July 02, 2013

ओले अंजीर आणि बेळगावी कुंदा..!

एकदा सहजच अण्णांना भेटायला कलाश्रीमध्ये गेलो होतो. बाहेरच्या खोलीत अण्णा निवांतपणे बसले होते. 'काय कसं काय, मुंबई काय म्हणते, केव्हा आला ठाण्याहून..' असे जुजबी प्रश्न अण्णा विचारत होते. जरा वेळाने तेथे वत्सलाताई आल्या. त्यांनी मला ओले अंजीर दिले. अतिशय गोड आणि सुरेख होते.. मी ते अंजीर पटापट मटकावले परंतु मला प्रश्न असा पडला की त्याची देठं टाकायची कुठे? मग बाहेर जाताना ती सोबत न्यायची आणि टाकून द्यायची असं मी ठरवलं आणि तसाच बसून राहिलो..

माझी चुळबुळ वत्सलाताईंच्या लक्षात आली.. 

'माझ्याजवळ द्या ती देठं इकडे.. मी टाकते.."

त्या इतक्या सहजतेने म्हणाल्या की मलाच ती देठं त्यांच्या हातात देतांना अवघडल्यासारखं वाटलं..

"यांना तो बेळगावी कुंदापण दे.." अण्णा म्हणाले..

ताईंनी लगेच तत्परतेने आत जाऊन माझ्याकरता तो कुंदा आणला..

मग निरोप घेतला..

अण्णांनी विचारलं, "कसे जाणार?" 

अण्णांना एकूणच रस्ते, गाड्या यात विलक्षण इंटरेस्ट.. :)

"साडेचारची कोयना आहे.. ती पकडणार.."

हां हां बरोबर.. कोयना आठपर्यंत जाईल ठाण्याला.."

जगभर प्रवास केलेल्या अण्णांनी 'मी कोयना एक्सप्रेस पकडून ठाण्याला जाणार..' या प्रवासातदेखील इतकी उत्सुकता दाखवली की मला गंमतच वाटली..! :)

असो.. आता फक्त आठवणी आहेत..!

तात्या.

No comments: