January 18, 2014

दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनात..?

भाईकाकांचा गजा खोत हा हार्मोनियमवर 'उगीच का कांता..' हे पद वाजवायचा प्रयत्न करतो आणि त्या नादात 'उगीच..' या शब्दातील उ गी च ही अक्षरं हार्मोनियमच्या बटणांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो.. :)

वास्तविक कुठलीही अक्षरं ही त्या त्या स्वरांमध्येच वाजतात आणि स्वर तर फक्त सातच आहेत हे आपल्याला माहीत आहे.. सारेगमपधनीसां.. या ७ स्वरातला हा सारा खेळ आहे..

परंतु गाण्याचा अभ्यास करताना मला हे जाणवलं की क्वचित काही योग असेही येतात जेव्हा काव्यातलं एखादं अक्षर हे नेमकं सारेगमपधनीसां या स्वरात बसतं आणि तेव्हा तो माझ्या मते 'सोने पे सुहागा..' असा योग असतो..

सांगतो कसं ते.

गीत रामायणतल्या 'पराधीन आहे जगती..' या अजरामर गाण्यामधल्या एका कडव्यातल्या ओळी आहेत..

जरा मरण यातून सुटला कोण प्राणिजात
दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनात..?

आता गंमत बघा.. की 'दु:खमुक्त जगला का रे..' या ओळीतल्या 'रे' या अक्षरावर नेमका शुद्ध रिषभ पडला आहे.. शुद्ध रिषभ म्हणजे 'सारेगमपधनीसां..' मधला रे..!

म्हणजे मूळ काव्यातलं अक्षरही 'रे' आणि त्याचा स्वरही 'रे' च..!

आणि रे या अक्षरावर असलेला रे हा स्वर मला विलक्षण आकर्षित करतो, खूप काही सांगून जातो..!

कुणाकडे मयत झालं तर आपण काय करतो..? त्या घरातल्या लहान-थोरांची,

'काय इलाज आहे सांगा पाहू? जन्माला आलेला प्रत्येक जण जाणारच आहे की नाही? तुम्ही असा धीर सोडू नका.. होईल सगळं काही ठीक.. आम्ही आहोत ना तुमच्यासोबत.."

असं काहितरी म्हणून आपण त्या कुटुंबियांचं सांत्वन करतोच की नाही?

नेमकं तेच सांत्वन इथे श्रीराम भरताचं करताहेत.. त्याची समजूत काढताहेत.. आणि ती समजूत काढताना ते म्हणताहेत..

"दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनात..?"

आणि या ओळीतलं ते 'रे' हे अक्षर आणि त्यावरचा 'रे' हा स्वर.. मला खूप खूप इंटिमेन्ट वाटतो.. भावनेच्या खूप जवळ घेऊन जातो..

काय सांगतो तो रे हा स्वर..?

हेच की श्रीराम खूप म्हणजे खूप प्रगल्भ विचारांचे आहेत.. ते भरताच्या पाठीवरून हात फिरवून त्याची समजूत काढत आहेत, त्याला धीर देत आहेत..

"दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनात..?..!'

मंडळी, म्हणूनच असं नेहमी म्हटलं जातं की गाणं ही अनुभवायची गोष्ट आहे..

काल मी कुसुमाग्रजांच्या 'सरणार कधी रण..' या गाण्याबद्दल दोन ओळी लिहिल्या होत्या.. आज पुन्हा 'पराधीन आहे जगती..' याबद्दल दोन ओळी लिहिल्या..

मी आजतागायत गाणं आणि खास करून गीतरामायण या विषयावर भरपूर डोकेफोड केली आहे, सततचं चिंतन-मनन केलं आहे आणि त्यातूनच क्वचित असे काही माणिक-मोती हाती लागतात. सतत त्या प्रशांत महासागरात न कंटळता श्रद्धेने डुबक्या मारत रहायचं हेच आपलं काम..!

माझ्या मते 'सरणार कधी रण..' किंवा 'पराधीन आहे जगती..' ही केवळ गाणी नाहीत, तर हे संदर्भ ग्रंथ आहेत.. सर्जनशील, सृजनशील आयुष्याच्या ह्या पोथ्या आहेत.. यांना एखाद्या धर्मग्रंथाइतकं मोल आहे..!

-- (बाबूजींचा शिष्य) तात्या अभ्यंकर.

2 comments:

आशा जोगळेकर said...

ज्ञानोबांची वाणीआणि तुमचें विवेचन दोन्ही एकत्र छान वाटलं.

Shantanu_2412 said...

too good