November 04, 2014

आपण फक्त आपल्यापुरतं बोलावं...

हम्म.. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आणि नाथाभाऊंनी केलेल्या विधानापासून एकंदरीतच गेल्या दोन दिवसात FB वर ब्राह्मण-बहुजन असा बराच राडा वाचायला मिळाला..

असो..

प्रत्येकाची मतं.. प्रत्येकाचे विचार...

माझ्यापुरतं बोलायचं तर आमचे गुरुवर्य पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या आज्ञेनुसार जातीपाती या फक्त खाद्यपदार्थांपर्यंतच मर्यादित असाव्यात हेच मी मानतो.. जातीपाती टिकाव्यात..परंतु त्या फक्त खाण्यापिण्यापुरत्या..

म्हणजे ब्राह्मणाकडे अळूचं फदफदं, डाळिंबी उसळ.. कायस्थाकडे वालाचं बिरडं, कानवले.. एखाद्या बावनकशी शाण्णव कुळी मराठ्याकडे झणझणीत मटण.. एखाद्या कुडाळ देशकराकडे तिरफळं घातलेलं बांगड्याचं कालवण..तर एखाद्या कोळ्याकडे किंवा आगर्‍याकडे त्यांच्या पद्धतीचं मटण किंवा मग सुक्या बांगड्याचं भुजणं..!

बास.. जातीपाती या इतपतच असाव्यात..

असो..

पण गेल्या दोन दिवसात FB वर एकंदरीतच जी काही गरळ वाचायला मिळाली त्याने जरा दु:खी झालो आहे.. अर्थात, मला दोष कुणालाच द्यायचा नाही.. प्रत्येकाची मतं.. आपण फक्त आपल्यापुरतं बोलावं...

-- (जातीने ब्राह्मण, मनाने कोळी) तात्या वेसावकर.. :)

October 30, 2014

अरुणा शानभाग..

चामारी.. एकंदरीत अंबानी रुग्णालय आणि के ई एम च्या रुग्णालयासंबंधीची माझी पोस्ट भन्नाटच चालली म्हणायची..

आत्तापर्यंत जवळपास शेकडो shares आणि whats up वर धुमाकूळ घातलाय या पोस्टने...

असो.. तरीही अगदी पहिल्यांदा ज्याने ही पोस्ट माझं नाव वगळून चोरली त्याला मी धन्यवादच देईन..

कारण एकच की त्या निमित्ताने गेली ३५ वर्ष के ई एम रुग्णालयात खिचपत पडलेल्या, मृत्यूची वाट पाहणार्‍या त्या बिचार्‍या दुर्दैवी अरुणा शानभागची निस्वार्थी परंतु आपुलकीची सेवा-शुश्रुषा के ई एम च्या परिचारिका करत आहेत ही गोष्ट पुन्हा एकदा social media मध्ये फिरली हेही नसे थोडके..

आजवर के ई एम रुग्णालयाच्या आसपास अनेकदा जाऊनही, के ई एम मध्ये ओळख असूनही आणि इच्छा असूनही त्या अरुणा शानभागला बघायला जाण्याचा धीर मला झालेला नाही..!

सोनीवर क्राईम पेट्रोल मध्ये या अरुणा शानभागच्या सत्यकथेवर एक भाग अतिशय संवेदनशीलतेने चित्रित केला होता तो पाहून मात्र मोकळा रडलो होतो..

असो..

-- तात्या अभ्यंकर..

July 11, 2014

आक्कामावशी...

आदरणीय गुरुवर्य भाईकाका...

शिरसाष्टांग नमस्कार....

एक छोटेखानी व्यक्तिचित्रं लिहायचा प्रयत्न केलाय तेवढा गोड मानून घ्या.. माझ्या गणगोतातली आक्कामावशी..!

तिचं हे व्यक्तिचित्रं तुम्हाला समर्पित...

--------------------------------------------------

आक्कामावशी दारावर यायची.. आम्ही तिला आक्कामावशी म्हणायचो.. एका मोठ्या टोपलीत नाना प्रकारची शेव, फरसाण, मस्का खारी आणि नानकटाई असं घेऊन आक्कामावशी यायची आणि दारोदार विकायची.. तिच्या त्या टोपलीतच दोन तव्यांचा तराजूही असे..

तुम्ही काय शेव, फरसाण घ्याल ते वजन करून कागदातच बांधून द्यायची.. सोबत तो लाँड्रीमध्ये असतो तसा दोर्‍याचा एक मोठा गुंडा असे.. प्लॅस्टिकच्या पिशव्या नाहीत की स्टॅपलर नाही..! :)

"शेव देऊ का रे..? खाऊन तर बघ..."

