June 18, 2011

आजची खादाडी, आजची बाई..१

लोकहो,

राम राम..

'आजची खादाडी, आजची बाई..' हे नवं सदर आम्ही आजपासून सुरू करत आहोत. अर्थात, वेळेच्या अभावी आम्ही हे सदर अगदी रोजच्या रोज लिहू शकू याची शाश्वती नाही. तरीही आमचा प्रयत्न मात्र तोच असेल.

मुळात खादाडी आणि बाई या दोन्ही गोष्टी आमच्या आणि इतरही अनेकांच्या इंटरेस्ष्टच्या आहेत, आवडत्या आहेत असा आमचा विश्वास आहे.. आता सभ्य आणि सुसंस्कृतपणाचे नसते ढोंगी बुरखे पांघरलेला कुणी म्हणेल की 'तात्याने हे नवं काय आरंभलं आहे? हे स्त्री-प्रदर्शन कशाकरता..?' वगैरे वगैरे..!

त्यावर आमचं इतकंच उत्तर आहे की आवडत्या खाद्यपदार्थासोबत आवडत्या बाईचंही चित्रं टाकलं आणि त्यावर दोन शब्द लिहिले म्हणजे आम्ही फार मोठ्ठं काही पापकर्म करत आहोत असं आम्ही तरी समजत नाही..

तेव्हा कुणी काय म्हणेल याची आम्हाला शाटमारी पर्वा नाही..

ते असो..

आज शनिवार. आठवडाखेर. आज जरा छानश्या चुलबुल्या मिनिशा लांबा सोबत गरमागरम कोंबडी टिक्का खाउया... :)



आमची मिनिशा तशी मुळातच चटपटीत आणि चुलबुलीत.
अवखळ आहे. पटदिशी लाडात काय येईल, तुमचा गालगुच्चा काय घेईल, मुका काय घेईल.. काही विचारू नका..! :)



किडन्यॅप चित्रपटात तिच्या पोहण्याचा एक शीन आहे त्यात ती फारच आकर्षक दिसते बुवा.

आम्ही जळ्ळं चुकून पाण्यात पडलो तर आम्हाला पैशे तर सोडाच, आम्हाला बाझवला साधं वाचवायलाही कुणी येणार नाही. मिनिशाला मात्र छानपैकी पोहायचे छानपैकी पैशेही भेटले असतील..! :)

असो..

मिनिशा मात्र आम्ही लाडकी आहे हो. तिला अनेकोत्तम शुभेच्छा..!

तात्या.

June 07, 2011

एक आठवण, धुळीतली...!

परवाच कुठेतरी नभोवाणीवर कुणी गात असलेली बिलावलमधली 'कवन बटरिया गईलो..' ही बंदिश कानावर पडली आणि माझं मन एकदम काही वर्ष मागे गेलं. वर्ष आता आठवत नाही परंतु सवाई गंधर्व महोत्सवातील आठवण आहे ही..अण्णांनी खास करीमखासाहेबांची 'प्यारा नजर नही..' ही बंदिश आणि त्यालाच जोडून 'कवन बटरिया..' फार सुरेख गायली होती त्याची आठवण झाली.

पं अच्युतराव अभ्यंकर यांनी माझ्या कानावर केलेले किराणा गायकीचे संस्कार आणि वारंवार समजावून दिलेले करीमखासाहेब आणि पुढे जाऊन त्याच गायकीतील भक्कम वीण समाजावून देणारे आमचे दस्तुरबुवा आणि अण्णा. दस्तुरबुवांचं अत्यंत सुरेल किराण्याचं गाणं. कधी त्यांचा स्वराचा एकेक मोती उलगडून दाखवणारा यमन, तर कधी खासाहेबी गोपाला मेरी करुना, किंवा जादू भरेली कौन अलबेली..! तर कधी अण्णांनी अनेकदा उलगडून दाखवलेला शुद्ध कल्याण किंवा तोडी. झालंच तर पुरीया.!

सवाईं गंधर्वांची ही शिष्यजोडी मलाही अगदी भरपूर लाभली. तो दिसच माझ्या आयुष्यातला खूप भाग्याचा दिस होता. अण्णांच्या आणि दस्तुरबुवांच्या पायाशी बसण्याचे खूप दिवस मनात होते, अखेर ती इच्छा पूर्ण झाली. आमचे दस्तुरबुवा म्हणजे ख्वाजा मोईउद्दीन चिस्तीने पाठवलेला एक अवलिया स्वर-जादुगार; तर आमचे अण्णा म्हणजे माझ्याकरता साक्षात पंढरीचा विठोबाच..!



