December 31, 2007

सालस...

नमस्कार मंडळी,
ही एक जुनी हकिगत आहे. आत्ता केबलवर "त्रिदेव" नावाचा हिंदी चित्रपट लागला होता, तो जरा बघत बसलो होतो. पण त्यामुळे माझ्या काही पूर्वस्मृती जाग्या झाल्या. म्हटलं, त्या तुमच्याबरोबर share कराव्या.

१९८७-८८ सालचा सुमार असेल. आम्ही मित्रमंडळी कॉलेजचे रमणीय दिवस फारसा अभ्यास-बिभ्यास न करता फार मजेत व्यतीत करत होतो. मस्तपैकी रोज सकाळी कॉलेजांत टाईमपास करायचा, जोक्स सांगायचे, गाणी म्हणायची आणि धमाल करायची. त्यांत मी म्हणजे काय, एकदम फेमस! "तात्या जरा म्हण रे गाणी" असं कोणी म्हटलं की मी लगेच त्या हरबऱ्याच्या झाडावर चढायचो आणि गायचो. मग काय, सगळ्या मुलामुलींचा घोळका साला आपल्याभोवती!! मग काय विचारता, कँटीनमध्येच रोज एक छोटीशी मैफलच रंगायची. एहेसान तेरा होगा, अभी ना जाओ छोडकर, दिवाना हुआ बादल, हम प्यार मे जलनेवालोको वगैरे गाण्यांच्या फैरी झडायच्या.

तसा मी यथातथाच गायचो. पण च्यामारी मैफल मारून नेण्यांत आपण पटाईत! अहो, चांगल्या चांगल्या, छान छान दिसणाऱ्या मुलीसुध्दा कौतुकानं कम प्रेमानं म्हणायच्या, "कोण तात्या ना, क्या बात है, छानच गातो!" साला आपण खुष!!
वर्गांत कमीच बसायचो. सदैव कँटीन मध्येच पडलेला असायचो. आमचा कँटीनवाला बबल्या शिंदे सामोसे फक्कड करायचा. तोही माझा भक्त कम दोस्त होता. आमच्याच वयाचा बबल्या खरंच खूप छान मुलगा होता. मिष्कील होता. त्याला syjc मधली वैशाली जोगळेकर फार आवडायची. तसं त्यानं एकदा मला हळूच सांगीतलंही होतं. "च्यामारी तात्या, काय नशीब बघ माझं! साला कँटीनवाल्या पोऱ्याला कोण पोरगी पटणांर?, जाऊ दे" असं म्हणायचा!! पण कधी कधी वैशाली कँटीनमध्ये आलेली असायची तेव्हा बबल्या सामोसे जरा जास्तंच खरपूस आणि अधिक प्रमाने तळायचा! मध्येच माझ्या सुरू असलेल्या मैफलीत डोकावायचा, आणि तात्या, "चैनसे हमको कभी, आपने जिने ना दिया" हे गाणं म्हण, एक सामोसा फ्री देईन अशी ऑफरही द्यायचा!

एकूण काय, सगळी धमाल चालायची. गायचो-बियचो बरा, त्याच्या जोडीला बोलबच्चनगीरी, त्यामुळे काही मुलीं सुध्दा आमच्या गोटांत सामील झाल्या होता. त्याही आमच्या बरोबर खुप मजा करायच्या. मी त्या सगळ्या ग्रुपचा म्होरक्या!! अगदी "तात्या म्हणेल तसं" इतपत मी माझं प्रस्थं माजवलं होतं! असो. (गेले ते दिवस आता. हल्ली गेले ते दीन गेले हे गाणं खरंच फारच सुरेख म्हणतो मी! वेदनेतून गाणं जन्माला येतं म्हणतांत ना, ते असं!!)

संध्याकाळी पुन्हा सगळेजण (फक्त मुलंच) न चुकता ठरलेल्या नाक्यावर हजर! आमच्या ठाण्याच्या गोखले रोडला संध्याकाळी फार सुंदर हिरवळ असायची. (आजही आहे, पण हल्ली मुली मला "काका, जरा वाजले किती ते सांगता?" असं विचारतांत!, असो.) नाक्यावर उभं राहून आमची भरपूर थट्टा-मस्करी चालायची. शिवाय आमच्यातला प्रत्येकजण आपापला सभ्यपणा जपत, लाईनी मारत असे. ते वयच तसं होतं. एक मात्र खरं, की आमच्यापैकी कधी कोणी असभ्यपणा केला नाही. येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींवर फालतू कॉमेंटस् पास करणे, आचकट विचकट हावभाव करणे असले प्रकार आम्ही कधीच केले नाहीत. पण हळूच एखादीकडे बघणे, लाईन मारणे इतपतच आमची पापभिरू हिरोगिरी चालायची! त्यातच मजा असायची.