"आजची भावनगरी.. एकदम मस्त.. खाऊन तर बघ.."

"अरे नानकटाई देऊ का..? एकदम ताजी आहे.. तोंडात विरघळेल.."

आक्कामावशीचं मार्केटिंग मस्त असायचं.. सोबत प्रत्येक गोष्टीचं आमच्या हातावर सँपल ठेवायची.. :)

"अगं आक्कामावशी.. आता कशी काय आलीस तू..? बघतेस ना.. दफ्तर भरतोय..."

आकाशवाणी मुंबई ब वर कामगार विश्व संपलेलं असायचं आणि नंदूरबारचे वगैरे बाजारभाव सांगत असायचे.. आमची पांढरा शर्ट आणि खाकी हाफ पॅन्ट चढवून झालेली असायची.. दफ्तर भरायचा कार्यक्रम सुरू असायचा..

"अरे ते पलीकडचे जोशी आहेत ना.. त्यांच्या घरी रेडियोवर 'तुझे गीत गाण्यासाठी..' हे गाणं लागलं होतं.. तेवढी ऐकत बसले बघ.. म्हणून उशीर झाला.."

आक्कामावशी मनमोकळेपणाने उशीर होण्याचं कारण सांगायची..

आमचं घर काय, जोश्यांचं काय, भडसावळ्यांचं काय.. आक्कामावशीचा सर्वत्र हक्काचा राबता होता...

"आज शाळेत डबा काय नेतो आहेस रे..?"

"अगं मावशी.. आज फोडणीची पोळी आहे.."

हे ऐकल्यावर आक्कामावशीने लगेच मूठभर शेव कागदात बांधून दिली..

"दुपारी डबा खाताना तुझ्या त्या फोडणीच्या पोळीवर ही शेव घाल.. छान लागेल.." असं म्हणून छानशी हसलेली आक्कामावशी मला आजही जशीच्या तशी आठवते...!

असाच एक दिवस.. आज आक्कामावशीच्या डोक्यावरच्या त्या टोपलीसोबत हातात एक दुधाची बरणीही होती..

"आई आहे का रे घरात..? उत्तम चीक आणलाय बघ.. खरवस करून खा.."

मध्येच केव्हातरी आक्कामावशी उत्तम प्रतीचा चीक आणायची.. मग काय आमची मजाच मजा.. छान वेलची, जायफ़ळ वगैरे घातलेला गुळाचा उत्तम खरवस खायला मिळायचा.. :)

"मेल्या खरवस खाऊन वर लगेच भसाभसा पा़णी नको पिऊस हो.. नाहीतर मारशील रेघा... हा हा हा.."

मनमुराद, निष्पाप हसायची आक्कामावशी..!

असाच एक दिवस.. बाहेर गडबड ऐकू आली म्हणून डोकावलो तर शेजारच्या भडसावळ्यांना फीट आली होती.. नेमकी तेव्हाच आकामावशीही आली होती.. भडसावळे जमिनीवर आडवे पडून थरथरत होते...

आक्कामावशीने ताबडतोब प्रसंगाचा ताबा घेतला...

"धाव जा पहिला आणि कंगवा घेऊन ये.."

"स्मिता..कांदा आण एक फोडून पटकन..!"

आक्कामावशी आम्हा सगळ्यांना हक्काने आदेश देऊ लागली..  लगेच तिने भडसावळळ्यांचा तोंडात कंगवा घातला.. फोडलेला कांदा नाकाशी धरला.. हातपाय रगडले.. डॉक्टर येईस्तोवर आक्कामावशीच आमची MD FRCS होती...!

कोण होती हो आक्कामावशी..? कुठली होती..?

माहीत नाही...!

कुलकर्ण्यांच्या मुलाच्या लग्नात आक्कामावशी आली होती.. कुलकर्ण्यांनी तिला खास आमंत्रण दिलं होतं..!

मधोमध किंचित सुदृढ आक्कामावशी आणि वरवधू यांचा एक फोटोही काढल्याचं आठवतंय मला..!

आमची पंगत बसली होती.. बघतो तर श्रीखंडाचं पातेलं घेऊन आक्कामावशी येत होती आग्रह करायला..!

माझ्या पानात चांगलं भरभक्कम श्रीखंड वाढत म्हणाली...

"अरे घे मेल्या.. संपवशील आरामात.. लाजतोस काय..?"

दारावर येणारी, शेव फरसाण विकणारी आक्कामावशी..

भडसावळ्यांच्या फीटवर उपचार करणारी आक्कामावशी...

