August 08, 2015

साखर-खोबर्याचा गोडवा...

तयासि तुळणा कैसी, मेरु मांदार धाकुटे..

वा! काय सुंदर शब्द आहेत!

खूप वर्षांपूर्वी..म्हणजे साधारण १९७६-७७ च्या सुमारास मी अगदी तिसरी-चौथीत असताना मला आठवतंय..आमच्या सोसायाटीमध्ये एक मेहेंदळे नावाचं कुटुंब रहायचं. त्यातले भाऊ मेहेंदळे तीन सांजा झाल्या की दर शनिवारी आम्हा सगळ्या बाळगोपाळाना इमारतीच्या गच्चीत जमवायचे. आणि मग ती हनुमंताची पर्वत उचलणारी लहानशी तसबीर ठेऊन, छान उदबत्ती वगैरे लावून आम्ही सगळे भीमरूपी महारुद्रा म्हणायचे. त्यानंतर नारळ फोडून त्याचे लहान तुकडे करून आणि त्यात साखर घालून आम्ही सगळे लहान लहान हनुमान तो सुंदर प्रसाद खायचो. पुढे काळाच्या ओघात ती आरतीही केव्हातरी बंद झाली..

तेव्हा संध्याकाळचा पर्वचा, पाढे, रामरक्षा, भीमरूपी महारुद्रा या गोष्टी घराघरात चालायच्या. अर्थात, त्यातल्या १९, २९ वगैरे पाढ्याना मी आजही घाबरतो तो भाग वेगळा! :)

पण तेव्हा तीन सांजेला देवाला नमस्कार करून घरातल्या सगळ्या वडिललधा-यांना नमस्कार करायची पद्धत होती. मी आजही संध्याकाळी दिवाबत्ती करून म्हातारीच्या पाया पडतो!

आता whatsapp आले, video games आले, स्कायपी आल्या, सेल्फी आले.. चालायचंच. माझी कुठलीच तक्रार नाही..

पण भाऊ मेहेंदळे यांच्यासारख्या बुजुर्गांनी किंवा आपल्या आई-वडिलांनी आपल्याला संध्याकाळचा पर्वचा, पाढे, रामरक्षा, भीमरूपी महारुद्रा हा अनमोल ठेवा दिला आहे. तो आपण टिकवला पाहिजे!

काळाच्या ओघात भाऊ मेहेंदळेही गेले. पण त्या साखर-खोबर्याचा गोडवा आजही कायम आहे. कारण तो अक्षय आहे!

असो..

-- तात्या अभ्यंकर.