रोज संध्याकाळी सात-सव्वासातच्या सुमाराला त्या रस्त्यावरून एक मुलगी जायची. रोजचा क्लासबीस संपवुन जात असेल घरी. तुम्हांला खरं सांगतो मंडळी, मला ती मुलगी अतिशय आवडायची! तशी ती दिसायला फार सुरेख वगैरे नव्हती पण एकंदरीत फारच आकर्षक व्यक्तिमत्व होतं तीचं. आपण तर बाबा मरायचो तिच्यावर. अत्यंत सालस दिसायची. पण तीचं तर नांवही आम्हाला माहीती नव्हतं, पण सालस दिसायची म्हणून तिचं नांवही आम्ही "सालस" हेच ठेवलं. ती येतांना दिसली की सगळे म्हणायचे, "अरे तात्या, लेका तुझी सालस येत्ये बघ!". "तात्या, तुझी सालस!" झालं, मी लगेच लाजेने चूरचूर व्हायचो! मग मी हळूच तिच्याकडे बघायचो. मंडळी, काय सागू तुम्हांला. खल्लास दिसायची हो ती! आहाहा, आत्ता हा लेख लिहितांना सुध्दा डोळ्यात पाणी आलं बघा!! दिवसभरच्या व्यापातून(?) संध्याकाळी एकदा का सालसचं दर्शन झालं की धन्य वाटायचं. एव्हढं होईपर्यंत ७.३०-७.४५ वाजलेले असायचे. सिगरेटचे झुरके आणि कटिंग मारून आम्हा मित्रांची पांगापांग व्हायची. मीदेखील सालसच्या आणि माझ्या सुखी संसाराची स्वप्नं रंगवत रंगवत घरच्या वाटेला लागायचो!!

असा रोजचा दिनक्रम सुरू होता. दिवस फार मजेत चालले होते. दिवसेंदिवस मी सालसच्या अधिकच प्रेमांत पडत चाललो होतो. सालस ही जगातली सर्वांत देखणी, सर्वांत आकर्षक, सर्वांत गुणी मुलगी वाटायची मला. पण सालसला त्याचा पत्ताच नव्हता!

अशीच एक छानशी संध्याकाळ. मस्तपैकी आमचा अड्डा जमला होता. सालस यायची वेळ झालेलीच होती. च्यामारी जी मुलगी आपल्याला एवढी आवडते, तिच्याशी आपली साधी ओळखदेखील नसावी, याचं मला राहून राहून वाईट वाटत होतं. एरवी मी अनेकींना माझ्या झुरणाऱ्या मित्रांबद्दल बिनधास्त अगदी भर रस्त्यात गाठून, कुठूनतरी ओळख काढून विचारलं होतं. पण सालसशी कसं बोलायचं? अरे यार, वो तो लाखोमे एक थी.. आहाहा, काय दिसायची हो.. छान सावळा रंग, आकर्षक, बोलकी चेहरेपट्टी.. मंडळी, काय सांगू तुम्हाला!

एकीकडे माझे मित्र मला म्हणत होते, "काय तात्या? अरे एवढा शूर तू. एका मुलीशी बोलायला घाबरतोस? च्यामारी, भीड बिनधास्त! अरे एवढा बोलबच्चन तू! आपल्या कॉलेजातल्या मुलींवर सफाईने शाईन मारतोस! फार फार तर काय होईल? नडेल, आखडेल! अरे यार, खरं काय ते एकदा कळू तरी देत. असा किती दिवस झुरणार तू?!"

गणेश सुतावणे नावाचा एक खट्याळ पोरगा आमच्या ग्रुपमध्ये होता. आम्ही त्याला गण्या म्हणायचो. महा खट्याळ कार्ट! नेहमी कुजबुजल्यासारखं बोलायचा. सदैव कुचकट टोमणे मारायचा, आणि स्वतःशीच खट्याळपणे हसायचा. तो एकदा मला गंभीर आवाजात म्हणाला," हे बघ तात्या, पू होऊन पिकायच्या आधीच कोणतंही गळू फोडलेलं बरं..!!! ...काय? तू एकदा तिला विचारूनच टाक...!!"

प्रसाद भणगे नावाचा आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगा होता. माझा अगदी विशेष भक्त! त्याचं तर भलतंच निरीक्षण! तो तर एकदा मला म्हणाला, "तात्या, अरे ऐक माझं. मला खात्री आहे, तिलाही तू जाम आवडतोस!! अरे ती जेव्हा आपल्यासमोरून पास होते ना, तेव्हा तीही हळूच तुझ्याकडे बघते. मी स्वतः पाहिलंय!!":) "तू नुसतं एकदा तिला विचारायची हिंमत कर! बस! अरे, तुला सालस नक्की पटेल आणि तसं झालं तर मी अख्ख्या ठाण्याला पेढे वाटीन आणि बिल्डिंगला लाईटींग करीन..!!"

अहो कसलं काय मंडळी, हे सगळं प्रसादची माझ्यावरची भक्ती, मला धीर देण्याकरता बोलत होती. म्हणे तूही तिला जाम आवडतोस! छ्या..!! तिनं आजतागायत एकदाही ढुंकूनही माझ्याकडे पाहिल्याचं मला आठवत नव्हतं!

