December 05, 2007

काशीबाई..

राम राम मंडळी,

ठाण्याच्या एकविरा पोळीभाजी केन्द्राच्या बाहेर उभं राहून गरमागरम पोळीभाजी खायची आणि तिथूनच कार्यालयात जायचं हा माझा नित्याचा क्रम. घरगुती स्वरुपाची पोळीभाजी केन्द्रं, हा आम्हा चाकरमानी मुंबईकरांचा एक आधार. आज ठाण्या-डोंबिवली सारख्या शहरांत अशी अनेक पोळीभाजी केन्द्रं उभी आहेत. एकविरा पोळीभाजी केन्द्र हे त्यातलंच एक.

सकाळचे साडेआठ नऊ वाजलेले असतात. मी एकविरेच्या बाहेर उभा असतो.

"आज तुझी आवडती वांगीबटाट्याची भाजी आहे रे दादा. आज जेव बाबा जरा निवांत!"

उजळ वर्णाची, म्हातारीशी सुरकुतलेली, गोल चेहेर्‍याची, गालावर छानश्या खळ्या असलेली, कपाळावर पुसटसे तीन हिरवट त्रिकोणी ठिबके गोंदवलेली, चेहेर्‍यावर समाधान असलेली काशीबाई मला म्हणत असते!

काशीबाई!

एकविरा केन्द्रात रोजंदारीवर भाकर्‍या करणारी एक बाई! एकविराच्या त्या लहानश्या जागेत खाली जमिनीवर बसून तीन-चार बायका पोळ्याभाकर्‍या करत असतात, स्वयंपाक करत असतात, त्यातलीच काशीबाई एक! भाकर्‍या करण्याचं काम काशीबाईकडे . काशीबाई माझी कुणीच नाही, ना नात्याची ना गोत्याची. पण तरीही ती माझ्याकरता खूप काही आहे. तिच्या समाधानी व्यक्तिमत्वाचा मी निस्सिम चाहता आहे!

सकाळी सकाळी लवकर उठून एखाद-दोन घरी जाऊन बाळंतीणींना शेक, अंगाला लावण्याचं काम करणे हेदेखील काशीबाईच्या नित्याचंच एक काम. काशीबाई बाळंतीणींच्या अर्भकांच्या मालिशची कामं करते हे मला माझा मित्र अमित चितळे याच्या घरी मी गेलो असताना कळले. तिथे अमितच्या मुलाला मालिश करायला काशीबाई आली होती. इथे तिचा एक गंमतीशीर संवाद सांगायचा मोह मला आवरत नाही.

पोराचं मालिश करून झाल्यावर काशीबाई अमितला म्हणाली, "दादा तुमचं पोरगं मोठेपणीसुद्धा असंच अगदी गोरंपान राहील"

"ते कसं काय?" अमितने विचारलं.

"त्याचं सामान बघा. कसं अगदी गोरंगुलाबी आहे! ज्याचं सामान असं गोरंगुलाबी असतं तो मोठेपणीही छान गोराच राहतो. पण सामान जरा जरी काळपट असेल तर मात्र गोरेपणा टिकणं कठीण आहे! :)

काशीबाई किती सहजपणे बोलून गेली होती हे! तिचे विचार ऐकून मी आणि अमित खो खो हसलो होतो. या जुन्या बायकांचे काही काही शब्द आणि आडाखे मोठे मजेशीर असतात! :)

मालिशची कामं करून मग काशीबाई एकविरेत येते. तिथे भाकर्‍या बडवायचं काम सुरू! साडेदहा अकराच्या सुमारास भाकर्‍यांच्या कामातून काशीबाई जराशी मोकळी होते व तीही तिथेच चार घास खाते. त्यानंतर हळूच चंची उघडून तंबाखू मळून खाईल. जुन्या खेडवळ बायकांची तंबाखू खायची जुनी सवय काशीबाईलाही आहे.

एके दिवशी मी असाच पोळीभाजी खात एकविरेच्या बाहेर उभा होतो तेव्हा तिथेच खाली जमिनीवर बसून अगदी मन लावून भाकर्‍या करत असलेल्या काशीबाईने माझं लक्ष वेधलं.

'चांदोबा माज्या म्हाह्येरचा, सून मी सुर्व्याघरची!'

काशीबाई भाकर्‍या करता करता असं काहीसं छानसं कुठलंतरी खेडवळ लोकगीत आपल्याच नादात गुणगुणत होती. त्याची चाल, शब्द सगळंच मला अपरिचित होतं पण ऐकायला छान वाटत होतं. रोजंदारीवर भाकर्‍या करण्यासारखं कष्टप्रद काम करतानादेखील ही बया काय छान गुणगुणत होती! माझाही स्वभाव तसा बोलघेवडाच. मी पटकन तिला म्हटलं, "मावशे, खूप चांगलं गातेस की गं तू!"

तशी आजुबाजूच्या बायांकडे पाहात काशीबाई एकदम गोड लाजली आणि गायचीच थांबली! म्हातारीच्या खळ्या काय सुंदर दिसल्या लाजताना! त्या दिवसापासून माझी आणि काशीबाईची 'आखो ही आखोमे' गट्टीच जमली! माझ्या रोजच्या वेळेवर मी पोळीभाजी खायला गेलो की नजरेतूनच आम्ही एकमेकांची विचारपूस करायचो. अधिक काही बोलणं, गप्पा मारायला वेळही नसायचा आणि कारणही नसायचं!

एकविरेत रोज तीन चार प्रकारच्या भाज्या केल्या जायच्या, झुणका असायचा, भाकरी, पोळ्या असायच्या. एकदा पातेल्यातल्या वांगीबटाट्याच्या रस्साभाजीकडे पाहून, "अरे वा! आज वांगीबटाट्याची भाजी का? वा वा!" अशी नकळतपणे माझ्याकडून दाद गेली!

"आज हीच भाजी मला दे" असं मी काऊंटरवर बसलेल्या शिवरामला सांगितलं.

"अरे दादा, वांगीबटाट्याच्या भाजीसंगती भाकरी खा की! चपाती कशापायी खातो?" काशीबाई प्रथमच माझ्याशी बोलत होती! अगदी डायरेक्ट! :)

तिचं बोलणं ऐकून शिवरामही क्षणभर चाचपडला, मग लेगच सावरून म्हणाला, "खरंच, आज चपाती नको, भाकरीच खावा साहेब. आमची काशीबाई भाकर्‍या एकदम फस्क्लास करते! "
'First Class' या इंग्रजी शब्दांचा उच्चार 'फर्स्ट क्लास' असा आहे हे शिवरामला अमान्य होतं! :) असो, रंगाने जर्द काळ्या, बोलक्या डोळ्यांच्या, अंगाने सडपताळ परंतु देखण्या असलेल्या शिवरामविषयी पुन्हा केव्हातरी! कुणालाही हवाहवासा वाटावा असाच आमचा शिवराम आहे!:)

"थांब जरासा, आत्ता गरम भाकरी करून तुला देते!"

वास्तविक पातेल्यात आधी केलेल्या १०-१२ भाकर्‍या शिल्लक होत्या, परंतु मला गरमगरम भाकरी मिळावी अशीच माझ्या मैत्रिणीची इच्छा होती! माझ्याकडून मी काशीबाईला केव्हाच माझी मैत्रिण मानले होते परंतु तिच्याकडूनही माझ्याबद्दल तेवढाच ओलावा आहे हे वरील भाकरीच्या एका साध्या प्रसंगातून मला समजले आणि त्याचा आनंद त्या गरम भाजी भाकरीपेक्षा अंमळ अधिक होता! किंबहुना, काशीबाईने आपणहून मला गरमागरम भाकरी करून दिली त्यामुळे ती भाजीभाकरी मला अधिक गोड लागली!

मी त्या म्हातारीच्या जवळजवळ प्रेमातच पडलो होतो. मला त्या बाईबद्दल खूप उत्सुकता होती, तिच्याशी भरपूर बोलावंसं वाटत होतं! पण कधी? ती बिचारी आत बसून आपल्या भाकर्‍यांच्या व्यापात मग्न असे आणि मलाही तिथे अधिक काळ थांबायला वेळ नसे. पण एके दिवशी तिच्याशी बोलायचा, तिच्या घरी जायचा प्रसंग आला. मी नेहमीप्रमाणे एकविरेत पोळीभाजी खाण्याकरता गेलो होतो. मला पाहून काशीबाई उठली आणि तिने एक कार्डवजा कागद माझ्यापुढे धरला.

"जरा हे कार्ड बघ रे दादा. ह्याचे पैशे कधी भेटणार मला?"

पोष्टाच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीमचं ते कार्ड होतं. पाच वर्ष संपलेली होती आणि आता काशीबाईला व्याजा/बोनससहीत पाच-पंचवीस हजारांची रक्कम मिळणार होती असं ते कार्ड दर्शवत होतं!

"अगं मावशे, तुला फार काही करावं लागणार नाही. आज उद्या केव्हाही टाऊन पोष्टात जा. मास्तरांना भेटून हे कार्ड दाखव, ते सांगतील तिथे सह्या कर म्हणजे लगेच तुला ह्याचे पैशे भेटतील!"

"धत तुझी मेल्या! मला कुठं सही करता येते? तू येशील का माझ्यासंगती? ती पोष्टाची बया धा धा निरोप धाडून पण येईना बघ!" निरागसपणे हसत काशीबाई म्हणाली.

काशीबाईचे पैसे गुंतवणारी कुणी महिला एजंट आता तिला भेटतही नाही ही गोष्ट माझ्या लक्षात आली. एकदोन दिवसातच मी तुझ्याबरोबर पोष्टात येईन असं मी काशीबाईला कबूल केलं आणि दुसर्‍याच दिवशी दुपारी दोनअडीचच्या सुमारास मी मुद्दाम वेळ काढून काशीबाईसोबत पोष्टात गेलो. पोष्टाच्या बाहेर आमची रिक्षा उभी राहिली. काशीबाईने आपल्या मळकटश्या बटव्यातून पैसे काढले.

"थांब मावशे. मी देतो रिक्षाचे पैसे" मी सहजंच म्हटलं.

"माझं काम अन तू कशापायी पैशे देणार? वा रं वा!" काशीबाई जवळजवळ ओरडलीच माझ्यावर! पण ते माझ्यावर ओरडणं नव्हतं तर तो तिचा स्वाभिमान होता! काशीबाईला रिक्षाने फिरवण्याइतका मी श्रीमंत नव्हतो हे जाणवलं मला! त्या भाकर्‍या करणार्‍या बाईची खुद्दारी माझ्यापेक्षा खूप खूप श्रीमंत होती! केवळ 'ओळखीचा चेहेरा' या आधारावर वांगीबटाट्याच्या भाजीसोबत गरम भाकरी खा असा आग्रह धरणारी प्रेमळ काशीबाई आणि रिक्षाचे पैसे मला देऊ न देणारी स्वाभिमानी काशीबाई मी पाहात होतो. प्रसंग तसे लहानसहानच असतात पण त्या त्या प्रसंगातूनदेखील आपल्याला माणसाच्या स्वभावातले बारकावे कळू शकतात!

पोष्टातलं काम झालं. काशीबाईला पैसे मिळाले. आम्ही पोष्टाच्या बाहेर पडलो. समोरच रंगीत बर्फाचे गोळे विकणारा उभा होता. मी गंमतीने काशीबाईला म्हटलं, "मावशे, बर्फ खायला घाल ना मला. ऊन खूप आहे, तहान लागली आहे!"

हे ऐकून मगासची स्वाभिमानी काशीबाई पुन्हा एकदा लहान झाली, निरागस झाली! :) मग मी आणि माझ्या त्या मैत्रिणीने दुपारच्या टळटळीत उन्हात मस्तपैकी लिंबूनमक लावलेले रंगीबेरंगी बर्फाचे गोळे एन्जॉय केले! व्हॉट अ डेट! :) एखाद्या देखण्या जवान तरतरीत तरुणीसोबत बास्किन रॉबिनसन्सचं आईस्क्रीम खाताना जी मजा येणार नाही ती मजा मला काशीबाईसोबत बर्फाचे गोळे खाताना आली! :)

"चल, येतोस का माझ्या घरला? इकडनं जवळंच माझं घर आहे. तुला चुरमुर्‍याचे लाडू देते!"

हे ऐकून मला आनंदच झाला. मी कोणतेही आढेवेढे न घेता तिच्या घरी गेलो. किसननगरच्या वस्तीतील एका चाळीत काशीबाईचं मोजून दीड खोल्यांचं घर. घरी एक तरुणी एका लहानग्या शेंबड्या पोराला बदडत होती. बहुधा त्या मायलेकरांचं काहीतरी बिनसलं असावं. घरात दुसरं एक लहानगं पोर होतं ते झोपलं होतं. मी आणि काशीबाई घरी पोहोचल्यावर ते शेंबडं पोर एकदम धावत आलं आणि काशीबाईला बिलगलं! काशीबाईने आभाळाच्या मायेने त्या पोराला जवळ घेतलं, आंजारलं, गोंजारलं!

बोलण्याबोलण्याच्या ओघात मला त्यांच्या घरातल्या काही हृदयद्रावक गोष्टी समजल्या! काशीबाईचा नवरा एक नंबरचा बेवडा, काही कामधंदा करत नसे. दारूच्या अतिआहारी गेला आणि मरण पावला. काशीबाईला तीन मुलं. दोन मुलगे, एक मुलगी. मोठा मुलगा-सुनबाईने वेगळी चूल मांडली होती. ती मंडळी काशीबाईला थुंकूनही विचारत नव्हती. आई मेली काय नी जगली काय, त्यांना काहीच फरक पडत नव्हता! दुसरा मुलगा चांगला हातातोंडाशी आलेला, रेल्वे अपघातात मरण पावला. त्याची बायको लहानगं मूल टाकून, त्याची जबाबदारी काशीबाईवरच सोपवून दुसर्‍या कुणाचातरी हात धरून पळून गेलेली. एक आई आपल्या मुलाला टाकून जाऊ शकते हे अविश्वसनीय होतं पण इथे मात्र तीच वस्तुस्थिती होती! मुलगी लग्न होऊन सासरी गेली आणि वर्षादोनवर्षाच्या आतच नवर्‍याने टाकली म्हणून लहानग्याला घेऊन माघारी परतलेली!

आणि काशीबाई समर्थपणे हा सगळा गाडा ओढत होती, चालवत होती!

मला दूरदर्शनवरील समस्त मालिकांमध्ये कल्पनादारिद्र्य असलेल्या लेखक-दिग्दर्शकांची, ते त्यांच्या मालिकांमधून दाखवत असलेल्या मोठ्यांच्या खोट्या दु:खांची अक्षरश: दया आली, कीव आली!

"ए सुमन, दादाला लाडू दे आणि याला पण आण."

मांडीवर घेतलेल्या लहानग्याला खेळवत काशीबाईने सुमनला, त्या लहानग्याकरता आणि माझ्याकरता लाडू आणायला सांगितले! काशीबाईने केलेले ते गूळ चुरमुर्‍याचे लाडू आम्ही तिचे दोन्ही नातू खाऊ लागलो! एक नातू अगदीच लहान,बापाने टकलेला आणि एक मी! आपली लहानसहान मध्यमवर्गीय पांढरपेशी दु:ख गोंजारणारा!!

तो गूळचुरमुर्‍याचा लाडू त्या लहानग्याच्या एकदम तोंडात जाईना म्हणून काशीबाई त्या लाडवाचे तुकडे करून त्याला भरवू लागली. ते शेंबडं, लहानगं आता तो लाडू मटामट खाऊ लागलं आणि काशीबाईच्या चेहेर्‍यावरचं कौतुक ओसंडून वाहू लागलं! मला फक्त 'आजीची माया ही घट्ट सायीसारखी' एवढंच पुस्तकी वाक्य पाठ होतं!

"मुंबईची मुंबादेवी,
तिची सोन्याची साखली......"

असं काहीसं गाणं गुणगुणत काशीबाई सुमनच्या मुलाला हसतमुखाने खेळवत होती. बिचारीला 'गतं न शोच्यम' असा काहीसं संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे हेही ठाऊक नव्हतं! ते संस्कृत वचन न वाचताही ते ती किती सहजपणे आचरणात आणत होती! स्वत:च्या संसाराचा बट्ट्याबोळ झालाच होता, पण आता कडेवर पोर घेऊन मुलगी माघारी आली होती आणि धाकट्या मुलाचं पोरही काशीबाईच्याच गळ्यात! बापरे! काशीबाईच्या या वयातही तिच्या अंगावर असणार्‍या जबाबदार्‍या पाहून माझंच धाबं दणाणलं होतं! सुमन मात्र मला खरंच खूप चांगली मुलगी वाटली. धुण्याभांड्यांची चार कामं तिने मिळवली होती. काशीबाईची शेक, अंगाला लावण्याची कामं, भाकर्‍या आणि सुमनची धुणीभांडी यांच्या वेळा त्या मायलेकींनी आपापसात ऍडजस्ट केल्या होत्या आणि दोघीही त्या लहान पोरांना सांभाळत होत्या!

'तुमची पुढील पैशांची व्यवस्था काय आहे?', 'या मुलांचं तुम्ही कसं करणार?' 'सुमनच्या मुलाचं ठीक आहे, पण काशीबाईच्या दुसर्‍या नातवाची जबाबदारी काशीबाईच्या पश्चात कोण घेणार?' 'की ती जबाबदारी सुमनवरच?' असे कोणतेही प्रश्न मी तिथे विचारू शकलो नाही, नव्हे तेवढी हिंम्मतच नव्हती माझ्यात! आणि स्वाभिमानी काशीबाई हे प्रश्न घेऊन माझ्या दाराशी कधीच येणार नव्हती! उलट हे प्रश्न विचारल्यावर, "तुला का रे बाबा आमची चिंता" असं म्हणून काशीबाईनी मला अगदी सहज झाडून टाकला असता याचीही खात्री होती मला!

हीच का ती काशीबाई, जी भाकर्‍या करताना सगळी दु:ख विसरून गाणी गुणगुणते? हीच का ती काशीबाई, मी रिक्षाचे पैसे देऊ लागल्यावर हिचा स्वाभिमान खाडकन जागा होतो? आणि 'मावशे तू छान गातेस बरं' एवढी लहानशीच दाद दिल्यावर चारचौघीत गोड लाजणारी हीच का ती काशीबाई? अजून हिच्यात इतका गोडवा शिल्लकच कसा?

"दादा, ये हां पुन्हा. लाडू आवडला ना गरीबाघरचा?" काशीबाईने मला हसतमुखाने विचारलं!

'लाडू म्हणजे मोतीचुराचा आणि तोही साजूक तुपातला!' अशी लाडवांबद्दलची माझी व्याख्या! काशीबाईकडच्या गूळचुरमुर्‍याच्या लाडवाने ती व्याख्या साफ पुसून टाकली!

आता पुन्हा एकदा एकवीरेत जाईन, तिथे वांगी बटाट्याची भाजी असेल, आणि पुन्हा एकदा काशीबाई मला म्हणेल,

"आज वांगीबटाट्याची भाजी आहे. तिच्यासंगती भाकरीच खा. आत्ता करून देते गरमगरम भाकरी!"

-- तात्या अभ्यंकर.

हाच लेख इथेही वाचता येईल!

पाटणकर आजोबा..

अखेरीस पाटणकर आजोबा वारले! अगदी शांतपणे आणि आनंदाने! एखाद्या जिवलग मित्राला भेटावं इतक्या सहजतेने मृत्युला भेटले!

पाटणकर आजोबा मला प्रथम भेटले त्याला आता १५-२० वर्ष झाली असतील किंवा त्यांच्यामाझ्या दोस्तीला १५-२० वर्ष झाली असं आपण म्हणूया!

एकदा मालिनी राजूरकरांच्या गाण्याला गेलो होतो तेव्हा श्रोत्यांमध्ये पहिल्याच रांगेत बसून पाटणकर आजोबा मालिनीबाईंच्या गाण्याला मनमोकळी दाद देत होते. जुन्या ष्टाईलचा धोतर-कोट-टोपी हा पोशाख. उंचीने, शरीरयष्टीने मध्यम. पण म्हातार्‍याच्या चेहेर्‍यावर मात्र तरतरी होती, मिश्किल भाव होते. कोकणस्थी गोरा रंग असलेले पाटणकर आजोबा देखण्यातच जमा होत होते, हँडसम दिसत होते!

गाण्याचं मध्यंतर झालं. मंडळी जरा इकडेतिकडे करत होती, चहापान वगैरे करत होती. माझादेखील चहा घेऊन झाला होता व मी बांधून आणलेलं १२० पान सोडून खायच्या तयारीत होतो. समोरच पाटणकर आजोबा उभे होते व मिश्किलपणे माझ्याकडे पाहात होते. मीदेखील त्यांना एक तोंडदेखला स्माईल दिला तशी मला म्हणाले,

"आज नेमकी मी माझी पानसुपारीची चंची घरी विसरलो! गाण्याला खूपच गर्दी आहे आणि आता लवकरच पुन्हा मध्यंतरानंतरचं गाणं सुरू होईल. तू जरा माझी जागा पकडतोस का?, मी बाहेर जाऊन पटकन पान खाऊन येतो. नाहीतर मी पान खायला म्हणून बाहेर जायचो आणि नेमकी माझी जागा जायची!"

'तुम्ही कोण', 'तुमचं नांव काय', 'कुठे असता' इत्यादी नेहमीचे औपचारिक प्रश्न न विचारता अगदी वर्षानुवर्षाच्या ओळखीतल्या माणसाशी बोलावं तसं एकदम एकेरीवर येत पाटणकर आजोबा माझ्याशी बोलते झाले! पुलंच्या भाषेत सांगायचं तर 'इतक्या एकदम सलगीत आलेला हा म्हातारा कोण?' हे मला कळेचना! पण काही काही चेहेरेच असे असतात की 'याचं-आपलं जमणार!' याची खात्री पहिल्या भेटीतच होते. पाटणकर आजोबांच्या चेहेर्‍यावरही असेच 'दोस्ती करण्याकरता उत्सुक' असे भाव होते. मला तो माणूस कुणी परका आहे असं वाटलंच नाही! मग मीच त्यांना म्हटलं, "आजोबा तुम्ही बसा आणि माझीही जागा पकडा, मी तुमच्याकरता बाहेरून पान घेऊन येतो. तुमचं पान कोणतं ते सांगा!"

"उत्तम! बनारसी १२०, कच्ची सुपारी" आजोबा खुशीत येऊन म्हणाले.

चढत्या भाजणीने रंगत गेलेलं मालिनीबाईंचं गाणं संपलं. मंडळी, मालिनीबाईंचं मैफलीतलं गाणं ऐकायला भाग्य लागतं! पाटणकर आजोबा आणि मी मैफलीत पहिल्या रांगेत शेजारी शेजारीच बसलो होतो. समोरच अवघ्या दोन तीन फुटांच्या अंतरावर अत्यंत साध्या आणि घरगुती व्यक्तिमत्वाच्या मालिनीबाई बसल्या होत्या. त्यांच्या स्वरास्वरात, लयीच्या प्रत्येक वळणात 'संगीत!' 'संगीत!' म्हणतात ते हेच!' याची साक्ष मिळत होती. अत्यंत कसदार आणि खानदानी गाणं! स्वच्छ, मोकळा आणि अत्यंत सुरेल आवाज, सुरालयीवर, तानेवर, सरगमवर असामान्य प्रभुत्व. 'चाल पेहेचानी' हा टप्पा आणि त्यानंतर 'फुल गेंदवा अब ना मारो' या भैरवीने मालिनीबाईंनी अक्षरश: आभाळाला गवसणी घातली आणि मैफल खूप उंचावर नेऊन ठेवली! मैफल संपल्यानंतर एक सन्नाटा निर्माण झाला. लोकांना टाळ्या वाजवायचं भान नव्हतं! मंडळी, संगीतक्षेत्रात असं मानलं गेलं आहे की जी मैफल संपल्यानंतर टाळ्यांच्या ऐवजी नुसताच सन्नाटा निर्माण होतो ती खरी मैफल! मालिनीबाईंची मैफल म्हणजे नादब्रह्माचा साक्षात्कार! मला आजपावेतो मालिनीबाईंचं मैफलीतलं गाणं अगदी भरपूर ऐकायला मिळालं हे माझं भाग्य! असो, मालिनीबाईंचा गानविष्कार हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

गाणं संपलं. मालिनीबाईंच्या पाया पडून मी बाहेर पडलो.

"कुठे राहतोस?"

मागनं पाटणकर आजोबांचा आवाज ऐकू आला. त्यांचा हात माझ्या खांद्यावर होता. आयला!, म्हातारा मला सोडायलाच तयार नव्हता!

मग 'तुम्ही कोण, कुठले', 'आम्ही कोण, कुठले' या आमच्या गप्पा झाल्या, रीतसर ओळख झाली. पाटणकर आजोबा दादरलाच एका चाळीत राहणारे. नोकरीधंद्यातून निवृत्त होऊन फंड-पेन्शनीत निघालेले.

"चल, मस्तपैकी पावभाजी आणि नंतर भैय्याकडची कुल्फी खाऊ! घरी जायच्या गडबडीत नाहीयेस ना?"

मला जरा आश्चर्यच वाटलं. रात्रीचा जवळजवळ एक वाजला होता आणि या म्हातार्‍याला घरी जाऊन चांगलं झोपायचं सोडून खादाडीचे वेध लागले होते! :) पण मला त्यांचा आग्रह मोडवेना. मग आम्ही मस्तपैकी गाडीवर पावभाजी झाल्ली. तेव्हा बिसलेरी-फिसलेरीचं एवढं फ्याड निघालं नव्हतं त्यामुळे बाजूच्याच प्लाष्टीकच्या पिंपातलं पाणी प्यायलो आणि नंतर झकासपैकी मलई कुल्फी खाल्ली. मजा आली तिच्यायला! :)

"काय मग, कसं वाटलं मालिनीबाईंचं गाणं? चल जरा चौपाटीवर थोडी शतपावली घालू म्हणजे पावभाजी पचेल!"