जोश्यांच्या घरी घटकाभर बसून 'तुझे गीत गाण्यासाठी..' ऐकणारी आक्कामावशी...

माझ्या फोडणीच्या पोळीवर मूठभर शेव बांधून देणारी आक्कामावशी...

कुलकर्ण्यांच्या मुलाच्या लग्नात घरचं कार्य समजून श्रीखंडाचा आग्रह करणारी आक्कामावशी...!

पण काय गंमत असते पाहा.. आक्कामावशी दारावर यायची तेवढीच तिची आठवण असायची.. ती केव्हापासून येत नाहीशी झाली हे कळलंच नाही...!

आता आक्कामावशी कुठे असेल हो..?

असेल की नसेल..?..!

आक्कामावशी.. ये की गं फरसाण घेऊन..

आक्कामावशी.. लवकर ये.. तुला बाबूजींची 'तुझे गीत गाण्यासाठी..', स्वर आले दुरुनी..' अशी म्हणशील ती गाणी ऐकवतो..

काय गं आक्कामावशी.. आकाशवाणी मुंबई ब चा कामगार विश्व कार्यक्रम, ते नंदूरबारचे बाजारभाव...यांच्यासोबत काळाच्या ओघात तूही कुठे नाहीशी तर झाली नाहीस ना..??.

आक्कामावशी.. आज फोडणीची पोळी केल्ये.. थोडी शेव हवी होती गं...!

-- तात्या अभ्यंकर..

June 30, 2014

घनःशाम सुंदरा श्रीधरा..

घनःशाम सुंदरा श्रीधरा..

हे गाणं किती सुरेख आणि सात्त्विक आहे हे मी आजपर्यंत अनेकदा शब्दात मांडायचा प्रयत्न केला..परंतु प्रत्येक वेळा लिहिलेले कागद चुरगाळून टाकले..संपूर्ण लिहायला कधी जमलंच नाही..!

काय शब्द योजावेत, होनाजींच्या काव्यावर लिहावं, की वसंतराव देसाईंच्या चालीवर लिहावं? गायकीवर लिहावं, की दीदी आणि पंडितराव नगरकर यांच्या सुरांवर लिहावं..? त्यातल्या भूपावर आणि किंचितश्या देसकारावर लिहावं..की त्या गाण्यात असलेल्या कमालीच्या प्रसन्नपणावर लिहावं..?. काही समजतच नाही...!

आजपर्यंत मी देवमाणूस हा शब्द ऐकला आहे.. त्याच शब्दाचा आधार घेऊन मी पंडितराव नगरकरांच्या गळ्याला देवगळा असं म्हणेन..या माणसाच्या गळ्यात जगातली सगळी सगळी सात्त्विकता भरून राहिली होती हो..!

जाता जाता एकच म्हणावंसं वाटतं.. की साक्षात श्रीकृष्णाने सरस्वतीच्या अंगणात छान सडासंमार्जन करून सुरालयीची घातलेली सुरेख रांगोळी म्हणजे हे गाणं..!

-- तात्या अभ्यंकर..

June 28, 2014

बिती ना बिताई..

आयुर्विमा महामंडळाच्या एका बड्या साहेबांनी आज मला त्यांची गाडी आणि चालक दिला..

"तात्या.. जा.. आज गाडी तुझी..!"

ठाण्याहून गाडी घेऊन थेट निघालो तो डायरेक्ट पंचमदांचा घरासमोर..!

स्वस्थपणे ५-१० मिनिटं एकटाच उभा होतो त्यांच्या घरासमोर.. 

जिंदगी के सफर में
मुसाफिर हु यारो..
कुछ तो लोग कहेंगे
रैना बिती जाए
बिती ना बिताई रैना
इस मोड से जाते है..

कित्येक गाणी रुंजी घालू लागली कानात.. 

तिथून निघालो तो थेट जुहू किनार्‍यावरील किशोरदांच्या घरापाशी..!

कारण किशोरदा, पंचम, गुलजार... हे सगळे एकच आहेत..यांचा आत्मा एकच आहे..शरीरं वेगवेगळी आहेत..! 

मला माहीत नाही..कुठल्या जन्मीचे ऋणानुबंध हे...!

ही मंडळी तुम्हा-आम्हाला किती आनंद देऊन गेली... आपण वर्षातून एकदा ५ मिनिटं पण त्यांच्याकरता काढू नयेत..?..!

किशोरदांच्या घरासमोरच्या समुद्राच्या पुळणीवर एकटाच उभा होतो ५ मिनिटं...

