October 31, 2011

हाल ए दिल..

राम राम मंडळी,

हाल ए दिल.. (येथे ऐका)

श्री अमिताब बच्चन ऊर्फ अमिताब श्रीवास्तव (यूपीतल्या इलाहाबादच्या या भैय्याचं 'श्रीवास्तव' हे मूळ आडनांव, जे हरिवंशरायांनी 'बच्चन' असं बदलून घेतलं), ऊर्फ बीग बी, ऊर्फ बच्चनसाहेब हा खरोखर एक अजब माणूस आहे. अत्यंत गुणी कलाकार, एक मोठा कलाकार, एक निर्विवाद दिग्गज! गेली ४० दशकं हा बुढ्ढा म्हातारा होतच नाहीये. त्याचा अभिनय, त्याचा आवाज सगळंच जबरा! आणि मुख्य म्हणजे आजही सर्व जुन्या नव्या माणसांना जमवून घेत हा इसम पुढेपुढेच चालला आहे. मग त्याचा केबीसीचा चौथा की पाचवा सीजन असो, की अलिकडेच प्रदर्शित झालेला 'बुढ्ढा होगा तेरा बाप' हा चित्रपट असो..इतका मोठा कालावधी प्रकाशाच्या झोतात रहाणं आणि लौकिकार्थाने 'नंबर वन' पदावर रहाणं फारच कमी लोकांना जमतं त्यापैकीच बच्चन साहेब एक.

तूर्तास मी हे अमिताब पुराण इथेच आवरतं घेतो आणि वळतो एका छानश्या गाण्याकडे. 'बुढ्ढा होगा..' चित्रपटातलंच विशाल-शेखरचं संगीत असलेलं आणि खुद्द बचन साहेबांनी गायलेलं 'हाल ए दिल..' हे यमन रागातलं गाणं. यमन आला रे आला की माझ्यासारख्या यमनभक्तांची समाधी लागलीच म्हणून समजा. मग तो यमन मदनमोहनच्या अनपढ मधला 'जिया ले गयो जी मोरा सावरिया असो', की बाबूजींच्या 'समाधी साधना' तला असो की विशाल-शेखर च्या 'हाल ए दिल..' मधला असो. यमनला तोड नाही, यमनला पर्याय नाही. आपल्या अभिजात रागसंगीताला पर्याय नाही. फक्त काही वेळेस खंत एकाच गोष्टीची वाटते की अलिकडचे संगीतकार त्याची ताकद, त्यातलं अफाट-अनंत असं पोटेन्शियल ओळखू शकत नाहीत, पाहू शकत नाहीत, किंबहुना त्यांची कुवतदेखील कुठेतरी कमी पडत असावी. मला नक्की माहीत नाही.. असो..

या पार्श्वभूमीवर विशाल-शेखरचं नक्कीच कौतुक आणि अभिनंदन की त्यांनी हा छोटेखानी यमन आम्हाला दिला..

हाल ए दिल तुमसे कैसे कहू..

स्वभावत:च हे गाणं म्हणजे एक गुणगुणणं आहे. स्वत:शीच साधलेला संवाद आहे. माझं 'हाल ए दिल..' बाई गं तुला कसं सांगू? 'नी़रेग' ही यमनची अगदी 'बेसिक लेसन' असलेली संगती छानच गायली आहे बच्चनसाहेबांनी. त्याच 'हाल ए दिल' ची 'प परे' ही अजून एक संगती. आणि 'कैसे कहू..' तला षड्ज. व्वा बच्चबबुवा!

यादो मे ख्वाबों मे..

डायरेक्ट धैवतावर न्यास असलेली 'यादो मे' तली 'गपध' संगती पुन्हा छान आणि 'ख्वाबो मे' तली 'धनीनीध..' ही सुरावट घेऊन बच्चनसाहेब ज्या रितीने पंचमावर स्थिरावतात ते केवळ सुरेख आणि कौतुकास्पद. हा पंचम अत्यंत सुरीला..!

'आपकी छब मे रहे..'

