July 01, 2013

बुड बुड घागरी.. :)

स्नान, अंघोळ आणि तिचे नानाविध प्रकार आणि नानाविध रुपं..

"छ्या लेका दूर हो..४-४ दिवसात अंघोळ कर नाहीस.." इथपासून ते रोज छान छान श्रीमंती टबात ऊन ऊन पाण्यात अंघोळ करणारे..!

मुंबै उपनगरी रेल्वेतून जाताना बरेच वेळा काही भय्ये साधारणपणे लालसर चड्डीवर अंघोळ करताना फार सुरेख दिसतात.. डोक्याला शांपूबिंपू असली श्रीमंती भानगड नाही. ‌साबणच लावतात डोक्याला आणि थंड पाण्यानेच अंघोळ करतात..

पण मी एक पाहिलं आहे.. बारा महिने थंड पाण्याने अंघोळ करणारे बरेचवेळा स्वताःचीच बढाई मारताना दिसतात..

"कितीही थंडी असो.. मी बारा महिने थंड पाण्याने अंघोळ करतो..ह्या ह्या ह्या... "

अशी फुशारकी मारतात..

अंघोळ.. एक प्रसन्न प्रकार..

पूर्वी बंब असायचे. झकासपैकी कढत कढत पाणी देणारे बंब.. आता गिझर, गॅसगिझर आले..

'काय पण म्हणा.. बंबातल्या पाण्याने अंघोळ करायची मजाच वेगळी.. ' हे म्हणणारे आता फार कमी राहिलेत..

उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला मनसोक्त केलेली विहिरी-नदीतली अंघोळ.. व्वा..! आडातलं पाणी बाकी काय आल्हाददायक गार असतं..!

गंगा-गोदावरी आदी तिर्थात केलेली अंघोळ.. हरिद्वार-अलाहाबाद आदी कुंभात केलेली अघोळ... व्वा..!

सहज लिहायला बसलो.. पण किती प्रकार सुचताहेत अंघोळीचे.. साला, लेखणी प्रसन्न आहे आपल्याला.. भाईकाकांचा भक्कम आशिर्वाद आहे.. :)

ब्राह्मणात नाही, पण इतर बऱ्याच जातीत मयताला घालतात ती अंघोळ.. तेव्हाची रडारड.. भसाभस पाणी ओतत असतात त्या मयतावर.. त्याला बिचाऱ्याला पत्ताच नसतो.. माझ्या ओळखीच्या एका म्हाताऱ्याचं मयत. चमत्कारिक कुबड होतं त्या बिचाऱ्याला. त्याच्या पायावर पाणी घातलं की तो डोक्याकडनं उठून बसायचा.. आणी डोक्यावर पाणी घातलं की पाय वर करायचा..!

लहानपणीची आई-आज्जीने घातलेली काऊचीऊची अंघोळ.. नंतर तीट-पावडर.. व्वा..!

नरकचतुर्दशीची दिवाळीच्या पहाटे छान सुगंधी तेल-उटण्याचं अभ्यंग स्नान..

डोक्याला छान खोबरेल तेल लावून छान कढत पाण्याने बहिणीने घातलेली भाउबिजेची अंघोळ..!

"अरे जा आता अंघोळीला.. "

"हे काय, तुमची अंघोळ वगैरे झाली वाटतं.. "

"आज पाणी नाही.. अंघोळीला बुट्टी.. "

"लांबून प्रवासाहून आलाय. घ्या जरा अंघोळ वगैरे करून.. आमटीभात तयार आहे.. "

"साल्याच्या नावाने अंघोळ केली.. "

अंघोळीच्या बाबतीतले असे असंख्य संवाद..

एक अंघोळ मात्र खूप उदास. नकोशी वाटणारी.. स्मशानात अग्नी देण्यापूर्वीची किंवा मयताहून आल्यानंतरची अवेळी अंघोळ..

पण त्या अंघोळीने आप्तस्वकियांच्या आठवणी, त्यांचे प्रेमळ स्पर्श, त्यांची शाबासकी, माया, ममत्व.. कधीच वाहून जात नाही. बादलीभर पाण्याची ती ताकद नाही..!

बराय तर मंडळी.. पाणी तापलं आहे. आलोच दोन तांबे घेऊन..! :)

-- तात्या अभ्यंकर.

No comments: