August 29, 2006

देवासचे कुमारजी...

नमस्कार मंडळी,
१९८९-१९९० च्या दरम्यानची गोष्ट. मी काही कामानिमित्त भोपाळला गेलो होतो. एका सकाळी विशेष काही काम नव्हते, म्हणून जरा भोपाळात भटकत होतो. झकासपैकी जाडनळीची, पाकाने भरलेली, साजुक तुपातली गरमागरम जिलेबी, त्यावर २ ग्लास गरमागरम केशरी आटीव दुध रिचवून आणि १२० जाफरानीपत्तीयुक्त पानाचा तोबरा भरून मस्त मजेत भोपाळात हिंडत होतो. नोव्हेंबर महिन्यातली भोपाळमधली सुरेखशी थंडी, गरमागरम दुध-जिलेबी, आणि १२० तंबाखूपानाची लज्जत! क्या बात है!! मस्त माहोल जमला होता. नकळत सकाळचा भटियार मनाचा ताबा घेत होता. हिंडता हिंडता s t stand पाशी आलो. समोरच "भोपाल-देवास" अशी पाटी असलेली बस उभी दिसली. आणि एकदम मला कुमारजींची (पं कुमार गंधर्व) आठवण झाली! कुमारजी देवासला रहायचे. "जायचं का कुमारजींना भेटयला"? क्षणभर मनामध्ये विचार आला आणि चढलोसुध्दा त्या बसमध्ये!

बसमध्ये मोजकीच माणसं. झकासपैकी खिडकीतली जागा मिळाली होती. पान तर फारच सुरेख जमलं होतं. पिचकारी मारायला खिडकीही मिळाली होती! :) आता मगासच्या भटियारची जागा "सोहनी-भटियार" ने घेतली होती! सोहनी-भटियार हे खास कुमारांचं combination! सोहनी हा उत्तररात्रीचा बादशहा आणि भटियार हे सकाळचं वैभव! कुमारांनी या दोघांना एकत्र आणून "सोहनी-भटियार" हे एक अजब रसायन बनवले आहे. त्यांची त्यातली "म्हारुजी, भुलो ना माने" ही बंदिश प्रसिध्द आहे.

दुपारी एक दिडच्या सुमारास देवासांत उतरलो. वातावरणांत सुरेख गारवा होता. एक छानसा फुलांचा गुच्छ घेतला. समोरच टांगा दिसला. कुमारांचा पत्ता मला माहीत नव्हता. पण देवास तसं फार मोठं नाही. त्या टांगेवाल्यालाच विचारलं,
"कुमारजी कहा रहते है पता है आपको"?
तो लगेच म्हणाला,"देवासमे उन्हे कौन नही जानता? आप बौठिये बाबुजी, हम छोडे देते है आपको उनकी कोठीपे"!

आता मात्र मला थोडंसं टेन्शन यायला लागलं. इथपर्यंत आपण आलो खरे, पण बोलणांर काय त्यांच्याशी? तशी त्यांची माझी ओळख होती. यापूर्वी अनेकदा मुंबै-पुण्याला त्यांच्या बैठकी मी ऐकल्या होत्या, त्यांना भेटलो होतो. पण त्यांचा स्वभाव थोडासा तापट आणि विक्षिप्त होता हे मला माहीत होतं!

तेवढ्यांत त्यांचं घर आलं. मी टांग्यातून उतरलो. देवासचा फारच सुंदर आणि निसर्गरम्य परिसर! एका लाहानश्या टेकडीपाशी आमचा टांगा थांबला होता. त्या टेकडीवरच त्यांचा सुरेख बंगला होता. मी हळूच फाटकापाशी आलो, आणि बघतो तर काय, समोरच कुमारजी त्यांच्या बंगल्याबाहेरील बागेत निवांतपणे बसले होते. मला पाहून स्वतः फाटकापाशी आले आणि मला पाहून म्हणाले,
"अरेच्च्या, तुम्ही इकडे"? "हो, जरा कामाकरता भोपाळपर्यंत आलोच होतो. तुम्हाला भेटावसं वाटलं म्हणून मुद्दाम आलो"
"वा!, या की मग. आतच बसुया"

