October 10, 2011

हाथ छुटे भी तो...


आज पुन्हा एकदा खूप काही हरवलं आहे. पोटात खूप काही तुटतं आहे. जगजीत सिंग साहेबांसारख्या एका मनस्वी सुरील्या, भावतरल गळ्याच्या धन्याला आज आपण मुकलो आहोत. एक खूप मोठा कलाकार आज आपल्यातून निघून गेला आहे.

जगजित सिंग यांच्याच एका गाण्याचे रसग्रहण करण्याचा माझा हा एक प्रयत्न. हीच माझी त्यांना विनम्र आदरांजली..!

हाथ छुटे भी तो..!
(इथे ऐका)

'पिंजर' चित्रपटातलं उतम सिंग यांचं संगीत असलेलं जगजित सिंग यांनी गायलेलं हे गाणं. केवळ अप्रतीम. हे गाणं ऐकलं की काव्य, संगीत आणि गायन या सर्वार्थाने एक अत्यंत उच्च दर्जाचं गाणं ऐकल्याचं समाधान मिळतं, जीव तृप्त होतो!

हाथ छुटे भी तो रिश्ते नही छुटा करते,
वक्त की शाख से लम्हे नही टुटा करते!

पुरियाधनाश्रीचे बेचैन स्वर. राग पुरियाधनाश्री. समाधीचा राग..!

'वक्त की शाख से लम्हे..' या ओळीतील 'लम्हे'वर कोमल धैवत विसावतो, उदास सायंकालच्या सावल्या लांबतात आणि ते 'लम्हे' काळजात घर करतात..!

जिसने पैरों के निशा भी नही छोडे पिछे,
उस मुसाफिर का पता भी नही पुछा करते..!

क्या केहेने..! या ओळीचं चित्रिकरण तर विशेष सुरेख आहे!

जिसने पैरो के..' ही ओळ जेव्हा तार षड्जाला स्पर्ष करते तिथे पुरियाधनाश्री जीव कासावीस करतो. ते पुरियाधनाश्रीचं समर्पण! आणि त्यानंतरची पंचामवरची अवरोही विश्रांती. हा खास पुरियाधनाश्रीतील पंचम. प्रार्थनेचा पंचम..! आणि ही सारी जगजितसिंग साहेबांच्या सुरांची आणि त्यांच्या विलक्षण भावपूर्णता असलेल्या ओल्या रसिल्या गळ्याची किमया..!

'छुट गये यार ना छुटी यारी मौला..' चा कोरस सुंदर. कोरसचं सरगम गायनही अगदी परिणामकारक. गाण्याच्या चित्रिकरणातील उर्मिला अभिनयात, दिसण्यात नेहमीप्रमाणेच लाजवाब!

प्रिय जगजित सिंग साहेब,

हाथ छुटे भी तो रिश्ते नही छुटा करते,
वक्त की शाख से लम्हे नही टुटा करते!

खरं आहे आपण म्हणता ते. आज आपण आम्हा सर्वांचा हात सोडून निघून गेला आहात, परंतु आपल्यातलं सुराच नातं कधीही तुटणार नाही. आम्हाला तृप्ती, समाधान आणि आनंद देणर्‍या आपल्या अनेक मैफलींमधले, गायकीमधले लम्हे कधीही पुसले जाणार नाहीत, विसरले जाणार नाहीत.

सुरांनी बांधलेली नाती कधीही तुटत नाहीत हेच खरं..!

-- तात्या अभ्यंकर.

No comments: