March 31, 2011

पाकसिद्ध बल्लवाचार्य गणपा..!

फाईन आर्टस्. कोणत्या? संगीत, क्रीडा, साहित्य, शिल्प, चित्र, नाट्य आणि सर्वात महत्वाची फाईन आर्ट म्हणजे पाककला..! या कला परमेश्वर सर्वांच्याच हाती देत नाही, देत नसतो. लाखोकऱोडोत एक लता होते, एक भीमण्णा होतात, एक सचिन होतो. त्याचप्रमाणे असंख्य मराठी ब्लॉग्जवर एक ब्लॉग जन्म घेतो - खा रे खा..! आणि या ब्लॉगचा कर्ता असतो माझा मित्र गणपा..!
पाककला, पाककृती, किंवा पाकक्रिया या शब्दांच्याही वरचढ एक शब्द आहे आणि तो म्हणजे पाकसिद्धी..! गणपाचं पाककौशल्य पाहिलं की त्याला या कलेतील सिद्धी प्राप्त झाली आहे असंच म्हणावं लागेल. सिद्धी असल्याशिवाय अशी देखणी, चवदार पाककृती हातातून उतरत नाही. सिद्धीला वयाचं वावडं नसावं आणि म्हणूनच इतक्या तरूण वयात गणपा 'बल्लवाचार्य' या पदास पोहोचला आहे हे सांगायला मला सार्थ अभिमान वाटतो. 'पाककलेतील सिद्धपुरुष', 'बल्लवाचार्य', 'पाकसिद्धीमहामहोपाध्याय' अश्या अनेक पदव्या आमच्या गणपाला शोभून दिसतील..!
गणपाचा खारेखा हा ब्लॉग अक्षरश: बघत राहावा असा आहे. किती नानाविध पदार्थ? तेही सचित्र, सुरेख मांडलेले..! असं म्हणतात की एखादी सुंदर नटलेली, थटलेली बाई डयरेक्ट बघण्यापेक्षा ती जेव्हा तिचा तो साजशृंगार करत असते, तिचा केशसंभार सवारत असते, खोपा घालीत असते, नाकी नथ आणि गोर्‍यापान दंडावर छानशी जाळीदार वाक चढवत असते तेव्हाच तिला पाहावं..! भाईकाका म्हणायचे की गाण्याच्या सुरवातीला जेव्हा वाद्य लागत असतात, तबले-तानपुरे-सारंग्या जुळत असतात ते श्रवणसुख काही औरच..!
त्याचप्रमाणे गणप्याच्या पाककृती जेव्हा जन्म घेत असतात तेव्हापासूनच त्या पाहण्यात खरी गंमत आहे, मौज आहे, आनंद आहे. पाककृतीचं छानसं मांडलेलं साहित्य, नानाविध मसाले, कच्चामाल या सगळ्याची पूर्वतयारी याचेही अगदी स्टेप-बाय-स्टेप सुरेख फोटो गणप्याने दिले आहेत. आणि या सार्‍यासोबत गणपाची पाकवाणीही तेवढीच वाचनीय आणि चवदार .! 
चला आता एक लहानशी सफरच करू या गणपाच्या या ब्लॉगची..
काय? सुरवातीलाच गरमागरम आलूपराठा खायचा म्हणता..? हा घ्या..
हे त्याचं नटणं-थटणं पाहा किती लोभसवाणं..
आणि हा घा तैय्यार आलूपराठा. हा वाढताना गणपा म्हणतो - " ताज्या ताज्या दह्या /लोणच्या बरोबर , आवडी नुसार तळलेल्या / कच्या मिरच्यांसोबत लुफ्त घ्या गरमा गरम आलु के पराठे का " 
आता काय? डायरेक्ट दम बिर्याणी खायची म्हणता? अहो थांबा थांबा, जरा तैय्यार तर होऊ द्या. तिला जरा 'दम'देणं सुरू आहे..! 
हम्म.. आता खा मनसोक्त... 
तुम्हाला जयपूर गायकी आवडते का? म्हणजे तुम्हाला अनवट राग आणि अनवट पदार्थ नक्कीच आवडत असणार..! त्याकरता ही घ्या खास तुमच्याकरता सुरणाच्या वड्यांची देखणी पूर्वतयारी.. तेलात सूर मारण्यापूर्वीचे हे सुरणाचे वडे..! तैय्यार वडे पाहायला तुम्हाला त्या ब्लॉगवरच मी पाठवणार आहे..! 
असो..
अहो इथे किती आणि कशाकशाची झलक दाखवू? अजून खूप खूप खादाडी शिल्लक आहे गणप्याच्या ब्लॉगवर. कुठे युरोपियन डोसाच आहे, तर कुठे इदेचा शीरखुर्मा आहे. कुठे पेपर चिकन आहे तर कुठे शाकाहार्‍यांकरता व्हेज बिर्याणी आणि सुक्या मटणाची व्हेज व्हर्जन आहे. कुठे केळफुलाचे जोरदार कबाबच आहेत तर कुठे देशप्रेम जागृत करणारे तिरंगा कबाब आहेत. मधेच छानशी कोथंबीर वडी सजूनधजून उभी आहे! 
कुठे उडपी उत्तपा हुशारी करतो आहे तर कुठे बोंडाची भाकरी तुमचा जीव एवढुसा करते आहे. कुठे चिकन साते, तर कुठे पात्रानी मच्छी. कुठे लाजवाब वांग्याचं भरीत तर कुठे तुमचा आत्मा थंड करणारी मलई कुल्फी..!
हा ब्लॉग निर्माण करून 'देता किती घेशील दो कराने' अशी तुमची माझी अवस्था करून ठेवली आहे गणप्याने! खरंच खूप कौतुक वाटतं, कमाल वाटते..!
या ब्लॉगवर वावरत असताना सतत कुठेतरी एक प्रसन्नता डोकावत असते. ती एकापेक्षा एक अजोड पाकशिल्प पाहताना त्या मागे असलेला दैवी परीसस्पर्श सतत जाणवतो..
आमचे अण्णा माडगुळकर म्हणतात-
या वस्त्राते विणतो कोण?
एकसारखी नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्‍याचे..!
त्याचप्रमाणे गणप्याच्या पाककृतींमागे असलेले साक्षात आई अन्नपूर्णेचे अदृष्य हात आपल्याला दिसत नाहीत इतकंच..!
-- तात्या अभ्यंकर.

March 29, 2011

मोहाली उपान्त्य सामना आणि मनमोहन सरकारची लाचारी...!