हुश्श! माझं मगासचं टेन्शन एकदम नाहीसं झालं! ते मला त्यांच्या दिवाणखान्यात घेऊन गेले. तिथे वसुंधराताई बसल्या होत्या. मी त्या दोघांनाही वाकुन नमस्कार केला. "काय, कसं काय" वगैरे प्राथमिक बोलणं झाल्यावर साहजिकच आमच्या गप्पांचा ओघ गाण्याकडे वळला.

मला याची पूर्ण जाणीव होती की मी एका विलक्षण प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वासमोर बसलो होतो! सर्व परंपरांच्या परे गाण्याकडे बघणारा, ख्यालगायकीमध्ये संपूर्णपणे एक वेगळीच वाट शोधणारा, अत्यंत प्रयोगशील, सर्जनशील असा कलावंत म्हणजे कुमारजी! राग, सूर, लय, ताल, गाण्यातली घराणी, बंदिशी, रागसंगीत व लोकसंगीत, कबीर, मीराबाई यांचं साहित्य, निसर्ग, ऋतुमान यांचा गाण्याशी संबंध इ. अनेक गोष्टींवर त्यांनी फार बारकाईने विचार केला होता हेही मला माहीत होतं. त्यामुळेच मला त्यांच्याशी बोलायचं टेन्शन आलं होतं.

कुमारजी म्हणजे मध्यलयीचे बादशहा! त्यामुळे मी हळूच माझ्या बोलण्यातून त्यांना "लयी बद्दल तुमच्याकडून काही विचार ऐकायची इच्छा आहे" असं सांगीतलं. आणि ते भरभरून बोलू लागले. त्यांच्या बोलण्यातून त्यांनी अक्षरशः त्यांच्या विचारांचा खजिना माझ्यासमोर ओतला. रागसंगीताबद्दलचे आणि ख्यालगायकीचे त्यांचे अनेक विचार त्यांनी मला सांगितले. त्यांची प्रतिभा खरंच थक्क करणारी होती! त्यानंतर त्यांच्या निर्गुणी भजनांचा मी विषय काढला. त्यावरदेखील ते माझ्याशी खूप चांगलं बोलले.
"उड जायेगा हंस अकेला,
जगदर्शन का मेला"

ह्या कबिराच्या भजनाबद्दल ते बोलू लागले. त्यातल्या,
"जम के दूत, बडे मजबूत,
जमसे पडा है झमेला,
उड जायेगा हंस अकेला"!!

या ओळी वाचतानाच या भजनाची चाल त्यांना सुचली असं ते म्हणाले.
बोलता बोलता तंबोऱ्यांचा विषय निघाला. मला म्हणाले, "अरे तंबोरा उत्तम लागला नाही तर गाणार कसं? तंबोरा हा तर गायकाचा आरसा. आरसा जर धुसर असेल तर आपण त्यांत स्वतःला नीट पाहू शकतो का? मग तंबोरा जर नीट लागला नसेल तर गायक त्याची साथ घेऊन चांगली अभिव्यक्ती करु शकेल का"?!! कुमारजींच्या घरी तंबोऱ्याची एक सुरेल जोडी सुंदर गवसणीत घालून ठेवली होती.
मी म्हटलं, "गवसणी फार सुंदर आहे हो, कुठून आणल्या ह्या गवसण्या"?तर ते हसून मला म्हणाले, "अरे त्या शिवून घेतलेल्या आहेत. ते रजईचं जाडं कापड आहे"!!"रजईचं कापड"?"अरे आता थंडी पडेल ना? मग तंबोऱ्यांना नाही का वाजणांर थंडी"?!! या दिवसांत रजईच्या कापडाच्या गवसण्या माझ्या तंबोऱ्यांना असतांत आणि उन्हाळ्यातल्या पात्तळ तलम कापडाच्या गवसण्या वेगळ्या आहेत!!

