August 24, 2013

पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी..

संत तुकाराम चित्रपटातला एक विलक्षण मेलडियस, उत्साहाने, चैतन्याने भरलेला एक अभंग.. 
बिहागसारख्या रागात बांधलेला..

संत तुकाराम चित्रपटातला तुकोबांचा कट्टर विरोधक सालोमालो.. ह्या सालोमालोच्या तोंडी हा अभंग आहे.. 

ह्या सालोमालोचं काम करणारा नट कोण आहे देव जाणे, पण या नटाने अगदी झक्कास अभिनय केला आहे हा अभंग गाताना. हा अभंग कुणी गायला आहे हेही माहीत नाही.. कदाचित तो सलोमालोचं काम करणारा नटच गायकनटही असावा..

परंतु ज्याने कुणी हा अभंग गायला आहे त्याने हा अभंग केवळ अप्रतिम गायला आहे असंच म्हणावं लागेल.. हा जो कुणी आहे तो अतिशय सुरेल मनुष्य आहे... गाण्याची उत्तम तालीम घेतलेला आहे..





मुळत हा अभंग तुकोबांचा.. सालोमालो तो ढापून आपल्या नावावर खपवू पाहात आहे.. त्यांमुळे त्याच्या सादरीकरणात एक प्रकारचं नाट्य आहे, अभिनय आहे.. त्यामुळे त्याची चालही बदलली आहे.. मूळ तुकोबांची चाल ही अतिशय साधी, त्यांच्यासारखीच सात्त्विक आहे जी विष्णूपंत पागनीसांनी गायली आहे.. परंतू सालोमालोची चाल ही बिहागमधली, त्याच्यासारखीच रंगेल आणि राजस गुणांची आहे हे ध्यानात घेण्यासारखं आहे..!

कुठल्याही चित्रपटातल्या एखाद्या गाण्याकडे बघताना अशाच दृष्टीने पाहिलं पाहिजे..कारण ते नुसतं गाणं नसतं तर त्या गाण्याला एक पार्श्वभूमी असते हेही लक्षात घ्यावं लागतं.. आणि त्या दृष्टीने या अभंगाकडे पाहिल्यास आपलाच आनंद अधिक दुणावतो..

पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी..

गंधारावरची सुंदर सम.. वा!

सालोमालोबुवा छान नटूनथटून कीर्तनाला उभे आहेत.. हाती चिपळ्या आहेत.. 

एका श्रोत्याला छान डुलकी लागली आहे.. त्यामुळे सालोमालोबुवा त्याला,

'जागृती-स्वप्नी पांडुरंग..' असं म्हणत खणकन त्याच्या कानाशी चिपळी वाजवाताहेत.. मस्तच जमलंय हे टायमिंग.. 

आणि पांडुरंगातल्या त्या शुद्धनिषादाची क्वालिटी खास बिहागातली. अतिशय सुरेख..

स्वर नुसतेच छान आणि सुरेल लागून उपयोगाचं नाही तर ते त्या त्या रागाच्या क्वालिटीनुसार(च) लागले पाहिजेत..! असो.

'पहिले वळण ऐंद्रिया सकळा..'

वा..! सालोमालोच्या आवाजाचा पोत खरंच सुरेख आहे.. उत्तम फिरत आहे आवाजाला.. आवाजाची जात थोडी सुरेशबुवा हळदणकरांसारखी वाटते आहे.. 

'भाव तो निराळा नाही दुजा.. '

धत तेरीकी..! येथे तुकोबांना काय म्हणायचं आहे हेच मुळी सालोमालोला कळलेलं नाही.. नाहीतर त्याने तुकोबांशी असा दुजाभाव केलाच नसता..!

'भाव तो निराळा.. ' नंतरची थोडी लयकारीवजा गोलाकार आलापी सुंदर आणि त्यानंतर 'नाही दुजा.. ' वरचा पुन्हा एकदा बिहागचा देखणा निषाद आणि त्यानंतर त्या अज्ञात गायकाने धैवत, पंचम आणि मध्यमावर अनुक्रमे केलेला ठेहेराव देखील सुरेख.. मध्यमावरच्या ठेहेरावावरती त्याची डोळ्यातनं टिपं गाळायची नाट्यमयता.. सगळंच सुंदर..!

सालो म्हणे नेत्री केली ओळखण..

हा हा हा.. इथे' तुका म्हणे' च्या ऐवजी त्याने 'सालो म्हणे' टाकलं आहे. ‌शिवाय 'सालो म्हणे.. ' या शब्दांवर विशेष जोर देऊन ते तो ठासून सांगायचा प्रयत्न करतोय तेही मस्त.. त्यावेळची तोड, तिहाया, चौथाया. ‌सगळंच मस्त ..

'तटस्थ ते ध्यान विटेवरी..' असं म्हणताना त्याने कमरेवर हात ठेऊन घेतलेली विठोबाची पोझ.. पण त्याचा तो म्हातार नोकर जो आहे तो हे सगळं ओळखून आहे.. तो आपल्या मालकाच्या 'ध्याना'लाच नमस्कार करतो आहे..! 

गायकीचे बारकावे आणि सुरेलता तर आहेच परंतु इतरही अनेक बारकावे आहेत या गाण्यात..त्यामुळेच एकदा या गाण्यावर भरभरून लिहायचं ठरवलं होर्त.. आज योग आला..

आज इतके वर्ष झाली या चित्रपटाला परंतु त्यातल्या या अभंगाची नोंद कुणी घेतली आहे की नाही माहीत नाही..आणि म्हणूनच मी ती आवर्जून घेतो आहे..

सालोमालोंनी गायलेला हा सुंदर अभंग ऐकून स्वतः तुकोबा इतकंच म्हणाले असते..

"बाबारे, काय छान गातोस.. पांडुरंगाने तुला काय गोड गळा दिला आहे.. वाटल्यास मी माझे सगळे अभंग तुला देतो.. फक्त तुझ्यातला दुजाभाव तेवढा बाजूला ठेव म्हणजे झालं..! "

-- तात्या अभ्यंकर.

2 comments:

Unknown said...

अहो तात्या ते श्री भागवत आहेत आणि गाण पण त्यानीच म्हटल आहे , वारकरी कीर्तनकार होते ते. कोरस सुद्धा त्यांचीच कीर्तन मंडळी आहेत.

Unknown said...

अहो तात्या ते श्री भागवत आहेत आणि गाण पण त्यानीच म्हटल आहे , वारकरी कीर्तनकार होते ते. कोरस सुद्धा त्यांचीच कीर्तन मंडळी आहेत.