इथे 'आप की' शब्दातली पपम' संगती. हा तीव्र मध्यम यमनाची खुमारी वाढवतो, जादुई तीव्र मध्यम हा..! आणि 'छब मे रहे..' मध्ये हळूच लागलेला शुद्ध मध्यम आणि शुद्ध गंधारावरचा नाजूक न्यास! हा शुद्ध मध्यम आल्यामुळे मात्र आमचा यमन हळूच लाजतो आणि क्षणात त्याचा 'यमनकल्याण..' होतो. सांगा पाहू, कोणता बरं हा शुद्ध मध्यम? 'क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा..' ही ओळ आठवा पाहू क्षणभर. यातल्या 'मेळ' या शब्दात तुम्हाला हाच शुद्ध मध्यम सापडेल. हे आपले उगीच तात्यामास्तरांच्या शिकवणीतले दोन बोल, जे वाचक संगीताचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता बर्र् का! :)

'आठवणीत आणि स्वप्नात मी तुझ्याच 'छब' मध्ये राहतो गं बये. आता काय नी कसं सांगू तुला..!' :)

आणि ही बया तरी कोण..? तर साक्षात ड्रीमगर्ल हेमा. हो, आमच्या धर्मा मांडवकाराची हेमा! खरंच कमाल आहे बुवा या बाईची. इतकं वय झालं तरी अजूनही काय दमखमातली दिसते!


तर अशी ही दमखमातली हेमा आणि आमचा पिकल्या फ्रेन्च कट मधला गॉगल लावलेला बुढ्ढा जवान बच्चन यांच्यावरचं या गाण्याचं चित्रिकरणही छान. आणि सोबत बच्चनचा सादगीभरा सुरीला आवाज, छान सुरेल लागलेले यमनाचे स्वर आणि हाल ए दिल सांगणारे शब्द..!

विशाल शेखर, तुमचं अभिनंदन आणि कौतुक. अशीच चांगली चांगली गाणी, सुरावटी अजूनही बांधा रे बाबांनो. थांबू नका. हल्लीच्या काळात चांगलं सिनेसंगीत ऐकायला मिळत नाही. आम्ही भुकेले आहोत. चांगली चांगली गाणी बांधा, तुमच्या उष्ट्याकरता नक्की येऊ..!

-- तात्या अभ्यंकर.

October 26, 2011

मोरा गोरा रंग..

माझ्या सर्व मायबाप वाचकांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!

मोरा गोरा रंग.. (येथे ऐका)


थोरल्या बर्मनदांचं बंदिनी चित्रपटातलं एक अप्रतीम गाणं. दिग्दर्शक बिमलदा, गीत- गुलजारसाहेब, संगीतकार थोरले बर्मनदा, सोज्वळ सौंदर्यवती नूतन आणि मा दिनानाथरावांची थोरली हृदया, अर्थात लतादिदि मंगेशकर. (आपल्या महितीसाठी - दिदिचं पाळण्यातलं नांव - 'हृदया' हे होय.)

सगळी टीमच भन्नाट. फक्त आणि फक्त उत्कट कलेशी बांधिलकी असलेली. यातलं ना कुणी त्या बापुडवाण्या झी/सोनी वहिनीच्या उथळ इंडियन आयडॉलच्या स्पर्धेतलं, ना कुणी महागायक/महागयिका, महाराष्ट्राचा गौरव इत्यादी समस चा लाचारी जोगवा मागणर्‍या खेदजनक स्पर्धेतलं. तरीही सारेच अव्वल..!

मोरा गोरा अंग लइ ले
मोहे शाम रंग दइ दे
छुप जाऊँगी रात ही में
मोहे पी का संग दइ दे

एका तरुणीचं मनोगत. लइ ले आणि दइ दे ही क्रियापदं अगदी वळणदार..किती सुरेख शब्द आहेत या गाण्यात! हिंदी भाषेचा गोडवा काही औरच आणि त्यातले लइ दे, दइ दे, हमका बताइ दे इत्यादी उच्चार केवळ दिदिनेच करावेत..