चेंडुफळीच्या विश्वचषक स्पर्धेत भारत-पाक हा सामना उद्या मोहालीत होणार आहे त्याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही. दोन्हीही संघ आयसीसीचे सभासद असल्यामुळे व हा सामना विश्वचषकातीलच एक असल्यामुळे त्याला आमचा विरोध नाही व तो करण्याचे काही कारणही नाही. आमचा मुद्दा वेगळाच आहे.
भारतासारख्या सार्वभौम देशाच्या पंतप्रधानांनी पाकच्या राष्ट्रप्रमुखांना हा सामना पाहण्याकरता मोहालीत येण्याचे जे प्रेमाने आणि उमाळ्याने आमंत्रण दिले आहे त्याबद्दल आम्ही अतीतीव्र शब्दात आमचा निषेध नोंदवतो. आमच्या मते भारतीय पंतप्रधानांचे हे अत्यंत लाचारीचे वर्तन आहे.
भारताच्या या निमंत्रणावर पाकने म्हणे अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. भारताची हद्द ओलांडून चुकून पाकिस्तानात घुसलेल्या गोपालदास नामक (चूभूदेघे) एक इसमाला पाकने त्यांच्या कैदेतून तात्काळ मुक्त केले आहे...!
यावर आम्ही भोळसट भारतीयांनी खुश व्हावे आणि मनमोहन सरकारची पाठ थोपटावी अशी सरकारची अपेक्षा आहे काय..?
सकारात्मकच जर प्रतिसाद द्यायचा असेल तर मग पाकने कसाबबद्दलची सगळी माहिती तात्काळ का नाही उपलब्ध करून दिली..? खंडणीची दहशत, गँगवॉर या सारखी कारस्थाने करून गेली अनेक वर्षे डोकेदुखी ठरलेल्या व सध्या पाकिस्तानात लपलेल्या दाऊद इब्राहिमला रातोरात भारताच्या हवाली का नाही केले..?
आम्ही असा अजून किती काळ लाचारीच्या मित्रत्वाचा हात पाकपुढे पसरणार आहोत? आणि का? कशासाठी..?
पाकच्या पंतप्रधानांना मोहालीत मारे प्रेमाचे आणि मैत्रीचे आमंत्रण देणारे पंतप्रधान मनमोहनसिंग मुंबै हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या संदीप उन्नीकृष्णनच्या घरी सांत्वनासाठी कधी गेले होते का हो..?
मुंबै सी एस टी स्थानकात, गेटवेला रक्ताची होळी खेळणार्‍या पाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखांपुढे ही लाचारी का..?
परंतु ज्या देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती एका इटालीयन मूळ असलेल्या स्त्रीकडून लीलया ठरवले जातात, स्थापित केले जातात त्या देशाला स्वाभिमान तरी का असावा..?
असो..
-- तात्या अभ्यंकर.
--
आई अंबे जगदंबे जातो सत्कर्मी जय दे
रिपुदमनाचा आईभवानी आम्हाला वर दे..!
(चित्रपट २२ जून १८९७)

March 28, 2011

नाविका रे...

नाविका रे, वारा वाहे रे,
डौलाने हाक जरा आज नाव रे..
(येथे ऐका)
 हे सांगतांना त्या नविकाबद्दल एक विश्वास आहे. जणू काही तो नाविक कुणी माहेरचाच मनुष्य आहे, ज्याला विश्वासाने काही सांगावं!
डौलाने हाक जरा आज नांव रे..!
मग? मला जायचंय पैलतिरी असलेल्या माझ्या घरी! छान वारा वाहतोय, सुंदर मूड आहे. मनी एखादी आस असली तरी सुंदर मूड तयार होतो, अन् त्या मुडातूनच मनीचं गुज सहजासहजी असं ओठांवर येतं, एखाद्या नाविकासमोर उघड होतं!
मग नाव कशी हाकायला हवी? डौलानेच ना? 
त्यामुळे 'डौलाने हाक जरा आज नांव रे..' ही ओळही तशीच डौलदार वाटत. ज्या डौलाने नाव हाकणं अपेक्षित, तोच डौल त्या ओळीतही! की त्या ओळीतल्या डौलामुळे नाव खरोखरच डौलदारपणे हाकायला हवी हे पटतं? की हेच गाण्याचे शब्द अन् त्याची चाल यांचं अद्वैत?
सांजवेळ झाली आता पैल माझे गाव रे..!
'पैल माझे गाव रे..' हे सागताना 'अरे समजून घे रे जरा, तीन सांजा झाल्या अन् पैलतीरी असलेल्या माझ्या गावाला मला लौकर जायचंय रे.. अशी समजावणी, एक आर्जव! आणि कुण्या जवळच्या सुहृद मित्राला सांगावं असा विश्वास..! एका नाविकाचं आणि स्त्री प्रवाश्याचं इतकं सुंदर नातं असू शकतं? धाकल्या दिरासारखं किंवा पाठच्या भावासारखं!
आषाढाचे दिसं गेले, श्रावणाचा मास सरे, भादवा आला
माझा राऊ मनामंदी बोलुनि गेला
धाव घेई बघ माझे मन, नाही त्याला ठाव रे...!
काय संवाद साधला माझ्या राऊनी माझ्यापाशी? आता तो संवाद त्या नाविकाला सांगायचाय! 'पैल माझे गाव रे..' ह्या आर्जवाने त्याला कधीच आपलासा केलाय! मग आता मनातल्या राऊचे संवाद त्याला सांगायला काय हरकत आहे अशी एक स्वाभाविकता..!
आषाढ गेला, श्रावण गेला अन् आता भादवा आला! भादवा हा शब्द असा गाऊन ठेवलाय की त्या एका शब्दात आषाढ आणि श्रावणाची प्रतिक्षा उभी केली आहे! आषाढ-श्रावणातली ती मौनप्रतिक्षा अखेर झालीच शेवटी प्रकट भादवा या शब्दातून..! 
एक म्हणणं मांडलं आहे 'भादवा' ह्या शब्दातून..!
आणि आता नावेत बसल्यावर अवचित त्या नाविकासमोर आषाढ-श्रावणातला विरह ओठी आला आहे!
भादवाही येऊन उभा राहिला आहे त्यामुळे आता पुढल्या अश्विनातलं शरदाचं चांदणं अन् अश्चिनातल्या पौर्णिमेची आस आता चांगलीच जाणवू लागली आहे! आता नाही धीर धरवत..!
नेमकं हेच जाणवतं का हो 'धाव घेई बघ माझे मन, नाही त्याला ठाव रे...!' या ओळीतनं? Smile
असो..

एक हृदयाला हात घालणारं गाणं! एखाद्या सर्जनशील, संवेदनशील चित्रकराला हे गाणं नुसत ऐकून हातात कुंचला घ्यावासा वाटेल आणि त्याच्या कॅन्व्हासवर डौलाने जाणारी ती छानशी शिडाची होडी उतरेल, मंद वारा वाहणारी ती सांजवेळ उतरेल.. त्या चित्रात पार्श्वरंग असतील भादवा आला ह्या म्हणण्याचे आणि असेल एक ओढ लगोलग येऊ घातलेल्या अश्विनातली...!
-- तात्या अभ्यंकर.

March 22, 2011

सजदा..

माय नेम इज खान सिनेमातलं एक वेगळंच गाणं. सुफी संगीताची पार्श्वभूमी असलेलं..
(येथे ऐका)

रोम रोम तेरा नाम पुकारे
एक हुए दिन रैन हमारे..