एके दिवशी मात्र मी ठरवलंच! च्यामारी, आज तिच्याशी ओळख काढायचीच. बिनधास्त बोलायचं. जो होगा देखा जायेगा! घरातल्या घरातच आरशासमोर दोन-तीन रिहर्सल केल्या, डायलॉग पाठ केले! आणि पक्का निश्चय करूनच नाक्यावर गेलो. हळूहळू बाकीचीही मित्रमंडळी नाक्यावर जमली. नेहमीच्या गप्पा, कटींगचाय, सिगरेट सुरू झाली. आज मी तिच्याशी ओळख काढणार आहे, डायरेक्ट भिडणार आहे याबाबत मी कुणालाच थांगपत्ता लागू दिला नव्हता. पण जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी माझी फाटायला लागली! आज ती आलीच नाही तर फार बरं होईल असासुद्धा एक पळपुटा विचार माझ्या मनांत येऊन गेला! तेवढ्यात गण्या कुजबुजला, "तात्या, तुझी सालस...!!"

लांबूनच ती येताना दिसत होती. छानसा पांढऱ्या शुभ्र रंगाचा पंजाबी ड्रेस! चेहऱ्यावरती नेहमी दिसणारा एक आत्मविश्वास!! क्षणभर मनात विचार आला, जाऊ दे! आज नकोच हिला विचारायला!! आज ही इतकी छान दिसत्ये की आपल्याला नक्की नाहीच म्हणेल!! :) उगाच रिस्क कशाला घ्या! :)

"अरे! तात्याची सालस आली वाटतं!" "अरे यार तात्या, आज खरंच काय मस्त दिसत्ये रे!" विन्या म्हणाला.
एव्हाना ती येताना इतरही मित्रांना दिसली होती. पण तिला आज भिडण्याचा मी मनोमन प्लॅन केला आहे, हे कुणालाच माहीत नव्हतं.

तेवढ्यात सुरेशचं माझ्यावरचं प्रेम उचंबळून आलं! तो हिंदीत म्हणाला, "चल तात्या, आज तेरे वास्ते आपून भिडता है उसको..!!"

"नको रे बाबा. तू वाटच लावशील माझी!" आमचा सुऱ्या म्हणजे एक अवतारच होता. हे जीवन म्हणजे एक हिंदी पिक्चरच सुरू आहे असं त्याला सदैव वाटायचं! उगाच काहीतरी तिच्यापुढे बरळायचा, आणि सगळं मुसळ केरात जायचं!!

कशी माहीत नाही, पण माझ्या मनातली घालमेल गण्याला कळली. तो नेहमीप्रमाणे हळूच कुजबुजला, "तात्या, ती येत्ये बघ! आज हे गळू फोडूनच टाक एकदाचं..!!" असं म्हणाला आणि हलकेच फीस्स्स करून हसला..!!
छ्या! हा गण्या म्हणजे खरंच एक हलकट माणूस होता...!! :)

'बस्स! ठरलं! नकोच ते! आज नाहीच विचारायचं! आज तिला नुसतं एक स्माईल देऊन बघावं काय होतंय ते..!!' असा मी ऐनवेळी निर्णय घेतला!! च्यामारी मंडळी, बघा काय पण माझी निर्णयक्षमता..!! आहे की नाही वाखाणण्याजोगी..!! :)
'काय सांगावं? कदाचित तीही मला उत्तरादाखल प्रतिस्माईल देईल.!!' या गण्याला नाही अक्कल! नुसत्या गोळ्या घेऊन भागत असताना मला ऑपरेशन (गळवाचं हो...!!) करायला सांगत होता...!! :)

हुश्श!! पण या निर्णयाने किती बरं वाटलं माझं मलाच!! :)

तिचं माझ्याकडे लक्ष जाईल, माझा चेहरा तिला स्पष्ट दिसेल हे पाहून मी थोडा ऍडजस्ट होऊन उभा राहिलो. नाहीतर मी नुसताच स्माईल द्यायचो, आणि ती आपल्याकडे बघायचीच नाही! साला, आपलं स्माईल फुक्कट!! :) शिवाय, पचका वेगळाच..!!

आता मात्र ती आमच्या खूपच जवळ आली होती, आणि ५-१० सेकंदातच आमच्या समोरून पास होणार होती, आणि मी तिला एक छानसा (माझ्या परीने..!!) स्माईल देणार होतो. आणि आज कधी नव्हे ती आमची नजरानजर झाली!

पक्षांची किलबिल थांबली, वारा स्तब्ध झाला, साऱ्या जगानं क्षणभर एक पॉज घेतला, आणि.....

(क्रमशः)--

तात्या.

December 21, 2007

सुगम रूप सुहावे...

राम राम मंडळी,

गाणं शिकणार्‍या काही हौशी मंडळींकरता, तर काही विद्यार्थ्यांकरता एक छोटेखानी शिबिर नुकतेच ठाण्यामध्ये आयोजित केले गेले होते. त्या शिबिरात आयोजकांनी अस्मादिकांनाही दोन शब्द बोलायला आमंत्रित केले होते. कार्यक्रम तसा घरगुती स्वरुपाचाच होता. म्हटलं तर शिबीर, म्हटलं तर घरगुती स्वरुपाच्या गप्पाटप्पा आणि गाण्याची मैफल! अस्मादिकांनी त्यात नेहमीप्रमाणेच खूप भाव वगैरे खाऊन घेतला. 'तात्या अभ्यंकर' म्हणजे काय विचारता महाराजा? एकदम संगीततज्ञ की हो!!' अशी आमची प्रतिमा कायम राखण्यात आम्ही कालही यशस्वी झालो! :) विशारद, अलंकार शिकणारे काही होतकरू विद्यार्थी कार्यक्रम संपल्यानंतर चक्क आमच्या पायाबिया पडले! अर्थात, आम्हीही एक विद्यार्थीच असल्यामुळे ते सर्व नमस्कार आम्ही मुखाने गोविंद गोविंद म्हणत भीमण्णांच्या पायाशी रुजू केले!