समोर अंधारलेला समुद्र... त्याची गाज.. पाऊस नाही... वातावरण कोंडलेलं.. खूप घुसमटलेलं..!

पाऊस पडायला हवा जोरदार.. मुसमुसून..हमसूनहमसून.. छान..मोकळा.. धुवाधार...!

पंचमदा, किशोरदा...बाबूजी..भीमण्णा... सगळे सगळे खूप अस्वस्थ करतात मला.. ही माणसं मला भरपूर छान कोवळं ऊन देऊन गेली.. शीतलछाया देऊन गेली...मनमुराद पाऊस देऊन गेली...

तरीही पुन्हा पुन्हा तृषार्त वाटतं.. छे..! खूप पाऊस पडायला हवा आहे... वातावरण मोकळं हवं आहे.. कुणाच्यातरी खांद्यावर डोकं ठेऊन मनसोक्त रडायचं आहे मला.. त्यानंतरचा मोकळेपणा हवा आहे मला.. त्या रडण्यातलं समाधान हवं आहे मला..!

"वो गोलिया क्या खतम हो गई..?"

परिचय या चित्रपटात डॉक्टरांच्या या प्रश्नावर हरिभाई उत्तरतो..

"सासे खतम हुई..!"

परतीच्या वाटेवर होतो.. कानात 'बिती ना बिताई..' सुरू होतं..!

-- तात्या अभ्यंकर..

June 15, 2014

पुरिया...

पुरिया रागाचा स्वभाव आणि आमच्या भीमण्णांचा स्वभाव यात नेहमीच मला एक साम्य दिसत आलेलं आहे..

धीरगंभीर, टक्केटोणपे खाल्लेला, अनुभवी असा एक बुजुर्ग पुरिया..

जो मूलत: अबोल आहे.. सततचं फक्त आत्मचिंतन.. आणि त्यायोगे स्वत:मधल्या आत्मिक शक्तिचा सतत विकास..!

पुरिया.. एक तेजस्वी योगी.. जो चाललाय आपल्याच वाटेने.. आपलीच वाट शोधत...

चेहेर्‍यावर एक आश्वासक परंतु घनगंभीर भाव.. एक निर्भयता...

उगीच कुठे हॅ हॅ नाही.. की हू हू नाही..

काही गहन प्रश्न विचारावा.. आणि अगदी मोजक्याच शब्दात परफेक्ट उत्तर यावं असा पुरिया.. उगीच कुठे भारंभार चर्चा नाहीत की परिसंवाद नाहीत...!

अण्णाच एकदा म्हणाले होते,

मी आणि माझं संगीत.. आम्ही प्रवासी आहोत.. अनोळखी वाटेवरचे..! आकाशाची उंची, सागराची खोली उगाच कशाला तपासून पाहा..?

अण्णा.. आणि अण्णांचा पुरिया...!

एक अद्वैत..!

अण्णा.. आणि अण्णांचा पुरिया...!

माझ्या आयुष्यातला एक अनमोल ठेवा..

सावल्या लांबतील... तिन्ही सांजा होतील... तंबोरे लागतील... आणि कोमल रिखबाला अगदी हलका स्पर्श करून अण्णा शुद्ध निषादावर कृपा करतील आणि त्याच्यावर विसावतील..

ज्यावरून तानपुर्‍यातला निषाद जुळवावा.. असा तेजस्वी निषाद..!

आणि पुरियाची व्रतस्थ वाट सुरू होईल...!

-- तात्या अभ्यंकर..

May 13, 2014

मंदिरात अंतरात...

"तात्या, आहेस का रे? तुला रीतसर आवतान देतो गाण्याचं.. पोर आज जायची आहे रे अमेरिकेला.."

आत्ता संध्याकाळी बाळासाहेब शिंगोटेंचा फोन.. बाळासाहेब शिंगोटे म्हणजे आमच्या कोपरी गावातलं एक बडं प्रस्थ..

"बाळासाहेब, मी येईन पण आत्ता? अहो आधी तरी सांगायचंत.. मला दोन पेग लावल्याशिवाय गाता येत नाही.."

"अरे तू ये रे..पटकन मार कुठेतरी आणि ये.. मला बील दे.."

मग मी तिथे कोपरीतल्याच एका बार मध्ये एक बॅगपायपर क्वार्टर मारली आणि कोपरी गावातल्या बाळासाहेबांच्या घरी हजर झालो...

तिथे कुणी हौशी तबला-पेटीवाले होतेच..बाळासाहेबांच्या घरचीच पाच-पंचवीस मंडळी होती.. मग मी बैठक मारली.. बाबूजी, अण्णांचं स्मरण केलं आणि,

"मंदिरात अंतरात तोच नांदत आहे..नाना देहि, नाना रुपी तुझा देव आहे.."