मिश्र खमाज म्हणता यावा अशी गाण्याची खानदानी सुरवात. (चूभूदेघे.)

'सजदा..'

ख्यालसंगीताची उत्तम बैठक असलेला राहत फतेचा आणि रिचा शर्माचा अविष्कार. आवाजाची जात, फेक ही सारी सुफी गायकीत जमा होणारी. सुरवतीची बोल आलापी संपल्यानंतर गाणं छानशी लय पकडतं..

तेरी काली अखियोसे जिंद मेरी जागे
धडकन से तेज दौडू सपनो से आगे..

शब्द आणि त्यांचा लहेजा उत्तमच..

अब जा लुट जाए
ये जहा लुट जाए..

यातली 'जहा' शब्दावरची जागा आणि गायकी खानदानी..! इथून पुढे गाणं केरव्याची छान लय पकडतं...

'संग प्यार रहे मै रहू ना रहू...'

या ओळीतली सुरावट म्हणजे या गाण्याचा प्राण, त्याचं मर्मस्थान. 'संग..' शब्दातली 'रेम'म' संगती आणि 'रहू ना रहू..' मधली 'रेग, गमधपरेसा..' ही संगती केवळ अप्रतिम..! त्यानंतरचा 'सजदा..' चा कोरसही सुरेख. त्याच्या पार्श्वभूमीवरील सजदा शब्दाची तार शड्जाशी संगती करणारी बोल आलापी आणि गायकी उत्तमच..
रिचा शर्मा या गायिकेची जोडही उत्तम. बाईनं खानदानी आवाज लावला आहे. नक्कीच सुरेल आहे. ही दुगल गाण्याला आवश्यक आणि तेवढीच शोभूनही दिसणरी..

एकंदर पाहता गाण्याला लाभलेली अभिजात गायकीची बैठक नक्कीच कौतुकास्पद आहे..शंकर एहेसान लॉयचं कौतुक वाटतं..

रांझणा नैनो के तीर चल गये
साजना सासो दिल सिल गये..

यातला शुद्ध मध्यम नेहमीप्रमाणेच अद्भूत आणि सुख देणारा..



शाहरुख हा इसम आवडतो मला. लेकाचा तसा प्रो मुस्लिम आणि पाक-धार्जिणा वाटतो पण आवडतो मला. हा प्राणी टॅलेन्टेड आहे हे माझं मत. आणि आमच्या तनुजाच्या काजोलबद्दल काय बोलू? लै आवडते ती मला. हल्लीच्या नट्यांपैकी अभिनयाच्या बाबतीत एक तब्बू मला पयला नंबरवर आवडते आणि त्यानंतर काजोल. काजोलच्या चेहेरा विलक्षण बोलका आहे. तिचे यजमानही मला आवडतात. गंगाजल मध्ये छान काम केलं होतं त्यांनी..!

असो, सिनेमाच्या गप्पा पुन्हा केव्हातरी. तूर्तास सजदा हे गाण ऐका. छानच गाणं आहे..

-- तात्या अभ्यंकर.

March 20, 2011

वसंता पोतदार..!

अण्णांना जाऊन आता जवळ जवळ दोन महिने पूर्ण होतील. अण्णा गेले तेव्हादेखील मनात कुठेतरी वसंताचीही आठवण झाली. वसंता अण्णांच्या बराच आधी गेला होता.

वसंता पोतदार!

"ए तात्या, मला चक्क 'अरे वसंता' असं म्हणायचं बरं का! वसंतराव किंवा अहो-जाहो ची भानगङ नाय पाहिजे!"
वास्तविक वसंता माझ्यापेक्षा वयाने. ज्ञानाने कितीतरी मोठा! तरीही मी त्याला केवळ त्याच्या आग्रहाखातर 'वसंता' अशी एकेरीच हाक मारायचा.

अण्णांचं गाणं आणि त्यावर आत्यंतिक प्रेम हाच माझ्या आणि वसंताच्या मैत्रीचा मुख्य मुद्दा. अण्णांच्या गाण्याला वसंता अनेकदा भेटायचा आणि मग गप्पा रंगायच्या, धमाल चालायची!

वसंता हा अत्यंत व्यासंगी आणि विद्वान माणूस. एक चांगला लेखक, उत्तम वक्ता! स्वामिजींवरचं 'योद्धा सन्यासी', भाईकाकांवरचं 'एका पुरुषोत्तमाची गाथा', गाडगेबाबांवरचं 'तोचि साधू ओळखावा', अण्णांवरचं 'भीमसेन' ही त्याची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. वसंता स्वामिजींवर व्याख्यानही फार छान द्यायचा.
अण्णांवर पुस्तक लिहिण्याकरता म्हणून वसंता काही काळ सतत अण्णांसोबत असे. आणि अण्णांचं मुंबईत कुठेही गाणं असलं म्हणजे तिथे माझी हजेरी ही असायचीच. त्यातूनच माझी आणि वसंताची ओळख झाली, परिचय वाढला, दोस्ताना वाढला.

एकदा एका कार्यक्रमाच्या वेळी ग्रीनरूममध्ये साक्षात अण्णांनीच,

"हे अभ्यंकर. मुंबैच्या हायकोर्टात वकील आहेत आणि आमचे चाहते आहेत..!"
(मी मुंबैच्या हायकोर्टात वकील आहे हा अण्णांचा समज शेवटपर्यंत तसाच होता. मी एकदोनदा खुलासाही करून पाहिला होता. असो.)
तर,"हे अभ्यंकर. मुंबैच्या हायकोर्टात वकील आहेत आणि आमचे चाहते आहेत..!" अशी आपल्या खर्जातल्या धीरगंभीर आवाजात अण्णांनी वसंताला माझी ओळख करून दिली होती. वास्तविक मी अण्णांच्या लाखो भक्तांपैकीच एक, तसा नगण्यच! परंतु साक्षात अण्णांनीच ओळख करून दिल्यावर आणखी काय पायजेल?!

"क्या बात है, मिलाव हाथ!"

हे त्यावेळचे वसंताचे मनमोकळेपणे आणि आनंदाने उच्चारलेले शब्द मला आजही आठवताहेत!


एका कार्यक्रमानंतर चालायला त्रास होत असल्यामुळे मी आणि वसंता अण्णांना सोबत घेऊन जात आहोत.

त्यानंतर मुंबैतल्याच अण्णांच्या एका चाहत्याच्या घरी अण्णांचा मुक्काम होता. त्या घरी जाऊन विसावतो न विसावतो तोच बुवांचा पुन्हा मूड लागला आणि तंबोरे गवसणीच्या बाहेर निघाले! आणि काय सांगू मंडळी, पुन्हा एकदा जमलेल्या त्या बहारदार मैफलीबद्दल! अण्णांनी आमच्या पुढे दरबारीचा अक्षरश: महाल उभा केला होता! ऐकायला गिनेचुने श्रोते. भाईकाकांच्या शब्दात सांगायचं तर बेहोश झाला होता सारा मामला! वसंता आणि मी बाजूबाजूला बसलो होतो आणि अण्णांच्या दरबारीच्या सुरासुरांवर जीव ओवाळून टाकत होतो!