आणि खरोखरंच रात्री एक वाजता पाटणकर आजोबांबरोबर मी मुकाट्याने दादरच्या चौपाटीवर शतपावली घालू लागलो. 'च्यामारी कोण हा? का असा मला वेठीस धरतो आहे?' असा विचार माझ्या मनात आला. पण पाटणकर आजोबांचं व्यक्तिमत्वच एवढं प्रभावी आणि छाप पाडणारं होतं की मला त्यांना 'नाही' म्हणताच येईना! मग आम्ही जरा वेळ गाण्यावर गप्पा मारल्या. त्यांनी माझा पत्ता,फोन नंबर घेतला आणि आम्ही एकमेकांना बाय बाय करून निरोप घेतला. पण त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की या माणसाने अभिजात संगीत अगदी भरपूर ऐकलं होतं. आमच्या गप्पांच्या ओघात त्यांनी अनेक लहानमोठ्या कलाकारांची नावं घेतली, त्यांची वैशिष्ठ्ये सांगितली. एकंदरीत हा माणूस गाण्यावर आणि आयुष्यावर भरभरून प्रेम करणारा वाटला, माणसांचा भुकेला वाटला! शिवाय 'भीमण्णांच्या गाण्यावर तुडुंब प्रेम' ही आमच्या दोघातली कॉमन गोष्ट निघाली. त्यामुळे मला तर माझ्या वारीतलाच एक वारकरी भेटल्याचा आनंद झाला! वारीत फक्त मागेपुढे चालत होतो त्यामुळे इतके दिवस भेट नव्हती! परंतु आमचा रस्ता एकच होता, वारी एकच होती. आम्हा दोघांचंही पंढरपूर म्हणजे पुण्यनगरीतल्या नव्या पेठेतील 'कलाश्री' बंगला आणि त्यातला 'कानडाऊ भीमसेनू' हाच आमचा विठोबा! असो...

त्यानंतर चारच दिवसांनी पाटणकर आजोबांचा फोन आला. "अरे अमुक अमुक ठिकाणी अण्णांचं गाणं आहे. येणारेस का? नक्की ये."

मंडळी, ही तर केवळ आमच्या गानमैत्रिची सुरवात होती. त्यानंतर पाटणकर आजोबांबरोबर मी गाण्याच्या अगदी भरपूर मैफली ऐकल्या. कधी मालिनीबाई तर कधी भीमण्णा, कधी उल्हास कशाळकर तर कधी आमच्या मधुभैय्या जोश्यांसारखा शापित गंधर्व! कधी कुमारजी, किशोरीताईंसारखे प्रतिभावंत तर कधी वीणा सहस्रबुद्धे. कधी शाहिदभाईंची गाणारी सतार, तर कधी आमच्या दातारबुवांचं लयदार व्हायलीन! कधी भाई गायतोंड्यांनी तबल्यात मांडलेला नादब्रह्माचा महायज्ञ तर कधी विश्वमोहन भट्टांची मोहनवीणेतली मोहिनी! कधी अजय चक्रवर्तीचं चमत्कृतीपूर्ण परंतु प्रतिभावन गाणं, तर कधी राशिदखानचं मस्त मिजास भरलेलं आमिरखानी गाणं! खूप खूप ऐकलं, अगदी मनसोक्त ऐकलं!

माझ्यासोबत काही वेळेला माझ्या काही समवयस्क मित्रमैत्रिणीही असायच्या. मग पाटणकर आजोबा आणि आम्ही सारी त्यांची नातवंड (!) एकत्र गाणं ऐकायचो आणि त्यानंतर कुठेतरी भरपूर खादाडीही करायचो, धमाल करायचो! वास्तविक पाटणकर अजोबांचं वय तेव्हाही पंचाहत्तरीच्या आसपास होतं. पण मनाने ते इतके तरूण होते की आम्हा कुणालाच कधी त्यांच्यात ऑडमॅन दिसला नाही. ते आम्हाला आमच्याच वयाचे, आमच्यातलेच कुणीतरी वाटत. त्यांचा उत्साह सर्वात अधिक!माझी सगळी मित्रमंडळी मला 'तात्या' म्हणत ते पाहून पाटणकर अजोबाही मला 'तात्या' म्हणू लागले. कधी मूड मध्ये असले की मला बाजूला घेऊन, "काय रे तात्या, ती अर्चना तुझ्यावर जाम खुश दिसते. जमवून टाक ना लेका! मी मध्यस्थ म्हणून बोलून पाहू का तिच्याशी?" असं हळूच डोळा मारून मला म्हणायचे! :)

पाटणकर आजोबांच्या घरीही मी अनेकदा गेलो आहे. मस्तपैकी चाळीतलं घर. आजोबा तिथे स्वतःपुरता स्वयंपाक करून एकटेच रहायचे. स्वयंपाक तर ते अतिशय उत्तम करायचे. त्यांच्या हाताला चव होती. "तात्या, वेळ आहे ना? बस निवांतपणे! पटकन पोहे टाकतो. मस्तपैकी पोहे खात खात हिराबाईंचा मुलतानी ऐकू!" असं म्हणून झकासपैकी कांदेपोहे करून आणायचे. खूप गप्पा मारायचे. भरभरून बोलायचे. त्यांच्या उत्तम तब्येतीचा तर मला नेहमीच हेवा वाटायचा. ७५-७६ व्या वर्षीही हा माणूस चांगली तब्येत राखून होता, स्वतःची सगळी कामं स्वतःच करायचा!

त्यांच्याकडे जुन्या पद्धतीचा फोनोग्राम होता. त्यावर त्यांच्याकडे असलेली, त्यानी चोरबाजारातून पाच पाच, दहा दहा रुपायाला विकत घेतलेली नारायणराव बालगंधर्वांची, हिराबाईंची आणि इतर अनेकांची ७८ आर पी एम च्या प्लेटांवरची ध्वनिमुद्रणे आम्ही एकायचो.

ध्वनिमुद्रणे ऐकता एकता पाटणकर आजोबा चंची उघडून स्वतःच्या हातानी माझ्याकरता पान जमवायचे. "तात्या, कात-चुना-सुपारी मी घालतो पण तंबाखू मात्र तुझा तू मळून घे हो!" असं गंमतीने म्हणायचे. वर पुन्हा "आपली व्यसनं आपण स्वत:च करावीत" हेही मिश्किलपणे सांगत. पाटणकर आजोबांच्या घरी खाल्लेल्या चमचमीत पोह्यांची, खमंग मुरबाडी आमटीभाताची, थालिपिठाची, आणि चुना-तुकडा कात- कच्ची रोठा सुपारी घालून जमवलेल्या पक्क्या कळीदार पानाची चव आजही माझ्या तोंडावर आहे! चुना-काळ्या तंबाखूच्या मळलेल्या चिमटीचा तो कडवट-मातकट स्वाद आजही मला पाटणकर आजोबांची आठवण करून देतो!

एकदा असाच पाटणकर आजोबांचा फोन आला. "अरे तात्या, येत्या रविवारी मी ८० वर्षांचा होतोय रे. दुपारी तुम्ही सगळे माझ्या घरी जेवायला या. अगदी नक्की आणि आठवणीने! वाट पाहतो!"

पाटणकर अजोबा ८० वर्षांचे झाले? केव्हा? मनाने तर ते एकविशीचे होते. आणि आम्ही सगळे त्यांच्या घरी जेवायला? आम्हा ५-६ मित्रमंडळींचा स्वयंपाक हा म्हातारा एकटा करणार? असा विचार करतच आम्ही तिघेचौघे मित्रमैत्रिणी आजोबांच्या बिर्‍हाडी गेलो. बघतो तर काय? घरात अक्षरश: गोकूळ नांदत होतं! पाटणकर आजोबा स्वतःच्या कुटुंबियांबद्दल कधीच माझ्याशी बोलले नव्हते आणि 'एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात उगाच कशाला नाक खुपसा?' असा विचार करून मीही कधी तो विषय काढला नव्हता!

पाटणकर आजोबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी चक्क त्यांची दोन कर्ती-सवरती मुलं अशोक आणि विद्याधर, सुना प्राजक्ता आणि नेहा, मुलगी सीमा आणि जावई प्रसाद, एवढी मंडळी जमा झालेली होती. आजोबांच्या आजुबाजूला ५-६ नातवंडं खेळत बागडत होती. पाटणकर आजोबांनीच त्या सगळ्यांशी, "हा माझा गाण्यातला जिवलग दोस्त तात्या" अशी माझी आणि आमची सर्वांची ओळख करून दिली!

मंडळी, खरंच सांगतो, आजोबांच्या घरचं ते गोकूळ पाहून अगदी आपोआपच माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले! 'पाटणकर आजोबा अगदी एकटे आहेत' अशी निश्चितपणे माझ्या मनात कुठेतरी भावना असणार. तिला सुखद तडा गेला असणार आणि म्हणूनच माझ्या आनंदाश्रूंना वाट मिळाली असणार!

पुढे असाच एकदा आजोबांच्या घरी गेलो असताना गप्पांच्या ओघात आजोबा कधी नव्हे ते स्वतःबद्दल बोलले. तसे ते खूप गप्पीष्ट होते परंतु स्वतःबद्दल फारच कमी बोलत. मला म्हणाले, "अरे तात्या, आमची सौ आम्हाला मध्येच सोडून गेली रे! तिला जबरदस्त कावीळ झाली, ती पोटात फुटली आणि सगळा खेळ खलास..मी मध्यमवर्गीय माणूस. तसा मला ग्लॅक्सो कंपनीत पगारबिगार बरा होता. शिवाय गावाकडचाही थोडाबहुत पैसा मिळाला म्हणून संसार तरी पूर्ण करू शकलो. माझी तिनही मुलं मात्र गुणी हो! उत्तम शिकली आणि आपापल्या मार्गाला लागली. सीमाही सुस्थळी पडली. दोन्ही मुलांनी उपनगरात मोठाल्या जागा घेतल्या आणि तिथे रहायला गेली. अरे त्यांचे संसार आहेत, मुलंबाळं आहेत. या चाळीतल्या दोन खोल्यात ते कसं जमणार?

मला प्रेमाने त्यांच्याकडे रहायला बोलावतात. इथे एकटे राहू नका म्हणतात. पण मीच जात नाही रे! चाळ सोडवत नाही बघ! आणि अजून परमेश्वराच्या कृपेने तब्येत चांगली आहे. उत्तम दिसतंय, उत्तम ऐकू येतंय, स्वतःचं सगळं स्वत:ला करता येतंय, आणि मुख्य म्हणजे गाठीशी चार पैसे आहेत हे महत्वाचं! पैशाचं सोंग घेता येत नाही रे तात्या! तेव्हा असा विचार केला की उगाच कशाला त्यांच्यात जा? त्यांचं त्यांना आयुष्य जगू दे की सुखाने! तेव्हा जमेल तितके दिवस इथे चाळीतच रहायचं असं ठरवलं आहे. मस्तपैकी गाण्याच्या मैफली वगैरे ऐकायच्या, धमाल करायची. शिवाय तुमच्यासारखी तरूण मित्रमंडळीही अधनंमधनं भेटतात, बरं वाटतं!"

पाटणकर आजोबा प्रसन्नपणे बोलत होते. बोलण्यात कुठेही खंत नव्हती, कडवटपणा नव्हता! पाटणकर आजोबांच्या रुपात एक उमदा मित्र मला बघायला मिळत होता. त्यांच्या आयुष्यात कसलीच तक्रार नव्हती, दु:ख नव्हती असं मी तरी कसं म्हणणार? त्यांच्याही काही तक्रारी असतील, दु:ख असतील, पण पाटणकर आजोबांची एकंदरीतच वृत्ती अशी होती की तिथे दु:खांना हा माणूस फार वेळ थाराच देत नसे! हिंदित 'सुलझा हुआ' असं काहीसं म्हणतात ना, तशी होती त्यांची पर्सनॅलिटी! जे आहे, जसं आहे त्यात आनंद मानायचा, उमेदीने जगायचं आणि आयुष्याचा जास्तीत जास्त आस्वाद घ्यायचा हेच त्यांचं धोरण होतं.

पाटणकर आजोबांना मी कधी फारसं रागावतानाही बघितलं नाही. "आजोबा, तुम्ही नेहमीच आनंदी दिसता, कधीच भडकत नाही, रागावत नाही, हे कसं काय?" असं त्यांना विचारल्यावर ते हसून मला म्हणाले होते, "अरे समोरच्या माणसाने कसं वागावं हे मी ठरवू शकत नाही ना! त्याला जसं वागायचंय तसंच तो वागणार! असं असताना मी त्याच्यावर उगाच कशाला रागावू? त्याला जसं वागायचंय तसं तो वागेल आणि मला जसं वागायचंय तसं मी वागेन! झाली की नाही फिट्टंफाट! मग कशाला उगाच रागावून भडकाभडकी करा आणि स्वत:चंच बीपी वाढवून घ्या?! खरं की नाही? दे पाहू टाळी!" असं म्हणत मोठ्याने हसले होते! :)

तर अशी पाटणकर आजोबांची आणि आमची दोस्ती बर्करार होती. गाण्याच्या मैफली झडत होत्या, खादाडीचे कार्यक्रम सुरू होते. म्हातारा अगदी 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' या चालीने आयुष्य जगत होता आणि अशातच एके दिवशी ध्यानीमनी नसताना आजोबांच्या मुलाचा, विद्याधरचा मला फोन आला.

"कोण तात्याच ना? अरे मी विद्याधर पाटणकर बोलतोय! आज सकाळी बाबा वारले. त्यांच्या डायरीत तुझा नंबर सापडला म्हणून तुलाही कळवतोय."