एक लाज रोके पैयाँ
एक मोह खींचे बैयाँ

क्या बात है! जेवढा मोठा मोह, तितकीच मोठी अदब आणि संस्कार..! मोहाने बाही खेचली जातेय परंतु संस्कार पाउलांना थांबवताहेत..! 'एक मोह खिचे पैया' तल्या दिदिच्या कोमल गंधाराबाबत काही भाष्य करायला मी फार छोटा माणूस आहे! 'बैयाँ' शब्दातली 'नीसां' संगती केवळ लाजवाब. आणि त्यानंतरचं दिदिचं 'हाए..!'

असं 'हाए' गेल्या दहा हज्जार वर्षात झालं नाही आणि पुढे होणार नाही..! (जाता जाता - तेच 'हाए' अनुराधा या अप्रतीम चित्रपटात पं रवीशंकरांनी दिदिच्या 'कैसे दिन बिते कैसे बिती रतिया..' या गाण्यात घेतलं आहे!)



जाऊँ किधर न जानूँ
हम का कोई बताई दे

'जाऊँ किधर न जानूँ..' या ओळीतलं कोमल निषाद आणि शुद्ध धैवताचं तसं अनोखं परंतु छान अद्वैत..आणि त्याच नीध चं 'हम का कोई बताई दे' या ओळीनं पंचमावर न्यास करून केलेलं छान समाधान..!

बदरी हटा के चंदा
चुप के से झाँके चंदा

हम्म! इतका वेळ ढगाआड लपलेला चंदा आता हळूच त्या मुलीचं मनोगत ऐकायला आला आहे. प्रकट झाला आहे.

तोहे राहू लागे बैरी
मुस्काये जी जलाइ के

पण तिला ते तेवढंसं आवडलेलं नाहीये. तिच्या चेहेर्‍यावरचा तो लटका राग केवळ क्लास! आणि मग 'तोहे राहू लागे बैरी..' असं म्हणून त्या चंद्राला 'तुझ्यामागे राहूचं शुक्लकाष्ट लागो..' अशी दिलेली प्रेमळ धमकी!

आपले गुलजारसाहेब शनीच्या ऐवजी बहुधा राहूला अधिक घाबरत असावेत. म्हणूनच ते नायिकेकरवी चंद्राच्या मागे चक्क राहूची पीडा लावू इच्छितात..! :)

कुठे अवखळपणा तर कुठे थोडा नखरा, कुठे लटकेपणा तर कुठे 'मोहे पी का संग..' किंवा 'तोहे राहू लागे बैरी..' तली मनलुभावणी मेलडी. एखादं गाणं किती देखणं असावं, सुरेख असावं..?

कहाँ ले चला है मनवा
मोहे बाँवरी बनाइ के

क्या केहेने! इथे किती मोठी गोष्ट सांगून गेलेत गुलजारसाहेब! प्रत्येक तरुणीच्या आयुष्यात असं एक वेडं वय येतं जेव्हा कुणीतरी भेटावसं वाटतं, कुणासोबततरी हातात हात धरून कुठेसं जावसं वाटतं. मस्त वार्‍यावर फडफडणारं मन. अगदी खरोखर 'बाँवरी' बनवणारं ते वय..!

मंडळी, एखादं गाणं आपल्याला ऐकायला आवडतं, कानांना गोड वाटतं. परंतु मी इथे इतकंच सांगेन की आपण त्याही पुढे जाऊन त्या गाण्याकडे कसं बघतो, त्यातल्या स्वरसंगती, न्यासस्वर, लयतालाची बाजू, त्यातले शब्द अन् त्याची चाल कशी समजून घेतो हेही महत्तवाचं आहे. त्यामुळे ते गाणं आपल्याला निश्चितच अधिकाधिक आनंद देऊन जाईल..