असो,

आज वसंता हयात नाही, अण्णाही गेले.

आठवणी फक्त उरल्या आहेत..!

-- तात्या अभ्यंकर.

March 17, 2011

जीव झाडाले टांगला...!

अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला..!

यशवंत देवांनी संगीत दिलेलं आणि उत्तरा केळकरांनी गायलेलं हे अप्रतीम गाणं इथे ऐका!

खोपा हे वास्तविक सुगरणीचं घर, घरटं! त्या घरट्याला झोक्याची किती सुंदर उपमा बहिणाबाईंनी दिली आहे! एखाद्या घरट्याला तुम्हीआम्ही झोका, झोपाळा असं म्हणू शकतो का हो? परंतु बहिणाबाई त्याला किती सहजपणे झोक्याची उपमा देतात! क्या केहेने..!

पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला

झुलता बंगला?!

एखाद्या झाडावरील सुगरण पक्ष्याच्या घरट्याला बहिणाबाई 'बंगला!' असं संबोधतात! किती ही शब्दांची श्रीमंती, मनाची श्रीमंती! तुम्हीआम्ही एखादा बंगला बांधतो आणि 'आमचा काय, बंगला आहे बॉ!' म्हणून स्वत:चं आणि स्वत:च्या बंगल्याचं कित्ती कित्ती कौतुक करत बसतो..! परंतु बहिणाबाई मात्र त्या खोप्याला अगदी सहजपणे बंगला असं संबोधून जातात! प्रत्यक्षात एखाद्या बंगल्यात स्वत: बहिणाबाई तरी कधी गेल्या असतील का हो?


आणि बंगला कसा? तर झुलता बंगला! बहिणाबाईंनी सुगरणीला नुसत्या नव्हे तर झुलत्या बंगल्याचं आर्किटेक्ट बनवलं आहे!

तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला

नि:शब्द...!!!

'जीव झाडाले टांगला' ह्या ओळीतील 'झाडाले' या शब्दात यशवंत देवांनी किती सुरेख आस ठेवली आहे! क्या बात है...!

अहो त्या सुगरणीची पिल्लं असतात हो त्या खोप्यात! का नाही तिचा जीव टांगणीला लागणार? एखादी चाकरमानी स्त्री जेव्हा स्वत:च्या चार सहा महिन्याच्या पिल्लाला एखाद्या पाळणाघरात ठेऊन आठ आठ दहा दहा तास घराच्या बाहेर असते तेव्हा तिचा जीवही त्या पिल्लाकरता टांगणीला लागतच असेला ना? मग सुगरणीचा का बरं लागू नये? भले मग ती पिलं एखाद्या झुलत्या बंगल्यातच का असेनात!

जीव झाडाले टांगला ह्या ओळीतली आस, ममत्व यामुळे गाण्यात ही ओळ ऐकतांना क्षणात डोळ्यात पाणी येतं, क्षणभर का होईना, परंतु जिवाची घालमेल होते!




त्या सुगरणीचा खोपा हा शब्दश: झाडाला टांगलेला असतो..

'लौकर ये बाबा, उगाच जीव टांगणीला लावू नकोस..' असं आपण नेहमी म्हणतो. इथे बहिणाबाईंनी हा वाक्प्रचार किती सुंदररित्या कवितेत वापरला आहे!

असो...

पुढल्या कडव्यांबद्दलचं रसग्रहण/प्रवचन पुन्हा कधितरी! आज जरा मूड लागला म्हणून तात्याने ह्या वेड्यावाकड्या चार ओळी खरडल्या आहेत. तुम्हाला आवडल्या तर छानच, नाय आवडल्या तर राहिलं!

जीव झाडाले टांगला.. ही ओळीला, त्याच्या चालीला, त्यातल्या गायकीला आपला सलाम..!

बराय तर मंडळी, आता आपला निरोप घेतो.. पुढची कविता तात्यामास्तरांकडून पुन्हा केव्हातरी शिका!

घरट्याची उब ती घरट्याचीच उब! मग ते उबदार घरटं कुणा तुमच्याआमच्यासारख्यांचं असो, काऊचिऊचं असो, वा बहिणाबाईंच्या लाडक्या कुण्या सुगरणीचं असो. पंचतारांकीत हाटेलातल्या सुसज्ज खोल्यांना त्याची सर नाही!

-- तात्या अभ्यंकर.

March 04, 2011

मंगेश....!

राम राम मंडळी,

तानपुरा, तंबोरा...!

आपल्या भारतीय संगीताचा आधार...!



आपलं भारतीय अभिजात संगीत हे अक्षरश: तानपुर्‍याच्या चार तारांवर उभं आहे असं म्हटल्यास ती अतिशोयोक्ति ठरू नये...

या वाद्याचा इतिहास काय, जन्म केव्हा, याबद्दल मला माहीत नाही. परंतु गेली २५ वर्ष तरी मी हे वाद्य हाताळतो आहे, या आधारावर तानपुर्‍याविषयी ढोबळ असे माहितीप्रद चार शब्द लिहू इच्छितो म्हणून या लेखाचे प्रयोजन..!

ही माहिती मला पं अच्युतराव अभ्यंकर, किराणा गायकीचे दिग्गज पं फिरोज दस्तूर, स्वरभास्कर पं भीमसेन जोशी यांच्याकडून मिळालेली आहे. त्याचप्रमाणे मिरज या बीनकारांच्या माहेरघर असलेल्या शहरातील काही कारागिरांकडूनही मला या वाद्याविषयी, विशेष करून याच्या ट्युनिंगविषयी खूप काही शिकायला मिळालं आहे. हा लेख लिहितांना मी या सर्वांचे ऋण व्यक्त करू इच्छितो...

१) तानपुर्‍याच्या खुंट्या.



तानपुरा लावताना (ट्यून करताना) सर्वप्रथम या खुंट्यांचा वापर केला जातो. तानपुरा खूप उतरला किंवा चढला असल्यास ज्या स्वरात तो लावायचा असेल (उदा काळी ४/५, १/२, पांढरी ४ इत्यादी,) त्या स्वरात लावण्याकरता या खुंट्यांचा वापर केला जातो..

२) तानपुर्‍याचा भोपळा.



तानपुरा या वाद्याचा जो आवाज असतो तो आवाज येण्याकरता हा भोपळाच अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो. तानपुर्‍याची तार छेडल्यावर त्यातनं जो टणकार उमटतो तो टणकार या पोकळ भोपळ्यात घुमतो आणि एका घुमार्याच्या स्वरुपात हा आवाज आपल्याला ऐकू येतो..

तानपुर्‍याकरता लागणार्या भोपळ्यांची विशेष मशागत केली जाते. त्यानंतर ते भोपळे ७५ टक्के कापून त्यातील मगज बाहेर काढला जातो व ते रिकामे भोपळे कडकडीत उन्हात वाळवले जातात..

