त्याचा नेहमीचा पेहराव म्हणजे एक साधा बुश शर्ट, तेवढीच साधी पँट. मॅचिंग-फिचिंगच्या भानगडीत आबा कधी पडला नाही. केशरचना? ती नाहीच! कारण मी तरी आबाला ओळखू लागलो तेव्हापासून तो साफ टकल्याच आहे. उंची जेमतेम ५ फूट. बांधा जाडा (हल्लीच्या भाषेत सुदृढ!), चेहरा गोल गरगरीत, त्यावर देवीचे व्रण. असा एकूण आबाचा अवतार असे.
माझ्यावर त्याचा फार जीव. एकंदरीतच आबा तसा माणूसवेडा. माणसांवर प्रेम करणारा. आता कोण कुठला तो गोखल्यांच्या हॉटेलातला मॅनेजर शंकरराव! तो गेला त्या दिवशी आबा हमसाहमशी रडला होता! मिसळीवर आबाचं प्रेम. त्यामुळे गोखल्याच्या हॉटेलात त्याचा बराच राबता असे. एकदा मला सांगायला लागला, "अरे तात्या, त्या शंकररावाला मी २५००० रुपये उसने दिले. त्याच्या लेकीचं लग्न ठरलंय रे. अरे लग्नाकार्यात नाही म्हटलं तरी खर्च खूप होतो रे"!! मी नेहमीप्रमाणे थक्क!!
"तुला सांगतो तात्या, बाकी सगळं एकवेळ मिळेल रे, पण माणूस पुन्हा मिळायचा नाही. तेव्हा माणसं जपायला हवीत" हे वाक्य आबा एकदिसाआड तरी घोकायचा आणि तसा वागायचादेखील!
"अरे तुला सांगतो तात्या, कसले रे मान-अपमान घेऊन बसतो आपण? आता तो देसाई माझा नेहमी द्वेष करायचा. मला घालूनपाडून बोलायची एक संधीही तो सोडत नसे. आठवतंय ना तुला? मला काय कधी त्याला उलटून बोलता नसतं आलं? पण जाऊ दे रे. अरे माणूस आहे! काय सांगावं? घरी कदाचित त्याची बायको त्याला येता-जाता हाणत असेल, तोच बायकोचा राग त्याला या आबावर काढून समाधान मिळत असेल! मग मिळू दे!!
हे मात्र खरं आहे. देसाई हा आमच्या कचेरीतला एक अत्यंत माणूसघाणा प्राणी होता. सगळ्यांशीच शिष्टपणे वागायचा. स्वतःला जाम शहाणा समजायचा. का माहीत नाही, पण आबाचा तर तो फारच राग राग करायचा. पण एके दिवशी आबाने त्यालाही जिंकलंन!
झालं असं की, त्या देसायाच्या मुलाला एकदा खूप मोठा अपघात झाला. त्याला गाडीने उडवलं होतं. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. रविवारचा दिवस. आमच्या कचेरीला सुट्टी. कुठूनतरी आबाला ही बातमी कळली तसा तडक हॉस्पिटलात पोहोचला. देसाई आणि त्याची बायको धीर खचून, हतबल होऊन बसले होते. देसायाचा स्वभाव माणूसघाणा असल्यामुळे नातेवाईक किंवा इतर माणसं तिथे कुणीच नव्हती. देसाई, त्याची बायको आणि तिसरा आमचा आबा!!
क्षणार्धात आबाने परिस्थितीचा ताबा घेतला. डॉक्टरांना भेटला. रक्ताच्या ३-४ बाटल्या लागणार होत्या. आबा म्हणजे जगनमित्र. अर्ध्या तासाच्या आत आबाने ५-६ रक्तदाते उभे केलेन. वेळीच रक्त मिळालं आणि देसायाचा मुलगा वाचला!! तेव्हापासून देसाई फक्त आबाशीच नव्हे, तर कचेरीतल्या प्रत्येकाशी नरमाईने वागू लागला. आबाशी तर तो फारच आदराने वागायला लागला!
मी सहज आबाला म्हटलं, " अरे आबा, लेका त्या देसायाला जिंकलंस रे".
यावर नेहमीप्रमाणे आबाची टिप्पणी-
"अरे तात्या, मूळचा कोणीच माणूस वाईट नसतो रे. परिस्थितीनुसार प्रत्येकाचा स्वभाव घडत असतो. अरे देसाईपण आपलाच आहे रे! त्याला माणसाची किंमत कळली, हेच पुष्कळ झालं"!!