पण मंडळी, एकंदरीतच कार्यक्रमाला खूप मजा आली. त्या कार्यक्रमात काही विद्यार्थी खरोखरंच चांगले गाणारे होते, मेहनत करणारे होते ही मला समाधानाची बाब वाटली. असो..

कालचा माझा विषय होता,
'

यमन रागातील बंदिशींचे सौंदर्य आणि विविधता!'

मंडळी, आजपर्यंत आंतरजालावर अनेक वेळेला मी यमनचे, यमनकल्याणचे अगदी भरभरून गोडवे गायले आहेत. तो रागच तसा आहे. अगदी अवीट. स्वभावाने अत्यंत तरल, हळवा आणि प्रसन्न! गेली अनेक वर्षे या रागाने संगीतकारांवर, गायकांवर, बंदिशकारांवर अक्षरश: मोहिनी घातली आहे. आमच्या अभिजात संगीताच्या दुनियेत तर असं मानलं गेलं आहे की ज्याला यमन गाता आला त्याला गाणं आलं! तसे आपल्या रागसंगीतात शेकडो राग आहेत. प्रत्येक कलाकार त्यातला प्रत्येक राग सादर करतोच असं नाही. परंतु असा क्वचितच कुणी कलाकार असेल की ज्याने यमनची साधना केली नाही, ज्याला यमनने भुरळ घातली नाही. म्हणूनच अभिजात संगीताच्या मैफलींतून आजही प्रत्येक लहानथोर गायक यमन गातो, यमनची साधना करतो. आमच्या भीमण्णांसारखा वयोवृद्ध कलाकार मैफलीच्या सुरवातीला आजही पटकन यमनची आलापी करू लागतो! असो..

तर मंडळी, अश्या या यमन रागात अभिजात संगीताच्या दुनियेत अनेक बंदिशी आहेत. माझ्यासारख्या यकश्चित कलाकारापासून ते अगदी दिग्गज कलाकारांपर्यंत प्रत्येकाला यमनमध्ये काही ना काही बांधावसं वाटलं, त्याच्या स्वरांच्या माध्यमातून काही ना काही अभिव्यक्त करावंसं वाटलं. कालच्या शिबिरात मी यमन आणि यमनकल्याणमधील एकंदरीत चार वेगवेगळ्या बंदिशींबद्दल विस्तृत बोललो, त्याचं सौदर्य, त्यातल्या जागा श्रोत्यांना उलगडून दाखवायचा प्रयत्न केला. अभिजात ख्याल संगीत अतिशय उत्तम रितीने सादर करणारी ठाण्यातली माझी मैत्रिण वरदा गोडबोले हिने मोठ्या मनाने मला मदत केली व वानगीदाखल त्या चारही बंदिशींचे प्रात्यक्षिक दाखवण्याचे मान्य केले. त्या चारही बंदिशी तिने अतिशय उत्तम तर्‍हेने गाऊन दाखवल्या. त्या चारही बंदिशींबद्दल मी इथे दोन शब्द लिहिणार आहे आणि ऐकवणार आहे. हां हां. घाबरू नका मंडळी, मी स्वत: गाणार नाहीये तर युट्युबच्या साहाह्याने वरदाने गायलेल्या आपल्याला ऐकवणार आहे! :)

सुरवातीला मी तानपुरा उत्तम तर्‍हेने कसा लावावा, त्यात कोणकोणत्या गोष्टींना महत्व असतं याबद्दल दोन शब्द बोललो. एका विद्यार्थ्याने त्याचं लहानसं चित्रण केलं आहे ते आपल्याला खाली पाहा. मंडळी, तानपुरा कसा लागलाय ते ऐकून सांगा बरं का! जोड, खर्ज, पंचम सगळं बरोबर आहे ना बघा! :) असो..



=====================================================================================

पहिली बंदिश आहे -


अस्थाई -

मतवारी हू आज मै
स्वच्छंद मंद स्वर सुगंध
देत हृदय आनंद

अंतरा -

दिनरंग की कृपा
मोपे है आसिस
तब होवे ग्यान सुलभ
श्रुति, सूर, लय, राग


ऐका ही बंदिश!