३) घोडी किंवा ब्रिड्ज.



ह्याला तानपुर्‍याचा प्राण म्हणता येईल. तानपुर्‍याच्या तारा ह्या खुंटी ते भोपळ्याची मागील बाजू, अश्या बांधलेल्या असतात. त्या तारा ह्या घोडीवरून गेलेल्या असतात. तार छेडल्यानंतर तारेतून टणकार उत्पन्न करण्याचं काम ही घोडी करते.

४) जवार आणि मणी.



जवार किंवा जवारी हिला तानपुरा वादनात अनन्यसाधारण महत्व आहे. आपण जर वरील चित्र नीट पाहिलंत तर त्यात तानपुर्‍याच्या तारा आपल्याला घोडीवरून गेलेल्या दिसतील आणि घोडीच्या मधोमध तारेच्या खाली आपल्याला एक बारील दोरा दिसेल. तानपुर्‍यातून गोळीबंद व गोलाकार आवाज येण्याकरता हा दोराच अत्यंत महत्वाची भूमिका निभावतो. त्याकरता तानपुर्‍याची घोडी कानसेने, पॉलिश पेपरने एका विशिष्ठ पद्धतीने घासावी लागते. ह्यालाच तानपुर्‍याची 'जवार काढणे' असे म्हणतात. हे अत्यंत कठीण काम आहे. ही जवार अतिशय सुपरफाईन पद्धतीने काढावी लागते. त्यामुळे दोरा तारेतून आत सरकवल्यावर घोडीच्या मध्यभागी एका विशिष्ठ ठिकाणी अडतो आणि बरोब्बर त्याच जागेवर तार छेडली असता घोडीतून गोलाकार, गोळीबंद असा टणकार उत्पन्न होतो. हा दोरा घोडीच्या एका ठराविक जागी असतांनाच तानपुर्‍यातून सुरेल व मोकळा टणकार ऐकू येतो. ह्यालाच "जवारी लागली" असे म्हणतात.

जमिनीत काही अंतरावर खोदकाम केल्यावर जसा छानसा पाण्याचा झरा लागतो, अगदी तीच उपमा "जवारी लागण्याला" देता येईल! हा दोरा जरा थोडासा जरी आपल्या जागेवरून हालला तर तारेतून मोकळा टणकार उत्पन्न न होता बद्द आवाज ऐकू येतो. जवारीच्या जागी उत्पन्न झालेला टणकार पोकळ भोपळ्यात घुमून त्या भोपळ्यातनं अतिशय सुंदर असा गोलाकार ध्वनी ऐकू येतो...!

वर उल्लेख केल्याप्रमाणे तानपुरा कारागिरीत पिढ्यान पिढ्या असलेले मिरजेतील काही कारागीर, दस्तूरबुवा यांच्याकडून मला जवारी काढण्याचे धडे मिळाले हे माझं भाग्य! काही वेळेला अण्णांकडूनही मला उत्तम जवारी कशी असावी, कशी लावावी, तानपुरा कसा गोळीबंद बोलला पाहिजे, कसा मिळून आला पाहिजे याबाबत थोडंफार शिकायला मिळालं आहे!

घोडीच्या पुढे दिसणारे मणी हे तानपुर्‍याच्या फाईन ट्युनिंगकरता वापरले जातात. स्वरांचे सूक्ष्म फरक या मण्यांच्या साहाय्यानेच सुधारले जातात.

५) तानपुर्‍याचे लागणे.

अरे देवा! हा तर खूप म्हणजे खूप मोठा विषय आहे आणि याबाबत अधिकारवाणीने काही लिहिणे ही माझी पात्रता नाही! उत्तम तानपुरा लावणे ही आयुष्यभर करत रहायची साधना आहे.

असो, इथे फक्त ढोबळ मानाने इतकंच लिहू इच्छितो की तानपुर्‍याच्या पहिल्या तारेवर रागानुसार मंद्र पंचम, किंवा मंद्र शुद्ध मध्यम, किंवा मंद्र शुद्ध निषाद लावला जातो, मधल्या दोन तारांना 'जोड' असं म्हणतात आणि या तारांवर मध्य षड्ज लावला जातो आणि शेवटची तार ही खर्जाची असते आणि त्यावर खर्जातला षड्ज (मंद्र षड्ज) लावला जातो. शेवटची खर्जाची तार ही नेहमी तांब्याची असते आणि इतर तीन तारा या स्टीलच्या असतात.

वर उल्लेखलेल्या गुरु मंडळींकडून थोडाफार तानपुरा लावायला शिकलो आहे, त्याची एक झलक आपल्याला इथे पाहता येईल..


असो,

तर मंडळी, असं हे एक ढोबळ तानपुरा आख्यान! उत्तम जवारीदार तानपुरा लागणे आणि त्यावर त्याच तानपुर्‍याशी मिळताजुळता, एकरूप होणार स्वर मानवी गळ्यातून उमटणे ह्याला मी तरी केवळ अन् केवळ "देवत्वा"चीच उपमा देईन..

सुरेल तानपुर्‍याइतकेच सुरेल बाबुजी!



स्वरभास्कर तानपुरा जुळवताहेत...!


मंडळी, असं म्हणतात की तानपुर्‍यात ईश्वर वास करतो. काही ठिकाणी अशीही मान्यता आहे की तानपुरा हे शंकराचं रूप आहे! ह्यातला आध्यात्मिक किंवा खरंखोटं, हा भाग सोडून द्या कारण या लेखाचा तो मुख्य मुद्दा नाही. परंतु गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या लहानपणीची एक आठवण या निमित्ताने जाता जाता सांगाविशी वाटते...

लतादिदींना लहानपणी अगदी थोडा म्हणजे अगदी थोडा काळ त्यांच्या वडिलांकडून - मास्टर दिनानाथरावांकडून गाण्याचं शिक्षण मिळालं. मास्टर दिनानाथ नेहमी लतादिदींना म्हणत,
"तो तानपुरा आहे ना, तो मंगेश आहे बरं का! त्यावर नेहमी श्रद्धा ठेव, तो तुला निश्चित प्रसन्न होईल...!



-- तात्या अभ्यंकर.

February 26, 2011

हमने उनको भी छुप छुप के आते देखा इन गलियोमे..!

"तात्यासेठ, अभि ये महिनेमे मेरे बँकमे रख्खे हुए ३०००० रुपये मिलेंगे ना?"


"हा. क्यू नही मिलेंगे? जरूर मिलेंगे. डबल ढक्कनको बोल दुंगा!"


शबनम मला विचारत असते. तिला आता तिच्या मुलीकरता काही चांगले कपडे घ्यायचे असतात, ती चाहेल तो खाऊ द्यायचा असतो, कपडे घ्यायचे असतात, मायलेकींना मुंबैत जरा मजा करायची असते.


शबनम..!