आणि,

"टाळ बोले चिपळीला.."

हे दोन अभंग मस्त रंगवून, ताना वगैरे घेऊन म्हटले.. पब्लिक सालं खुश..! :)

जास्त वेळ गायचंच नव्हतं.. कारण बाळासाहेबांची एकुलती एक लेक आणि जावई आज रात्री उशिराच्या विमानाने अमेरीकेला जायचे आहेत.. आमच्या हौशी-हळव्या बाळासाहेबांनी लेकीचा send off ठेवला होता..तात्याचं गाणं ठेवलं होतं..!.

"बाळासाहेब.. येतो मी..तुमचं चालू द्या.."

"अरे असं कसं तात्या.. दोन घास खाऊन जा.."

गरमगरम पावभाजी आणि आंबा-आइसक्रीम चा बेत होता..

त्यानंतर मला बाळासाहेबांनी आतल्या खोलीत बोलावला.. क्वार्टरचे दोनशे रुपये आणि १००१ रुपये बिदागी माझ्या हातावर ठेवली.. आम्ही खोलीच्या बाहेर आलो...

"सुमन..तात्या निघाले.. पाया पड.."

बाळासाहेबांच्या डोळ्यात पाणी.. मुलीचा बाप हो.. फारच हळवा..

मग सुमन आणि जावई माझ्या पाया पडले..

"सुखी राहा.. खूप खूप यशस्वी व्हा.."

"भटाचा आशीर्वाद आहे गं सुमन.. " - बाळासाहेबांच्या डोळ्यात पुन्हा पाणी.. माझ्याही डोळ्याच्या कडा ओलावलेल्या..!

सासरी गेलेल्या.. आणि आता परदेशी चाललेल्या एकुलती एक मुलीबद्दलची माया, ओढ.. कशात मोजायची..?

बाळासाहेबांच्या डोळ्यातला एक एक अश्रू अनमोल होता..!

-- तात्या अभ्यंकर..

April 20, 2014

कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे...

कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे
आम्हासि का दिली वांगली रे...

येथे ऐका - http://www.youtube.com/watch?v=Nc16cBewztM

शरीररुपी वस्त्र.. कबीर याला चादर म्हणतात.. तर माउली या करता घोंगडी हा लोभसवाणा शब्द वापरतात..

जसं आपण एखाद्या घोंगडीने आपल्या शरीराला झाकतो.. तसं आपलं शरीर ही देखील एक घोंगडीच आहे जी आपल्या आत्म्याला झाकते.. 

ते त्यांच्या कान्होबाला, विठुरायाला विचारत आहेत की अरे विठुराया.. हे जे आमचं शरीर आहे.. ते सर्व व्याधीविकारांनी ग्रस्त आहे.. अरे तू आम्हाला तुझ्यासारखी घोंगडी का नाही दिलीस?.. आम्हाला का वांगली घोंगडी दिलीस? आमचं घोंगडं तुझ्यासारखं का नाही रे..?

स्व-गत सच्चितानंदे मिळोनि
शुद्ध सत्व गुणे विणली रे..

स्व- गत, सोहम.. ब्रह्म, सच्चितानंद.. किंवा आपण ज्याला आत्मानंद म्हणतो अशांनी मिळून, तुझी चादर ही शुद्ध, सात्विक गुणांनिशी विणलेली आहे.. !

षड्गुण गोंडे रत्नजडित तुज
श्यामसुंदरा शोभली रे..

आणि म्हणूनच हे विठोबा.. तुझी ही चादर रत्नजडीत आहे.. षट्गुण हीच्या त्या चादरीची रत्न आहेत, तिचे गोंडे आहेत आणि अशी चादर तुला शोभून दिसते.. कुठली आहेत ही सहा रत्न..? ज्ञान, ऐश्वर्य, बल, स्फूर्ती, वीरता, आणि तेज..!

षड-विकार, षड-वैरी मिळोनि
तापत्रयाने विणली रे..

आणि आम्हाला तू जी घोंगडी दिली आहेस ती कशी आहे रे? ती षड-विकार, षड-वैरी, आणि तापत्रयाने विणलेली आहे.. 

कुठले षडविकार?  अस्तित्व, जन्म, वाढ, तारुण्यावस्था वा प्रौढावस्था, क्षय किंवा जर्जरता आणि मृत्यू..!

कुठले षड-वैरी..? काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आणि लोभ..!

आणि कुठले तीन ताप किंवा तापत्रय? आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक किंवा आधि-आत्मिक..