माणसांबद्दलचं आबाचं एवढं साधं सोपं तत्त्वज्ञान ऐकून मी नेहमीच थक्क होत असे. आमच्या डिपार्टमेन्टमध्ये देसाई तसा सगळ्यात श्रीमंत. त्याकाळात त्याची गाडी होती. नेहमी सफारी सुटात वावरायचा. उंची अत्तरं लावायचा. पण फक्त एका फोनवर केवळ १५-२० मिनिटांत ५-६ रक्तदाते उभे करणारा आमचा आबा त्याच्याहून किती श्रीमंत होता हे देसायाला प्रथमच कळत होतं!!
आबाला २ मुलं. मोठी मुलगी स्वाती लग्न होऊन बंगलोरला स्थायिक. धाकट्या अविनाशने संगणकशास्त्रात प्रावीण्य मिळवून, लग्न होऊन तो आणि त्याची बायको आणि २ वर्षांचा मुलगा असे अमेरीकेत असतात. नलूताईचं मात्र मला खरंच खूप कौतुक वाटतं. अत्यंत साधं, सोज्वळ व्यक्तिमत्त्व. दिसायला सुरेख. आमच्या ओबडधोबड आबाला एवढी सुरेख बायको मिळाली याचं नवल आजही अनेकांना वाटतं! आबाचाही तिच्यावर खूप जीव. आबाच्या बोलण्यात नलूताईबद्दल नेहमी कौतुकच असतं. आबा मला नेहमी म्हणतो, "अरे बायकोला उगीच नाही घरची लक्ष्मी म्हणत रे. ती प्रसन्न तर सगळं घर प्रसन्न!! नाहीतर एकीकडे मानभावीपणाने समाजात मिरवायचं आणि घरच्या लक्ष्मीला मात्र शिव्या द्यायच्या, मारझोड करायची. मग काय उपयोग?"! आबाचं हे आणखी एक ठाम तत्त्वज्ञान!!
आबा मला नेहमी गमतीने म्हणतो, "अरे मागच्या जन्मी मी बहुतेक एका पायावर उभं राहून तप केलं असणार म्हणून इतकी गुणी आणि सुंदर बायको मिळाली."
आमची नलूताई स्वयंपाकदेखील एकदम फर्मास करते. तिने साधा आमटी-भात जरी केलान ना, तरी मंडळी आडवा हात मारतात. श्रीखंड, अळूवड्या, बेसनाचे लाडू, पाकातल्या पुऱ्या, वाटली डाळ, फणसाची भाजी, डाळिंब्यांची उसळ हे पदार्थ करावेत तर नलूताईनेच करावेत!! आबा मात्र गमतीने मला म्हणतो, "कसली रे सुगरण? तिला अजून मिसळ करता येत नाही. मी एकदा आपल्या शंकररावाला सांगून त्या गोखल्याच्या भटारखान्यातल्या आचाऱ्याला हिला स्पेशल ट्रेनिंग देण्याकरता घरी बोलावणार आहे!! :)
मीही निवृत्तच झालो होतो. मुलं आपापल्या मार्गाला लागली होती. खिशात चार पैसे होते, म्हणून मी आणि माझ्या बायकोने एका यात्राकंपनीबरोबर दोन महिन्याच्या परदेशयात्रेला जायचं ठरवलं. जायचं जायचं असं म्हणेस्तोवर जाणं अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपलं. आबाही बऱ्याच दिवसात भेटला नव्हता. परदेशवारी संबंधात फोनवर त्याच्याशी एक-दोनदा मोघम बोलणं झालं होतं इतकंच. मी त्याला फोन करणारच होतो, तेवढ्यात आबाचाच फोन आला. रात्री गप्पा मारायला म्हणून आबाकडे जायचे ठरले. नलूताईने जेवायलाच बोलावले. ओले पावटे घातलेली, तीळ-खोबरं वाटून लावलेली, चिंचगुळ घालून केलेली शेंगा-वांगी-बटाट्याची फर्मास भाजी तिने केली होती. त्यासोबत झकासपैकी ज्वारीची भाकरी, ताज्या लोण्याचा गोळा, आणि लसणाची चटणी असा न्यारा बेत होता! आबाच्या ४२ पिढ्यांना पुरेल इतका दुवा देत देत मी त्या माऊलीने केलेल्या सुग्रास अन्नावर ताव मारत होतो.