मी तसा कडमड्या हौशी गाणारा.. चार मित्रांनी जरा हरबर्‍याच्या झाडावर चढवायचा अवकाश, की लग्गेच मी नरडं साफ करायला घेतलंच म्हणून समजा! आता माझ्यासारख्या बेसुर्‍या, बेताल गवयाला काय गोविंदराव पटवर्धन साथीला मिळणार?! :)


त्यामुळे माझे बाजिंदे-साजिंदेही अगदी माझ्याचसारखे शिकाऊ. शकीलभाय पेटीवाला त्यातलाच एक. दोन तीन वर्षांपूर्वी बनारसी चाळीतल्या या शकीलभाय बाजेवाल्याने माझी आणि शबनमची ओळख करून दिली होती. काँग्रेस हाऊस आणि फोरासरोडवरच्या बनारसी चाळीत जिथे मुजरा होतो तिथे शकील भाय हार्मोनियम वाजवतो, चांगली वाजवतो. शकीलभाय हा शबनमचा मामू, की असाच कुणी सगेवाला.


"तात्याभाय, ये शबनम. इसको अच्छा पैसा मिलता है, अच्छा नाचती है. इसकू जरा तुम्हारा एल आय सी का पॉलिसी लेके देव!"


त्या दिवशी प्रथमच मी शबनमचा मुजरा पाहिला. छान दिसत होती, नाचतही छान होती. त्या बैठकीत दोनचार अय्याश लोक बसले होते, ते पैसे उडवत होते! ती मंडळी निघून गेल्यानंतर शबनमने माझ्याकरता आणि शकीलकरता चहा मागवला. मग एल आय सी पॉलिसी म्हणजे काय? विमा म्हणजे काय? कसे आणि किती वर्ष हप्ते भरावे लागतील, लाईफ-कव्हर म्हणजे काय?, इत्यादी सर्व सर्व गोष्टींवर मी तिचं भरपूर बौद्धिक घेतलं. समुपदेशनच म्हणा ना!


शबनम तशी अशिक्षितच. ज्या समाजात, ज्या वस्तीत, ज्या लोकात वाढली तो समाजही अशिक्षितच. तिला माझं बोलणं समजत होतं आणि नव्हतंही! शेवटी मी तिला त्या एरियाच्या, खास बंबिय्या-हिंदीत समजाऊन सांगितल्यावर तिला माझं म्हणणं पटलं असावं!


"देख, अभि साला तेरी चमडी टाईट है, थोबडा ठीक है, जवानी है तबतक तेरे मुजरेपे पैसा उडेगा. एक बार चमडी उतर गयी तो साला कुत्ताभी तेरेको पैसा नही देगा. यही सब यहा बैठे हुए ऐय्याश रंडीबाज तब तेरेपे थुकेंगे भी नही! किसी और कच्ची कली, आयटम को पैसा देंगे. तब क्या करेगी? कहासे लाएगी पैसा? क्या खाएगी?"


इतक्या कडक आणि हेटाळणीभरल्या शब्दात सुनावल्यावर शबनम भानावर आली. तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं! त्यानंतर तिला मी विम्याच्या, पोस्टाच्या मासिक बचत योजनेच्या काही स्कीम्स समजावून सांगितल्या. आयूर्विमा महामंडळाची न्यू जनरक्षा पॉलिसी तिला दिली. डबल ढक्कनला सांगून मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या डेली रिकरींगच्या बचत योजनेत तिला पैसे गुंतवायला लावले. डबल ढक्कन हा प्राणी त्या बँकेचा दलाल आहे. हा इसम पूर्वी दिवसरात्र गांजा पिऊन फोरासरोडवर, फॉकलंडरोडवर पडलेला असायचा. मीच त्याला त्या बँकेचा दलाल बनवला. डबल ढक्कन तसा वल्ली माणूस. त्याचे व्यक्तिचित्र पुन्हा केव्हातरी!


दरम्यानच्या काळात विम्याच्या वगैरे कामानिमित्त माझी आणि शबनमची काही वेळा भेट झाली. एकदोन वेळेला मी तिला बाकायदा दिल्ली दरबार हाटेलात बिर्याणी खायलाही घेऊन गेलो आहे. 'हा माणूस मादरचोद नाही आणि याला आपल्यासोबत गेम वाजवण्यात काहीही इंटरेस्ट नाही!' असा कुठेतरी एक विश्वास, एक खात्री तिला होती/आहे! कारण ती ज्या दुनियेत वावरते त्या दुनियेत बाहेरच्या सभ्य, सुशिक्षित, पांढरपेशा समाजातले लोक तोंडं लपवून, कुठे काही चान्स मारायला मिळतो का, या एकाच हेतूने येतात. हो, तोंडं लपवून! घरच्या बायकोवर त्या मायझव्यांचं समाधान होत नाही. 'अमर प्रेम' मधली किशोरदाने गायलेली, 'हमने उनको भी छुप छुप के आते देखा इन गलियोमे..!' ही ओळ मी तिथे येणार्‍या काही पांढरपेशा पब्लिकच्या बाबतीत अनुभवली आहे!


तर काय सांगत होतो?


आमची शब्बो तशी हुशार, व्यवहारचतूर परंतु अत्यंत अबोल. बोलेल तेही अगदी हळू आवाजात. स्वभावाने तशी खरच खूप चांगली आहे. पण नशीबाने तिला त्या बाजारात बसवली. तिची आई याच धंद्यातली. बनारसला कोठेवाली होती. काही वर्षांपूर्वी ती लहानग्या शबनमला घेऊन मुंबैत आली. शबनम १५-१६ वर्षाची झाली, जवानीत आली आणि आपसूकच या धंद्यात आली!


अहमदाबादचा पन्नाशीतला कुणी करोडपती जगनसेठ एकदा काँग्रेस हाऊस मध्ये मुजरा ऐकायला आला होता. सोळा-सतरा वर्षाच्या शब्बोरानीवर नजर गेली त्याची. पैसे उडवू लागला तिच्यावर. अडनिड्या वयातली शबनमही भाळली त्याच्यावर. आणि एकेदिवशी बाकायदा नथ-उतरणीचा कार्यक्रम ठरला. शबनमला चुरगाळण्याचे एक लाख रुपये ठरले. खुद्द तिच्या आईनेच सौदा ठरवला आणि पैसे घेतले. आता बोला..!


एकदा चव घेतल्यावर तो जगनसेठ येईनासा झाला! पन्नाशीतला जगनसेठ मुलीच्या वयाला शोभेल अश्या शबनमला भोगून दुसरीकडे हुंगेगिरी करायला चालता झाला! शबनमला दिवस राहिले. नथ-उतरणीच्या संबंधातून जर दिवस राहिले तर होणारं मुल फारच मुबारक! त्यातून मुलगी झाली तर फारच छान. कारण ती जवान होऊन पुढे घराणं चालवेल अशी मुजरेवाल्या/कोठेवाल्या दुनियेची धारणा!


शबनमला मुलगी झाली. जगनसेठने दिलेले पैसे संपले. शबनम पुन्हा कोठ्यावर हजर! आता तिची मुलगी मोठी होते आहे. आईचं म्हारातपण आहे, औषधपाणी आहे. जिंदगी सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे..!