मंडळी, ही बंदिश आग्रा गायकीचे बुजुर्ग असलेल्या पं दिनकरराव कायकिणींनी बांधली आहे. मुळात आग्रा गायकी ही उत्तमोत्तम बंदिशींकरता प्रसिद्ध. त्यात यमन रागातील बंदिश नसेल तरच नवल! कायकिणीबुवांनी या बंदिशीत काय सुरेख एकताल ठेवला आहे पाहा. 'मतवारी'त ल्या 'वा' वरच्या गंधारावर सम कशी अलगद येते! हा गंधार किती सुरेख आहे! 'स्वच्छंद मंद स्वर सुगंध' हे शब्द आरोही पद्धतीने किती सुंदर रितीने पुढे जातात! आणि 'देत हृदय आनंद' मधील 'आनंद' या शब्दात कायकिणीबुवांनी किती सुरेख शुद्ध मध्यम ठेवला आहे! क्या बात है.. 'आनंद' या शब्दात यमनातला हळवा भाव प्रकट होऊन तिथे यमनकल्याणची छानशी सावली पडते! अंतर्‍यातील 'दिनरंग की कृपा, मोपे है आसिस' या ओळीतील 'आसिस' शब्दावरील जागा कशी ठेवली आहे बघा! आणि श्रुति, सूर, लय, राग हे शब्द सुटे सुटे असून किती उत्तम तर्‍हेने चालीत बसले आहेत! मंडळी, माझं भाग्य हे की ही बंदिश खुद्द कायकिणीबुवांकडूनही मी मैफलीत ऐकली आहे...

=====================================================================================

मंडळी, गेल्या वर्षी होळीनिमित्त मी, माझ्या मैत्रिणी धनश्री लेले व वरदा गोडबोले, आम्ही तिघांनी मिळून मुंबईत काही ठिकाणी होळीवरील बंदिशिंचे कार्यक्रम केले होते. सवडीने मी या बंदिशींवर इथे विस्तृत लिहिणारच आहे. या सर्व बंदिशी धनश्री लेलेने रचल्या होत्या, मी त्या स्वरबद्ध केल्या होत्या आणि वरदाने त्या गायल्या होत्या. त्यात यमनकल्याण रागातलीही एक बंदिश होती. परवाच्या शिबिरात आम्ही प्रत्यक्षिकाकरता ही बंदिशदेखील घेतली होती. ही बंदिश मी अध्ध्या त्रितालात बांधली आहे. तात्या अभ्यंकरांनी धनश्रीच्या शब्दांना चाल कशी लावली आहे तेही सांगा हो! :)

ऐका ही बंदिश -




सजधज रंगत झुमे ब्रिजवा
नंदसुत खेलत होरी संगवा..

ठुमकत नाचत आवत गिरिधर..
लुपतछुपत सब गोपी राधा.
बिनती करत अब,
छेडो ना मनवा, छोडोरी संगवा, डारो ना रंगवा,
पीत, हरीत, नील, धुमल, पाटल.


क्या बात है, धनश्रीने किती सुंदर शब्द लिहिले आहेत! डोळ्यासमोर बृजवासात होळीची धमाल सुरू आहे, नंदसुत कन्हैय्या गोपींसमवेत होळी खेळत आहे, छेडखानी करत आहे असं चित्र उभं राहतं. 'नंदसुत' हा शब्द मला अतिशय आवडला. 'झुमे' शब्दावरल्या पंचमाचे आणि 'खेलत' या शब्दातल्या शुद्ध गंधाराचे सौंदर्य पाहा.

'ठुमकत नाचत आवत गिरिधर'!

'ठुमकत नाचत'! किती छान शब्द आहेत हे! 'आवत गिरिधर' मधली वरदाच्या आवाजातली तार सप्तकातील गंधारापर्यंतची सहजता पाहा! ठुमकत, नाचत येणार्‍या गिरिधराला पाहून धनश्री पुढे लिहिते,


'लुपत छुपत सब गोपी राधा!'

'क्या बात है.... त्या सगळ्या गोपी कृष्णाला लाडिकपणे विनवत आहेत, की बाबारे आमच्यावर उगाच रंगांची उधळण करू नकोस! (म्हणजे खरं तर उधळण कर! :)

कुठले रंग?


'पीत, हरित, नील, धुमल, पाटल!...:)

वरदाने किती सुंदर तर्‍हेने या सगळ्या रंगांची नावं गायली आहेत!

मंडळी, धनश्रीची ही बंदिश म्हणजे केवळ रंगांचीच उधळण नव्हे तर यमनच्या स्वरांचीदेखील उधळण आहे! रचनाकार आमची धनश्री असो, वा कविकुलगुरू कालिदास असो, वा अगदी माडगुळ्याचे महाराष्ट्र वाल्मिकी असोत, आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतामध्ये कुठल्याही रचनेला सामावून घ्यायची ताकद आहे हेच खरं!

असो, मंडळी तात्या अभ्यंकरांचं हे कॉम्पोझिशन आपल्याला कसं वाटलं ते ऐकून अभिप्राय द्या बरं का! :)


=====================================================================================

त्यानंतर प्रात्यक्षिकादाखल आम्ही पं यशवंतबुवा महाले यांची एक बंदिश घेतली होती. तिचे शब्द आहेत,


जियरा नही माने,
उनबिन, जियरा नही माने...
कैसे कटे अब घडी पलछिन दिन

कासे कहू अब
जियाकी बिथा मोरी
चैन नाही मोहे, उनके दरस बिन..