उगाच कुठेही गोंगाट नसलेला कमीतकमी वाद्यमेळ, सुंदर शब्द, वजनदार ठेका, तरीही अगदी भरपूर मेलडी असलेलं हे गाणं. नूतनची मोहक छबी आणि तिचा सहजसुंदर गाण्यानुरूप अभिनय. का माहीत नाही परंतु नूतनकडे बघताना मला उगाचंच आमच्या मुमताज जहान बेगम दहलवी 'आपा'ची आठवण झाली! :)

आता कुठे गेली हो अशी गाणी? खरंच, कुठे गेली..? :(

आहे तो केवळ बराचसा गोंगाट अन् मेलडीचा अभाव असलेले भडक वाद्यमेळ..!

असो..

-- (दिदिची व्यक्तिपूजा, विभूतीपूजा करणारा तिचा एक लोटांगणवादी चाहता) तात्या अभ्यंकर.

October 10, 2011

हाथ छुटे भी तो...


आज पुन्हा एकदा खूप काही हरवलं आहे. पोटात खूप काही तुटतं आहे. जगजीत सिंग साहेबांसारख्या एका मनस्वी सुरील्या, भावतरल गळ्याच्या धन्याला आज आपण मुकलो आहोत. एक खूप मोठा कलाकार आज आपल्यातून निघून गेला आहे.

जगजित सिंग यांच्याच एका गाण्याचे रसग्रहण करण्याचा माझा हा एक प्रयत्न. हीच माझी त्यांना विनम्र आदरांजली..!

हाथ छुटे भी तो..!
(इथे ऐका)

'पिंजर' चित्रपटातलं उतम सिंग यांचं संगीत असलेलं जगजित सिंग यांनी गायलेलं हे गाणं. केवळ अप्रतीम. हे गाणं ऐकलं की काव्य, संगीत आणि गायन या सर्वार्थाने एक अत्यंत उच्च दर्जाचं गाणं ऐकल्याचं समाधान मिळतं, जीव तृप्त होतो!

हाथ छुटे भी तो रिश्ते नही छुटा करते,
वक्त की शाख से लम्हे नही टुटा करते!

पुरियाधनाश्रीचे बेचैन स्वर. राग पुरियाधनाश्री. समाधीचा राग..!

'वक्त की शाख से लम्हे..' या ओळीतील 'लम्हे'वर कोमल धैवत विसावतो, उदास सायंकालच्या सावल्या लांबतात आणि ते 'लम्हे' काळजात घर करतात..!

जिसने पैरों के निशा भी नही छोडे पिछे,
उस मुसाफिर का पता भी नही पुछा करते..!

क्या केहेने..! या ओळीचं चित्रिकरण तर विशेष सुरेख आहे!

जिसने पैरो के..' ही ओळ जेव्हा तार षड्जाला स्पर्ष करते तिथे पुरियाधनाश्री जीव कासावीस करतो. ते पुरियाधनाश्रीचं समर्पण! आणि त्यानंतरची पंचामवरची अवरोही विश्रांती. हा खास पुरियाधनाश्रीतील पंचम. प्रार्थनेचा पंचम..! आणि ही सारी जगजितसिंग साहेबांच्या सुरांची आणि त्यांच्या विलक्षण भावपूर्णता असलेल्या ओल्या रसिल्या गळ्याची किमया..!

'छुट गये यार ना छुटी यारी मौला..' चा कोरस सुंदर. कोरसचं सरगम गायनही अगदी परिणामकारक. गाण्याच्या चित्रिकरणातील उर्मिला अभिनयात, दिसण्यात नेहमीप्रमाणेच लाजवाब!

प्रिय जगजित सिंग साहेब,

हाथ छुटे भी तो रिश्ते नही छुटा करते,
वक्त की शाख से लम्हे नही टुटा करते!

खरं आहे आपण म्हणता ते. आज आपण आम्हा सर्वांचा हात सोडून निघून गेला आहात, परंतु आपल्यातलं सुराच नातं कधीही तुटणार नाही. आम्हाला तृप्ती, समाधान आणि आनंद देणर्‍या आपल्या अनेक मैफलींमधले, गायकीमधले लम्हे कधीही पुसले जाणार नाहीत, विसरले जाणार नाहीत.

सुरांनी बांधलेली नाती कधीही तुटत नाहीत हेच खरं..!

-- तात्या अभ्यंकर.