April 19, 2011

तुमच्या उष्ट्यासाठी आलो...!

आपल्या अभिजात संगीताच्या दुनियेत गुरू-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे. किंबहुना ह्या परंपरेशिवाय हे संगीत सुरूच होत नाही, त्याची अभिव्यक्ति केवळ अशक्य आहे.

स्वर, लय, ताल, राग, गायकी, ह्या सगळ्या गोष्टी गुरूकडूनच शिकायला मिळतात, शिकायच्या असतात. गुरुकडे गाण्याची तालीम घेत असताना/घेतल्यावर गुरुचं बोट धरून शिष्यही ह़ळूहळू गाऊ लागतो, गाता होतो. पण गुरुकडून काय शिकायचं असतं बरं?

गुरूकडून गाण्याकडे बघण्याची जी एक नजर असावी लागते ती नजर शिकायची असते, गायकी शिकायची असते. गायकी कशात आहे, कुठे आहे, हे गुरूच शिकवतो. परंतु पुढची वाटचाल मात्र शिष्याला स्वत:च करायची असते. उदाहरणार्थ, यमन राग कसा आहे, त्याचं जाणंयेणं कसं आहे, हे गुरू शिकवतो. थोडक्यात सांगायचं तर तो यमन रागाची वाट दाखवतो. 'बाबारे, हे स्वर असे आहेत, असा असा, या या वाटेने पुढे जा, अमूक स्वरावली अशी आहे, तमूक तशी आहे!' रागाच्या या सगळ्या खाणाखुणा, बारकावे, हमरस्ते अन् पाऊलवाटा सगळं काही गुरू दाखवत असतो. परंतु एकदा गुरूकडून या सगळ्याची रीतसर तालीम घेतल्यावर मात्र शिष्याला त्या वाटेवरून एकट्यालाच जायचं असतं/जावं लागतं. गुरूकडून मिळालेल्या तालमीमुळे, गाण्याच्या सततच्या चिंतन-मननामुळे, केलेल्या रियाजामुळे, गुरुने दाखवलेल्या त्या यमनच्या वाटेवरून शिष्य जाऊ लागतो, परंतु त्याचसोबत त्याच वाटेवर राहून स्वत:ची अशी एक वेगळी अभिव्यक्ति तो करू लागतो, स्वत:चे विचार मांडू लागतो, स्वत:चं गाणं गाऊ लागतो!

एखादा उत्तम शिष्य हा स्वत:च्या गुरूने दिलेल्या तालमीसोबतच इतरही अनेक जणांकडून, त्यांची गायकी ऐकून त्यातल्या चांगल्या गोष्टी उचलत असतो, अक्षरश: वेचत असतो. आपल्या गुरुची गायकी तर तो शिकत असतोच, त्याबद्दल काही वादच नाही, परंतु आपल्या गुरुसमान असणार्‍या इतरही अनेक दिग्गजांचं गाणं, त्यातली सौंदर्यस्थऴं तो टिपत असतो. आणि या सगळ्याच्या परिपाकातूनच एक चांगला, तैय्यार आणि खानदानी गवई तयार होत असतो, होतो!

एखादा गवई (आता आपण शिष्य हा स्वत:च एक गवई झाला आहे असं समजून पुढे जाऊया! ) स्वत:च्या गाण्याची अभिव्यक्ति करत असतांना, मध्येच त्याच्या गायकीत - त्याच्या गुरूच्या गायकीची, त्याच्या घराण्याच्या गायकीची आणि घराण्यातील इतर पूर्वजांच्या जागांची (ज्या त्याला त्याच्या गुरुनेच दाखवलेल्या असतात!) आणि त्याने केलेल्या, आपल्या गुरुसमान असणार्‍या इतर दिग्गजांच्या गायकीच्या सततच्या चिंतन-मननाची, अभ्यासाची एक छानशी सावली पडते! मंडळी, माझ्या मते ही सावली म्हणजेच कलेची एक अत्यंत उच्च, प्रतिभावान अशी अभिव्यक्ति आहे. मंडळी, ही नक्कल नव्हे, नक्कीच नव्हे! मी याला गाण्यातली बहुश्रुतता म्हणेन! आणि मला असं वाटतं की कुठल्याही उत्तम गवयाकडे अशी बहुश्रुतता हवी तरच त्याचं गाणं हे अधिकाधिक समृद्ध होत जातं, समृद्धतेकडे वाटचाल करू लागतं!

