी परिक्षकाचं काम? ज्यांना चिंतन-मनन करायला दिवसातले २४ तासही कमी पडत अश्या कुमारांचा वारसा ना तुझा?

मी पुन्हा एकवार स्पष्ट करतो की कुठलीच स्पर्धा वाईट नसते. गुणी मंडळींकरता ते एक आव्हानच असतं, प्रगती साधण्याचा तो एक मार्ग असतो. पण त्या स्पर्धकांची कलात्मक मूल्यं तपासण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गुणवंत परिक्षकांचा. एसएमएस पद्धतीचा नाही, कधीही नाही, त्रिवार नाही..!

असो..

जे काही वाटलं ते मोकळेपणी लिहिलं.. वरील सर्व मतं माझी व्यक्तिगत मतं आहेत तरीही ती तुला कळवाविशी वाटली.. एक सामान्य श्रोता म्हणून मी नेहमीच तुझा चाहता राहीन. तुझ्या 'मुख तेरो कारो..'च्या यमनकल्याणचा, 'दीप की ज्योत जले..' च्या धनबसंतीचा नेहमीच भुकेला राहीन.!

तुझा,
तात्या.

August 30, 2010

बेहती हवा सा था वो..


बेहती हवा सा था वो...(येथे ऐका..)

३ इडियटस् चित्रपटातलं हे अप्रतिम गाणं. एका हरवलेल्या मित्राबद्दलचं हे मनोगत.. 

विशुद्ध, निरपेक्ष मैत्रीसारखं या दुनियेत दुसरं काही नाही. महाविद्यालयीन दिवसातली मैत्री.. सख्ख्या भावापेक्षाही अधिक जवळची..

कोण आहे हा मित्र? कोण आहे हा मनाला कायमची रुखरुख लावून गेलेला..? कोण आहे हा दोस्तीचा प्रसन्न शिडकावा करून गेलेला? कसा आहे तो? कसा होता तो?
मंद-मोकळ्या झुळुकेसारखा..वा-याची एक झुळूक. जी फक्त सुख आणि सुखच घालते आपल्या पदरात..! अगदी सहज कुठेही स्वच्छंदपणे हेलकावणा-या पतंगासारखा..! स्वत:च स्वत:ची वाट शोधणारा.. वेळप्रसंगी धडपडणारा पण सावरून पुन्हा आपल्याच मस्तीत मार्गक्रमणा करणारा..! आताचा क्षणच काय तो महत्वाचा, उद्याचं माहीत नाही असं म्हणून मस्त मजेत जगणारा..!

कहा से आया था वो?
छुके हमारे दिलको
कहा गया उसे ढुंडो..!


कुठून आला माहीत नाही... पण जीव लावून गेला.. आता शोधायला हवा त्याला..!
हास्य
तळपत्या उन्हातल्या एखाद्या शांत सावलीसारखा होता तो.. दूरदूरपर्यंत पसरलेल्या वैराण वाळवंटात एखादं गाव लागावं त्या गावासारखा आश्वासक होता तो..

आम्ही तसे थोडेसे कुपमंडूकच.. थोडेसे घाबरलेले, थोडेसे बावरलेले.. पण तो तसा नव्हता. तो वेळप्रसंगी गोते खायचा, पण आमच्या सारखा लहानश्या बावडीत नव्हे, तर नदीच्या अथांग पात्रात.. आणि गोते खाऊनदेखील पुन्हा प्रवाहाविरुद्ध पोहणारा..!

विंदांनी 'वेड्यापिश्या ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे..' असं म्हटलंय.. तो अगदी तसाच होता.. आमचा होता तो.. अगदी खूप आमचा..! त्याला शोधायला हवा..!

मंडळी, खूप जीव लावणारं गाणं आहे हे.. अगदी हळवं करणारं...

आमिरखानचं, शरमन जोशीचं, मॅन्डी माधवनचं, बोमनचं... सा-यांचंच खूप खूप कौतुक करावसं वाटतं..

आणि अर्थातच.. राजू हिरानीचं..!

प्रिय राजू हिरानी, 

अरे 'हृषिदा' नावाचा एक खूप मोठा माणूस होऊन गेला, तू वावरतोस त्या चित्रसृष्टीत.. !
तुझ्याकडूनही फार अपेक्षा आहेत रे.. हृषिदांनी जसा आम्हाला निखळ आनंद दिला तसाच तू ही द्यावास इतकंच वाटतं रे..!