आबा म्हणाला, "खा लेका. खाऊन घे. उद्यापासून २ महिने अमेरीकेला जायचा आहेस ना? तिथे असलं काही खायला मिळणार नाही"! का कुणास ठाऊक, पण आबाचा स्वर थोडा कडवट वाटला. पण मी खाण्यात इतका बुडलो होतो की लक्षच दिलं नाही.
जेवण झालं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मी सहज आबाला म्हटलं, "अरे मी या या दिवशी न्यूयॉर्कला असेन, तेव्हा तुझ्या अविनाशला भेटीन. त्याचा नंबर, पत्ता माझ्याकडे देऊन ठेव."
आबा एकदम खेकसला, "त्याला भेटायची काय गरज आहे? तो मजेतच असणार"! मगासचा कडवटपणा आता जास्तच डोकावत होता. आबा असं कडवट कधीच बोलत नसे.
मी आबाला म्हटलं, "का रे बाबा, काय झालं? स्पष्ट बोल की काय ते."
"काही नाही रे. त्याला भेटलास तर सांग की आबा अजून जिवंत आहे, आणि मजेत आहे. मेला की कळवू म्हणावं"!!
मग मात्र मी आबाला चांगलाच झापला. तेवढी मैत्री होती आमची. तसा मग आबाही भडभडा बोलू लागला.
"अरे फक्त २-३ वर्षांकरता तिथे जातो म्हणाला. आता ८-९ वर्ष होत आली, पण इथे परत यायचं नाव काढत नाही. अरे पैसा पैसा किती करायचं माणसाने? इथेही त्याला चांगली लठ्ठ पगाराची नोकरी होतीच की! तुला सांगतो तात्या, तुझा माझा निवृत्तीच्या वेळचा जो पगार होता ना, त्यापेक्षा जास्त पगार त्याला इथे सुरवातीला होता."
"अरे हल्लीच्या मुलांना असते रे पैशांची क्रेझ. शिवाय राहणीमानही उंचावलं आहे, गरजा वाढल्या आहेत. पैसे लागतात रे माणसाला." मी आपली अविनाशची बाजू सावरून धरण्याचा प्रयत्न केला.
"अरे हो. पण पैशाच्या मागे माणसाने किती लागायचं याला काही सुमार? इथे भारतात येऊन राहिला तर काय कमी पडणार आहे रे त्याला? फार तर माझ्याजवळ नको राहू. वाटल्यास याहूनही मोठी जागा घे. कुले धुवायला अगदी सोन्याचं टमरेल ठेव. मग तर झालं?"
इतक्या वर्षांत आबाचं हे वेगळं रूप मी प्रथमच पहात होतो. आबा अगदी पोटतिडिकेने बोलत होता.
तुला सांगतो तात्या, "पोरांना आपली किंमत नाही रे. अरे इतका गोंडस मुलगा आहे त्याचा, इथे मी आणि नलूने नातवाचं कोडकौतुक हौसेने केलं नसतं का? तिथे काही दुखलं खुपलं, लागलं सवरलं तर कोण करणार रे यांचं? कुठलातरी ९११ नंबर फिरवायचा, म्हणजे लागेल ती मदत मिळते असं म्हणाला. अरे पण उद्या तुझ्या पोराला सर्दी झाली तर त्याच्या नाका-कपाळावर सुंठ उगाळून, त्याचा कढत लेप ते ९११ वाले घालणार आहेत का?
नलूताई बिचारी गप्प उभी होती. आबाची तोफ सुरूच होती. "आणि काय रे तात्या? पैसा आणि करियर म्हणजे सर्व काही आहे का? नाही, ते जरूर असावं. कौतुकच आहे आम्हाला. पण या अविनाशला असं वाटत नाही का रे, की आपले आई बाप तिथे एकटे राहतात, त्यांना आपली खूप आठवण येत असेल! आम्ही आमच्या परीने याचे लाड केले, लहानाचा मोठा केला, उत्तम शिक्षण दिलं त्याचं काहीच नाही? की ते आमचं कर्तव्यच होतं? अरे मग याचं कर्तव्य काय? आठवड्याला फक्त एखादा फोन करणं? अरे, तुझा माझा आता काय भरवसा? आज आहोत, उद्या नाही! अरे पण डोळे मिटताना मुलगा समोर असावा एवढी साधी अपेक्षा करणं चूक आहे का रे? अरे किती स्वार्थी असावं माणसाने?