याची अनेक म्हणजे अनेक उदाहरणे देता येतील. कुमार गंधर्व! वास्तविक स्वत: एक अत्यंत प्रतिभावन कलावंत. स्वत:च्या वाटेनं जाणारा, स्वत:चं असं एक वेगळं गाणं निर्माण करणारा! परंतु त्यांच्यावरही नारायणराव बालगंधर्वांचा इतका प्रभाव पडला की त्यांनाही कुठेतरी नायारणरावांचं गाणं लोकांना उलगडून दाखवावंसं वाटलं! आणि त्यांनी 'मला उमजलेले बालगंधर्व' या नावाचा एक कार्यक्रमच केला, त्याची ध्वनिफीतही काढली. पण म्हणजे त्यांनी बालगंधर्वांची नक्कल केली का हो? नक्कीच नाही!

बाबूजींचंही उदाहरण देता येईल. त्यांच्या गायकीमध्येही हिराबाई, बालगंधर्व यांचा खूप प्रभाव होता.

मंडळी, आजपर्यंतच्या आयुष्यात मला अनेक दिग्गजांच्या जाहीर तसेच खाजगी मैफली ऐकण्याचा अगदी भरपूर योग आला. कित्येकदा गवई गाता गाता रंगात येऊन, मध्येच एखादी छानशी जागा, सुरावट त्याच्या गायकीत घेऊन मोठ्या कौतुकाने, "हे निवृत्तीबुवांचं बरं का!, हे करिमखासाहेबांचं बरं का!, हे अमक्याचं बरं का!, हे तमक्याचं बरं का!" असं चक्क भर मैफलीमध्येच बोलताना मी ऐकलं आहे. म्हणजे तो गवई निवृत्तीबुवांची किंवा करीखासाहेबांची नक्कल करत असतो का हो? नाही! मी मगाशी 'गाण्यातली बहुश्रुतता' हे जे शब्द वापरले ना, तीच ही बहुश्रुतता!

आमच्या भीमण्णांचंही उदाहरण देता येईल. खरंच किती बहुश्रुत होतं अण्णांचं गाणं! सवाईगंधर्वांची तालीम असल्यामुळे त्यांची गायकी तर अण्णांच्या गाण्यात पुरेपूर दिसतेच! सवाईगंधर्वांना आवाजाचा बर्‍याचदा त्रास व्हायचा, कित्येकदा त्यांचा आवाज लागायला वेळ लागायचा. त्यामुळे कदाचित दर मैफलीत आवाजाच्या त्रासामुळे त्यांना जे गाणं दाखवायचं असेल ते गाणं ते दाखवू शकतच असत असं नव्हे! या मुद्द्यावर भाईकाका एकदा असं म्हणाले होते की सवाईंचं गाणं हे खर्‍या अर्थाने भीमसेननेच जगाला दाखवलं, जगापुढे उत्तमरित्या मांडलं!