काहीच दिवसांपूर्वी शबनमच्या त्या 'मुबारक ' (?) औलादीचा जनमदिन होता म्हणून तिने मला जेवायला बोलावलं होतं. मटणकुर्मा-पराठे असा बेत होता. दोन पेगही झाले तिथे. तिची आईही होती तिथे. जनरली कुठल्याही वडिलधार्‍या माणसाला प्रथम भेटलं की वाकून नमस्कार करायची सवय आहे मला. परंतु मुलीच्या नथ-उतरणीचे लाख रुपये घेतलेल्या त्या बाईला बघितल्यावर नमस्कार तर सोडाच, उलट घृणा आली मला तिची! पण कुणाला दोष देणारा मी कोण? काय अधिकार मला? 'शबनमके मेहमान!' म्हणून त्या बाईने पाहिलं मला आणि लाचारपणे हसली. घृणेची जागा किवेने घेतली!


शबनमची पोरगी गोड आहे! कधी कधी विचार केला की वाटतं की त्या जगनसेठला का दोष द्यावा? त्याने सौदा केला होता, लाख रुपये मोजले होते! तरीही मनातल्या मनात त्या जगनसेठला शिव्याशाप देत मी त्या निष्पाप चिमुरडीच्या हातात शंभराची नोट ठेवली!




आता लौकरच शबनमचं डेली रिकरींग डिपॉझिट मॅच्युअर होणार आहे. तिला ३०००० रुपये मिळणार आहेत. मी तिला पुन्हा ते डिपॉझिट कंटीन्यू करायला सांगणार आहे. पण सध्या नाही. कारण तिला आता तिच्या मुलीकरता काही चांगले कपडे घ्यायचे आहेत, ती चाहेल तो खाऊ घ्यायचा आहे, मायलेकींना मुंबैत जरा मजा करायची आहे!


करू देत..!


-- तात्या अभ्यंकर.

February 21, 2011

याचे करू आता काय मला सांग.. :)



जरा वेडासा खुळासा पण साधासा भोळासा......
..................याचे करू आता काय मला सांग.. (येथे ऐका)

काही गोष्टी घडतात तेव्हा कुणा एका व्यक्तिचं नव्हे, कुणा एका प्रांताचं, राज्याचं, देशाचं नव्हे, सार्‍या विश्वाचं नव्हे, एखाद-दुसर्‍या आकाशगंगेचं नव्हे तर सार्‍या अंतराळाचंच भाग्य उजळून निघतं. यमनचा जन्म झाला तेव्हा नेमकं हेच झालं..!

'गलगले निघाले' मधला जरा वेडासा खुळासा पण साधासा भोळासा भरत जाधव. त्याच्या प्रेमात पडलेली केतकी थत्ते. आणि मग या भरतच्या वर्णनाचं स्वरचित्र रेखाटताना अशोक पत्कींना आधार मिळतो यमनचा आणि एक छोटेखानी, जलद लयीचं नितांत सुंदर गाणं जन्माला येतं..!

बोले मनातील भाषा, याचा थोडासा हा लोचा, याचे करू आता काय मला सांग..!

गरे नी़नी़नी़ रे गरे , गरे म'म'म'म'म'म' म'धनीरेंनीध गरेगरेसा..!

तुम्ही अण्णांचा एखादा 'नामाचा गजर गर्जे भीमातीर.'. सारखा अभंग घ्या किंवा बाबूजींच्या 'समाधी साधन संजीवन नाम..' सारख्या लै भारीतल्या भारी ओळी घ्या.. किंवा मग '....याचा थोडासा हा लोचा याचे करू आता काय मला सांग..' या ओळी घ्या; आपला यमन सगळ्यांना पुरून उरतो हो. अक्षरश: त्या गाण्याचं सोनं करतो..!

'याचे करू आता काय मला सांग..' ची ' म'धनीरेंनीध गरेगरेसा..' ही संगती केवळ क्लास, त्यातलं कौतुक क्लास..! अगदी आपली वाटते ही संगती. वैशाली सामंतने छान गायलं आहे हे गाणं..

यमनासोबतच या गाण्यातली जलद लय मला फार आवडली.. पुढे छानसं यमनचं इंजिन आणि त्याला जोडलेले शब्दास्वरांचे रंगीबेरंगी डबे; अशी ती गाडी छोटी छोटी वळणं घेत मस्त चालली आहे असं वाटतं..हास्य

मन नितळ नितळ
नाही इतरासारखे
नाही मनामध्ये पाप मुखी राम राम..!

' मुखी राम राम..!'

आला..! शुद्ध मध्यम आला...!

' नाही मनामध्ये पाप मुखी राम राम..' या ओळीत शेवटी येणारा शुद्ध मध्यम केवळ अद्भूत..! शुद्ध मध्यमाबद्दल मी बापडा काय बोलणार..? मला अद्याप नीटसा कळलेलाच नाही हा स्वर..! हास्य

एकंदरीत खूप बरं वाटतं हे गाणं ऐकून, खूप प्रसन्न वाटतं..!

गाण्याचं चित्रिकरणही मस्त. आणि केतकी थत्ते..?

मला जर कुणी विचारलं की सार्‍या अंतराळात छान, सुंदर, सुरेख, झकास, फक्कड दिसणारी मुलगी कोण, तर मी क्षणात केतकी थत्ते हे उत्तर देईन..!हास्य



केतकी, जियो..! हास्य

-- तात्या अभ्यंकर.

February 18, 2011

मेघना माझी बहीण..

परवा बर्‍याच दिवसांनी मेघना भेटली. खूप बरं वाटलं.

मेघना एरंडे. माझी एक मैत्रिण, माझी एक बहीण! नात्यातलीच.

मी मेघनाला तिच्या अगदी लहानपणापासून पाहतो आहे, ओळखतो आहे. अतिशय गुणी मुलगी. अभिनयाचा गुण अगदी उत्तम. उपजतच!

मेघनाला सत्यदेव दुबे आणि विद्या पटवर्धन यांच्याकडून अभिनयाचं बाळकडू मिळालं, त्यांच्याकडे शिकायला मिळालं. नाटकांसोबतच एकीकडे शाळा, महाविद्यालयीन शिक्षणही सुरू होतं. लहानपणापासून अनेक नाटकांतून तिनं कामं केली. पण मेघना खरी रमली ती डबींगच्या क्षेत्रात, संचलन-निवेदनाच्या क्षेत्रात..
परवा सहज म्हणून मेघनाशी गप्पा मारत बसलो होतो, तिच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीविषयी जाणून घेत होतो आणि हळूहळू थक्कही होत होतो! आमची ही लहानशी मेघना आज इतकी कर्तृत्ववान असेल असं मला खरंच वाटलं नव्हतं!

"तुला पोगो, डिस्ने, कार्टून नेटवर्क इत्यादी वाहिन्यांवरची नॉडी, निन्जा हातोडी, डिझ्झी, डेक्स्टर्स लॅब मधली डिडी ही पात्रं माहित्येत का? त्या सर्वांकरता माझा आवाज वापरला आहे!"