मला गाणं म्हणजे काय ते हळुहळु कळत होतं!!

वसुंधराताईंनी मस्तपैकी कन्नड पध्दतीचा थालीपिठासारखा एक पदार्थ खायला दिला. त्याचं नांव आता माझ्या लक्षात नाही. गरमागरम कॉफी केली. पुन्हा एकदा त्या दोघांनाही नमस्कार करून मी त्यांचा निरोप घेतला. जातांना त्यांनी त्यांच्या बंगल्याबाहेर चारही बाजूला फार सुंदर बाग केली होती, ती त्यांनी मला दाखवली.

बसस्टॉपपाशी आलो. एव्हांना संध्याकाळ झाली होती. अर्धा तास थांबल्यावर मला भोपाळची बस मिळाली. आम्ही अवघे ८-१० प्रवासीच त्यात होतो. अंधार पडायला लागला होता. बस भोपाळच्या दिशेने भरधाव निघाली होती. खिडकीत गजाला डोकं टेकून शांत बसलो होतो. देवासच्या आसपासच्या परिसरातल्या गर्द झाडीतून आता बोचरा गार वारा अंगावर येत होता. कुमारजीं आणि वसुंधराताईंनी माझा फार उत्तम पाहूणचार केला होता. मनांत फक्त कृतार्थतेची भावना होती. खूप काही हाती लागल्यासारखं वाटत होतं! आणि अजून आपल्याला बरंच शिकायचं आहे हेदेखील समजलं होतं!!

"उड जायेगा हंस अकेला, जगदर्शन का मेला"

या ओळींचा अर्थ, आणि त्यातल्या सुरावटींतली आर्तता त्या धावत्या बसमध्ये मला अस्वस्थ करून गेली!!
--तात्या अभ्यंकर.

7 comments:

Nandan said...

tatya, tuza blog paahoon bare vaaTale. aata tuze likhan niyamitpaNe vaachataa yeiil ashee aashaa karato.

Tatyaa.. said...

प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार...

-तात्या अभ्यंकर.

Anonymous said...

मला शास्त्रीय संगितातलं काही कळत नाही. पण कुमारजींचीच्या भेटीची ही आठवण खूप छान शब्दबद्ध झाली आहे.

माझ्या ब्लॉगवरील प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. मिसळीची सचित्र पाककृति..? hmm कल्पना चांगली आहे.:-)

Anonymous said...

तात्या,
आपली अनुदिनी छान आहे. आपले लिखाण मनोगतावर वाचले आहेच.

कुमारजींच्या भेटीचा प्रसंग फार सुंदर. आपण भाग्यवान आहात. निर्गुणी भजनांमुळेच मी सुद्धा त्यांच्या गायकीकडे आकर्षीत झालो. त्यांचे चरित्र वाचल्यावर तर त्यांच्याबद्दलचा आदर शतगुणित झाला.

आता आपल्या अनुदिनीला वारंवार भेट देईनच.
शुभेच्छा,
--लिखाळ.

Tatyaa.. said...

dhanyavaad, likhaaLaraao!
-tatyaa.

Vaidehi Bhave said...

tatya,
khup chan ase vachale aaj tumachya blogvar. manapasoon dhanyawad. Kumarajinvishayi kahi vachayala milale ki chan vatate..kay mansachi pratibha hoti..maza shastriy sangitacha abhyas nahi..pan mihi "ud jayega hans akela" aganit vela aikale ahe...tumachya chan likhanabaddal punha ekada dhanyawad..

Anonymous said...

तात्या,
मिपावरील कुमार गंधर्वाची चित्र पाहून दुव्यावरुन इथे आलो. आम्ही इथे आपल्या कुमारांच्या भेटीचा अनुभव वाचत बसलो. अप्रतिम लेखन !!!


-दिलीप बिरुटे