झालं! आमच्या सांगितिक वारीतला एक वारकरी स्वतःच वैकुंठवासी झाला होता. मंडळी, हे सांगितिक ऋणानुबंध फार त्रास देतात. रक्ताच्या नात्यापेक्षा संगीतातली नाती अधिक घट्ट असतात! मी चुपचाप उठलो आणि आजोबांच्या घरी पोहोचलो. मुलं, सुना, लेक, जावई, नातवंडं सगळी जमली होती.

आमचा म्हातारा शांतपणे घोंगडीवर विसावला होता. झोपेत असतानाच मृत्यु आला होता. चेहेरा अगदी शांत दिसत होता, त्यावर कुठल्याही वेदना दिसत नव्हत्या. तक्रार करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता त्यामुळे साक्षात मृत्यु भेटायला आल्यावरसुद्धा त्यांनी कुठलीच तक्रार केली नसणार!

आजोबांना पोचवून आम्ही पुन्हा त्यांच्या घरी गेलो. सुनबाईंनी पिठावर पणती वगैरे लावली होती. तिला नमस्कार केला. तिथून निघायला तर हवं होतं पण निरोप तरी कुणाचा घेणार? आता तिथे माझं कुणीच नव्हतं! शेवटी मी अशोक आणि विद्याधरशी औपचारिक पद्धतीने हात मिळवला व त्यांचा निरोप घेतला.

चपला घालून घराबाहेर पडणार तेवढ्यात मागनं आवाज आला,

"तात्या, वेळ आहे ना? बस निवांतपणे! पटकन पोहे टाकतो. मस्तपैकी पोहे खात खात हिराबाईंचा मुलतानी ऐकू!"

--तात्या अभ्यंकर.

हाच लेख इथेही वाचता येईल!



December 03, 2007

रौशनी.. ४

>>ना कुठल्या गुन्ह्यात मला तिच्यासमोर उभं केलं गेलं होतं, ना मी तिच्यासोबत
>>लाळघोटेपणाकरून झोपायला निघालो होतो! पण च्यामारी बाईचा चेहेराच साला भारी होता,
>>आव्हानात्मक होता, एक प्रकारची हुकुमत होती तिच्या चेहेर्‍यावर!

दोन-पाच मिनिटं अशीच शांततेत गेली. त्यानंतर कृष्णाने सांगितलेली लस्सी आली.

"लिजिये सेठ. कृष्णा, सेठको नमस्ते करो"

त्या काळ्यासावळ्या कृष्णाने मला नमस्कार केला. त्याचा चेहेरा लाघवी होता. माझ्यासमोर थोडासा अवघडलेपणाने उभा होता, थोडासा कसनुसा होऊन उभा होता. 'कोण हा?', 'रौशनीला याच्याबद्दल माझ्याशी काय बोलायचं असेल?' माझ्या मनात पुन्हा एकदा प्रश्न उभे राहू लागले. मी काहीच न बोलता लस्सी पिऊ लागलो.

आता रौशनीने विषयाला हात घातला. "तात्यासेठ, हा कृष्णा. अमिताचा मुलगा. याला कुठेतरी चांगल्या ठिकाणी कामपे लगाओ तो बहोत मेहेरबानी होगी! वैसे बिलकुल गवारा/अनपढ नही है. डोंगरीके मुन्शिपाल्टीके स्कूलमे चारपाच साल तक इसने पढाई की है. याने चांगलं शिकावं, तुम लोग जैसा साब बनावं, अशीच इच्छा होती याच्या आईची. अमिता इसे इस माहोलसे दूर रखना चाहती थी!

"तात्यासाब, तुम बहोत सही और सिधेसाधे इन्सान लगते हो, अच्छे घरानेके लगते हो, बडे बडे लोगोंके साथ उठतेबैठते हो, तुम्ही याच्याकरता कुठेतरी चांगली नोकरी बघा. लडका तसा हुशार आहे, मेहनती आहे, प्रामाणिक आहे, पडेल ते काम करेल!" असं रौशनी म्हणाली तेव्हा मला जरा नवलच वाटलं. मी सिधासाधा, अच्छे घरानेका आणि थोरामोठ्यांसोबत उठबस करणारा आहे, हा शोध तिला कसा लागला देव जाणे! बहुतेक तिच्या अनुभवी नजरेने तिला हे सांगितलं असेल!

"जा बेटा कृष्णा, तू अंदर जा और हिसाब लिख. तात्याभाई, हमारा सेठ है ना, उसके सब हिसाब लिखने का काम आजकल कृष्णाही करता है. जगहे का भाडा, खानापिना-चायपानी, लडकियोके भाडे का हिसाब, वगैरा वगैरा!"

हे ऐकून मी मनाशीच हसलो. साला काय फरक होता माझ्यात आणि कृष्णात? मी देशी दारूचे हिशेब लिहीत असे, तर कृष्णा रांडांच्या खोलीभाड्याचे वगैरे हिशेब लिहीत असे! दोन्ही लाईनी तश्या डेंजरच!" :) ते असो, थोडक्यात त्या कृष्णा नावाच्या मुलाला कुठेतरी चांगल्या ठिकाणी कामाला लावायचा होता आणि ह्याकरताच रौशनी मला भेटू इच्छित होती हे मला समजलं. निदान आत्तापर्यंत रौशनी प्रकरणातल्या एका गोष्टीचा तरी मला उलगडा झाला होता, हेही नसे थोडके!

पण आता, 'ही अमिता कोण?', 'ही हयात नाही का?' हे पुन्हा काही नवे प्रश्न तयार झाले. च्यामारी एकदा मनात विचार आला की मरेनात का तो कृष्णा, ती अमिता आणि ती रौशनी! आपल्याला सालं काय देणघेणं या रंडीबाजारवाल्यांशी? ही लस्सी संपवावी आणि इथून चुपचाप फुटावं हे खरं! नंतर नेहमीच काहीतरी कारणं सांगून टाळाटाळ करणं मला सहज शक्य होतं!

लस्सी पीत असतांनाच माझी नजर रौशनीकडे गेली. बाई मोठ्या विश्वासाने माझ्याकडे पाहात होती. 'हा मनुष्य चांगला आहे', 'कृष्णाचं काम करील' असा विश्वास तिच्या चेहेर्‍यावर दिसत होता! मग माझी मलाच क्षणभर शरम वाटली. असेना का ही रंडीबाजारातली मावशी! मला तर तिने खूप इज्जत देऊ करून आदराने वागवलं होतं ना? मला काही वावगं तर करायला सांगत नव्हती ना ती? मग मला तिचं काम करायला काय हरकत होती? निदान प्रयत्न तरी करून पाहायला काय हरकत होती?

आणि खरं सांगायचं तर आता रौशनी मला आवडू लागली होती! हां, आता त्या माहोलमध्ये राहून तिची भाषा काही वेळेला हार्श आणि शिवराळ होती हे खरं, परंतु पहिल्याच भेटीत माझ्या नकळत मी तिच्याकडे आकर्षित झालो होतो. गोरापान रंग, रेखीव चेहेरा! तिचं बोलणं, चालणं, उठणं, बसणं ही प्रत्येक गोष्ट अत्यंत ग्रेसफूल होती. त्या गलिच्छ वातावरणात ह्या सगळ्या गोष्टी अद्याप कशा काय टिकून राहिल्या होत्या देव जाणे! कुठे रौशनी आणि कुठे त्या बाकीच्या काळ्याकुट्ट, पोट सुटलेल्या, बेढब आणि अवाढव्य लोंबत्या स्तनांच्या इतर मावश्या! असो..

"ठीक आहे, मी प्रयत्न करून पाहतो. त्या मुलाचं संपूर्ण नांव, कहा तक सिखा है, उसके जनम की तारीख, ये सब मुझे एक कागजपे लिखके दो!"

हे ऐकल्यावर रौशनी निराश हसली!

"कृष्णा हसन हे त्याचं नांव आहे. बस, उसके डोंगरीके स्कूलका एक कागज है मेरे पास. वो देती है आपको. और तात्यासाब, खरं सांगायचं तर हमारे यहा जो बच्चे पैदा होते है, उनका बस एकही नाम होता है - 'हरामी"!! अमिता किसीसे प्यार करती थी. आता काय सांगू तुम्हाला तात्याभाई, अहो रांडांवर कधी कुणी प्रेम करतं का? फक्त शरीराची भूक भागवायला आलेल्या माणसाचं प्रेमही फक्त तेवढ्यापुरतंच! एकदा पाणी पडलं की त्यांच्या प्रेमाची नशादेखील खाडकन उतरते! (ही खास त्या बाजारातली भाषा! हे वाक्य रौशनीच्या तोंडचं आहे, माझं नाही, याची कृपया सुशिक्षित, सुसंस्कृत वाचकांनी नोंद घ्यावी!! :)

"पण अमिताला हे समजलं नाही. एक गिर्‍हाईक आलं होतं तिच्या आयुष्यात. बस! पडली त्याच्या प्रेमात! तिला भाबडीला वाटलं की तोही तिच्यावर प्रेम करतोय म्हणून! अहो पैसेही घेत नसे त्याच्याकडून. त्याची काय चैनच हो! तो मादरचोद फुकटात ठोक ठोक ठोकायचा अमिताला! कसलं प्यार नी कसलं काय! शेवटी एके दिवशी अमिताचं पोट फुगवून, कृष्णाला तिच्या पोटात सोडून निघून गेला कायमचा! अब तो कृष्णा की जिम्मेदारी मुझपे छोडकर अमिताभी इस दुनियासे चली गयी! अमिता मेरी बहोत अच्छी सहेली थी. कृष्णाका कुछ भला हो तो अच्छाही है, नही तो जिंदगीभर रंडियोके हिसाब लिखते वो भी यही पे पडा रहेगा!"

रौशनी बोलत होती, मी ऐकत होतो! सुशिक्षित, पांढरपेशा समाजातला मी, रितीप्रमाणे कृष्णाचा बायोडेटा मागितला तर रौशनीने मला त्याचा वरील बायोडेटा सांगितला! असला बायोडेटा यापूर्वी कधीच माझ्या पाहण्यात आला नव्हता!! ज्याच्या बापाचं खरं नांव माहीत नाही असा बायोडेटा! अमिताच्या त्या ठोक्याचं नांव हसन असावं बहुधा!

"ठीक है. चलता हू मै. मुझसे जो हो सकेगा मै करूंगा." असं म्हणून मी तिथून उठलो. रौशनी मला सोडायला चाळीच्या जिन्यापर्यंत आली. पुन्हा एकदा त्या रांडांच्या गर्दीतून वाट काढत काढत मी जाऊ लागलो.

"दोबारा जरूर आना सेठ. हमे भूल मत जाना." असं म्हणून रौशनीने मला निरोप दिला.

"और तात्यासाब, खरं सांगायचं तर हमारे यहा जो बच्चे पैदा होते है, उनका बस एकही नाम होता है - 'हरामी"!!"

रौशनीचं ते वाक्य माझ्या कानात घुमत होतं! आपण किती सहजपणे आपल्या नेहमीच्या बोलण्याचालण्यात 'हरामी', 'हरामखोर' हे शब्द वापरतो! पण आज मी प्रत्यक्ष एका 'हरामी' माणसाला बघत होतो! तो चौकडीचा शर्ट आणि हाफ चड्डी घातलेला, काळासावळा, भाबड्या चेहेर्‍याचा कृष्णा हरामी होता, हरामखोर होता, हरामाचा होता!! छ्या.. डोकं सुन्न झालं होतं! अमिताला मी कधीही पाहिलं नव्हतं, पण कृष्णाच्या चेहेर्‍यात मला आता तिचा चेहेरा दिसत होता!

आणि रौशनी? मैत्रिणीच्या पोराचं भलं करायला निघाली होती. दोस्ती निभावायला निघाली होती. मृत अमिताचं पोरगं तिथेच सडूकुजू नये म्हणून प्रयत्नशील होती! म्हटलं तर सगळंच अगम्य होतं. आणि मी तरी असा मोठा कोण होतो की त्या चार यत्ता शिकलेल्या कृष्णाला मारे कुठे कामाबिमाला लावणार होतो? तेव्हा मी स्वतःच अवघ्या हजार-बाराशे रुपयावर नोकरी करत होतो. झमझम बारमध्ये हिशेब लिहिण्याचे चार पैसे जरा जास्त सुटत इतकंच!

बारमध्ये परतलो तर बारमधली नेहमीची नोकर मंडळी मिश्किलपणे माझ्याकडे बघत होती. तो चूतमारिचा दीडदमडीचा मन्सूर मला विचारतो, "काय तात्याशेठ, रौशनीकडे काय मजा केलीत? कुणी नवाकोरा माल आला आहे का तिच्याकडे? नथ उतरवायला साली जाम मजा येते!"

पाचदहा रुपायाच्या टीपवर जगणार्‍या मन्सूरने नथ उतरवायची मजा केव्हा अनुभवली होती कुणास ठाऊक! :) पण मला आता या सगळ्याचं काहीच वाटेनासं झालं होतं. मन्सूरला तरी मी का दोष देऊ? तो सगळा माहोलच तसा होता!