ऐका ही बंदिश -



मंडळी, पं यशवंतबुवा महाले हे आग्रा परंपरेतलेच. अण्णासाहेब रातंजनकरांचे शिष्य. पण महालेबुवांचा परिचय एवढ्या दोन ओळीतच पुरा होत नाही, होणार नाही. महालेबुवांवर एक विस्तृत लेखच मी लिहिणार आहे. गाण्यातला खूप मोठा माणूस. आमच्या महालेकाकूही उत्तम गाणार्‍या. पं गजाननबुवा जोश्यांच्या शिष्या. महालेबुवांचं आणि काकूंचं मला खूप प्रेम लाभलं हे माझं भाग्य!

महालेबुवा एकदा राजधानी एक्सप्रेसने दिल्लीला चालले होते तेव्हा त्याना ही बंदिश सुचली. राजधानीने द्रुत लयीत अगदी सुरेखसा ठेका पकडला असणार आणि महालेबुवांनी अगदी बिनचूकपणे ती लय पकडली असणार असंच ही बंदिश ऐकताना वाटतं! अश्या वेळेस 'गाडीची लय म्हणजे 'कशासाठी पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी!' असं भाईकाका म्हणतात ते पटतं! :)


'जियरा नही माने..'

बंदिशीचा मुखडा तानेतला आहे. 'जियरा' शब्दावर बोलतान असून तिचं समेवर विसर्जन होतं! मंडळी, मुखड्यात तान असलेल्या बंदिशींचं सौंदर्यच वेगळं!

'कैसे कटे अब, घडी पलछिन दिन'

'कैसे कटे अब' मधल्या 'कैसे' तला फर्म पंचम आणि 'कटे' तला छानसा शुद्धमध्यम! या बंदिशीची अस्थाई ऐकताना असं वाटतं की 'जियरा'च्या तानेतल्या मुखड्यानंतर ही बंदिश 'कैसे कटे अब' च्या फलाटावर आमच्या शुद्धमध्यमाला गाडीत चढू देण्याकरता क्षणभर विसावली आहे! :) पण अगदी क्षणभरच बरं का! त्यानंतर लगेच समेला ऑफबिट पकडून 'घडी पलछिन दिन, जियरा नही माने' असं म्हणत बंदिशीतल्या राजधानीने पुन्हा आपली मूळ लय पकडली असावी!

'कासे कहू अब, जिया की बिथा मोरी' मधला तार षड्ज फारच सुरेख. 'चैन नाही मोहे' मधली अस्वस्थता पुढे 'उनके दरस बिन..'मधून फारच उत्तम रितीने अभिव्यक्त होते आणि त्याला जोडूनच गाडी पुन्हा 'जियरा नही माने..' या तानेतल्या मुखड्यावर येते! क्या केहेने..!

खरंच मंडळी, गाण्याकडे आपण जसं पाहू तसं आपल्याला गाणं दिसतं! फक्त गाण्याकडे पाहण्याची नजर हवी! आणि ती नजर बुजूर्ग कलाकारांना ऐकूनच मिळते, सतत गाण्यात राहूनच मिळते, गाण्यावर विचार करूनच मिळते! महालेबुवांनी किती सुरेख बंदिश बांधली आहे आणि वरदानेही ती तेवढीच छान गायली आहे. सध्या वरदाला महालेबुवांचीच तालीम मिळत आहे.

=====================================================================================

And now, Last but not the least...


सुगम रूप सुहावे, सलोने
माई, सुगम रूप सुहावे..
जलक ज्योत चित चोरत नित
सखिया संग मिल गाओ, रिझाओ
माई सुगम रूप सुहावे

जो देखेत चित, सोहिरी झरत
बिन देखे अमर, जिया आकुलावे,
माई सुगम रूप सुहावे....


मंडळी, ऐका ही भेंडीबाजार घराण्यातली पारंपारिक बंदिश!



इस बंदिश के बारेमे क्या केहेने! माझी ही अत्यंत आवडती बंदिश आहे. या बंदिशीचा मूड किती सुरेख आहे बघा! क्या बात है..

मंडळी, राग जरी एकच असला तरी त्यातल्या वेगवेगळ्या बंदिशींमुळे त्याच रागाच्या विविध छटा आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक बंदिशीचा एक मूड असतो, एक स्वभाव असतो हेच मी या लेखातून सांगायचा प्रयत्न केला आहे. आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातील 'आग्रा गायकी' म्हणजे बंदिशींचा खजिनाच. भातखंडेबुवा, रातंजनकरबुवा, जगन्नाथबुवा, कायकिणीबुवा, गिंडेबुवा अश्या एकापेक्षा एक दिग्गजांच्या बंदिशींमुळे आग्रा गायकी समृद्ध झाली आहे, संपन्न झाली आहे.

बंदिशींमधली ही विविधता पाहिली की 'हम राग नही, बंदिश गाते है' असं आग्रावाली मंडळी नेहमी म्हणतात ते पटतं. वर आपण दिनकररावांच्या 'मतवारी आज मै..' मधला प्रासदिकपणा पाहिला, 'सजधज रंगत झुमे ब्रिजवा' मध्ये वृंदावनातली होळी अनुभवली, 'जियरा नही माने..' मधली अस्वस्थता, ओढ पाहिली. त्याचप्रमाणे 'सुगर रूप सुहावे..' मधल्या अनामिक ओढीवर मला तरी जान निछावर कराविशी वाटते!