त्या दिवशी खरंतर अण्णा माझ्यावर जरा वैतागलेलेच होते. का? तर मी मस्त मांडी ठोकून खाली धुळीत बसलो म्हणून..! :)

"च्च.. अरे इथे धुळीत काय बसतोस? कपडे मळतील की? तुला आमच्यासोबत फोटोच काढायचा आहे ना? मग बाजूला खुर्चीत बस की..!"

"नको हो अण्णा, मी आपला धुळीतच बरा..!" :)

असो..

आता अश्या अनेक आठवणी निघतात आणि मन उदास होतं. आजही कधी ग्रँटरोडला जाणं होतं. दस्तुरबुवा राहायचे त्या बिल्डिंगपाशी दोन क्षण उभा राहतो. पटकन दोन जिने चढून जावं आणि दस्तुरबुवा भेटावेत, त्यांच्या पायांना मिठी मारावी असं वाटतं. तर कधी दादरच्या प्रकाशचा बटाटवडा बाबुजी-ललीमावशीची आठवण करून देतो..!

चार-आठ दिसांपूर्वीच पुण्याला गेलो होतो. पाय नकळत कलाश्री बंगल्याकडे वळले. क्षणभर वाटलं की बंगल्यात जावं आणि किमान अण्णांच्या तंबोर्‍यांना तरी नमस्कार करावा. पण धीर नाही झाला. वळलो तसाच माघारी..!

-- तात्या अभ्यंकर.

बाबा रामदेव, वेळीच जागा हो..! :)

१) मी स्वत: कट्टर काँग्रेस अन् सोनिया विरोधी आहे,
२) भ्रष्टाचार हटवण्याची किंवा काळा पैसा भारतात आणण्याची आजच्या केन्द्र सरकारची मानसिकता नाही आणि तशी प्रबळ राजकीय इच्छाशक्तिही नाही हेही मी ठामपणे नमूद करतो.
३) मी स्वत: रामबाबाच्या योगविद्येचा आदर करतो आणि त्याकरता माझा त्याला दंडवतच आहे.

तरीही असे लिहावेसे वाटते की,

पोलिसांनी आंदोलकांना रामलीला मैदानातून हाकलताना बायकांना आणि लहान मुलांना मारले असे रामबाबा सांगत आहे. परंतु त्यात फारसे तथ्य दिसत नाही. अन्यथा पोलिस लहानमुलांना आणि बायकांना फटकावताहेत, हे चित्र कुठल्या ना कुठल्या वाहिनीवर नक्कीच दिसले असते; कारण प्रत्येकच वाहिनी मध्यरात्रीची ती प्रत्यक्ष दृष्ये दाखवत होती. अर्थात, खरोखरच जर त्यांना मार पडला असेल तर ती सरकारची केव्हाही चूकच आहे..

तरीही पोलिस हरकत में आ गई आणि केवळ शक्तिप्रदर्शनाकरता जमवलेल्या ५०००० च्या त्या गर्दीला तेथून रातोरात हाकलले ते एका अर्थी बरेच झाले. त्या गर्दीत फुकाचे साधुसंत आणि यूपीतले बरेचसे रेमेडोके भय्येच अधिक दिसत होते हे आग्रहाने नमूद करावेसे वाटते..!

बाकी सांगायचे म्हणजे एकूणच रामबाबाच्या ह्या आंदोलनात त्याने **अत्यंत ढोबळ अन् बेफाट** मागण्यांच्या निमित्ताने केलेले राजकीय (?) शक्तिप्रदर्शनच अधिक होते.

** १) आत्ताच्या आत्ता परदेशात जा अन् तेथील बँकातील काळा पैसा घेऊन या..!
-  म्हणजे पोतीच्या पोती घेऊन परदेशात गेले आणि तेथील सारा काळा पैसा घेऊन पुढच्याच विमानाने भारतात परत आले इतके हे सोप्पे आहे का?