काही दिवस असेच गेले. अधनंमधनं 'रौशनीने चाय पिने के लिये बुलाया है' असे मन्सूरचे निरोप यायचे, पण मी त्याकडे दुर्लक्ष करत होतो. 'ही बया मला वारंवार का बोलावते?' कृष्णाच्या नोकरीचं अजून काहीच काम झालं नव्हतं. म्हणजे मी काही प्रयत्नच केले नव्हते. पण रौशनी मात्र मनातून जात नव्हती. तिने दहा निरोप पाठवूनदेखील आपण एकदाही तिला भेटायला जात नाही हे कुठेतरी माझ्याही मनाला खटकत होतं हेही खरं होतं!

अश्यातच एके दिवशी मन्सूरचा पुन्हा एकदा निरोप आला, "तात्याभाई, तुम्हाला आज रौशनीने खानेपे बुलाया है. ना मत केहेना!" बस! मनाशी ठरवलं, तसाच उठलो आणि पुन्हा एकदा रौशनीची माडी चढलो. 'कृष्णाच्या नोकरीकरता प्रयत्न करत आहे' असं तिला सांगायचं असं मनाशी ठरवलं होतं!

"आओ तात्याभाई, आप तो हमारा रास्ताही भूल गये! आज आपको हमारे यहासे खाना खाकेही जाना पडेगा!"

पुन्हा एकदा रौशनीने माझं हसतमुखाने स्वागत केलं! तिच टापटीप, साफ, स्वच्छ खोली आणि तीच आणि तशीच आकर्षक रौशनी!

'साली दुनिया गेली बाझवत!' असा विचार करून आज मी तिच्यासोबत व्हिस्की पिणार होतो, तिच्या हातची बिर्याणी खाणार होतो आणि मला ती तिच्या पूर्वायुष्याबद्दल सगळं सांगणार होती!

क्रमश:

--तात्या अभ्यंकर.

रौशनी.. ३

>>शेवटी एकदाचे आलो आम्ही रौशनीच्या खोलीपाशी. खोलीत समोरच सोफ्यावर रौशनी बसली होती! पन्नाशीच्या आसपासची, गोरी, आणि देखणी!! <<

भाग ३ -

"आओ तात्याभाई, बैठो. शर्माना मत!" रौशनी माझ्याकडे पाहात हसून म्हणाली.

माझं नांवबिव सगळं बहुधा या बयेला माहीत होतं. मी तिच्या खोलीत शिरलो. आत जाताचक्षणी माझ्या कल्पनेला पहिला धक्का बसला. 'वेश्याबाजाराच्या एका मावशीचं घर ते कसं असणार? जसा तो बाजार गलिच्छ, त्यात वेश्याव्यवसाय करणार्‍या मुली जश्या गलिच्छ आणि कळकट, तशीच त्यांची मावशी व तिचं घरही कळकट, कुबट आणि ओ येणारं असणार!' या माझ्या कल्पनेला पार तडा गेला. एक तडा रौशनीच्या घरात शिरण्यापूर्वी तिच्या रुपाकडे पाहून गेलाच होता! दुसरा तडा तिच्या घरात शिरल्यावर गेला! अतिशय स्वच्छ, नीटनेटकं, छान आवरलेलं घर. घरात मंद उदबत्त्यांचा वास सुटलेला. तिच्या घरात जाऊन तेथील सोफ्यावर मी बसलो. समोर पाहतो तर भिंतीवर विवेकानंदांचा फोटो, एका लहानश्या शोकेसवजा कपाटात काही पुस्तकं ठेवलेली, कोपर्‍यात उभा केलेला तानपुरा! वेश्याव्यवसाय चालणार्‍या मुंबईच्या एका गलिच्छ वस्तीत मी बसलो होतो या गोष्टीचा माझा माझ्यावरही विश्वास बसेना!

बाजूच्याच सोफ्यावर रौशनी बसलेली होती. तिचं सौंदर्य नक्कीच खानदानी वाटत होतं, गोरपान रंग आणि पन्नाशीच्या पुढची असूनही आकर्षक बांधा राखून होती!

साधारणपणे वेश्यावस्तीतल्या मावश्याही तशाच कळकट, कजाग, ओबडधोबड, भयानक शिवराळ, बथ्थड चेहेर्‍याच्या, अक्षरशः कैदाशिणी वाटाव्यात अश्या, अत्यंत स्थूल शरीरमानाच्या, अस्ताव्यस्त आणि शेप गेलेल्या ओथंबलेल्या स्तनांच्या, नेसलेल्या साड्यांमधून दिसणारी त्यांची ती सुटलेली काळी पोटं दाखवणार्‍या असतात असा माझा समज होता! पण रौशनी एकदम वेगळी होती. चेहेरा सुरेख होता पण करारी होता, त्यात एक जरब वाटत होती! ती असणारच म्हणा. वेश्या वस्तीतील ३०/३५ मुलींची मावशी होणे, त्यांना सांभाळणे, पोलिस, गुंड, दारुवाले यांच्याशी नेहमी संबंध असणार्‍या बायका या! यांना साधं, गरीब राहून चालणारच नव्हतं!

ते काहीही असो, मला मात्र रौशनीकडे पाहताच क्षणी तिचे आकर्षण वाटले होते. 'च्यामारी, बाई पन्नाशीच्या घरातली दिसते पण अजूनही चांगला दमखम राखून असावी असा एक विचार माझ्या मनात डोकावून गेला! कोण असेल ही? इथे कुठून आली असेल? च्यायला रंडीबाजारातली मावशी ही, हिच्या घरात स्वामींचा फोटो कसा काय? काय संबंध? स्वामी हिने वाचले आहेत काय? हिच्या घरात इतरही पुस्तकं दिसताहेत? किती शिकलेली असेल ही? आणि कोपर्‍यातला तो तानपुरा? ही गाणं शिकलेली आहे की काय? की इतर कुणी यांच्या घरात गातं? मला हिने का बोलावलं असेल? आत्ता आपण ज्या कॉमन गॅल्लरीतून हिच्या घरात प्रवेश केला तिथून आमचा झमझम बार दिसतो खरा, परंतु तिथे येजा करताना असं किती वेळा हिने मला पाहिलं असेल? मलाच हिला का बोलवावासं वाटलं असेल? मन्सूरने माझ्याबद्दल हिला काय सांगितलं असेल?

सगळे प्रश्न! फक्त प्रश्न!! च्यामारी सुशिक्षित/सुसंस्कृत मंडळींना प्रश्नच फार पडतात! :)

"काय घेणार शेठ? काही दूध, लस्सी, कॉफी मागवू का? की थोडी व्हिस्की घेणार? सगळा बंदोबस्त आहे आपल्याकडे!" रौशनी कधी मराठीत बोले, तर कधी बंबैय्या हिंदीत तर कधी अस्खलित हिंदीत.

साला मी कसला तिच्याकडे काही दूध-लस्सी वगैरे घेणार होतो? मला खरं तर वेश्याव्यवसाय सांभाळणार्‍या एका मावशीच्या घरात आपण बसलो आहोत हेच अजून पचवायला कठीण जात होतं. त्यातच अधनंमधनं बाहेरून त्या परकर पोलक्यातल्या, काळपट रंगाच्या, ओठ सुजलेल्या विशीपंचविशीतिशी तल्या वेश्या माझ्याकडे पिजर्‍यातला प्राणी पाहावा अश्या पद्धतीने पाहात होत्या, एकमेकांकडे पाहून टिंगलीच्या सुरात हासत होत्या! 'ये कौन चुतिया इधर आ गया' असंच त्या आपापसात म्हणत असणार! 'च्यामारी झक मारली आणि इथे आलो. का आलो? इथून उठून ताडकन चक्क निघून जावं की काय?' असेच विचार माझ्या मनात येत होते! संस्कार! दुसरं काय? सुशिक्षित, सुसंस्कृत घराण्यातले पांढरपेशा संस्कार! रामरक्षा, पर्वचा, पाढे, शाळा, शिक्षक, मोतोपंत, बालकवी, या सगळ्या गोष्टी मला रौशनीच्या घरच्या सोफ्यावर आरामशीरपणे बसू देत नव्हत्या. कुल्याला फोड आलेला नसतानही मी त्या सोफ्यावर अवघडलेपणाने बसलो होतो!

तेवढ्यात, "एऽऽऽ क्यो खडी है सब लोग इधर? क्या नाटक है? ये सेठ इधर सो ने को नही आया है! चलो, निचे जाव सब लोग मादरचोद! धंदा करना नही करना क्या आज? यहा किसिको फोकट का खाना नही मिलेगा. धंदा नही करना है तो भागो यहासे और अपना रास्ता सुधारो! मन्सूर, तू अब जा और निचे जाके रुक. सेठको भेजती है मै थोडी देर के बाद!"

अरे बापरे माझ्या! बहुतेक माझं अवघडलेपण रौशनीच्या ध्यानात आलं असावं आणि तिने तिच्या ठेवणीतल्या आवाजात त्या बाहेर घुटमळणार्‍या रांडांना दम भरला असणार! 'ये सेठ इधर सोने के लिये नही आया?? बाबारे माझ्या..:) सानेगुरुजींची 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अरपावे' ही कविता म्हणणारा मी. एका सरळमार्गी शिक्षिकेचा मुलगा होतो मी. नोकरीधंद्याच्या निमित्ताने त्या भागात वावरत असे. हा इथे आपल्याबरोबर झोपायला आला आहे असं त्या मुलींना वाटलंच तरी कसं? अर्थात, वाटलं असेल तरी त्यांची काय चूक म्हणा! तिथे जाणारी माणसं केवळ त्या एकाच कामाकरता तिथे जात! ते काही स्वरुपानंदांच्या पावसचं किंवा गुहागरच्या व्याडेश्वराचं मंदिर नव्हतं! :)

"थोडी लस्सी तरी घ्या शेठ आमच्याकडची! हमभी आपही की तरह इन्सान है, थोडी लस्सी लोगे तो हमारीभी इज्जत रहेगी!"

रौशनीचा आवाज पुन्हा एकदन नॉर्मल. एका क्षणापूर्वी ही बया केवढ्या मोठ्यांने ओरडली होती! एवढं या बाईला स्वीच ऑन, स्वीच ऑफ तंत्र अवगत होतं? :)

"अरे कृष्णा, जा धोबीसेठ को एक लस्सी उपर भेजनोको बोल!"

आतल्या खोलीतून एक काळासावळा, १७-१८ वर्षांचा मुलगा बाहेर आला. चौकडीचा शर्ट आणि हाफ चड्डी घातलेला. तो पटकन माझ्यासमोरून जात लस्सीची ऑर्डर द्यायला खाली निघून गेला.

"बसा तात्याशेठ. लस्सी मागवली आहे. हा कृष्णा. इसिके बारेमे आपसे जरा बात करनी है!"

आता मात्र रौशनीचं बोलणं मला थोडं आश्वासक वाटू लागलं आणि हळूहळू माझा धीर चेपू लागला. मंडळी, आपल्याला खोटं वाटेल पण त्या बाईच्या चेहेर्‍यावर एक विलक्षण आत्मविश्वास होता, वागण्याबोलण्यात अदब होती! समोरच्या माणूस कितपत पाण्यात आहे हे अवघ्या एका नजरेत ओळखण्याचं कसबही तिच्यात अनुभवाने आलेलं असावं. माझ्या नजरलेला नजर देऊन बोलत होती. उलट मीच थोडासा भांबावलो होतो, उगाच इकडेतिकडे पाहिल्यासारखं करत होतो. तिच्या नजरेला नजर देणं मला जमत नव्हतं. वास्तविक मला guilty वाटण्याचं काहीच कारण नव्हतं. ना मी तिचे चारचव्वल देणं लागत होतो, ना कुठल्या गुन्ह्यात मला तिच्यासमोर उभं केलं गेलं होतं, ना मी तिच्यासोबत लाळघोटेपणाकरून झोपायला निघालो होतो! पण च्यामारी बाईचा चेहेराच साला भारी होता, आव्हानात्मक होता, एक प्रकारची हुकुमत होती तिच्या चेहेर्‍यावर!

क्रमशः..

तात्या अभ्यंकर.

रौशनी.. २

>>'कोण कुठली रौशनी! मी का जावं तिच्याकडे?' असा विचार करून मी मन्सूरकडे दुर्लक्ष केलं. पण त्यानंतर दोनतीनदा मन्सूरने रौशनी बोलवत असल्याचं पुन्हा सांगितलं. शेवटी 'च्यामारी बघू तरी एकदा ही भानगड तरी काय आहे?' असा विचार करून एके दिवशी मी त्या रौशनीला भेटायला जायचा विचार पक्का केला. <<

...रात्रीचे १० वाजले असावेत. मी मन्सूरला सोबत घेऊन बारच्या बाजुलाच असणार्‍या चाळीमध्ये रौशनीला भेटायला निघालो. त्या चाळीत जाण्याची माझी पहिलीच वेळ! दोन्ही बाजूला परकरपोलकी घातलेल्या, चेहेर्‍यावर रंगरंगोटी केलेल्या वेश्या उभ्या होत्या. त्यातल्या बर्‍याचश्या रंगरुपाने दिसायला केवळ भयानक होत्या. गलीच्छ होत्या. काळ्याकुट्ट देहावर, चेहेर्‍यावर मेकपची पुटं चढवलेल्या! रंगीबेरंगी भडक कपडे घातलेल्या! चेहेर्‍यावर आचकट विचकट भाव अन् हसू! कोण कुठल्या या मुली? इथे कश्या आल्या असतील? कुणी आणल्या असतील? किती रुपायाला विकल्या गेल्या असतील? छे! सगळेच नुसते प्रश्न...! उत्तर एकाचंही माहीत नाही! मला त्या मुलींची किळसही आली आणि एकिकडे दयाही आली! पाच पंचवीस पन्नास रुपयांकरता फालतूतल्या फालतू, अत्यंत थर्डरेट माणसांसमोर पाय फाकवायचे? आणि त्यानंतर होणार्‍या फक्त यंत्रासारख्या हालचाली! कॉटवर आडवं पडून पाय फाकवणारं फक्त एक यंत्र! आणि यांच्याकडे येणारी गिर्‍हाइकं? ती एवढी भुकेली असतील?? काहीही करून कसंही करून स्त्रीशरीर मिळाल्याशी कारण!

