August 28, 2010

ननदीके बचनवा..

I स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II

'ननदीके बचनवा..'

यमन रागातली ग्वाल्हेर परंपरेची ही सुरेख बंदिश येथे ऐका.. शशांक मक्तेदारने गायली आहे.

'छे बाई... या नणंदेचे बोल काही सहन होत नाहीत हो आता... काय करणार?, आमच्या खाष्ट सासूबाईंची लाडकी लेक ना! जळ्ळी मेली..! आईचे संस्कार अगदी पुरेपूर उतरलेत हो लेकीमध्ये. त्याच मेलीची फूस आहे हिला.!' हास्य

'आपण आपलं 'वन्स' वन्स' म्हणून कौतुक करायला जावं तर जास्तच शेफारते ही.. चारचौघात अगदी घालूनपाडून बोलण्याची एकही संधी सोडत नाही हो..!' हास्य

'पण काय करणार बाई.. इकडूनही तिला काही सांगणं होत नाही.. लाडकी बहीण ना? आपलंच नाणं खोटं त्याला काय करायचं..?' हास्य

मंडळी, ही तक्रार आहे, एक स्वगत आहे नव्यानवर्‍या सुनबाईंचं..

'ननदीके बचनवा सहे न जात
सोच सोच कछु ना जाए हमसो
उमग उमग असूवन बरसत नीर..'


किती सुरेख बंदिश आहे ही! आपल्या हिंदुस्थानी संगीतातली ग्वाल्हेर परंपरा.. आमच्या अन्तुबुवांची, गजाननबुवांची, मधुबुवांची, उल्हासकाकांची ग्वाल्हेर परंपरा..!

यमनसारखा प्रसन्न राग.. ही बंदिश म्हणजे यमनातली एक सुरेख रांगोळी!

आमच्या अन्तुबुवा जोशींची ही बंदिश.. तिथून त्यांचे चिरंजिव पं गजाननबुवा जोशी, गजाननबुवांकडून त्यांचे शिष्योत्तम पं उल्हास कशाळकर आणि तिथून उल्हासकाकांचा शिष्य शशांक मक्तेदार.. असा हा या बंदिशीचा प्रवास.. याला म्हणतात घराण्याची परपरा... अष्टांगप्रधान ग्वाल्हेर गायकीची परंपरा..! याला म्हणतात गुरुशिष्य परंपरा..!

त्रितालातली ही बंदिश.. तशी ऑड असलेली चवथ्या मात्रेपासूनची तिची उठवण..'सहे न जात..' ची गंधारावरची सुरेख सम..'उमग उमग असूवन बरसत नीर..' क्या बात है.. हे शब्द किती सुरेख पडलेत पाहा.. किती सुंदर बांधलेत पाहा..!

अंतराही अगदी तितकाच सुंदर..

'एक तो बैरन मोरी सास-ननदीया
दोरनिया, जठनिया रैनदिन
सब मिल हमसन जियरा मोरा डरावे
ननदिके बचनवा सहे न जात..'


'रात्रंदिवस सगळा सासूरवास आहे ओ अगदी.. जळ्ळ्या मेल्या मोरा जियरा अगदी डरावून टाकतात..!' हास्य

शशांकच कौतुक वाटतं मला..त्याने अगदी सुंदर गायली आहे ही बंदिश..तो सुरेल आहे, आलाप, लयकारी, तान, बोलतान.. नक्कीच चांगली आहे.. तो पं उल्हास कशाळकर यांच्याकडे कलकत्त्याला आयटीसीएसआरए मध्ये शिकला आहे.. उल्हासकाकांकडून खूप छान तालिम मिळाली आहे त्याला.

मंडळी, अंतुबुवा जाऊन आज खूप वर्ष झाली..त्यानंतर गजाननबुवाही गेले.. तरीही त्यांच्या परंपरेतली ही बंदिश आजही अक्षय आहे, तितकीच ताजी टवटवीत आहे. ही पुण्याई, ही श्रीमंती ग्वाल्हेर परंपरेची, आपल्या हिंदुस्थानी रागदारी संगीताची..मंडळी, ही मिठाई आहे.. अगदी साजूक तुपातली!

हिंदुस्थानी रागदारी संगीत हा आपला अनमोल ठेवा.. याची सर्वांनी कास धरा.. आयुष्य खूप समृद्ध होईल.. इतकेच विनंतीवजा सांगणे...

-- तात्या अभ्यंकर.

3 comments:

प्रभाकर कुळकर्णी said...

तात्या राव , तुम्ही ते " रोशनी" प्रकरण केव्हा पुर्न करनार राव? पुढे लिहा की. हे गाण्यातलं आम्हाला थोडं कमी समजते. ऐकायला बरं वाटते. पुढची"रोशनी" वाचायची आहे.

Abhijit Kaskhedikar said...

Tatya tumcha contact number dyal tar bara hoil...please...

Abhijit Kaskhedikar said...
This comment has been removed by the author.