जेव्हा जेव्हा मी ही बंदिश ऐकतो तेव्हा तेव्हा एका निवांत अश्या एखाद्या फार्महाऊसवरची सुंदर संध्याकाळ माझ्या डोळ्यासमोर येते. तिन्ही सांजांची वेळही उलटली आहे. बाहेरच्या लॉनवरच खुर्ची टाकून मंद दिव्याच्या प्रकाशात आपण बसलो आहोत, समोर जीव ओवाळून टाकावा अशी लावण्यवती बसली आहे. समोरच्या प्याल्यातली ग्लेनफिडिच मला म्हणते आहे,

'अरे तात्या, तुझ्या समोर बसलेली लावण्यवती जेवढी सुरेख आहे, तेवढीच मीही सुरेख सोनेरी आहे रे! माझं माहेर स्कॉटलंड! तेथील मावळतीने मला हा सोनेरी रंग बहाल केला आहे! मला ऑन द रॉक्सच पी, त्यात सोडा किंवा पाणी टाकून माझी सोनेरी छटा, माझं 'स्कॉचपण' गढूळ नको करूस रे! :)

'सुगम रूप सुहावे..' या बंदिशीतल्या मध्यलयाची चैन जिवाला वेड लावते. या बंदिशिचा मूड थोडासा गझलेकडे झुकणारा आहे. पतियाळा, भेंडिबाजार गायकीचा खास बाज या बंदिशिला आहे. या बंदिशीचा नुसता अस्थाई-अंतरा मांडणं देखील वाटतं एवढं सोपं नाही. परंतु वरदाने मात्र ही बंदिश चांगलीच मांडली आहे. किराणा, पतियाळा गायकीचे बुजूर्ग कलाकार पं अजय पोहनकर ही बंदिश अतिशय सुरेख गातात. वरदालादेखील काही काळ पोहनकरांची तालीम मिळाली असल्यामुळे त्यांचाकडून तिने ह्या बंदिशींचे विधिवत शिक्षण घेतले आहे!

'रंजिश ही सही..' चा जो मूड आहे ना, तोच या बंदिशीचा मूड आहे. 'सुहावे' हा शब्द काय ठेवलाय! वा वा! 'सलोने माई' मधल्या पंचमाचा, रिषभाचा आणि गंधाराचा आपापसातला समजूतदारपणा पाहा! मंडळी, माणसं जर एकमेकांशी या स्वरांप्रमाणे समजुतदारपणे वागू लागली तर अजून काय पाहिजे?

जाऊ द्या मंडळी, या बंदिशीबद्दल किती लिहू आणि किती नको! आणि कितीही लिहिलं तरी ते कमीच पडणार आहे! या बंदिशीच्या सौंदर्यापुढे माझं शब्दसामर्थ्य अगदीच तोकडं आहे!

असो..

तर असा एकंदरीत हा बंदिशींच्या दुनियेतला प्रवास.. आपलं रागसंगीत आणि त्यातल्या बंदिशी हा कधीही न संपणारा एक अनमोल खजिना! ऐकणार्‍याने अगदी मनसोक्त ऐकत रहावं, बंदिशींच्या माध्यमातून रागांचे विविध रंग न्याहाळावेत, अनुभवावेत..!

मंडळी, या बंदिशींच्या दुनियेतला, रागसंगीताच्या दुनियेतला मी एक आनंदयात्री! काही प्रमाणात आपल्या सारख्या रसिकांनाही ही आनंदयात्रा घडावी याच हेतूने हा लेख लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. परंतु एकंदरीतच गाणं ही अनुभवायची गोष्ट आहे हेच खरं! कारण जिथे शब्द संपतात, तिथे सूर सुरू होतात! ह्या बंदिशी मला जश्या दिसल्या ते मी शब्दात मांडायचा प्रयत्न केला आहे. माझे शब्द आपल्याला कदचित आवडतील, न आवडतील. परंतु ह्या बंदिशी मात्र ऐकून कश्या वाटल्या हे अगदी अवश्य सांगा!

आपलाच,
(गाण्यातला!) तात्या अभ्यंकर.

December 20, 2007

मेरे मन ये बता दे तू...

राम राम मंडळी,

'मेरे मन ये बता दे तू..मितवा' या गाण्यातली मला दिसलेली सांगितिक सौंदर्यस्थळे सांगण्याचा हा एक प्रयत्न!




'मेरे मन ये बता दे तू
किस ओर चला है तू..'


'मेरे' तल्या शुद्ध गंधाराने श्रीगणेशा. 'मन', 'ये' चा पंचमावरील सुरेख ठेहेराव. 'ये बता' मधली 'पसां' संगती गाण्यातला स्वाभाविक 'षड्ज-पंचम' भाव दाखवते. 'बता' या अक्षरांनी तार षड्जापाशी केलेले मंजूळ knocking! या ठिकाणी लयीचा फार नाजूक टच जाणवतो आणि अक्षरशः सुखावून जातो. क्या बात है..