- तात्या अभ्यंकर.

August 28, 2010

ननदीके बचनवा..

I स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II

'ननदीके बचनवा..'

यमन रागातली ग्वाल्हेर परंपरेची ही सुरेख बंदिश येथे ऐका.. शशांक मक्तेदारने गायली आहे.

'छे बाई... या नणंदेचे बोल काही सहन होत नाहीत हो आता... काय करणार?, आमच्या खाष्ट सासूबाईंची लाडकी लेक ना! जळ्ळी मेली..! आईचे संस्कार अगदी पुरेपूर उतरलेत हो लेकीमध्ये. त्याच मेलीची फूस आहे हिला.!' हास्य

'आपण आपलं 'वन्स' वन्स' म्हणून कौतुक करायला जावं तर जास्तच शेफारते ही.. चारचौघात अगदी घालूनपाडून बोलण्याची एकही संधी सोडत नाही हो..!' हास्य

'पण काय करणार बाई.. इकडूनही तिला काही सांगणं होत नाही.. लाडकी बहीण ना? आपलंच नाणं खोटं त्याला काय करायचं..?' हास्य

मंडळी, ही तक्रार आहे, एक स्वगत आहे नव्यानवर्‍या सुनबाईंचं..

'ननदीके बचनवा सहे न जात
सोच सोच कछु ना जाए हमसो
उमग उमग असूवन बरसत नीर..'


किती सुरेख बंदिश आहे ही! आपल्या हिंदुस्थानी संगीतातली ग्वाल्हेर परंपरा.. आमच्या अन्तुबुवांची, गजाननबुवांची, मधुबुवांची, उल्हासकाकांची ग्वाल्हेर परंपरा..!

यमनसारखा प्रसन्न राग.. ही बंदिश म्हणजे यमनातली एक सुरेख रांगोळी!

आमच्या अन्तुबुवा जोशींची ही बंदिश.. तिथून त्यांचे चिरंजिव पं गजाननबुवा जोशी, गजाननबुवांकडून त्यांचे शिष्योत्तम पं उल्हास कशाळकर आणि तिथून उल्हासकाकांचा शिष्य शशांक मक्तेदार.. असा हा या बंदिशीचा प्रवास.. याला म्हणतात घराण्याची परपरा... अष्टांगप्रधान ग्वाल्हेर गायकीची परंपरा..! याला म्हणतात गुरुशिष्य परंपरा..!

त्रितालातली ही बंदिश.. तशी ऑड असलेली चवथ्या मात्रेपासूनची तिची उठवण..'सहे न जात..' ची गंधारावरची सुरेख सम..'उमग उमग असूवन बरसत नीर..' क्या बात है.. हे शब्द किती सुरेख पडलेत पाहा.. किती सुंदर बांधलेत पाहा..!

अंतराही अगदी तितकाच सुंदर..

'एक तो बैरन मोरी सास-ननदीया
दोरनिया, जठनिया रैनदिन
सब मिल हमसन जियरा मोरा डरावे
ननदिके बचनवा सहे न जात..'


'रात्रंदिवस सगळा सासूरवास आहे ओ अगदी.. जळ्ळ्या मेल्या मोरा जियरा अगदी डरावून टाकतात..!' हास्य

शशांकच कौतुक वाटतं मला..त्याने अगदी सुंदर गायली आहे ही बंदिश..तो सुरेल आहे, आलाप, लयकारी, तान, बोलतान.. नक्कीच चांगली आहे.. तो पं उल्हास कशाळकर यांच्याकडे कलकत्त्याला आयटीसीएसआरए मध्ये शिकला आहे.. उल्हासकाकांकडून खूप छान तालिम मिळाली आहे त्याला.

मंडळी, अंतुबुवा जाऊन आज खूप वर्ष झाली..त्यानंतर गजाननबुवाही गेले.. तरीही त्यांच्या परंपरेतली ही बंदिश आजही अक्षय आहे, तितकीच ताजी टवटवीत आहे. ही पुण्याई, ही श्रीमंती ग्वाल्हेर परंपरेची, आपल्या हिंदुस्थानी रागदारी संगीताची..मंडळी, ही मिठाई आहे.. अगदी साजूक तुपातली!

हिंदुस्थानी रागदारी संगीत हा आपला अनमोल ठेवा.. याची सर्वांनी कास धरा.. आयुष्य खूप समृद्ध होईल.. इतकेच विनंतीवजा सांगणे...

