March 12, 2012

एकदाच यावे सखया...

एकदाच यावे सखया.. (येथे ऐका)

अशोकजी परांजपेंचे सुंदर शब्द असलेलं अशोक पत्की, सुमनताईंचं एक सुरेख गाणं. साधीच परंतु अत्यंत सात्त्विक अन् गोड चाल आणि सुमनताईंचा तितकाच गोड आणि हळवा गळा. 'सखया' हा शब्द खूप म्हणजे खूपच सुरेख!

पुन्हा गूज अंतरीचे हे कथावे व्यथांनी.. - ही ओळ खूप काही सांगणारी.

मध्यंतरीच्या काळात कुठेतरी अंतर पडले आहे, ते दूर व्हावे आणि पुन्हा एकदा तुझे गीत कानी यावे आणि 'भाव दग्ध विटला हा रे, पुन्हा फुलुनि यावा...!'

'पुन्हा फुलुनि यावा...' या ओळीतील पत्कीसाहेबांच्या अत्यंत हळव्या सुरावटीचं सुमनताईंनी अगदी सोनं केलं आहे. ही जागा त्यांच्या गळ्यातून इतकी सात्त्विकपणे उतरली आहे की क्या केहेने..! 'धुंद होऊनी मी जावे..' ही सुरावट देखील तशीच सुरेख...

प्रेमगीतातील ही सात्त्विकशीलता आणि मर्यादशीलता हल्लीच्या काळात क्वचितच पाहायला मिळते. कितीही जरी निरनिराळ्या राजसी-तामसी पाककृती असल्या, आपण त्यांचा वेळोवेळी आस्वाद घेतला तरी अहो शेवटी केळीच्या पानावरील साधा गरमागरम वरणभात, सोबत साजून लोणकढं तूप याला जशी सर नाही ना, तसंच या गाण्याचं आहे. अखेर कुठेतरी तुम्हाला निवारा मिळेल आणि तुमचं मन शांत होईल ते 'एकदाच यावे सखया', 'केतकीच्या बनी', 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या' किंवा विठ्ठला तू वेडा कुंभार..' याचसारख्या गाण्यांमधून..!

पण आमचं हल्ली असं झालंय की आम्हाला 'कोलावरी डी..' सारखी गाणी हेच काय ते उच्च संगीत वाटतं आणि याचं कारण म्हणजे हल्लीच्या बाजारबसव्या वाहिन्या अशीच गाणी अगदी सतत तुमच्याआमच्या वर लादत असतात..


मग माझ्यासारखा नॉस्टालजियाने पछाडलेला एखादा खुळा उठतो आणि 'एकदाच यावे सखया..' या सारख्या गोड, अवीट गाण्याबद्दल आपलं मन मोकळं करतो इतकंच..!

-- तात्या अभ्यंकर.

3 comments:

Jayant Phatak said...

मित्रा,

लिहित रहा....

निदान मी तरी नक्कीच वाचीन...

जयंत फाटक...

Anonymous said...

मित्रा,

लिहित रहा....

निदान मी तरी नक्कीच वाचीन...

जयंत फाटक...

A Spectator said...

Listened to the song. Its really beautiful.