'दे' वरील पंचम व 'तू' वरील शुद्ध धैवत यांची कानाला अत्यंत गोड लागणारी 'पध' ही संगती. याच संगतीमुळे 'मेरे मन ये बता दे तू' मधला 'दे तू' कमालीचा गोड आणि लोभसवाणा वाटतो! शिवाय 'पध' ही आरोही संगती 'मेरे मन ये बता दे तू' या वाक्याचा उत्तरार्ध कायम ठेवते आणि श्रोत्यांना, आता पुढे काय ? अशी उत्सुकता लावते! ;)

'किस ओर चला है तू' हे त्याचं उत्तर लगेचंच मिळतं! फक्त इथे 'है तू' तली 'पप' ही संगती आणि तिच्यातील इनबिल्ट पंचमावरील न्यास ह्या गोष्टी पूर्वीच्या 'दे तू' तल्या 'पध' संगतीसारखी श्रोत्यांची उत्सुकता अधिक ताणून न धरता श्रोत्यांचे समाधान करतात! विशेषत: 'चला' या शब्दावरील जागा फारच सुरेख आणि तरल आहे. क्या बात है.. ;)

'मेरे मन ये बता दे तू
किस ओर चला है तू.. '

वा! किती गोडवा आणि हळवेपणा आहे या ओळींत! साला ऐकूनच दिल खुष होतो. आता पुढच्या ओळी पाहू..

'क्या पाया नही तूने,क्या ढुंड रहा है तू'

वा, किती साधे पण सुंदर शब्द आहेत! सरगम बरीचशी वरच्यासारखीच. तोच 'पध' आणि 'पप' चा संवाद. एक महत्वाचा फरक असा की 'क्या पाया नही तूने' मधली 'नही' ही तार सप्तकातल्या शुद्ध रिषभावरून तार षड्जावर स्थिरावलेली 'रेंसा' ही संगती आहे. 'नही' तल्या 'ही' या अक्षरावरचा बेहलावा ऐका काय सुरेख आहे! मस्त वाटतं ऐकायला..

'क्या ढुंड रहा है तू' मधला 'है' ही असाच सुखावह आहे! आणि त्यानंतर किंचितसा ऑफबीट टाकलेला 'तू'! वा..

मंडळी, खूप मजा येते हे गाणं ऐकतांना. हा लेख ज्यांना थोडीफार स्वरांची, लयीची ओळख आहे त्यांना अधिक चांगल्या रितीने समजू शकेल असे वाटते! अर्थात, ज्यांना स्वर समजत नाहीत त्यांचंही काहीच अडत नाही. कारण गाणं हे भावल्याशी कारण व हृदयाला भिडल्याशी कारण! ;)

पुढे जाऊया!

'जो है अनकही, जो है अनसुनी,वो बात क्या है बता...'

यातल्या 'वो बात क्या है बता' मध्ये पहा कसा एक एक स्वर ठेवला आहे! 'वो', 'क्या' आणि 'बता' तल्या 'ता' वर धीम्या केरव्यातल्या समेची कशी छान टाळी येते पहा. मस्त...!

आगे बढेंगे!

'मितवा....कहे धडकने तुझसे क्या!'

मंडळी, 'वो बात क्या है बता...' या ओळीनंतर हे गाणं 'पनीसां' ही संगती घेऊन डायरेक्ट तार षड्जाला अनपेक्षितपणे भिडतं! एकदम वळण घेतं. इतका वेळ सुरातल्या सुरात डुंबणारं हे गाणं ताल तोच असला तरी लयीच्या दुगुनचौगुन मध्ये शिरतं! तालाच्या एका छानश्या लयबद्ध पकडीत जातं! क्या बात है मंडळी, खरंच क्या बात है! शंकर महादेवनसारखा विलक्षण प्रतिभावान कलावंत आपल्याला लाभला ही मी अत्यंत भाग्याची गोष्ट समजतो!

दिल्ली स्थानकाला भले १० फलाट असतील. १० नंबरच्या फलाटाहून मुंबईकडे येणारी पंजाबमेल सुटते. दिल्ली स्थानकाबाहेर पडते. दिल्ली स्थानका बाहेरही रुळांची गर्दी असते. त्यातून एक एक रूळ बदलत, ओलांडत अखेर ती मुंबईकडे जाणार्‍या ठाराविक रुळावर येते आणि मग एका लयबद्ध रितीने धावू लागते. या गाण्यातल्या मितवावरही थोडंफार असंच होतं बरं का मंडळी! ;)

'मेरे मन ये बता दे तू, किस ओर चला है तू.. '
'क्या पाया नही तूने,क्या ढुंड रहा है तू'
'जो है अनकही, जो है अनसुनी,वो बात क्या है बता...'

या छानपैकी गुणगुणाव्याश्या वाटणार्‍या ओळी ओलांडून गाठलेला,

'मितवा....कहे धडकने तुझसे क्या!' हा टप्पा खासच! ;)

आणि मग पुन्हा वरील सर्व ओळी आणि मितवा हे सगळं एकाच लयीत धावू लागतं.

'मितवा....कहे धडकने तुझसे क्या,मितवा....ये खुदसे ना तू छुपा'

बाकी '