आपण नेहमी म्हणतो, 'की काय रे माणूस आहेस की जनावर?' हे म्हणण्यामागे माणसाकडून जनावरापेक्षा निश्चित काहीतरी वेगळ्या अपेक्षा असतात. अहो पण कुत्र्यामांजरांच्या संभोगातदेखील एक वेळ शृंगार सापडेल, प्रेम सापडेल! पण इथे मी खरोखरंच माणसातली जनावरं बघत होतो. कारण माझ्या आजुबाजूला गिर्‍हाइकांचीदेखील वर्दळ, येजा सुरू होती. माणूसरुपी जनावराचा आणि एका माणूसरुपी पाय फाकवणार्‍या यंत्राशी पाच पंचवीस रुपायांच्या बोलीत ठरलेला व्यावहारिक संभोग! तो म्हणणार, 'चल लेट जा. बहुत नखरा कर रहेली है', आणि ती म्हणणार, 'चल, जल्दी कर. आज धंदा कम है साला, जादा टाईम मत ले. धंदे का खोटी मत कर!' मंडळी, हे सगळंच खूप कठीण होतं. भयानक होतं!

पण मला त्या मुलींची, त्या माहोलची, त्या गिर्‍हाइकांची किळस का येत होती? मी यांच्यापेक्षा वेगळ्या सोसायटीतला, वेगळ्या समाजातला होतो म्हणून?? माझ्या समाजात किंवा माझ्यापेक्षा उच्चभ्रू समाजात नवरा सहा सहा महिने बोटीवर असतो, तुफान पैसा कमावतो. आणि इथे त्याची धर्म(!)पत्नी स्वतःच्या पॉकेटमनीकरता, वरखर्चाकरता पाच, दहा, पंधरा, पंचवीस हजारांची रक्कम घेऊन (तिच्या सुंदरतेनुसार, कमनीयतेनुसार!) अज्ञात ठिकाणी हेच काम करते की! अश्याही आहेतच की काही स्त्रीया! पण त्यांचा कुठे बाजार नसतो! बरीचशी कामं एसएमएस द्वारा चुपचाप होतात! बर्‍याचवेळा मध्यस्थांमार्फत ही कामं होतात, किंवा पेजथ्री मधल्या पार्ट्यांमधून एकमेकांशी ओळख तरी असावी लागते, मैत्री व्हावी लागते! मग कदाचित पैशांचाही प्रश्न येत नाही. सगळंच उच्चभ्रू आणि हायफाय लेव्हलवर चालतं!! पण तरीही त्यापैकी एखादी बाई समोर आली की नकळत माझ्या तोंडून कदाचित, 'हॅलो मॅडम, हाऊ आर यू?' हेच शब्द बाहेर पडणार! मंडळी, तेव्हा मात्र मला त्या बाईची किळस नाही येणार! कारण ती छान दिसते, पॉश राहते! 'तिचा नवरा सहा सहा महिने बोटीवर असतो ना, अहो मग काय करणार? शेवटी माणूस आहे आणि माणसालाही काही भुका असतात, गरजा असतात!' असा सोयिस्कर विचार मी करणार! 'च्यामारी आपल्यालाही या बाईबरोबर चान्स मिळाला तर काय मजा येईल!' हाही विचार माझ्या मनात येऊ शकतो. पण तेव्हादेखील मी माणूसच असतो बरं का! जनावर नसतो!

मंडळी, माझा एक करोडपती पंजाबी क्लाएंट आहे. बिझिनेस एथिक्स म्हणून मी त्याचं नांव नक्कीच घेऊ शकत नाही. साला भगवान आहे तो आपला! मंडळी, हा माणूस मुळचा चंढीगढचा. पण कामधंद्याकरता नेहमी फिरतीवर असतो. तुफान पैसा कमावतो. त्याचे शेअर्सचे सगळे व्यवहार मी पाहतो. तो एकदा दोन तीन महिन्यांच्या परदेशवारीकरता गेला होता. आल्यावर त्याने मला फोन केला. त्याला त्याच्या शेसर्ससंबंधी मला नित्याची माहिती द्यायची होती, माझ्या फीचे पैसेही त्याच्याकडून घ्यायचे होते. 'अरे तात्यासेठ, कैसा है? एक काम करना तात्या, मै आज शामतकही बंबईमे हू, बाद मे मुझे दिल्ली जाना है. तुम अंधेरीमे फलाना हॉटेलमे मुझे ये ये टाईमपे मिलना. फुरसतमे बात करेंगे. बियर पियेंगे!' असा आमचा फोन झाला.


आपल्याला काय हो, धंदेसे मतलब! मी ठरल्यावेळी अंधेरीला असलेल्या त्या पॉश होटेलात त्याला भेटायला गेलो.

स्वागतकक्षात चौकशी करून तो उतरलेल्या खोलीपाशी गेलो, दारावर टकटक केली. माझ्या पंजाबी क्लाएंटने आतून दार उघडलं. 'आओ तात्या, बैठो. स्टेटमेन्ट लाये हो?' मंडळी, मी आत जाऊन क्षणभर उडालोच! आतल्या डबलबेडवर मराठी वाहिन्यांतून, चित्रपटांतून काम करणारी एक प्रसिद्ध प्रतिथयश नटी बसलेली होती! तीदेखील माझ्याकडे पाहून फिल्मी पद्धतीने हसली. त्या पंजाबी माणसाने आमची एकमेकांशी ओळख करून दिल्यावर आम्ही एकमेकांना 'हाय हॅलो' केलं!

'बैठ तात्या. बियर पियेगा?' या प्रश्नाने मी भानावर आलो. पाच दहा मिनिटातच हिशोबाची स्टेटमेन्टस मी त्याच्या हवाली केली, माझे पैसे घेतले अन् तेथून निघालो. तो मला सोडायला खोलीच्या बाहेर आला. मला राहवेना. मी त्याला म्हटलं, 'साब, ये मॅडम तो बहोत फेमस है. आप उन्हे कबसे जानते है?'

अरे जानपेहेचान किस बात की? एक बार टीव्हीपे चॅनल सर्फींग करते हुए मैने देखा इसको. सिरियल लाईनके एक आदमीसे पता किया. साला पैसा फेकनेका! बस! तुझे चाहिये क्या बोल?!!' असं म्हणून तो गडगडाटी हसला आणि खोलीत परत गेला. मी माझे पैसे नीट जपून खिशात ठेवले आहेत याची खात्री करत तेथून रवाना झालो!

ती मालिकानटी मला पॉश वाटली. मी तिच्याशी लाळगळूपणा करत हाय हॅलोही केलं. कारण ती सुरेख होती, पॉश होती, स्वच्छ होती!! पण रोशनीच्या चाळीत उभ्या असलेल्या बायका मात्र मला गलिच्छ वाटत होत्या!!

साला दुनियेचा न्यायच अजब आहे! असो, थोडं विषयांतर होतंय, पण ते आवश्यक आहे. रौशनीचे हे व्यक्तिचित्र लेखन म्हणजे तात्याचा एक जीवनानुभव आहे. हे लेखन म्हणजे तात्याची एक भडास आहे. ओकू दे मला मनमोकळेपणाने!

तर कुठे होतो आपण?

मी निघालो होतो रौशनीला भेटायला. तिच्या वस्तीत, तिच्या चाळीत, रात्री दहाच्या सुमारास! मंडळी, खरं सांगायचं तर माझी क्षणभर जरा फाटलीच होती. 'कुठे चाललोय आपण? आणि का चाललोय? काय काम असेल आपल्याकडे या रौशनीचं?, च्यामारी यातून कुठल्या नवीन भानगडीत तर आपण अडकणार नाही ना?' अशा नाना शंकाकुशंका क्षणभर मनात येऊन गेल्या. पण साला आपला पण स्वभाव, 'जो होगा, वो देखा जाएगा भेंडी..!!', या टाईपचा असल्यामुळे मी त्या शंकाकुशंकांना माझ्या मनात फार वेळ थारा दिला नाही! ;)

मन्सूर अर्थातच माझ्यासोबत होता. आम्ही रौशनीच्या खोलीपर्यंत जात असतांना मन्सूर मात्र मोठ्या सराईतपणे आणि सफाईने त्या आजूबाजूच्या वेश्यांना, 'ए हटो सब एक साईड मे. तात्यासाब आ रहे है. साला गोवमेन्ट का आदमी है. लफडा नही मंगता है. नही तो बंद करेगा सबको!' अशा धमक्या देत मला घेऊन रौशनीच्या खोलीकडे निघाला होता! मी 'गव्हर्नमेन्ट का आदमी' केव्हा झालो हे माझं मलाही माहिती नाही! ;)

शेवटी एकदाचे आलो आम्ही रौशनीच्या खोलीपाशी. खोलीत समोरच सोफ्यावर रौशनी बसली होती! पन्नाशीच्या आसपासची, गोरी, आणि देखणी!!

(क्रमशः )

--तात्या अभ्यंकर.

रौशनी.. १

राम राम मंडळी,

"तात्याभाई, रौशनीने तुमको चाय पिने को बुलाया है!"

मन्सूर हे मला सांगायला आला. मी तेव्हा मुंबईच्या फोरासरोडवरील 'झमझम' या देशी दारूच्या बारमध्ये हिशेब लिहिण्याचं काम करत असे.

फोरास रोड! मुंबईच्या रेडलाईट विभागातला एक प्रमुख विभाग. तेव्हा मुंबईमध्ये फोरास रोड, फॉकलंड रोड, कामाठीपुरा येथे मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय चालायचा. आजही चालतो. रस्त्याच्या दुतर्फा अनेक छोट्यामोठ्या चाळवजा इमारती. या सर्व इमारतींमधून खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू असे. १५ वर्षांपासून ते अगदी पस्तिशी चाळीशी पर्यंतच्या पोरीबाळी व बायका संध्याकाळ झाली की चेहेर्‍यावर रंगरंगोटी करून परकरब्लाऊजच्या वेषात रस्त्याच्या कडेला, इमारतींच्या दाराखिडक्यात उभ्या रहायच्या. अनोळखी तसेच ओळखीपाळखीच्या लोकांना खाणाखुणा, शुकशुक करून बोलवायच्या. अगदी २०-२५ रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत वय, रंगरुपाप्रमाणे पैसे घेऊन आलेल्या गिर्‍हाईकाची भूक भागवायच्या. एका रात्रीत पाच पाच, सहा सहा गिर्‍हाईकं! खरंच, फार भयानक विश्व होतं ते मंडळी. अत्यंत ओंगळवाणं आणि किळस आणणारं होतं!
पण आपली रोजीरोटीच मुळी त्या सरकारमान्य देशीदारूच्या बारमध्ये हिशेब लिहायची होती. त्यामुळे त्या भागात रोज जावं लागत असे!

'बशीर मोराशी' असं काहीसं नांव असणार्‍या माणसाच्या मालकीचे तीन चार बार होते. त्या सर्व बारस् चं अकाउंटस् सेटप करण्याचं काम बशीरभाईनी मला दिलं होतं. मी तेव्हा मुंबईच्या प्रभादेवी भागात असलेल्या जी एम् ब्रेवरीज लिमिटेड या देशीदारूचं उत्पादन करणार्‍या कंपनीतं नोकरी करत होतो. मंडळी, आपल्याला आश्चर्य वाटेल, मुंबईतील सातशेहून अधिक बारमध्ये आमचा माल जायचा. अक्षरशः तुफान खप. मरण नसलेला धंदा! बर्‍याचश्या बार मालकांची आणि माझी चांगलीच ओळख. काही वेळेला त्यांची मागणी जास्त असायची, अन् माल कमी असायचा. मग जास्त मालाकरता कंपनीच्या सेल्स् मॅनेजरकडे वशिला लावण्यासाठी 'तात्यासेठ', 'तात्याभाई' अश्या उपाध्याही मला मिळायच्या! बर्‍याच बार मालकांचे बरेच अनुभव तिथे मी घेतले. बहुतेक सगळे शेट्टी! तुळू भाषा बोलणारे. त्यांचे दोन नंबरचे व्यवसायही बघितले, पण त्याविषयी पुन्हा केव्हातरी!

झमझम बार! फोरासरोडवरच्या गजबजलेल्या वस्तीत सरकारमान्य देशी दारू मिळणारा बार. तसा हा बार दिवसभरच गिर्‍हाईकांनी गजबजलेला असायचा, पण संध्याकाळी अगदी माणसंनी फुल्ल असायचा. शंभर रुपयांपर्यंत आख्खी बाटली मिळायची. तिथे येणारी बहुतेक सगळी मंडळी ही गुंड अन् मवाली. दिवसभर काहीतरी उलटेपालटे धंदे करायचे, लहानमोठ्या चोर्‍या करायच्या आणि संध्याकाळ झाली की झमझम बारमध्ये हजर! त्यातले काही इकडेतिकडे फुटकळ नोकर्‍या करणारे चतूर्थश्रेणी कामगारही असत. झमझम बारमध्ये यायचं, फुल्लटाईट व्हायचं अन् घरी जाऊन बायकाला मारझोड करायची एवढीच काय ती यांची मर्दुमकी! काही जण मर्दुमकी गाजवायला बाजुलाच असलेल्या इमारतीतल्या वेश्यांकडे जात. २०-२५ रुपयात मर्दुमकी गाजवून होई! शिवाय मारामार्‍या, चाकूवस्तर्‍याचे वार, दादा, भाई, पोलिस, त्यांचे हप्ते, या सगळ्या गोष्टी तर त्या बारमधल्या नित्याच्याच.

याच सर्वांमध्ये सुशिक्षित, सुसंस्कृत, पांढरपेशा समाजातला एक तात्या अभ्यंकरही 'अपनेको क्या? अपने कामसे मतलब!' या भावनेने त्या बारमध्ये हिशेब लिहीत बसलेला असायचा!;)

मन्सूर हा आमच्या बारमधला एक हरकाम्या पोर्‍या. दहापंधरा रुपयांच्या रोजीवर पडेल ती कामं करायचा. राहायचाही तिथेच. शिवाय दिवसाकाठी कुणाकुणाकडून पाचदहा रुपयांची टीपही मिळायची. बारमध्ये अजून तीनचार जण कामाला होते. त्या सगळ्यांकरता दोन टाईम डाळभाताचं जेवण त्या बारमध्येच शिजायचं. डाळभात, लिंबाची फोड अन् पापड! वरतून तुपाबिपाची धार नाही हो. ते सगळे लाड आपल्या दुनियेत! ;) मन्सूरसोबत मीही कधी मूड आला अन् रात्री घरी परतायला उशीर होणार असेल तर तिथेच डाळभात जेवायचा. मजा यायची! ;)

आमच्या बारच्या बाजूलाच एक एकमजली चाळ होती. त्या संपूर्ण चाळीत वेश्याव्यवसाय चालायचा. दिवसभरातल्या फावल्या वेळात मन्सूर तिथल्या वेश्यांचीही काही फुटकळ कामं दोनपाच रुपयांच्या टीपेवर करायचा. त्या काळात माधुरी आणि संजूबाबाचा 'साजन' हा चित्रपट नुकताचा प्रदर्शित झाला होता. मन्सूरने माझ्याकडून तिकिटाकरता उधार पैशे घेऊन तो चित्रपट पाहिला होता. "तात्याभाय, माधुरी बाकी क्या मस्त दिखती है. अपनेको उसे एक बार मिलनेकाईच है! आपुन उसको बोलेगा के तू भोत चिकनी दिखती है";) मला हसू आवरेना. माधुरीचे जे असंख्य चाहते होते त्यात एक आमचा मन्सूरही होता, हे त्या बिचार्‍या माधुरीला माहीत नसावं! ;) हा लेख लिहिताना आत्ता सहजच हा किस्सा आठवला. असो..!

"तात्याभाई, तुमको रौशनीने चाय पिनेकू बुलाया है!" मन्सूर.

"कौन रौशनी?"

"वो बाजुके बिल्डिंगमे नही रहती क्या? वोईच! एक-दो बार उसने तुमको यहा आतेजाते हुए देखा है. तुमारे बारेमे मेरेसे भोत पुछती है. तुम साला अच्छा शर्टपॅन्ट पेहेनता है ना! चिकना दिखता है, शरीफ दिखता है! बाजुके बिल्डिंगमे जो लडकीलोग है ना, ये रौशनी उन लडकीलोगकी मौसी है. तुमको उसने एक बार मिलनेको बुलाया है!"

क्रमशः...

-- तात्या अभ्यंकर.

July 10, 2007

आषाढस्य प्रथम दिवसे..


II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II

राम राम मडळी,

ठाण्यातील 'संस्कृत स्थानम्' या संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करणार्‍या संस्थेने रविवार दि १५ जुलै, २००७ रोजी संध्याकाळी ८.३० वाजता कालिदास दिनाचा मुहूर्त साधून 'आषाढस्य प्रथम दिवसे' हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

महाकवी कालिदासाच्या 'मेघदूत' या साहित्यकृतीवर आधारित हा कार्यक्रम असून त्या अंतर्गत मेघदुतातील काही श्लोकांचे निरुपण आणि गायन होणार आहे. तसेच नृत्यातील काही भावमुद्रांचेही सादरीकरण होणार आहे. याबद्दलची अधिक माहिती खालीलप्रमाणे -

आषाढस्य प्रथम दिवसे..

१) मेघदुतातील काही निवडक श्लोकांचे निरुपण - संस्कृत विदुषी सौ धनश्री लेले.

२) गायन - अभिजात संगीत गायिका सौ वरदा गोडबोले।

३) श्लोकानुरुप भरतनाट्यममधील भावमुद्रा - नृत्यांगना निलिमा कढे

४) संगीत - तात्या अभ्यंकर

५) निर्मितीप्रमुख - तात्या अभ्यंकर.
कार्यक्रम स्थळ - गडकरी रंगायतन, ठाणे.
दिनांक व वेळ - १५ जुलै २००७, रात्रौ ८।३० वा.
प्रायोजक - पितांबरी प्रॉडक्टस प्रा लि
प्रवेश विनामूल्य...
सर्व इच्छुकांनी सदर कार्यक्रमाला अवश्य उपस्थित रहावे ही विनंती.
कालिदसमहाराजांच्या ओळींना हिंदुस्थानी रागसंगीतावर आधारित स्वरसाज चढवायला मिळाला, ही मी माझ्या भाग्याची गोष्ट समजतो.
धन्यवाद!
आपला,
तात्या अभ्यंकर,
प्रसारक व प्रचारक,
हिंदुस्थानी रागदारी संगीत.

June 19, 2007

चर्चा एका उपक्रमीशी!

मिलिंद भांडारकर या आमच्या मित्राशी केलेल्या चर्चेचा हा काही भाग.

मूळ संदर्भ - 1) http://mr.upakram.org/node/423#comment-5762
2) http://mr.upakram.org/node/423#comment-5772

मिलिंदचं म्हणणं लाल अक्षरात, आपलं तिच्यायला निळ्या!


>>सहा महिने वाट पाहणार होतात ना ?

कशाला वाट पाहायची? एका साध्या प्रश्नाचं 'हो' किंवा 'नाही' एवढंदेखील उत्तर जर उपक्रमरावाला आणि त्याच्या टीमला देता येत नसेल आणि ही लोकं (की तुम्ही लोकं? कारण उपक्रमबद्दल तू उपक्रमरावाशी चर्चाबिर्चा करतोस म्हणे!) जर मला अनुल्लेखानी मारणार असतील तर इथे राहण्यात काय मतलब आहे??
बरं जाहीर उत्तर नाही तर नाही, पण उपक्रमला 'या विषयावर लिहा' किंवा 'लिहू नका' या आशयाची एखादी खरड किंवा व्य नि तरी मला टाकता नसता आला? उपक्रमाच्या सुरवातीला हगल्यापादल्या कुणाच्याही शंकांना त्वरेने उत्तरे देणारे उपक्रमराव आत्ताच एवढे गप्प का बसले आहेत? पण मिलिंद, एका संकेतस्थळाचे आपण मालक झालो याच गुर्मीवर ही मंडळी वावरत आहेत. एवढी कसली गुर्मी यांना चढली आहे तेच कळत नाही!


बारबालांचा विषय अनायसे निघालाच होता म्हणून मी हा प्रश्न विचारला होता. वास्तविक असा प्रश्नदेखील मी विचारला नसता पण माझा 'रौशनी' हा सामाजिक आशय असलेला लेख मी सर्वप्रथम उपक्रमावरच टाकला होता, पण तो लेख इथून एका मिनिटात उडवला होता हे तुलाही माहित्ये आणि त्यावर तुझ्याकडेही काहीही उत्तर नव्हतं हे तू मला व्य नि ने कळवलं होतंस. यावेळेस पुन्हा असं होऊ नये म्हणूनच मी जाहीर सवाल विचारला होता यात काय चुकलं माझं?

'बारबाला' या विषयावर माझ्याकडे लिहिण्यासारखं खूप आहे. मी येथील काही प्रतिसाद वाचले पण ती फार वरवरची माहिती आहे. वस्तुस्थिती काय आहे, यात हॉटेलमालक काय राजकारण खेळतात, यासर्व गोष्टी मी खूप जवळून पाहिल्या आहेत. पण उपक्रमाला बहुधा संगीत, व्याकरण, हा शब्द कसा आला अन् त्या शब्दाची व्युत्पत्ती काय, अन् महाभारतात व्यासाने काय लिहून ठेवलंय, गणिती कोडी, संगणकशास्त्र इतपतच सगळे गुडीगुडी, छान छान चार भिंतितले, वरणभातवाले सोवळे विषय पचतात असे दिसते! वेश्याव्यवसाय, बारबाला, दोन नंबरचे धंदेवाले, दारुवाले यांच्याविषयीच्या लेखनाच्या नुसत्या कल्पनेने बहुतेक उपक्रमरावाला आणि त्याच्या टीमला घाम फुटत असावा! तर ते पचवणार काय??

असो, उपक्रम हे माजघरातच ओव्या म्हणत रमणारं संकेतस्थळ दिसतं आहे. तिथे सगळी दुनियादारी केलेल्या आमच्यासारख्या भिकारचोट माणसाचे काय काम? ;)

आम्ही मिसळ, आमरस, मटण हे सगळे पदार्थ खाल्लेली माणसं! उपक्रमला फक्त मऊभात तूप मेतकुटी घरगुती माजघरातले माहितीपूर्ण लेख लिहिणारी मंडळी हवी आहेत! आम्ही कुमार, बाबुजी, भीमसेनही जवळून बघितले आणि वेश्या, दारुवाले आणि दोन नंबरचे धंदेवालेही तेवढ्याच जवळून बघितले!

असो, 'तुम्हा' उपक्रमी संपादक मंडळींना 'तुमचं' उपक्रम लखलाभ! एरवी जाहीरपणे १०० प्रतिसाद देणारा तूही उपक्रमरावाच्या जवळचा असल्यामुळे मूग गिळून आहेस हे पाहून मात्र गंमत वाटली! ;) असो! कुणाचा इंटरेस्ट कशात तर कुणाचा इंटरेस्ट कशात!

असो! आपण आहे नंबर एकचा वेडझवा माणूस. तो 'तुमच्या' उपक्रमापासून दूर राहिलेलाच बरा! 'तुला', 'तुझ्या उपक्रमी टीमला', आणि 'तुझ्या उपक्रमला' माझ्या मनपासून शुभेच्छा! खूप खूप मोठे व्हा आणि मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत पहिलं बक्षिस वगैरे मिळवा! ;)

मला मात्र तुझ्या उपक्रमात इटरेस्ट होताही आणि नव्हताही! एक तात्या गेला तर उपक्रमाचं काहीच बिघडणार नाही आणि एक उपक्रम गेलं तर तात्याचंही काहीच बिघडणार नाही! तात्या क्या है, कैसा है ये सब जानते है!

जोपर्यंत इथे होतो तोपर्यंत इथे बरंच काही संगीतविषयक लिहायचा विचार होता. 'मला आवडलेले भीमसेन' अशी अण्णांच्या ध्वनिमुद्रिकांवर आधारीत लेखमाला त्यातील सौंदर्यस्थळे तुकड्यांच्या रुपाने एखाद्या संकेतस्थळावर ऐकता येतील अशी चढवून त्याबाबत इथे विस्तृत लिहायचं कालच माझ्या मनात आलं होतं. पण भोसडीच्यांनो तुम्ही लोकांनी हा गेम केलात! ;)

चलो कोई बात नही! आता फिरत फिरत असेच कुठले दुसरे संकेतस्थळ दृष्टीस पडले आणि पुन्हा मूड आला तर तिथे लिहीन! आपल्याला काय! जिथे मन रमेल तिथे काही काळ थांबेन. नाहीतर एकला चलो रे आहेच!


>>तात्या, रविवारी रात्री प्रतिसाद टाकून सोमवारी सकाळी उत्तराची अपेक्षा का करतोस बाबा ? जरा धीर धर.

का बरं? एरवी तो फोकलीचा उपसंपादक तर बघावं तेव्हा पोलिसगिरी करत फिरत असतो की! बरं, सोमवार सकाळ तर केव्हाच गेली. आज मंगळवार सकाळ उजाडली आहे. अद्याप कुणाचंही उत्तर नाही!

>>दुसरे, रौशनी आणि बारबालांवरचा तुझा आगामी लेख, ह्यात फरक असेल की नाही ?

फरक आहेही आणि नाहीही. दोन्ही विषय स्त्रीशी निगडित आहेत. नैतिक अनैतिकतेच्या व्याख्येत बसणारे आहेत. तेव्हा विशेष असा फरक नाही. म्हणून म्हटलं आधी विचारून घ्यावं!