बघ कान्होबा.. कशी घोंगडी तू आम्हाला दिली आहेस.. हिला 'वांगली' नाही म्हणायचं तर दुसरं काय म्हणायचं? 

नवा ठायी फाटुनि गेली
ती त्वा आम्हासि दिधली रे..

अशी ठिकठिकाणी फाटलेली घोंगडी तू आम्हाला का दिलीस? अशी घोंगडी कशी पुरी पडणार आमच्या आत्म्याकरता? अशा घोंगडीमुळे आत्मशुद्धी मिळेल का.?

ऋषि मुनी ध्याता मुखि नाम गाता
संदेह वृत्ती नुरली रे...

मोठमोठे संतसज्जन, ऋषिमुनी जेव्हा तुझी ध्यानधारणा करतात.. तुझं नाम गातात.. तेव्हा खरंच रे कान्होबा असं वाटतं की तू आणि मी एकच आहोत..

अखेर तो नाम-महिमाच असा आहे की तू माझ्यात आहेस आणि मी तुझ्यात आहे या अद्वैताची खात्री पटते. कुठलाही संदेह रहात नाही..

संदेह वृत्ती नुरली रे...!

माउलीची शब्दयोजना काय अप्रतिम आहे पाहा..!

बाप-रखुमा देवीवरु विठ्ठलु
त्वत् पदी वृत्ति मुरली रे..

हे विठोबा, रखुमाईच्या वरा.. तुझ्या चरणी, तुझ्या पदी माझी सारी वृत्ती मुरली आहे, मी तिला तुझ्या पदी अर्पण केली आहे..!

देवा रे माझ्या..ज्ञानबामाउलीचं हे फक्त एक काव्य हाच मुळी डॉक्टरेटचा विषय आहे.. अजून सबंध ज्ञानेश्वरी तर दूरच राहिली..! :)

संदेह वृत्ती नुरली रे
त्वत पदी वृत्ती मुरली रे..

याला काव्य म्हणतात..!!!! 



मंडळी, ज्ञानोबांच्या ह्या ओळींचं मी माझ्या पात्रतेनुसार हे थोडंफार तुच्छ विवेचन केलं आहे..माउलीचं काव्य हे सार्‍या ब्रह्मांडाला व्यापून आहे.. कुणाकुणाला त्याचा कसा अर्थ लागेल, ते त्याचं याहूनही कितीतरी पटीने अधिक रसाळ विवेचन करू शकतील याची मला नम्र जाणीव आहे.. कारण मुळातच माउलीच्या काव्याबद्दल काही लिहिताना आपल्यातला "मी" हा बाजूला ठेवायला लागतो.. तरच दोन शब्द लिहिणं जमू शकतं..!

आणि अण्णांची गायकी..? मी काय बोलू? अहो साक्षात माउलींचाच आशीर्वाद असल्यशिवाय अशी गायकी येणार नाही.. स्वयंभू साक्षात्कारी, अधिक गुरुकडील विद्या, अधिक नारायणराव बालगंधर्वांचे संस्कार..!

षड-विकार षड-वैरी मिळोनि.. - यातला थोडा ललत बघा, किंवा नंतर पंचमासहितचा थोडा ललत-भटियार बघा..

किंवा नंतर याच शब्दांना अण्णांनी अचानक जोगियामध्ये कसं विणलं आहे ते बघा.. अण्णांच्या कोमलधैवतातलं दैवी समर्पण बघा.. 

काय बोलावं.. ? !

बाप-रखुमा देवीवरु विठ्ठलु.. या शब्दातली मध्यमाची गायकी पाहा.. अण्णांनी अचानक यमनमध्ये जाऊन कसं सुखावलं आहे ते पाहा.. काय बोलावं आणि लिहावं तरी काय..!

माझं भाग्य की अण्णांची अभंगवाणी खूपदा ऐकायला मिळाली.. अगदी चार चार-पाच पाच तास अण्णा गायचे..आणि दोन अभंगांच्यामध्ये कविवर्य वसंत बापट सरांचं रसाळ निरुपण.. श्रोत्यांना प्रश्न पडायचा की अण्णांचं गाणं ऐकावं की बापटसरांचं निरुपण ऐकावं...!

अण्णा जेव्हा विठ्ठलाला 'बाप रखुमा देवी वरु विठ्ठलु..' असं म्हणून साद घालायचे तेव्हा तो सावळा आपली घोंगडी आणि काठी घेऊन त्या सभागृहातच कुठेतरी ऐकत बसलेला असायचा..!

-- तात्या अभ्यंकर..