पण मंडळी, सवाईंचं उदाहरण एक वेळ सोडून द्या, कारण ते तर अण्णांचे प्रत्यक्ष गुरूच होते. परंतु अण्णांच्या गाण्यात किराणा घराण्याचे प्रमूख असलेल्या खुद्द करीमखासाहेबांच्याच गाण्याची इतकी सुंदर सावली दिसते की क्या केहेने! अण्णा गातांना मध्येच कधी पटकन खासाहेबांची एखादी जागा घेतील, खास त्यांच्या ष्टाईलने एखादा सूर ठेवतील की केवळ लाजवाब! आणि हे सगळं अण्णांना मुद्दामून करावं लागत नाही तर या गोष्टी अगदी नकळतपणे आणि तेवढ्याच सहजतेने त्यांच्या गायकीत उतरल्या आहेत. कधी केसरबाईंच्या आवाजाची चांदीच्या बंद्या रुपायासारखी खणखणीत नादमयता अण्णांच्या गाण्यात दिसते, त्यांच्या तानांचे अनेक उत्तमोत्तम पॅटर्नस् अण्णांच्या गायकीत अगदी एकरूप झालेले दिसतात, तर कधी आमिरखासाहेबांसारख्या गवयांचे गवई असलेल्या दिग्गजाच्या आलपीतली गहनता अगदी अवचितपणे अण्णांच्या गाण्यात डोकावते, कधी बडेगुलामअली खासाहेबांच्या अत्यंत लोचदार आलापीला अण्णा सहज स्पर्श करतात, तर कधी एखाद्या अभंगात नारायणराव बालगंधर्वांची एखादी जीवघेणी सुरावट किंवा एखादी झरझर लडिवाळ तान त्यांच्या गाण्यात उतरते! आणि एवढं सगळं करूनदेखील आज अण्णांचं गाणं हे स्वतंत्र आहे, जगाला त्यांच्या स्वत:च्या गाण्याची अशी एक ओळख आहे! मंडळी, मी गाण्यातली बहुश्रुतता म्हणतो ती हीच! अण्णाच नेहमी असं म्हणतात की एखाद्याची नक्कल करणं खूप सोप्प आहे परंतु त्या नकलेचं अस्सलमध्ये रुपांतर करून ते स्वत:च्या गाण्यात समर्थपणे मांडणं मुश्कील आहे!

 मंडळी, असाच एकदा अण्णांशी दोन घटका बोलत होतो. माझ्या सुदैवाने अण्णांचाही मूड होता आणि गाण्यातील बहुश्रुतता हा विषय निघाला. मी सहजच त्यांना म्हटलं की "अण्णा, नारायण बालगंधर्वांची गायकी आपल्या अभंगात फार सुंदरतेने दिसते, तर शुद्धकल्याणात करीमखासाहेबांची काही वेळेला अगदी सहीसही याद येते!"
त्यावर अण्णा हसून परंतु विनम्रपणाने इतकंच म्हणाले,

"अरे त्यात माझं कसलं रे कौतुक? पूर्वीच्या लोकांनीच इतकं भरपूर गाणं करून ठेवलंय की तेच आम्हाला आजपर्यंत पुरतं आहे. आम्ही त्यांचंच उष्ट खातो रे! हो, पण ते उष्ट म्हणजे उकिरड्यावरच्या पत्रावळीवरचं शिळं उष्ट नव्हे बरं का! ते उष्ट आहे चांदीच्या ताटातल्या बदामाच्या शिर्‍याचं, साखरभाताचं! आम्ही जे काही कण वेचले ते त्या बदामाच्या शिर्‍याचे अन् साखरभाताचेच..!"

अण्णा, तुमची खूप आठवण येते. तुम्ही वेचलेल्या त्या बदम्याच्या शिर्‍याचे अन् साखरभाताचे काही कण तुम्ही कधी प्रेमाने मलाही खाऊ घातलेत हे माझं भाग्य. अण्णा, तुमची जायची वेळ झाली अन् तुम्ही चांदीच्या ताटावरून उठून गेलात, परंतु त्याच ताटातले काही उष्टे कण मला मात्र आयुष्यभर पुरणार आहेत, माझी साथ करणार आहेत..!

 -- तात्या अभ्यंकर.

4 comments:

Abhi said...

अप्रतिम लेख!!

Asaami-Asaami said...

Tatya, kuthalya maifilila jaanar asala tar sangaal ka... sapadat nahit ho...

Tatyaa.. said...

ho, nakki sangen..

PG said...

तात्या, किती खरं आहे हे... मात्र शेवटी डोळे पाणावले ...