-- तात्या अभ्यंकर.

August 25, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (४०) - माता सरस्वती शारदा..

माता सरस्वती शारदा..!


(येथे ऐका..)

माता सरस्वती-दीदी शारदा..!

नुकताच दीदीचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा अगदी घरगुती वातावरणात साजरा झाला...

भारतरत्न लता मंगेशकर.. म्हणजे आपली सर्वांची लाडकी दीदी.!
 

लता मंगेशकर! हे नांव म्हणजे भारतीय संगीत..! हे नांव म्हणजे भारतीय संगीताची ओळख - भारतीय संगीतातलं सर्वोच्च बिरुद..!

गेली ८० वर्ष जिच्या कंठी साक्षात सरस्वतीने निवास केला आहे, तानपुर्‍यातला नैसर्गिक गंधार - ज्याने आपलं बिर्‍हाड जिच्या कंठी थाटलं आहे अशी दीदी..! जिथे सारे स्वर अदबीने 'मेरे लायक कुच्छ सेवा?' असा प्रश्न जिला विचारत आहेत अशी दीदी..! जिथे शब्द संपतात आणि उरतात केवळ सच्चे दैवी सूर.. अशी दीदी..!

'माता सरस्वती शारदा..!' - 'आलाप' चित्रपटातील दीदीनं गायलेली सुरेल भैरवी.. राग भैरवी. राग भैरवी म्हणजे भारतीय संस्कृती..

राग भैरवी.. जिथे सारे भारतीय एकवटतात, जिथे सारे भारतीय- सार्‍या भारतीय परंपरा, सण-उत्सव, भारतीय कला एक होतात अशी भैरवी..!

'विद्या दानी, दयानी दु:ख हरिणी' हे शब्द केवळ दीदीनेच गावेत. 'सरस्वती शारदा' हे शब्द म्हणून दीदी जिथे सम गाठते तेच भारत दर्शन..! 'इतना वरदान दिजे..' गाताना जे भाव उमटतात त्यालाच आवाजातलं लाघव म्हणतात, मार्दव म्हणतात, त्यालाच स्वरांतील 'अदब' म्हणतात..! आणि 'बुद्धी अनंता..' म्हणतानाची तान ही साक्षात आभाळातल्या विद्द्युलतेला लाजवील अशी..! सारंच अद्भूत..!

-- तात्या अभ्यंकर.

August 05, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३९) - चांद फिर निकला..


चांद फिर निकला.. (येथे ऐका)

गाणं कसं गावं, कसं मांडावं, स्वर कसे ठेवावेत, गाण्याच्या शब्दांतून त्यातली अदृष्य लय कशी जपावी... इत्यादी सा-या प्रश्नांची उत्तरं म्हणजे हे गाणं..हे गाणं म्हणजे तरलता.. हे गाणं म्हणजे एक कैफियत.. कैफियत इतकी सुंदर असू शकते?!


एखादं गाणं शब्दांच्या मुठीत पकडणं, त्याला व्याख्येत बसवणं हे मुश्किल काम..परंतु अप्रतिम गाण्याची व्याख्या करायचीच जर झाली तर त्याचं उत्तर म्हणजे हे गाणं..!


भूप रागावर आधारीत असलेलं हे गाणं.. हे गाणं म्हणजे 'ज्योती कलश छलके' चं भावंडं.. राग भूप! भूपाबद्दल काय बोलावं? त्याची सारी श्रीमंती त्याच्या नावातच! 'सारेगपधसां..' या त्याच्या सोन्याच्या मोहरा..! 'मनी' वर्ज्य असले म्हणून बिघडलं कुठं?!Smile

ये रात केहेती है वो दिन गये तेरे,
ये जानता है दिल के तुम नही मेरे
खडी हू मै फिर भी
निगाहे बिछाए, मै क्या करू हाए, के तुम याद आये..


'ये जानता है दिल' मधले स्वरभाव केवळ शब्दातीत! 'खडी हू मै फिर भी..' मधल्या अनपेक्षित तार गंधाराचं तेज सूर्याला लाजवेल असं.. 'निगाहे बिछाए, मै क्या करू हाए, के तुम याद आये..' च्या अवरोही बॅलन्सिंग बद्दल काय बोलावं?!

थोरल्या बर्मनदांना, नूतनच्या निरागस सौंदर्याला आणि 'दीदी'नामक आश्चर्याला सलाम.!


-- तात्या अभ्यंकर.