January 18, 2014

दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनात..?

भाईकाकांचा गजा खोत हा हार्मोनियमवर 'उगीच का कांता..' हे पद वाजवायचा प्रयत्न करतो आणि त्या नादात 'उगीच..' या शब्दातील उ गी च ही अक्षरं हार्मोनियमच्या बटणांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो.. :)

वास्तविक कुठलीही अक्षरं ही त्या त्या स्वरांमध्येच वाजतात आणि स्वर तर फक्त सातच आहेत हे आपल्याला माहीत आहे.. सारेगमपधनीसां.. या ७ स्वरातला हा सारा खेळ आहे..

परंतु गाण्याचा अभ्यास करताना मला हे जाणवलं की क्वचित काही योग असेही येतात जेव्हा काव्यातलं एखादं अक्षर हे नेमकं सारेगमपधनीसां या स्वरात बसतं आणि तेव्हा तो माझ्या मते 'सोने पे सुहागा..' असा योग असतो..

सांगतो कसं ते.

गीत रामायणतल्या 'पराधीन आहे जगती..' या अजरामर गाण्यामधल्या एका कडव्यातल्या ओळी आहेत..

जरा मरण यातून सुटला कोण प्राणिजात
दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनात..?

आता गंमत बघा.. की 'दु:खमुक्त जगला का रे..' या ओळीतल्या 'रे' या अक्षरावर नेमका शुद्ध रिषभ पडला आहे.. शुद्ध रिषभ म्हणजे 'सारेगमपधनीसां..' मधला रे..!

म्हणजे मूळ काव्यातलं अक्षरही 'रे' आणि त्याचा स्वरही 'रे' च..!

आणि रे या अक्षरावर असलेला रे हा स्वर मला विलक्षण आकर्षित करतो, खूप काही सांगून जातो..!

कुणाकडे मयत झालं तर आपण काय करतो..? त्या घरातल्या लहान-थोरांची,

'काय इलाज आहे सांगा पाहू? जन्माला आलेला प्रत्येक जण जाणारच आहे की नाही? तुम्ही असा धीर सोडू नका.. होईल सगळं काही ठीक.. आम्ही आहोत ना तुमच्यासोबत.."

असं काहितरी म्हणून आपण त्या कुटुंबियांचं सांत्वन करतोच की नाही?

नेमकं तेच सांत्वन इथे श्रीराम भरताचं करताहेत.. त्याची समजूत काढताहेत.. आणि ती समजूत काढताना ते म्हणताहेत..

"दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनात..?"

आणि या ओळीतलं ते 'रे' हे अक्षर आणि त्यावरचा 'रे' हा स्वर.. मला खूप खूप इंटिमेन्ट वाटतो.. भावनेच्या खूप जवळ घेऊन जातो..

काय सांगतो तो रे हा स्वर..?

हेच की श्रीराम खूप म्हणजे खूप प्रगल्भ विचारांचे आहेत.. ते भरताच्या पाठीवरून हात फिरवून त्याची समजूत काढत आहेत, त्याला धीर देत आहेत..

"दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनात..?..!'

मंडळी, म्हणूनच असं नेहमी म्हटलं जातं की गाणं ही अनुभवायची गोष्ट आहे..

काल मी कुसुमाग्रजांच्या 'सरणार कधी रण..' या गाण्याबद्दल दोन ओळी लिहिल्या होत्या.. आज पुन्हा 'पराधीन आहे जगती..' याबद्दल दोन ओळी लिहिल्या..

मी आजतागायत गाणं आणि खास करून गीतरामायण या विषयावर भरपूर डोकेफोड केली आहे, सततचं चिंतन-मनन केलं आहे आणि त्यातूनच क्वचित असे काही माणिक-मोती हाती लागतात. सतत त्या प्रशांत महासागरात न कंटळता श्रद्धेने डुबक्या मारत रहायचं हेच आपलं काम..!

माझ्या मते 'सरणार कधी रण..' किंवा 'पराधीन आहे जगती..' ही केवळ गाणी नाहीत, तर हे संदर्भ ग्रंथ आहेत.. सर्जनशील, सृजनशील आयुष्याच्या ह्या पोथ्या आहेत.. यांना एखाद्या धर्मग्रंथाइतकं मोल आहे..!

-- (बाबूजींचा शिष्य) तात्या अभ्यंकर.

January 05, 2014

लय म्हणजे काय हो? :)

तात्याचं गाणं.. या कार्यक्रमातील तात्यांचे लय-ताल विषयक अगदी साधेसोपे विचार..

गाण्यातली लय म्हणजे काय?