>>तिसरे, तुला एकट्याला अपवाद करण्याचा वेगळा पायंडा पाडणे हिताचे आहे का ?

अपवाद करा असं कुठे म्हटलंय मी? मी फक्त सदर लेख टाकू किंवा नको इतकंच विचारलं होतं ना? त्याचंही उत्तर देणं तुम्हाला जड झालंय?? एखाद्या सभासदाच्या जाहीर प्रश्नाला जाहीरपणे नाहीतर नाही पण खरड किंवा व्य नि लिहूनही दोन ओळींचं उत्तर देता येऊ नये? का बुवा असं? एवढा कुठला माज? एवढी कुठली गुर्मी?? उपक्रमाचे मालक आहात याची??

की तात्याला जे काय असेल ते जिंदादिलीने जाहीर उत्तर देतांना तुमचा सोकॉल्ड ईगो दुखावला जाईल अशी तुम्हाला भिती आहे? की अश्या नाजूक विषयावर तात्याने स्वतःहून लिहिलं तर लिहू दे, पण त्याकरता त्याला मुद्दामून परवानगी कशी काय द्यायची अशी तुमची पंचाईत झाली आहे? ;)

की या विषयाला परवानगी देऊन उपक्रमरावाच्या माजघरी परिटघडीच्या कपड्याला आणि सोकॉल्ड नैतिकतेच्या भंपक कल्पनांच्या इस्त्रीला सुरकुती पडेल की काय अशी बहुधा उपक्रमरावाला भिती पडली असावी! ;)

किती रे लहान मनोवृत्तीची माणसं आहात तुम्ही? अरे मिलिंद तू वसंतरावांचा भक्त ना? आठवून बघ एकदा वृत्तीने किती उमदा मनुष्य होता तो!

जाऊ दे मिलिंद. तुम्ही जपा तुमचे ईगो आणि तुमची माजघरातली ध्येयधोरणं. आपण साला आहे नागडा तमासगीर माणूस. तुमचं आमचं नाय जमणार!

असो! माझ्याकडून हा विषयही संपला आणि उपक्रमही संपलं. मी माझे येथील सर्व लेख उडवून टाकायला सांगितले आहेत आणि माझं खातंही बंद करायला सांगितलं आहे. ते अद्याप का केलें नाही हेदेखील कळलं नाही. असो, इथे अधुनमधून नक्की येत राहीन. आणि माहिती व देवाणघेवणीच्या माजघरातील तुमच्या सभ्य परिटघडीच्या चर्चा वाचत जाईन! ;)

तात्या.


June 09, 2007

संस्कृतभाषा भाषाणाम् सुजननी..

राम राम मंडळी,

दोनेक वर्षांपूर्वी मी भैरवी रागामध्ये चार ओळी बांधल्या होत्या, त्याबद्दल थोडंसं..

आमच्या ठाण्याच्याच राहणार्‍या एक संस्कृत भाषेच्या विदुषी सौ अदिती जमखंडिकर यांनी एका कार्यक्रमाकरता संस्कृत भाषेचं वर्णन करणार्‍या,

संस्कृतभाषा भाषाणाम् सुजननी
सकलसंस्कृती मुकुटविलासिनी
ज्ञानविज्ञानविद्याकलाशालिनी
महाकाव्यकथानाटकभूषिणी
नमनं नत शिरसा..

चूभूद्याघ्या - मला संस्कृत नीटसं लिहितादेखील येत नाही! ;)

थोडक्यात मुजिक डायरेक्शणच म्हणा ना! ;)

मी या ओळींना भैरवी रागाचा साज चढवला आणि सौ वरदा गोडबोले व डॉ राम देशपांडे या आजच्या तरूण पिढीतल्या अभिजात संगीत गाणार्‍या आघाडीच्या गायकांनी उत्तम तर्‍हेने गाऊन या ओळींचं आणि माझ्या चालीचं सोनं केलं.

डॉ राम देशपांडे यांनी पं यशवंतबुवा जोशी, पं बबनराव हळदणकर, पं उल्हास कशाळकर, पं यशवंत महाले यांच्याकडून गाण्याची तालीम घेतली आहे. रामवर एखादा लेख मी लवकरच लिहिणार आहे. सौ वरदा गोडबोले यांच्यावर माझा विस्तृत लेख आपल्याला
इथे वाचता येईल. माझ्या अजूनही काही बंदिशी वरदाने गायल्या आहेत त्या मी यथावकाश जालावर चढवीन आणि त्याची माहिती इथे सवडीने देईनच!

या गाण्याला संवादिनीची साथ पं विश्वनाथ कान्हेरे यांनी केली आहे.

कान्हेरेबुवा हे
पं गोविंदराव पटवर्धन यांचे शिष्य. कान्हेरेबुवांची संवादिनीची साथसंगत अगदी ऐकण्यासारखी असते. फारच सुरेख! भारतातल्या अनेक मोठमोठ्या कलाकारांना बुवांनी साथ केली आहे. पं उल्हास कशाळकरांच्या साथीला नेहमी बुवाच असतात.

माझा बुवांशी अगदी चांगला परिचय आहे, हे मी माझं भाग्य समजतो. कधी बुवांच्या घरी गेलो की बुवा स्वतः प्रेमाने पिठलंभात करून वाढतील, आणि अगदी मनसोक्त पेटी ऐकवतील. 'बराय बुवा, निघतो आता' असं मी म्हटलं की एखादी कोकणी शिवी देऊन 'बस रे, काय घाई आहे? एवढा जरा बसंतीकेदार ऐकून जा' असं प्रेमाने म्हणतील! ;)

तबल्याच्या साथीला धनंजय पुराणिक आहेत. आज नाट्यसंगीताच्या किंवा भजनाअभंगांच्या साथीला धनंजय पुराणिकच पाहिजेत असा आग्रह अनेक मोठे कलाकार नेहमी धरतात. मंडळी, हा धन्या पुराणिक आपला दोस्त बरं का. राहणारा डोंबिवलीचा. धन्याचं घराणं हे मूळचं कीर्तनकारांच्या परंपरेतलंच घराणं. धन्या स्वतः गातोही उत्तम! असो..

मंडळी, राग भैरवीबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. माझ्या मते राग भैरवी म्हणजे खुद्द आपली भारतीय संस्कृती! आपले रितीरिवाज, आपले सणउत्सव, १४ विद्या ६४ कला या सगळ्यांना जी एकाच धाग्यात बांधते ती भैरवी! माझ्या तरी भैरवीबद्दल याच भावना आहेत. भैरवीबद्दल विस्तृतपणे एकदा केव्हातरी लिहिणारच आहे.

बराय तर मंडळी, अदितीताईंच्या वरील ओळी आपल्याला
या दुव्यावरून उतरवून घेता येतील आणि ते गाणे ऐकता येईल.

ऐकून कसं वाटलं ते अवश्य सांगा हो! ;)

आपला,
(गाण्याखाण्यातला) तात्या.

May 30, 2007

आकाशाशी जडले नाते..

राम राम मंडळी,

http://mr.upakram.ऑर्ग/ या नांवाचे एक संकेतस्थळ आहे. त्यावर शरद कोर्डे नांवाच्या सद्गृहस्थांनी http://mr.upakram.org/node/356 येथे एक चर्चाप्रस्ताव मांडला आहे. आम्ही त्याला एक प्रतिसाद लिहिला. परंतु उपक्रम हे संकेतस्थळ फक्त माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करणारे संकेतस्थळ आहे, ही गोष्ट कोर्डे यांच्या चर्चाप्रस्तावाला प्रतिसाद देताना आमच्या लक्षात राहिली नाही. आम्ही जसं सुचेल तसं भावनेच्या भरात लिहीत गेलो. परंतु माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीमध्ये भावनेला शून्य किंमत असते हे आमच्या ध्यानात यायला हवे होते ते आले नाही, ही आमची चूकच झाली. आता निवांतपणे मित्रांसोबत दोन पेग विदेशी व्हिस्की प्यायल्यावर ही चूक आमच्या ध्यानात आली आणि आम्ही त्वरीत तेथील प्रतिसाद काढून टाकून तो इथे आमच्या हक्काच्या जागेवर चिकटवत आहोत. एकतर कुठलीही माहिती लोकांना द्यावी इतका आमचा अभ्यास नाही, आणि काही देवाणघेवाण होण्याइतपत आमचे विचारही प्रगल्भ नाहीत! माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करणार्‍या तद्न्य अन हुश्शार सभासदांच्या उपक्रमी मांदियाळीत आम्ही पूर्णत: unfit आहोत हेच खरे!

'तार्कीक कोडी' आणि 'ळ' कसा लिहावा यांसारख्या मोलाच्या चर्चेत आमचा प्रतिसाद म्हणजे ग्रहमालेच्या सभेत एखाद्या लहानश्या पिवळट बल्बने हजेरी लावण्यासारखे आहे! सबब आम्ही तो प्रतिसाद आता तेथून काढून टाकत आहोत व इथे देत आहोत. तो येथे हिरव्या अक्षरात देत आहोत! कोर्डेसाहेबांच्या चर्चेतील आम्ही संदर्भाकरता घेतलेली वाक्ये लाल अक्षरात देत आहोत.


आपणास माझ्या या किंचित् संशोधनाबद्दल काय वाटते?

लय भारी वाटते!

कोर्डेसाहेब, आपले चिंतन स्पृहणीय आहे. अश्या चिंतनातून बर्‍याचदा काही चांगलंच निष्पन्न होतं असा माझा विश्वास आहे.
आता थोड्या विस्ताराने संत तात्याबांचे भाष्य बरं का! ;)



आकाश (परिस्थिति?);

'आकाश' या शब्दाचा अर्थ 'परिस्थिती' या अर्थानेही काही वेळेला घेतला जातो ही कल्पना व्यक्तिशः मला अत्यंत सुंदर वाटते.

'एखाद्यावर आकाश कोसळले', 'आकाश भरून आले', 'मळभ दूर झाले', 'आभाळच फाटले तिथे ठिगळं काय लावणार?' या अर्थाची परिस्थितीशी निगडीत काही वाक्ये आपण बर्‍याचदा ऐकतो. एखाद्या माणसाच्या मानसिकतेचे वर्णन करताना 'आभाळाएवढं मोठं मन', आभाळासारखी माया' यासारखे शब्द वापरले जातात.


'आकाशी झेप घे रे पाखरा,
सोन्याचा पिंजरा'

'Sky is the limit' या इंग्रजी वाक्याचा अर्थ वरील दोन ओळीत फार व्यापकतेने सांगितला आहे असं मला वाटतं!
(मला काव्यातलं फारसं कळत नाही असं काही लोक म्हणतात तो भाग वेगळा! ;)


कोर्डेसाहेब, एकंदरीतच आभाळ ही फार सुरेख गोष्ट आहे. स्वच्छ निरभ्र आकाश, मळभ असलेलं आकाश, काळ्या ढगांनी भरून आलेलं आकाश, कातरवेळची पश्चिमेची लाली दाखवणारं आभाळ, ही आकाशाची सगळी रुपं कुठेना कुठेतरी मनाशीच निगडीत आहेत असं वाटतं. अवघं एक आकाशच आपल्याला खूप काही शिकवून जातं यात वाद नाही!

कोर्डेसाहेब, आकाश या शब्दाचा अर्थ निश्चितच खूप व्यापक असावा व म्हणूनच कदाचित थोरल्या आबासाहेबांसारख्यांच्या बाबतीत गगनाला मिठी मारणे, किंवा गगनभरारी, यांसारखे शब्द शोभून दिसतात!

'इवलेसे रोप लावियले द्वारी
तयाचा वेलू गेला गगनावेरी'

ओळीतलं माउलीला अभिप्रेत असलेलं आभाळ समजून घेणं ही फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं!
आपले महानोरसाहेब, मनाचीच एक अवस्था सांगतांना 'नभ उतरू आलं' असे शब्द लिहून जातात! 'पर्वतांची दिसे दूर रांग, काजळाची जणू दाट रेघ' यातली काजळाची दाट रेघ दाखवायला आशाताईंचाच स्वर हवा!

गदिमा स्वयंवराचं वर्णन करतांना,

'आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे,
झाले सीतेचे'

या ओळी लिहून जातात!

कोर्डॅसाहेब, वरील ओळींचे संगीतकार व आमचे मानसगुरू बाबुजी जायच्या आदल्या दिवशीच्या भकास संध्याकाळी आम्ही त्यांना भेटायला हिंदुजा रुग्णालयात गेलो होतो तेव्हा आमच्या मनाने भरून आलेल्या, अन् काळवंडलेल्या आकाशाचा अनुभव घेतला होता!

असो!

आपल्या या चर्चेच्या निमित्ताने आम्हालाही थोडे चिंतन करावेसे वाटले आणि हा चार ओळींचा प्रतिसाद लिहावासा वाटला! आकाश या विषयावर एखादा विस्तृत लेख लिहायचा विचार बर्‍याच दिवसांपासून माझ्या मनात होता. पण म्हटलं उपक्रमाच्या माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीत ते लेखन बसेल न बसेल! ;)

सदर चर्चेमुळे काही अंशी ही इच्छा पूर्ण झाली याबद्दल आपले आभार. अजूनही लिहिण्यासारखं बरंच काही आहे, पण सध्या इथेच थांबतो!


-- तात्या अभ्यंकर.