December 14, 2007

शब्द आणि स्वर, वक्ता आणि गवई! ..१

राम राम मंडळी,

ख्याल गायन, ज्याला 'ख़याल गायन' असेही म्हटले जाते हे आपल्या भारतीय अभिजात संगीताचं, विशेष करून हिंदुस्थानी रागदारी संगीताचं एक प्रमूख अंग आहे. मैफलीत गाताना गवयाकडून ख़याल (यापुढे ख्याल) गायला जातो, तसाच तो श्रोत्यांकडून ऐकलाही जातो. आता ख्याल किंवा ख़याल म्हणजे विचार. 'आपका क्या ख़याल है', किंवा 'आपका क्या विचार है' हे संवाद आपण नेहमी ऐकतो. मग मंडळी, आता दोन मुख्य प्रश्न असे पडतात की,

१) अभिजात संगीतातला 'ख्याल' म्हणजे काय?
२) आणि जर तो 'ख्याल' असेल तर तो कसा मांडतात? आणि तो व्यक्त करण्याची माध्यमं जरी वेगवेगळी असली (भाषण/वक्तव्य आणि गाणं!) तरीही त्यात काय साम्य आहे किंवा काय फरक आहे?

'वा! काय सुंदर विचार मांडले आहेत!' असं आपण एखाद्या उत्तम वक्त्याचं भाषण ऐकून अगदी सहजच म्हणतो, त्याचप्रमाणे अभिजात संगीताच्या क्षेत्रात देखील 'किशोरीताईंचा ख्याल ना?, वा! ताई काय सुंदर आणि वेगळेच विचार मांडतात!' असंही आपण म्हणतो.

लोकगीत, भावगीत, नाट्यगीत इत्यादी गायनप्रकार जेवढ्या प्रमाणात ऐकले जातात त्या तुलनेत ख्यालगायन ऐकलं जात नाही असं माझं निरिक्षण आहे. त्यामुळे मला कल्पना आहे की हा लेख वाचणारा प्रत्येकच वाचक काही ख्यालगायन ऐकणारा असेल असे नाही. परंतु प्रत्यक्ष जरी कधी मैफलीत बसून ख्यालगायन ऐकले नसले आपल्यापैकी अनेकांच्या कानांवरून 'ख्यालगायन' हा शब्द निश्चितच गेला असावा!

तर मंडळी, 'वक्तृत्वातील ख्याल' आंणि गायनातील ख्याल' यात काय साम्य आहे (बरचंसं साम्यच आहे,) आणि काय फरक आहे हे या लेखातून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. इथे मी 'वक्ता' म्हणजे 'उत्तम वक्ता' (जो दहा हजारात एक असतो असं काहीसं संस्कृत मध्ये म्हणतात तसा!) आणि ख्यालगायक म्हणजे 'उत्तम ख्यालगायक' हे गृहीत धरूनच लिहिणार आहे एवढं आपण कृपया लक्षात घ्या. मला सर्वच नसली, तरी उत्तम वक्त्याची आणि उत्तम ख्यालगायकाची काही लक्षणे माहिती आहेत, त्याचाच आधार मी घेणार आहे.

एखादा वक्ता जेव्हा बोलत असतो तेव्हा 'शब्द' हे त्याचं माध्यम असतं. मैफलीमध्ये एखादा वक्ता जेव्हा गात असतो तेव्हा अर्थातच 'सूर' किंवा 'स्वर' हे त्याचं माध्यम असतं. इथे एक महत्वाचा फरक लक्षात घ्या की शब्द हे सगुणरूप घेऊन श्रोत्यांपुढे येतात तर ख्यालगायनातल्या आलापीचे, लयकारीचे, तानेतले, मंद्र-मध्य-तार सप्तकातले स्वर हे निर्गुणरुपी असतात! ते श्रोत्याला समजून घ्यावे लागतात, जाणून घ्यावे लागतात आणि जरी समजले/जाणता आले नाहीत तरी ते त्याच्या काळजाला भिडावे लागतात! परंतु श्रोता जर जाणकार आणि बहुश्रुत असेल तर त्याला श्रवणाचा आनंद तर मिळेलच परंतु समोरचा गवई काय गातो आहे, कसं गातो आहे हेही तो डोळसपणे पाहू शकेल, गायकीवर काही भाष्यही करू शकेल. परंतु दोन्हीही क्षेत्रात शब्द आणि स्वर ह्यांनाच अनन्यसाधारण महत्व आहे हे निर्विवाद!

मग आता वक्त्याचा शब्द आणि गवयाचा स्वर (वर म्हटल्याप्रमाणे मला येथे अभिजात ख्यालगायन अपेक्षित आहे, ज्यात निर्गुणी स्वरांचं साम्राज्य अधिक असतं.भावगीत नव्हे, ज्यात स्वरांसोबतच शब्दांचंही प्राबल्य असतं आणि जे बरचसं सगुणरूप असतं!) यांनाच जर सर्वाधिक महत्व असेल तर मग उत्तम शब्द आणि उत्तम स्वर यांचे निकष काय? अहो एखाद्या उत्तम गवयाचं गाणं जसं काळजाला भिडतं तसंच एखाद्या उत्तम वक्त्याचं भाषण देखील अक्षरश: रोमांच उभे करणारं असतं, उघड्या मैदानावरील हजारोंचा श्रोतृवृंद स्तब्ध करून टाकणारं असतं!

अर्थातच माध्यमं असतात, शब्द आणि स्वर!

मग कसे असावेत बरं हे शब्द आणि स्वर?

(क्रमश:)

-- तात्या अभ्यंकर.


हाच लेख इथेही वाचायला मिळेल!

4 comments:

HAREKRISHNAJI said...

सुरेल लेख. पुढच्या लेखाची वाट पहात आहे.

Vaidehi Bhave said...

pudhe vachayachi utsookata ahe. nakki liha

आशा जोगळेकर said...

खरंच खूप मापिती पूर्ण लेख. गायकाचे स्वर हेच त्याचे शव्द. समर्पक लेख .

Tatyaa.. said...

हरेकृष्णजी, वैदेही, आशाताई,

प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार.

पुढचा भाग लिहितो लवकरच!

तात्या.