मुळात लय म्हणजे काय?

ढोबळ मानाने सांगायचं तर लय म्हणजे एक ठराविक गती. घड्याळाची टिकटिक, नाडीचे ठोके..

एखाद्या निरांजनातली ज्योत शांतपणे तेवत असते तेव्हा तिच्यातही एक लय असतेच की.. एक शांत, सुंदर लय..!

मुळात लय म्हणजे सजीवता, लय म्हणजे जिवंतपणा.. परंतु गती मात्र ठराविक..

तुम्ही तळ मजल्याला उभे असता तेव्हा तुमच्या नाडीचे ठोके ७२ असतात. आता धावत तीन जिने चढा पाहू.. लगेच लय बदलते..! :)

"अहो बातमी ऐकून काळजाचा ठोकाच चुकला हो.." असं आपण म्हणतो ना..तेव्हा चुकलेली असते ती लयच..!

रोजच्या व्यवहारात तर लयीची किंवा लयबद्धतेची अनेक उदाहरणं देता येतील. मग एखाद्या राजधानी एक्स्प्रेसने आता दोन तास कुठल्याच स्थानकात थांबा नाही म्हणून झकासपैकी पकडलेला स्पीड असो. तो स्पीडसुद्ध छान लयदार असतो.. गाडीचा वेग, चाकं आणि रूळ यांचं आपसात एक छान लयदार नातं जमतं.. किंवा मग अत्यंत मोहक अशी घोड्यांच्या टापांची लय असो.. मग हीच लय ओ पी नैय्यरसारख्या एखाद्या प्रतिभावंताला आकर्षित करते आणि तो 'मांग के साथ तुम्हारा, मैने मांग लिया संसार..' हे रफी-आशाचं एक सुरेख गाणं बांघून जातो..!

एवढंच कशाला.. एखादा हलवाई चुलीवर मोठी कढई ठेवून रबडी करण्याकरता म्हणून दूध आटवत असतो.. तुम्ही बघा..मोठ्या झार्‍याने कढईतलं ते दूध तो ढवळत असतो त्याला देखील एक छान लय असते.. ती लय बिघडली तर सबंध रबडीच बिघडेल ना..! :)

एखादा राजबिंडा गरूड अवघे दोन-चार पंख लयीत फडकवतो आणि उंच आभाळी जातो.. ह्याला लयीचं एक छान इग्निशन नाही म्हणायचं तर दुसरं काय म्हणायचं..?

लय बदलणं किंवा लय बिघडणं हे फारसं चांगलं नव्हे.. गाण्यात तर नव्हेच नव्हे..!

आता गाण्यातली लय म्हणजे काय हो?

स्वर, लय आणि ताल ही कोणत्याही गाण्यातली दत्तमूर्ती.. पण मुळात स्वर आणि लय हे वेगळे नाहीतच, असूच शकत नाहीत.. लयीला स्वरापासून किंवा स्वराला लयीपासून वेगळं काढता येतच नाही.. मग तुम्ही एखाद्या सेकंदापुरता षड्जाचा उच्चार करा.. किंवा चांगलं मिनिटभर षड्ज लावून ठेवा.. लय त्याच्या अंगभूतच असते.. राहता राहिला ताल.. तर तो त्या लयीचं एक मीटर ठरवतो.. तो त्या लयीला एक बंधन घालतो..जणू तो लयीला म्हणतो,

"बाई गं.. हा चार मात्रांचा केरवा.. लक्ष ठेव आणि पटकन परत ये.. बाई गं हा सात मात्रांचा रुपक बरं का.. लक्ष ठेव जरा.. बाई गं हा बारा मात्रांचा विलंबित एकताल किंवा १६ मात्रांचा विलंबित त्रिताल.. ये जरा निवांतपणे फिरून..!" :)

असो..

लयीचे आघात, लयीचे पॉज या विषयी पुन्हा केव्हातरी..

गाण्यातले स्वर, ताल किंवा शब्द हे आपल्याला ऐकू येतात.. त्यामुळे ते तसे सगुण म्हटले पाहिजेत.. परंतु लय ही अदृष्य असते, निर्गुण असते.. तिचा शोध म्हणजे अनंताचा शोध.. आणि या अनंताच्या शोधाकरताच गाण्याची अखंड साधना करावी लागते.. एरवी गाणं हा प्रकार खूपच सोप्पा आहे..! :)

असो..

सदरच्या लयविषयक दोन ओळी भीमण्णा, बाबूजी, पुलं आणि कुसुमाग्रज यांना समर्पित..!

-- (संगीताचा विद्यार्थी) तात्या.