**२) ५०० आणि १००० च्या नोटा लग्गेच फर्मान काढून रद्द करा..!
- अहो पण याला काही अन्य पर्याय..?

**३) वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांत द्या..
- पण तुमच्याकडे तसा अभ्यासक्रम तयार आहे का? तसे शिक्षक आहेत का? तश्या काही ठोस योजना तयार आहेत का?

वगैरे वगैरे.. **

योगविद्या शिकवणारा रामबाबा गेल्या काही काळापासून भलताच अहंकारी होत चालला होता. शिवाय तो एक हलक्या कानाचा अन् हुऱळून जाणारा साधूही आहे. त्याला आंदोलनाच्या ह्या हरबर्‍याच्या झाडावर कुणीतरी चढवला आणि तो सुसाट चढत सुटला. त्यातच अण्णांच्या आंदोलनाला सार्‍या देशाने आणि आंतरजाल जगताने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्याद्वारे रातोरात ष्टार झालेले अण्णा, हे पाहून रामबाबाही अंमळ खुळावला असावा, किंबहुना त्याचा जळफळाटच अधिक झाला असावा. आणि त्यामुळेच अण्णांचे हे आंदोलन तो काहीही करून हायजॅक करू पाहू लागला. मिडियाचे आपल्याकडे लक्ष जाऊन आपण सतत प्रकाशाच्या झोतात कसे राहू हे तो पाहू लागला.

अण्णांच्या आंदोलनाला/उपोषणाला जशी काही एक भक्कम वैचारीक बैठक आहे तशी काहीही बैठक रामबाबाची नाही. शिवाय अण्णांच्या मागे अरविंद केजरीवाल नामक एक चाणक्यही आहे जो अत्यंत हुशार मनुष्य आहे, काही एक चांगले करू पाहणारा आहे. अत्यंत कर्तबगार आणि निस्पृह पोलिस अधिकारी असलेल्या डॉ किरण बेदी याही अण्णांच्या पाठीशी आहेत. तसे या रामबाबाच्या मागे कुणी आहे का?

रामलीला मैदानावरील आंदोलनाच्या मंचावर ही ऋतंबरा कशाकरता आली होती? (तिला सारेजण 'साध्वी' ऋतंबरा असे संबोधतात. परंतु तिच्याबद्दल कुठलीही व्यक्तिगत माहिती मला नसताना मला व्यक्तिश: तिला 'साध्वी' असे संबोधणे उचित वाटत नाही. मनुष्यप्राणी हा जबर स्खलनशील आहे असा माझा ठाम विश्वास आहे. असो..!) :)

दिल्लीहून हुसकून हरिद्वारला पाठवलेला रामबाबा तिथे गेल्यावर अजूनही काही वाट्टेल ते बरळतो आहे. म्हणे ५००० माणसे बेपत्ता आहेत, मला ठार मारण्याचा सरकारचा डाव होता वगैरे वगैरे..

अरे रामबाबा, मेल्या योगी ना तू? मग तू कसा काय इतका जबर अहंकारी? अण्णा हजारेंवर जळ जळ जळून तुझा नक्की काय फायदा होणार आहे? 'तुझे आहे तुजपाशी' नाटकात पुलं म्हणाले होते की सन्याशाची वस्त्र ही भयंकर असतात, ती सारे अंग भाजून काढतात. रामबाबा, तूर्तास तुझीही नेमकी तशीच अवस्था झाली आहे. लेका, तुझ्यासारख्या योग्यापेक्षा आठवड्याला एक-दोनदा क्वार्टर अन् मच्छीचं जेवण जेवणारे, सुंदर-आकर्षक आणि कमनीय बायकांकडे पाहून मनातल्या मनात पाघळणारे आमच्यासारखे भोगी बरे की रे..! :)

तेव्हा रामबाबा, जागा हो. आजही तू एक मोठा योगाचार्य आहेस. तेव्हा तू आपला तुझी योग्यविद्याच आम्हा सार्‍या भारतीयांना शिकवून सोड कसा..!

जमल्यास तुझ्या योगसामर्थ्याच्या बळावर मस्तपैकी एकसे एक स्त्री शिष्यांना पटव ( तूर्तास तसं काही नसावं हा माझा अंदाज! ;) ) आणि मस्त मजा कर, असा आपला जाता जाता माझा तुला एक व्यक्तिगत सल्ला..! ;)

काय बोल्तो..? :)

तुझा,
तात्या.