"बे वॉच" कार्यक्रमात मी पॅमेला अ‍ॅन्डरसनला आवाज दिला आहे!"

"एका लीन नावाच्या चिनी अभिनेत्रीकरता माझा आवाज डब केला गेला आहे. बाल हनुमानमधील 'बाल हनुमानही मीच आहे."

"आणि तुला गंमत महित्ये का? पुणे आणि 'मुंबै-सेन्ट्रल' रेल्वे स्थानकात ध्वनिमुद्रीत उद्घोषणेतून (रेकॉर्डेड अनाउंन्समेन्ट) जी बया बोलते ना, तीही मीच!" Smile

मेघना सांगत होती. आपण तर साला फक्त कौतुकाने तिच्याकडे पाहात होतो!



त्यानंतर मला मेघनाने तिथल्या तिथे निरनिराळ्या आवाजात बोलण्याचा एक छोटेखानी पर्फॉर्मन्सच करून दाखवला..

वाक्य होतं - "खूप दिवसांनी भेटलास, अगदी बरं वाटलं!"

हे वाक्य एक अगदी चिमुरडी, एक तिसरी-चौथीत असलेली, एक कॉलेजकुमारी, एक मध्यमवयीन स्त्री आणि एक आज्जीबाई या स्त्रिया कसं बोलतील तसं अगदी एकापाठोपाठ एक बोलून दाखवलं! प्रत्येक पात्राच्या वेळेस क्षणात केलेला आवाजातील बदल, हेल, शब्दोच्चार, प्रत्येक वयाचा लेहेजा तिनं इतका सुंदर सांभाळला की क्या केहेने! अगदी सह्ही पर्फॉर्मन्स होता तो..

मेघनासमोर प्रामुख्याने दोन क्षेत्रं होती -एक म्हणजे अभिनय किंवा दुसरं म्हणजे डबींग- निवेदन-संचलन (रंगमंचीय किंवा दूरचित्रवाणी सादरीकरण इत्यादी.) आणि मेघनाने निवडलं ते डबींगचं क्षेत्र आणि आजमितीला मेघना एक अतिशय व्यस्त डबीग आर्टीस्ट म्हणून कार्यरत आहे. विदेशी चित्रपटाच्या ज्या हिंदी डीव्हीडीज आणि सीडीज इथे बनवल्या जातात त्यातही मेघनाला डबिंग कलाकार म्हणून काम करण्याच्या खूप संधी आहेत/येत असतात.

मेघनाचा स्वभाव सगळ्यांशी मिळून मिसळून वागण्याचा आहे. आजमितीस मराठीतील जवळ जवळ सगळ्या कलाकारांशी सह-अभिनयातून म्हणा, एखाद्या रंगमंचीय कार्यक्रमातून म्हणा, मुलाखतीतून म्हणा, मेघनाचा उत्तम परिचय आहे, मैत्री आहे. अभिनय क्षेत्र तिनं सोडलं आहे असं नाही, परंतु त्या क्षेत्रात राहण्यासाठी जे काही कॉन्टॅक्ट्स ठेवावे लागतात, काही एक रॅपो ठेवावा लागतो ते ठेवणं मेघनाला तितकसं जमत नाही किंवा तिचा तो स्वभाव नाही असं आपण म्हणू.. तरीही आभाळमाया, चार दिवस सासूचे, माझं सोनूलं सोनूलं, किंवा सनईचौघडे, मी शिवाजीराजे भोसले.. यासारख्या मोजक्याच चित्रपटांतून तिनं भूमिका केल्या आहेत..परंतु वर म्हटल्याप्रमाणे मेघना खरी रमते ती डबिंगमध्ये किंवा रंगमंचीय/दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमातच.

लोभ असावा, गाणे तुमचे आमचे, मी आणि आई - सॉलिड टीम!, 'मी मराठी' वाहिनीवरील मोगरा फुलला, पाकसिद्धी, पिकनिक रंगे तार्‍यासंगे, स्टार माझा वाहिनीवरील खमंग हा पाकसिद्धी कार्यक्रम, ई टीव्ही वरील टॅक्स फ्री हा चित्रपटांविषयी कार्यक्रम, 'साम' टीव्ही वरील आयुर्वेदाचार्य बालाजी तांब्यांसोबत 'आयुर्वेद' हा कार्यक्रम... यादी मोठीच आहे!

मेघनाने काही सरकारी कार्यक्रमांचंही सूत्रसंचालन केलं आहे/करते. ते करत असताना तिला राजकीय क्षेत्रातली मंडळी, त्यांची पदं-मानमरातब, प्रोटोकॉल, इत्यादी अनेक गोष्टींचं भान ठेवायला लागतं. अनेक देशी-विदेशी वित्तीय संस्थांच्या रंगमंचीय कार्यक्रमांचं (कॉर्पोरेट शोज) सूत्रसंचालन, त्यांचे विक्री मेळे, त्यात येणार्‍या संभावित ग्राहकांना योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शीत करणे ही सर्व कामं मेघना लीलया करते. पण हे सगळं सहज साध्य होत नाही, नसतं! त्याकरता करावी लागते ती अविरत मेहनत आणि अभ्यास!

श्रीराम ट्रान्सपोर्ट कंपनी सारख्या नावाजलेल्या कंपनीकरता मेघनाने भारतातल्या १२ ते १३ राज्यांमधून एका वेळी अडीच ते तीन हजार लोकांकरता माहितीप्रद असे कॉर्पोरेट शोज केले आहेत!

सचिन ट्रॅव्हल्स या नावाजलेल्या यात्राकंपनी सोबतही मेघना निगडीत आहे. त्यांचा 'हॅलो प्रवासी' हा कार्यक्रम ती करते. एकदा त्या कंपनीच्या यात्रेकरूंसोबत मेघना दक्षिण अफ्रिकेच्या दौर्‍यावरही गेली होती. तिथं तिनं त्या लोकांकरता विनय आपटेंच्या दिग्दर्शनाखाली आयपीएलचा सामनाही कव्हर केला होता.

"दक्षिण अफ्रिकेतील मसाईमाराच्या जंगलात चार दिवस राहण्याचा अनुभव केवळ रोमांचकारी होता!"
मेघना सांगते!

किती हरहुन्नरी! किती क्षेत्रात तिचा वावर आहे! किती नानाविध विषयात तिला गती आहे, तिचा अभ्यास आहे, कष्ट आहेत, परिश्रम आहेत! खरंच अभिमान वाटतो..!



रुपारेल महाविद्यालयातून बी ए ही पदवी घेणार्‍या मेघनाचा लोकसाहित्याचा विशेष अभ्यास असून एम ए ला लोकसाहित्य हा विषय घेऊन मुंबै विद्यापिठातून ती एम ए ला पहिली आली आहे!

काय नी किती लिहू मेघनाबद्दल?
जियो मेघना, जियो...!

-- तात्या अभ्यंकर.