आज विषय निघाला म्हणून तुला सांगतो तात्या, माझा बाप अर्धांगाने ५ वर्ष अंथरुणात होता, मी रोज संध्याकाळी ऑफिसातून परतल्यावर त्याच्या हातपायांना मालीश करायचो, पण एक दिवसही त्याचं ओझं मला वाटलं नाही. माझ्या मांडीवर डोकं ठेवून बाप समाधानाने गेला. मला सांग, काय कमी पडलं रे मला? सगळं उत्तमच झालं की. मगाशी तूच इथे वा वा छान छान करत सुग्रास जेवलास ना? तूच सांग, काय कमी आहे रे आमच्याकडे? तिथे हे लोक काय खाणार रे? पिझ्झा, बर्गर की त्या बाजारात मिळणाऱ्या मशीन मधल्या चामट पोळ्या? अरे दुधाच्या पातेल्यातली साखर घातलेली सायीची खरवड माझा नातू कधी खाणार रे?? अरे अविनाशला आवडतात, पण त्याला मिळत नाहीत म्हणून गेल्या कित्येक दिवसात नलूने बेसनाचे लाडू केले नाहीत! मीच तिला कधीतरी करायला सांगतो तर, 'नको, अविनाश इथे आला की मगच करेन' असं म्हणते! या माउलीची कळकळ कळत असेल का रे त्याला??
आबा तर सुटलाच होता. 'येऊ दे त्याची सगळी भडास एकदची बाहेर' या विचाराने मी गप्पच रहायचं ठरवलं होतं. जरा वेळाने तो बोलायचा थांबला. त्यानंतर थोडा वेळ कुणीच काही बोलेना. नलूताईचं मात्र मला हे सगळं होत असताना कौतुकही वाटत होतं आणि आश्चर्यही वाटत होतं!! चेहऱ्यावर तोच शांत भाव. ती हसतही नव्हती, रडतही नव्हती किंवा काही बोलतही नव्हती. खरंच खूप मोठी बाई! आमच्या आबापेक्षाही मोठी!!
मला मात्र आबाचं मात्र हे असलं रूप पाहून आतून खूप रडू फुटत होतं. आज कधी नव्हे ते आबा माझ्याच फाडफाड कानफटात मारत आहे असं मला वाटत होतं! एरवी कधी अविनाशचा विषय निघाला की आबा त्याच्याबद्दल माझ्याशी नेहमी कौतुकानेच बोलत असे. आज इतके वर्ष मी आबाला माझा अगदी जवळचा मित्र मानत होतो, पण त्याचा हा सल मी मित्र म्हणून ओळखू शकलो नाही हे मला माझं failure वाटत होतं!!
मी काही न बोलता उठलो, शांतपणे आबाच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला म्हटलं,
"बरं, निघतो मी. आता दोन महिन्यांनी भेटू. उद्या रात्री ९ वाजता घरातून निघणार आहे."
माझा अमेरीकेला जायचा सगळा आनंदच आबाने घालवला होता. रात्री घरी येऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा आबाला फोन करावासा वाटत होता. पण हिंमत होईना. त्याचाही फोन आला नाही. सगळा दिवस उदास गेला. रात्रीचे ९ वाजत आले, निघायची वेळ झाली. आणि तेवढ्यात दारात स्वतः आबा हजर!!!
त्याचा नेहमीचाच आनंदी स्वर!! "हे काय तात्या, निघालास? मी म्हटलं भेटतोस की नाही. तुम्हा दोघांनाही प्रवासाच्या शुभेच्छा"!!
"अरे काल रात्री जे काय बोललो ते विसरून जा. कधी कधी त्रास होतो इतकंच. आज सकाळीच अव्याचा "आबा BP चेक केलंत का? वेळच्या वेळी औषधं घेत जा" असा फोन आला होता"!!
"अरे शेवटी माणूस आहे रे, आपणच समजून घ्यायचं" हे त्याचं नेहमीचं वाक्य आबा बोलला आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला माझा नेहमीचा आबा परत भेटला होता!!
अगदी निघणार तेवढ्यात आबा म्हणाला, "अरे मी बघ किती वेंधळा आहे. ज्या कामाकरता आलो होतो ते काम केलंच नाही!"
"काय झालं?"
एक कागद माझ्या हातात देत आबा म्हणाला, "अरे हा अविनाशचा पत्ता आणि फोन नं आहे. एवढी पिशवी त्याला नेऊन दे. यात बेसनाच्या लाडवांचा डबा आहे. त्याला आवडतात म्हणून आत्ता संध्याकाळीच नलूने केले आहेत."!!!!
-- तात्या.